Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Bookshelf : ‘उपरा’ आत्मचरित्र म्हणजे कैकाडी समाजाचं चरित्र

    April 15, 2026

    ‘साक्षात वरद’च्या पुडीतील रहस्य

    April 14, 2026

    जगात भावनांपेक्षा व्यवहाराचं महत्त्व जास्त!

    April 14, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 15
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Bookshelf : ‘उपरा’ आत्मचरित्र म्हणजे कैकाडी समाजाचं चरित्र
    ललित

    Bookshelf : ‘उपरा’ आत्मचरित्र म्हणजे कैकाडी समाजाचं चरित्र

    डॉ. अस्मिता हवालदारBy डॉ. अस्मिता हवालदारApril 15, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, पुस्तक वाचन, पुस्तकसंग्रह, मी मराठी, अभिजात मराठी, Bookshelf, उपरा आत्मचरित्र, लेखक लक्ष्मण माने, उपराकार लक्ष्मण माने, आयुष्यातील संघर्ष, भटका विमुक्त कैकाडी समाज
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    लक्ष्मण माने यांच्या ‘उपरा’ या विलक्षण आत्मचरित्राला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. भटक्या विमुक्त कैकाडी समाजाचे चित्रण यात येते. पुस्तकाचे मुखपृष्ठ नीट पाहायला हवे. गाढवाच्या पाठीवर सामानसुमानासकट मुले बसली आहेत. गाढवाच्या आकारापेक्षा सामानाचा बोजा मोठा आहे. गाढवाचा एक पुढचा आणि एक मागचा पाय बांधला आहे. कैकाडी समाजातले लोक गाढवाच्या पाठीवर संसार बांधून एका गावाहून दुसऱ्या गावी फिरत राहतात. फक्त पावसाळ्यात एका ठिकाणी राहतात. गाढवाचे बांधलेले पाय समाजाने त्यांना घातलेली बंधने दाखवतात. पाठीवर असह्य ओझे आणि पायात बंधन अशा परिस्थितीत या समाजाला जगावे लागते. टोपल्या विणणारी ही जमात भारतभर पसरली असून सर्वांची भाषा एकच आहे.

    भटकी जमात असल्यामुळे त्यांचा विचार कोणी केला नाही. उलट त्यांना कायम गुन्हेगार मानले. एक पारधी स्त्री म्हणते की, ‘सरकारला आमची सगळी माणसे तुरुंगात डाम्बायला सांगा नाहीतर गोळ्या घाला. म्हणजे चोरी होणार नाही, किटाळ जाईल,’ ती पुढे म्हणते, ‘दादा, आमी काय मांगतो? उलीकसं कोपाट, अंगावर धडुतं, हाताला उलीसं काम आन पोटाला आन्न.’ स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षं झाली तरीही एवढंही यांच्या नशिबी आलेलं नाही. लेखक म्हणतात की, पुस्तकाला अमाप यश मिळाले; पण ते अस्वस्थ आहेत. कारण हजारो लाखो लक्ष्मण माने रस्त्यावर दुरवस्थेत आहेत.

    ग्रामीण भाषेत लिहिलेले हे आत्मचरित्र असून मधेमधे कैकाडी भाषेत संवाद येतात. लगेच भाषांतर येते. काही शब्दांचे अर्थ तळटि‍पेत लिहिले आहेत. भटक्या विमुक्त जाती हा शब्द आपण वाचलेला असतो, पण म्हणजे काय याची कल्पना नसते. आपल्या समाजाचा अविभाज्य भाग या जमाती आहेत. लेखकाच्या वडिलांना मुलाला शिकवायचे होते म्हणून त्यांनी आईचा विरोध पत्करून त्याला शाळेत घातले. सतत फिरत असल्यामुळे शाळा वारंवार बदलाव्या लागल्या. शेवटी एका सुसंस्कृत रामभाऊंनी त्यांना एका ठिकाणी ठेऊन घेऊन शिकवले. अत्यंत कठीण परिस्थितीत शिक्षण घेतले. उपासमारीचे वर्णन आपल्या कल्पनेपलीकडचे आहे. इतर मुले चिडवायची, कपडे फाटलेले असायचे, फक्त सदरा घातलेला असायचा बाकी कोणताही कपडा नाही, डबा आणलेला नसायचा. लोक जातीवरून बोलायची. त्यामुळे शाळेत जाणे आवडत नव्हते… पण एका प्रसंगामुळे लेखकाला शाळेचे महत्त्व समजले. आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे, हेही!

