डॉ. विवेक वैद्य
मी ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये काम करत होतो त्यावेळेची गोष्ट. साल 1985. सरांबरोबर ओपीडीत होतो, त्यावेळेस रिसेप्शनिस्टने निरोप दिला, ‘डॉक्टर विवेक, तुमचा फोन.’
यावेळेस कोणाचा फोन बाबा? घरी तर कालच बोलणे झाले होते!
“हॅलो…?”
“हॅलो, डॉक्टर विवेक?”
“बोलतोय”
“अरे, मी अज्या बोली हायनू. अजय पाटील…”
“अज्या! आज कसं काय आठवण काढी भो…”
“अरे, आम्ही मुंबई येयल शेतसं. कामना वास्ते. कुठे काई जॉब व्हई तर सांग.”
“आम्ही म्हणजे? आखो कोण येएल शे तुना संगे?”
“शिवदासबी शे संगे.”
“अरे, पण एकदम कसं काय उनात? आणि राव्हानी खावानी सोय?”
“मामा शे डोंबीवलीमा. त्यानाकडे उतरेल शेतस…”
“बरं. तुम्ही कालदिन अठे या. मग तपास करसू.”
“चाली. भेटसू कालदिन…”
मी फोन ठेवला. अजय माझा वर्गमित्र. डॉक्टर झाल्यावर अनुभव मिळावा म्हणून मुंबई, पुण्याच्या मोठ्या हॉस्पिटलला काम करण्याची त्यावेळेस पद्धत होती. सुदैवाने, माझे काका ठाण्याला राहात असल्याने मी लगेच येऊन हॉस्पिटलमध्ये जॉइन झालो. ही बातमी आमच्या मित्रांमध्ये पसरल्याने काही मित्र आले. अजय त्यातलाच एक. अजय हुशार… चटपटीत… मला मुंबईला येऊन 3-4 महिने झाले असल्याने माझ्या ओळखीने कुठेतरी मोठ्या हॉस्पिटलला काम मिळेल, या आशेने आला होता. पगाराची फारशी अपेक्षा नसायची. खाण्यापिण्याचा, राहाण्याचा खर्च निघाला तरी पुष्कळ!
हेही वाचा – सुख सुख म्हणजे काय असतं?
शिवदास हाही आमच्याच वर्गातला. पण खूप खेड्यातून आलेला. खूप तेल लावून चपचपीत बसवलेले केस… अंगावर बिनइस्त्रीचा शर्ट आणि पायजमा… हा त्याचा पहिल्या वर्षाचा अवतार. त्यामुळे वर्गातील मुलांसाठी तो टिंगलीचा विषय बनला. अजयचा तो दूरचा नातेवाईक लागायचा. अजयचे सर्वांशी चांगले संबंध असल्याने नंतर शिवदासचे नाव घेणे मुलांनी कमी केले नाहीतर, या रॅगिंगला कंटाळून शिवदास पहिल्याच वर्षी शिक्षण सोडून पळून गेला असता. तिसऱ्या वर्षी त्याच्या पायजम्याच्या जागी पँट आली, एवढाच फरक… बाकी तेच बुजरेपण, घाबरटपणा, कोणात मिसळणे नाही… दरवर्षी काठावर का होईना, पास होत होता मात्र!
फायनल ईयरनंतर संपर्क म्हणजे पत्र किंवा लँडलाइन! अजयला मी माझ्या हॉस्पिटलचा पत्ता आणि फोन नंबर कळवला होता. त्याच्यासाठी शिफारस करणे सोपे होते, तो हुशार होता पण शिवदासचे काय?
ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी अजय आणि शिवदास भेटावयास आले. शिवदासमध्ये काहीही फरक पडला नव्हता. मी त्यांना शेजारच्या मद्रासच्या हॉटेलमध्ये घेऊन गेलो. वडासांबार, कॉफी आणि मस्त गप्पा झाल्या. परत हॉस्पिटलमध्ये येऊन जेवढे ओळखीचे हॉस्पिटल होते, तिथे सगळीकडे फोन लावले. ठाणे, भांडूप, मुलूंड अगदी खान्देशातला एक घाटकोपरला होता कामाला… पण कुठेच व्हेकेन्सी नव्हती. काय करावे? शेवटी आमच्या सरांना गळ घातली… पण तरीही नकारघंटाच!
