नेहमीप्रमाणे ती महानगरातील आपल्या कंपनीतून सुट्टी घेऊन आईवडिलांना भेटायला आणि काही दिवस राहायला आली होती. पण यावेळचं तिचं येणं गुणात्मकदृष्ट्या वेगळं होतं. यावेळी येताना तिने एक निर्णय घेतला होता… पण तिचा प्रॉब्लेम असा झाला होता की, त्या निर्णयाची अंमलबजावणी नेमकी कशी करायची, या पेचात ती अडकली होती. तिच्या आईच्या लक्षात आलं होतं की, आल्यापासूनच तिच्या लाडक्या लेकीचं काहीतरी बिनसलेलं आहे आणि ती प्रचंड अस्वस्थ आहे! आईने तिला खोदून खोदून विचारलं, पण तिने काहीच थांगपत्ता लागू दिला नाही. सरतेशेवटी तिच्या एका जीवश्चकंठश्च मैत्रिणीने तिला माझं नाव सुचवलं आणि ती एका संध्याकाळी माझ्याकडे आली.
स्थानापन्न झाल्यावर तिने मला तिची जन्मपत्रिका दाखवली. बराच वेळ पत्रिकेचा काळजीपूर्वक अभ्यास करून मी बोलायला सुरुवात केली, “तुझ्या पत्रिकेवरून असं दिसत आहे की, तू एका कनिष्ठ मध्यमवर्गीय घरात जन्माला आली आहेस. कर्क राशीत उच्च असलेल्या गुरूची कृपा असल्याने तू अतिशय बुद्धिमान आहेस. तुझा शुक्र खूप पॉवरफुल आहे. त्याने तुला हे तेजस्वी रुप, अप्रतिम सौंदर्य बहाल केलं आहे. पण तुझ्या सौंदर्यावर राहूची नजर आहे. तुझ्या पत्रिकेत नमूद केल्याप्रमाणे लहानपणी वयाच्या नवव्या वर्षी तुला राहूची महादशा सुरू झालेली आहे. मिळकत स्थानात राहू असल्याने तुला तो खूप पैसा देणार, हे निश्चितच होतं. पण राहूचा पैसा सरळ मार्गाने येत नसतो. झटपट श्रीमंत होण्याचे राहूचे शॉर्टकट अतिशय धोकादायक असतात.
हेही वाचा – झाले मोकळे आकाश…
राहूची महादशा सुरू झाल्यावर तुझ्या मनात श्रीमंतीचं आकर्षण निर्माण झालेलं असू शकतं. प्रत्येक उलटणाऱ्या वर्षागणिक हे आकर्षण वाढत गेलेलं असू शकतं. तू अठरा वर्षांची झाल्यावर राहूचा तुझ्या जन्मनक्षत्रात प्रवेश झाला, असं तुझ्या पत्रिकेवरून दिसत आहे. त्यानंतर तुझ्या सरळमार्गी आयुष्यात एक वादळ निर्माण झालं असण्याची शक्यता आहे. तुझ्यावर वारेमाप पैसे खर्च करण्याची क्षमता असलेली, पण अत्यंत चुकीची विचारसरणी असलेली व्यक्ती तुझ्या आयुष्यात आली असण्याची शक्यता तुझं पंचम स्थान दाखवत आहे. राहू महादशेचा काळ संपेपर्यंत कदाचित तू त्या आकर्षणाच्या भोवऱ्यात भिरभिरत राहिली असशील; पण आता राहू महादशा जवळपास संपुष्टात आल्याने तुला कदाचित उपरती झाली असण्याची शक्यता आहे.”