    हेही वाचा – Bookshelf : ‘भुताचा जन्म’… मर्यादा सांभाळून केलेला निखळ विनोद

    हे लोक गावाच्या बाहेर जिथे गावकरी प्रातर्विधी करतात तिथे राहतात. लेखकाचे गाव निर्गुडी. वर्षभर फिरून चैत्र महिन्यात सगळे लोक गावात परत येतात आणि दसऱ्यापर्यंत राहतात. जत्रेत देवाला बोकड देतात, त्यासाठी कर्जसुद्धा काढतात. त्यांच्या वडिलांच्या अंगात यायचं त्यामुळे त्यांना देवासाठी सर्व पूजाअर्चना विधीवत करावे लागत असे… यासाठी पैसा लागतो, पैसा नसला की, कर्ज! कर्ज फिटले नाही तर, बायको गहाण ठेवायची पद्धत होती. एका निवाड्यात गहाण ठेवलेली बाई म्हणते, बायांची जात आणि ढोरांची जात सारखीच. पंच म्हणाले, “बाई मुकं जनावर, चालवाल तसं चालतं.” स्त्रियांची तुलना जनावरांशी केलेली पाहून वैषम्य वाटतं.

    बायकांना रोज आंघोळ वेणीफणी करायची परवानगी नव्हती, कारण सगळे उघड्यावर करायचे म्हणजे वाईट नजरा झेलायच्या! एखादीने केलीच तर नवऱ्याचा मार पडणारच आणि वाईट नजरेचे लोक येणारच… चोरीचे आरोप याच लोकांवर घेतात आणि त्यांना बेदम मार मिळतो. त्यांचे कपडे फाडतात… बायकांचे सुद्धा! लेखकाच्या आईला अशा प्रसंगातून जावे लागले होते आणि ते त्यांनी लहान असताना पाहिले होते. गुन्हेगाराच्या डोक्यावर मलाचा हंडा द्यायचा आणि लोकांनी त्यावर दगड मारायचे… हे वर्णन वाचून किळस येण्यापेक्षा आपण माणसं तरी आहोत का? हा प्रश्न मनाशी येत राहतो. ‘अरे, माणसा माणसा, कधी होशील रे माणूस?’

    सातवी नापास झाल्यावर त्यांचे लग्न करायचे ठरले आणि ते पळून गेले. पण नंतर समजूत घालून त्यांना परत आणलं. फलटणला शिक्षण सुरू झालं, तेव्हा हॉटेलात काम केलं. नुसते पाणी पिऊन दिवस काढले. सिगरेट, तंबाखूचं व्यसन लागलं. दहावी होईपर्यंत मित्रांबरोबर व्यसनांपासून ते मारामार्‍यांपर्यंत जे जे काही केलं, ते त्यांनी सविस्तर निःसंकोच लिहिलं आहे. दहावी झाल्याचा आनंद आईला सर्वात जास्त झाला.

    शहरात वसतीगृहात राहताना एका वेगळ्या जगाचा अनुभव आला. डोक्यावर छप्पर, वेळच्या वेळी जेवण, पाणी, स्वच्छता याचा अनुभव नवीन आणि सुखकारक होता; पण बरोबरची मुले नजरेने तू परका आहेस, हे जाणवून द्यायची. शहरात कोणी उघड बोलत नाही, आडपडद्याने सुचवतात. आडनाव ऐकल्यावर भाड्याचे घर, नोकरी नाकारली जाते, हे लेखकाला बोचत राहिले. नोकरी मिळाल्यावर पहिला पगार हाती येतो, तेव्हा त्यांना समजतं की, आता गमावलेला स्वाभिमान परत मिळवायचा मार्ग सापडला आहे… त्यांचा आत्मविश्वास वाढला.

    केवळ लग्नाआधी नवऱ्याबरोबर नवरीला फोटो काढू दिला नाही, या कारणावरून पाटलांच्या घरातल्या मुलीचं लग्न मोडलं… त्यामुळे त्या मुलीला नैराश्य येऊन तिचा मृत्यू झाला! हे कळल्यावर लेखक म्हणतात की, आमच्यात बायका कितीही नवरे करतात, मग हिच्याबरोबर कोणीच लग्न का केलं नाही? या लग्नाला सगळा गाव गेला होता, खूप खर्च झाला होता, लेखक आणि त्यांचे नातेवाईक वाजंत्रीवाले होते. त्या लग्नाचा शेवट इतका दुःखद झाला. स्त्रियांचा पुनर्विवाह, विधवाविवाह या सुधारणा करण्यासाठी किती संघर्ष आपल्या समाजाला करावा लागला होता! तेच या समाजात सहज शक्य होते. आर्थिक बळ आले की, अशी बंधने वाढत असावीत. पावित्र्याच्या, शुचितेच्या कल्पना कठोर होत असाव्यात. याच समाजात स्त्रीला जनावराइतकीच किंमत आहे, तिला वस्तू मानले आहे, हेही लक्षात घ्यायला हवे. स्त्रीस्वातंत्र्य, स्त्रीमुक्ती हे शब्द इथे किती दीनवाणे वाटतात!