तेवढ्यात आमच्या सरांचे मित्र भूलतज्ज्ञ वालावलकर सर आले, त्यांनाही सांगितले… “गावाकडची डॉक्टर मंडळी आहे. पगाराची मोठी अपेक्षा नाही. ड्युटी अवर्सचे बंधन नाही, पण अनुभव हवा.” त्यांना एकदम आठवले, कांजूरमार्गला नवीन हॉस्पिटल उघडले आहे. तिथे स्टाफ कमी आहे. कदाचित, ते थोडे बाजूला आणि इतर मुंबईच्या मानाने प्रगतीत काहीसे मागे राहिल्यामुळे असेल, तिथे डॉक्टर कमी होते. लगेच फोन केला त्यांनी, दुसऱ्या दिवशी दहा वाजता इंटरव्ह्यूला बोलावले… बरे वाटले.
अज्याला म्हटले, “कालदिन अठेच ये. सकाळले… मीबी येस संगे. (सरांच्या ओळखीने अजयबरोबर शिवदासलाही लावून देऊ हा विचार मनात होता.) अज्याही खूश. पण गंमत म्हणजे शिवदास काही बोलेना. तो अजूनही घाबरल्यासारखाच होता. तरी त्याला धीर देत म्हणालो, “शिवा… घाबरू नको. अजयबरोबर तुबी सिखी जासी. कालदीन जरा इस्त्रीना कपडाबिपडा घाली ये.”
त्याने नुसतीच मुंडी हलवली. त्यात काहीच दम नव्हता… पण आम्ही दुर्लक्ष केले.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर तयार होऊन बसलो. दहाला पोहोचायचे म्हणजे साडेआठला तरी ठाण्याहून निघणे भाग होते. साठेआठ… नऊ… करताकरता दहा वाजले तरी, अजयचा पत्ता नाही. मी बेचैन झालो. त्याकाळी मोबाईल नाही.. संपर्क करणार कसा?
वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते.
अखेर साडेअकराला घाबराघुबरा होत अज्या आला… “विवेक, यार उपादी व्हय गयी रे.”
“काय झाय?”
“शिवदास गुमी ग्या!” (शिवदास हरवला)
“असा कसा गुमी ग्या?”
झाले असे की, डोंबिवलीहून ठाणे लोकल तर, पकडली अजयने पण गर्दीमुळे शिवदास मागच्या डब्यात चढला तर अज्या पुढच्या. ठाण्याला उतरून बघतो तर, शिवदास गायब. तासभर त्याने शोध शोध शोधाले… मागून येणाऱ्या प्रत्येक लोकलमधून उतरला का, ते पाहिले… पण शिवदास सापडलाच नाही. शेवटी धावपळ करत माझ्याकडे आला. अज्या आता रडतो का काय, असे वाटू लागले.
मी धीर देत म्हणालो, “सापडी जायी रे भो, तो काय लहान पोर शे का?”
“अरे भो, त्याना मायने मना भरवशावर धाडेल शे. आते त्याले काही कमीजास्त व्हई गयी तर त्याना मायले काय तोंड दखाडू?”
शेवटी मी पुन्हा अज्याबरोबर जायचे ठरवले. ठाणे स्टेशनला आलो… तिथे नव्हता म्हणून पुन्हा डोंबिवलीला गेलो. मामांकडेही नव्हता. आता एवढ्या मोठ्या मुंबईत याला शोधायचे कुठे? तरीही स्लो लोकल पकडून प्रत्येक स्टेशनवर उतरून पाहिले. शिवदासचा पत्ता नाही! संध्याकाळ होत आली. शेवटी अज्याने पुन्हा एक-दोन फोन लावले बाहेरून. त्याचे गाव धुळ्याजवळचे. धुळ्याला एक-दोन नातेवाईंकाना फोन लावला. काय करावे समजेना. सकाळपासून जेमतेम दोन कप चहा प्यायलेला…
हेही वाचा – होप फॉर द बेस्ट!
शेवटी अज्याच बोलला, “विवेक, आते डायरेक्ट त्याना घरच जाऊ?”
“अज्या… गाडी?”
मग आठवले… दादरहून गाड्या निघायच्या. लाल डबा… धुळे गाडी संध्याकाळी सातला. मी म्हटले, “चालं जल्दी”
आम्ही पुन्हा दादरला आलो. सुदैवाने, कुठलीतरी पाच वाजेची गाडी लेट झाली होती. ती मिळाली. शिवदासचे गाव धुळ्याच्या अलिकडे. तिथे थांबा नव्हता. कंडक्टरला दादापुता करून तिथे थांबण्याची विनंती केली. दिवसभराच्या थकव्याने गाडी सुटताच झोप लागली.
