‘श्रीमद्भगवद्गीता’ म्हणजे असे पुस्तक ज्यामध्ये आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. असे म्हटले तर ते चुकीचे नाही. याचा विचार करताना सर्वप्रथम आपण कृष्ण-अर्जुन आहोत हे पक्के समजले पाहिजे. आपली अर्जुनासारखी अवस्था नेहमीच होते. म्हणजेच…
”सीदन्ति मन गात्राणि मुखं च परिशुष्यति|
वेपथुश्र्च शरीरे मे रोमहर्षश्र्च जायते ||1.29||
मग काय शोधत बसतो, कोणी कृष्ण येईल का? मला मदत करेल का? असे कोणी आपल्याला भेटले तर, सर्वांत महत्वाचे असते ते संवाद साधला जाणे. समोरच्याचे ऐकणे. कसाही प्रश्न असला तरी, शांतपणे प्रश्नावर आपले मत देणे. त्याला त्याचे उत्तर शोधायला मदत करणे, एकमेकांच्या भावनांचा आदर करणे अशा अनेक गोष्टी प्रामुख्याने पुढे येतात. एवढे होऊन सुद्धा कृष्णचे पण नेहमी ”इति मे मत:” (हे असे मला वाटतं) किंवा ”यथेच्छसि तथा कुरू” हेच वाक्य आहे. म्हणजेच, ‘सांगायचे काम मी करतो बाकी तू ठरव.’
हेही वाचा – मन माऊली सकळांची…
पण हेच जर दुसऱ्या कोणाच्या बाबतीत झाले तर आपण सल्ला द्यायला लगेच पुढे येतो. म्हणजेच, आपल्यातील कृष्ण जागा होतो. याचाच अर्थ आपण कधीतरी कृष्ण कधीतरी अर्जुन असे होतो. सगळी कौशल्य आपल्यातच आहेत, पण आपल्याला आपल्या क्षमतांचा विसर पडतो… आणि मग नकारात्मक भावना निर्माण व्हायला सुरुवात होते. या सगळ्यांतून बाहेर पडण्यासाठी प्रश्नाच्या मुळापर्यंत जायची तयारी हवी. त्यातून बाहेर पडताना अनेक गोष्टी समोर येतील. त्याचबरोबर इतरही प्रश्नांची उत्तरे मिळतील.
कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, विज्ञानयोग अशा अनेक पद्धतीने आपल्याला आपले उत्तर शोधता येते आणि शेवटपर्यंत हार न मानता त्याचा पाठपुरावा करत सकारात्मक निर्णयापर्यंत पोहोचता येते.
हेही वाचा – सहावे इंद्रिय… मन
श्रीकृष्ण अनेक वेळेस अर्जुनाच्या प्रश्नाला वैतागला असेल, पण अर्जुनाचे समाधान होत नाही, तोपर्यंत श्रीकृष्ण समजावतच होतेच ना। काहीवेळेस तर अर्जुन मुद्दाम वेळ काढण्यासाठी पण प्रश्न विचारत होता, ते काय श्रीकृष्णाला समजत नव्हते का? पण तरी दोघांमधील संवाद सुरूच राहिला… कारण एकमेकांवरील विश्वास! असाच विश्वास स्वत:वर असला तर…
खरंच, आपल्यातील श्रीकृष्णाला केव्हा जागे करायचे? केव्हा अर्जुनासारखे स्वत:लाच प्रश्न विचारायचे हे समजायला हवे शेवटी!
यत्र योगेश्वर: कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर:|
तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ||18.78||
हे महत्त्वाचे. दोघेही आपल्यातच आहेत, फक्त “मी-तू पणाची केली बोळवण” याप्रमाणे दोघांमध्ये संवाद हवा. कोणत्या परिस्थितीमध्ये कोणाला समोर करायचे, कृष्णाला की अर्जुनाला? हे आपणच ठरवायचे. त्यासाठी आपल्यातील कृष्णाला आणि अर्जुनाला नेहमी जागे ठेवले पाहिजे.