    पुढे कॉलेजचे शिक्षण सुरू झाल्यावर मित्र कमवायचे आणि यांचा खर्च चालवायचे. मग यांनीही नोकरी करायला सुरुवात केली. पण चारपैकी दोन मित्रांनी कमवायचे, इतरांचे शिक्षण सुरू ठेवायचे, हेही कौतुकास्पद वाटते. एका मित्राचे लग्न झाल्यावर त्याच्या संसारालाही हातभार लावला. पण पुढे जातीवरून या मित्रांशी बिनसलं. एकटे राहण्याची वेळ आली. यानंतर लेखक बाप म्हणण्याऐवजी ‘वडील’ असे संबोधू लागले आणि ‘अरे-तुरे’ जाऊन आदरार्थी बहुवचन आले… हा फरक वाचताना लक्षात येतो. शिक्षणामुळे आणि सुशिक्षित समाजात वावरल्यामुळे भाषेत आणि शिष्टाचारात फरक पडला. पण त्यांना स्वतःची जात सांगायची लाज वाटू लागली.

    नंतर दलित चळवळीत भाग घेतला. त्यांनी आधीपासूनच आंतरजातीय विवाह करायची खूणगाठ बांधली होती, त्याप्रमाणे मराठा मुलगी शशीशी लग्न ठरवलं. लग्न कसं झालं याची हकीकत वाचायला हवी. मेजर निंबाळकर, प्राध्यापक दाभाडे इत्यादी प्रतिष्ठित माणसे उपस्थित होती.लग्न झाल्यावर लेखकाच्या आईवडिलांनी आणि जातीच्या लोकांनी येऊन तांडव केलं. ते वाईटसाईट बोलले… आई-वडील टाकून बोलले. म्हणून त्यांना जातीबाहेर केले. आता ते जातीतल्या लोकांसाठीही उपरे झाले होते. जातपंचायतीने केवळ दुराग्रहामुळे त्यांना उपरे केले होते.

    त्यानंतर अत्यंत हालाखीचे दिवस आले. दिवसदिवस उपास घडले. राहायला धड घर सुद्धा नव्हते. पण पत्नीने समर्थ साथ दिली. आंतरजातीय विवाह करून त्यांनी जातपंचायतीविरुद्ध बंड केलं आणि जातीव्यवस्थेविरुद्ध सुद्धा. पण वडिलांनी मुलाला शिकवल्यामुळे तो बिघडला, असा बोल जातीने लावला.

    चळवळीमुळे त्यांचा डॉ नरेंद्र दाभोलकर, वि.स.खांडेकर, यदुनाथ थत्ते वगैरे नामवंत लोकांशी परिचय झाला. त्यांनी खूप मदत केली. आपल्या या संघर्षात साथ आहे, आपण एकटे नाहीत, या आधारामुळे नैराश्य झटकून टाकता आले. आपल्या परिस्थितीला आपण नाही तर, जातीव्यवस्था जबाबदार आहे याची जाणीव झाली. पुढे त्यांना समाजात सामावून घेताना किती दिव्यांतून जावे लागले, हे वाचायला हवे. त्यांच्या पत्नीचे प्रेम आणि त्याग दोन्ही विलक्षण वाटते. सुसंपन्न, सुशिक्षित घरातून आलेल्या असल्यामुळे त्यांना निश्चितच अवघड गेले असावे. लेखक लिहितात, जातीचा ठिपका जो पुशीन म्हणत होतो तो गडद झाला.

    हेही वाचा – Bookshelf : हसवता हसवता समाजाची कुरूप बाजू दाखविणारी ‘रामनगरी’!

    शेवटच्या पानावर त्यांचा परिचय दिला आहे. त्यात त्यांना मिळालेले पुरस्कार, ग्रंथसंपदा सामाजिक कार्य, विविध उपक्रम याचबरोबर त्यांनी केलेलं संशोधन लिहिलं आहे. हलाखीच्या परिस्थितीत राहून त्यांनी केलेले कार्य पाहून आश्चर्य वाटते. मलपृष्ठावर लिहिले आहे, “पिढ्यान पिढ्या बिऱ्हाड पाठीवर घेऊन गाढवाचं जिणं जगणाऱ्या मंडळींच्या वेदना हे पुस्तक वाचून समाज समजावून घेऊ शकला तरी खूप झालं.”