पहाटे पाचला अंधारात कंडक्टरने उठवले. फाट्यापासून एक दीड किलोमीटर तंगडतोड केली. शिवदासच्या घरी पोहचलो… झोपडीवजा घर. बाहेर चाऱ्याचा गंजा लावलेला. घरात एकजण तर बाहेर खाटेवर दुसरं कुणीतरी झोपलेलं… डोक्यावरून पांघरूण घेतल्याने कोण झोपलेले ते पण समजत नव्हते. शेवटी दोघांपैकी कोणीतरी उठेल याची वाट पहात आम्ही बाहेर ओट्यावर बसलो. अज्या म्हणाला… “धल्ली इचारी तर काय सांगांन?”
“जे व्हयेल शे तेच सांगान…”
दहा-एक मिनिटे बसलो, तेवढ्यात हातात टमरेल (लोटा) घेऊन कोणीतरी येताना दिसले. अंधारामुळे नीट दिसत नव्हते. टमरेल ठेऊन ती व्यक्ती जवळ आली आणि आम्ही दोघेही जोरात ओरडलो… “शिवदास तू?”
अज्या संतापाने म्हणाला, “XXX तू अठे यी लागना आणि आम्ही आख्खा दिन उपाशीतापाशी तुले ढुंढी -हायनू. कसं काय उना?”
“अरे भाऊ ठाणाला उतरनू… तू दिखना नई…. मी घाबरी गयू. तठून बाहेर उनू. काही समजमा ऊन नई. शेवटी एका पानटपरीवाला बाबाले विचारं. तो म्हणे आठेच एसटी ना स्टँड शे. तठून भिवंडी जा. भिवंडीतून धुळे गाडी भेटी जायी. ऊनू मगं.”
“अरे भाऊ… इतलं करानापेक्षा तू ठाणा स्टेशनवर बठी ऱ्हाता तर इतली मगजमारी कशाला होती.”
“अज्या… मी घाबरी गयू रे. ती मुंबईनी गर्दी… ती भागदौड… नको बाबा. आपल गावचं बरं शे…”
कपाळावर हात मारून घेतला. काय बोलणार?
तरी अजय संतापलाच… “अरे, पण तुना जीवले काही व्हई जातं त मी धल्लीला काय सांगतू?”
“अरे पण कशाला काई व्हई मना जीवले?”
हे शिवदास एवढ्या भाबडेपणाने म्हणाला की, मला त्याची दया आली. अज्या संतापून काही बोलणार तेवढ्यात मी त्याला दाबले, म्हणालो… “भाऊ कालदीसना भुका फिरी रायनू काही चहापाणी तर पाजं”
“चहाबी पाजस् आणि नाश्ताले चणाणी उसळ बनाडस…”
मग माझ्याजवळ येऊन माझ्या खांद्यावर हात ठेऊन शिवदास प्रेमाने म्हणाला, “माफ करा भो. मी तुमले खूप तकलीफ दिधी. पण आते येयल शेत तर ऱ्हावा दोन दिन. दुपारले मस्त गावरानी कोंबडी बनाडसूत. संध्याकाळले शेतवर जासूत.”
“अरे शिवदास… पण मी रजा सागीसन् येल नै?”
“विवेक… अज्या… निवांत ऱ्हावा आठे. काय ठेयेल शे ते मुंबईनी गडबडमा…”
हे तो एवढे प्रेमाने बोलला की त्याच्यावरचा राग मी विसरूनच गेलो! आम्ही खरेच राहिलो, दोन दिवस तिथे. जेवणात कोंबडी, बेसनभाकरी, ठेचाही खाल्ला, शेतावर गेलो, तिथल्या विहिरीत डुंबलो, रात्री अंगणात खाट टाकून आकाशाकडे पाहात गप्पा मारायचो. खरेच! खूप छान शांत वाटायचे. पण थांबणे शक्य नव्हत. निघताना शिवदासच्या आणि आमच्याही डोळ्यात पाणी आले… खूप वर्षे झाली. शिवदासचा माझा आता काहीच संबंध नाही. तो त्या गावाला राहतो का, तेही माहीत नाही. पण अशी प्रेमळ, साधी, मुंबईच्या गर्दीला घाबरणारी माणसे आता मिळणे दुर्मीळ! आजही त्याची आठवण आली की, गलबलायला होते.