माझे बोलणे संपवून मी तिच्याकडे पाहिलं. ती खाली मान घालून स्तब्धपणे बसली होती. काही वेळाने तिने मान वर केली. तिचे डोळे डबडबले होते. हलकेच डोळे पुसून मला म्हणाली, “तुमचे अंदाज बरेचसे बरोबर आहेत. माझ्या हातून फार मोठी चूक झाली आहे. माझ्या आई-वडिलांनी मला खूप समजावून सांगितलं की, स्वतःच्या कष्टाने, स्वाभिमानाने पैसे कमव. झटपट श्रीमंत व्हायचा हव्यास धरू नकोस. कुणाचीही आर्थिक मदत घेऊ नकोस. पण मी त्यांचं काहीएक ऐकलं नाही. माझी मती गुंग झाली होती. मला फक्त श्रीमंतीचा झगमगाट दिसत होता, चैन करायची होती. अशावेळी माझ्यावर पैसे खर्च करण्याची तयारी असलेली ती व्यक्ती माझ्या आयुष्यात आली आणि मी प्रवाहपतित होऊन वाहत गेले. फक्त नशीब बलवत्तर होतं म्हणून माझं उच्चशिक्षण व्यवस्थित पूर्ण झालं. मला आज एका अत्यंत नामवंत कंपनीत भरपूर पगाराची नोकरी आहे. पण आता ती व्यक्ती मला सोडायला तयार नाही. त्या व्यक्तीला स्वतःचा संसार, पत्नी, मुलंबाळं आहेत. मी आयुष्यभर असंच त्या व्यक्तीसोबत राहू शकत नाही. मला यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवा प्लीज.”
मी थोडा वेळ विचार केला आणि मग एक दीर्घ श्वास घेऊन बोलायला सुरुवात केली, “तू ज्या मार्गाने या चक्रव्यूहात स्वखुशीने प्रवेश केला होतास, त्याच मार्गाने तुला बाहेर पडावं लागेल. तुला त्या व्यक्तीने नोटांच्या साखळदंडाने बांधलेलं आहे. नोटांचे साखळदंड फक्त नोटांनीच तोडता येतात. तुलाही नेमकं तेच करावं लागेल. तू आज एका अत्यंत नामवंत कंपनीत भरपूर पगाराच्या नोकरीवर आहेस. त्यामुळे तुला फायनान्स कंपनीकडून मोठी रक्कम कर्जाच्या स्वरूपात मिळू शकते. तुझी स्मरणशक्ती खूप चांगली आहे. त्या व्यक्तीने तुझ्यावर खर्च केलेल्या जेवढ्या मोठ्या रकमा आठवतील त्या सगळ्या लिहून काढ. लहानसहान किरकोळ रक्कम सोडून दे. त्या सर्व मोठ्या रकमांची बेरीज करून फायनान्स कंपनीकडून तितकी रक्कम कर्जाऊ घेऊन त्या व्यक्तीला त्याचे पैसे परत देऊन टाक. फायनान्स कंपनीचे कर्ज फेडायला तुला काही वर्षे काटकसर करावी लागेल. पण काही वर्षे साधे जगणे म्हणजे तुझ्या चुकीचे प्रायश्चित्त आहे, असे समज.”
हेही वाचा – ही वाट एकटीची…
माझे बोलणे ऐकताना तिचा चेहरा निश्चयी होत गेला. मनोमन एक निर्धार करून ती माझ्या पाया पडली आणि नव्या उमेदीने आयुष्याला सामोरं जाण्यासाठी सज्ज झाली!
त्यानंतर काही काळाने रोजच्या कामाच्या रहाटगाडग्यात मी हे प्रकरण पूर्ण विसरुन गेलो होतो.
काही वर्षांनी माझ्या व्हॉट्सॲपवर एक मेसेज आला. मी तो उघडला… तो मेसेज म्हणजे एक फोटो होता. तो एका तुटलेल्या साखळदंडाचा फोटो होता. त्याच्या खाली तिने टाईप केले होते, “आज मी मुक्त झाले आहे. तुमचा सल्ला मी आयुष्यभर लक्षात ठेवणार आहे. माझ्या यापुढील आयुष्यात मी चुकीच्या मार्गाने श्रीमंत व्हायचा प्रयत्न कधीच करणार नाही.”
ते वाचल्यावर मला खूप समाधान वाटलं. आयुष्यात प्रत्येक व्यक्तीने आपला आत्मसन्मान जपला पाहिजे, हेच खरं आहे.