    हे आत्मचरित्र कैकाडी समाजाचं चरित्र आहे, एका व्यक्तीचं नाही. हा समाज अजूनही उपेक्षित आहे. हे पुस्तक वाचताना लेखक इतक्या मोकळेपणाने, विनासंकोच कसा लिहू शकतो, याचे आश्चर्य वाटत राहते. त्यांनी वापरलेले अपशब्द -शब्द, काही प्रसंग वाचताना धक्का बसला आणि त्यापैकी काहीही मी पुस्तकाचा परिचय देताना इथे लिहू शकले नाही, हे प्रांजळपणे कबूल करायला हवे. (पण याला अश्लील म्हणणे योग्य होणार नाही.) संस्कारांचा पगडा हे कारण आहेच. विशिष्ट सामाजिक स्तरात असल्यामुळे हे जग पूर्णपणे अपरिचित आहे. हे पुस्तक वाचेपर्यंत मी या समाजाबद्दल अनभिज्ञ होते.

    उपरा म्हणजे परका, जो आपल्यातला नाही. भटका विमुक्त समाज स्वतःला उपरा समजतो, त्यांना आपलेसे करून घ्यायला हवे; कारण ते आपलेच आहेत, आपल्यातलेच आहेत. थोड्याफार फरकाने आपल्यासारख्याच श्रद्धा आहेत. त्यांच्या समस्या समजून घ्यायला हव्यात. लेखक म्हणतात, समाज बदलण्यासाठी केवळ सहानुभूती नाही ठोस कृती हवी.

    त्यासाठी हे पुस्तक वाचायला हवे.

    Avatar photo
    डॉ. अस्मिता हवालदार

    डॉ. अस्मिता हवालदार नायर दंत रुग्णालयातून BDS. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून MA Indology; Diploma in Archeology Mumbai University. 27 वर्षे इंदूरमध्ये प्रॅक्टिस करते. विविध मासिक, दिवाळी अंकातून कथा आणि लेख प्रसिद्ध होतात. ‘विजयनगर हृदयस्थ साम्राज्य’, ‘विजयनगरचे शिल्प काव्य’, ‘विजयनगरचे लेपाक्षी मंदिर’ ही पुस्तके आणि ‘आव्हानांचे लावून अत्तर’ हा कथासंग्रह प्रकाशित.

    Related Posts

    ‘साक्षात वरद’च्या पुडीतील रहस्य

    April 14, 2026 ललित

    जगात भावनांपेक्षा व्यवहाराचं महत्त्व जास्त!

    April 14, 2026 ललित

    आशा उद्याच्या, डोळ्यात माझ्या…

    April 13, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    ‘साक्षात वरद’च्या पुडीतील रहस्य

    By दिलीप कजगांवकरApril 14, 2026

    कंपनीचा ई-मेल आणि चक्क पर्सनल मेल आयडीवर! राजला आश्चर्य वाटले. “तुम्हाला कामावरून कमी केलं असून…

    जगात भावनांपेक्षा व्यवहाराचं महत्त्व जास्त!

    April 14, 2026

    आशा उद्याच्या, डोळ्यात माझ्या…

    April 13, 2026

    शिव आणि आरूचं लग्न झालं, पण….

    April 13, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Bookshelf : ‘उपरा’ आत्मचरित्र म्हणजे कैकाडी समाजाचं चरित्र

    April 15, 2026

    ‘साक्षात वरद’च्या पुडीतील रहस्य

    April 14, 2026

    जगात भावनांपेक्षा व्यवहाराचं महत्त्व जास्त!

    April 14, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळ शिक्षण

    April 14, 2026

    Dnyaneshwari : मी जरी सलगीचा चांगु, तरी काय आइसीहुनी अंतरंगु…

    April 14, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 एप्रिल 2026

    April 14, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 267
    • अवांतर 182
    • आरोग्य 100
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 384
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 194
    • मैत्रीण 18
    • ललित 554
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Bookshelf : ‘उपरा’ आत्मचरित्र म्हणजे कैकाडी समाजाचं चरित्र

    April 15, 2026

    ‘साक्षात वरद’च्या पुडीतील रहस्य

    April 14, 2026

    जगात भावनांपेक्षा व्यवहाराचं महत्त्व जास्त!

    April 14, 2026
    Most Popular

    Bookshelf : ‘उपरा’ आत्मचरित्र म्हणजे कैकाडी समाजाचं चरित्र

    April 15, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.