भाग – 1
अनघा हॉल बाहेर ॲक्टिवावर बसली होती, आतमध्ये बुवांच्या गाण्याचा कार्यक्रम सुरू होता. पार्किंग लॉटमध्ये नेहमीप्रमाणे भरपूर गाड्या आणि स्कूटर्स लागल्या होत्या. सायंकाळी पाच वाजता कार्यक्रम सुरू झाला, तो अजूनही संपला नव्हता. पण आता पाच-दहा मिनिटांत संपेल याचा अनघाला अंदाज होता. कार्यक्रम संपला की, 15 मिनिटांत अर्जुन बाहेर येईल हे तिला माहीत होते… आज अर्जुनबरोबर बाहेर जेवायला जायचे ठरले होते, पण कार्यक्रम अजून संपत नव्हता… तिचे एकसारखे घड्याळात बघणे सुरू होते. एवढ्यात आतून आवाज बंद झाले आणि लोक हॉल बाहेर पडू लागली… हळूहळू हॉल खाली झाला. दहा मिनिटांनी अर्जुन बाहेर आला, इकडे तिकडे पाहताना त्याला अनघा दिसली, तसा तो तिच्या दिशेने येऊ लागला.
जवळ येताच त्याने स्कूटर चालवायला घेतली, अनघा मागे बसली. अर्जुन म्हणाला, “कुठे जायचे जेवायला?”
“कुठेही! आता थोडा उशीर झाला तर, देविकामध्ये जाऊ, तिथे गुजराती डिशेस चांगल्या मिळतात…”
अर्जुनने स्कूटर हॉटेल देविकाच्या दिशेने वळवली. स्कूटर बाहेर लावून दोघं आत गेली. एक कोपऱ्यातले टेबल पकडून तिथे बसली. वॉशरूममध्ये जाता जाता तो अनघाला म्हणाला, “दे ऑर्डर, तुला काय आवडते ते.” अनघाने दोन गुजराती पदार्थांची ऑर्डर दिली, सोबत रायता, पापड आणि रोट्या मागवल्या. अर्जुन रुमालाने हात पुसत पुसत समोर येऊन बसला, तेव्हा तिने विचारले, “प्रोग्रॅम कसा झाला?”
“नेहमीप्रमाणे उत्तम! बुवांचा कार्यक्रम कधी फेल होत नाही… एवढ्या वर्षांची तपश्चर्या आहे बुवांची, रोजचा रियाज कधी चुकणार नाही बुवांचा!”
“आणि तुझा? तू पण कधी रियाज चुकवत नाहीस! मी तुला ओळखते… तुझी मेहनत कधी कमी होत नाही, पण तू स्वतः कार्यक्रम करत नाहीस, त्यामुळे तुझी मेहनत दिसत नाही. तू बुवांना साथ करत असतोस, पण स्वतः कार्यक्रम करण्याचे धाडस करत नाहीस.”
“झालं तुझं सुरू!’
“मग मी बायको आहे ना तुझी, मला तुझी काळजी वाटणारच! बुवांना साथ करत राहिलास तर, स्वतः कधी मोठा होणार नाहीस. एका वटवृक्षाखाली दुसरं झाड मोठं होत नाही.”
“ते खरं आहे, पण बुवांना कसं सांगू, मी आता वेगळे कार्यक्रम करतो म्हणून? शेवटी गेली वीस वर्षे त्यांच्यासोबत आहे… त्यांच्यामुळे माझं नाव भारतभर आहे.”
“नाव आहे भारतभर, पण ते बुवांचा साथीदार म्हणून… गायक म्हणून नव्हे! तसा तू गेली वीस वर्षे बुवांकडे शिकतो आहेस, त्यांना कार्यक्रमात साथ करतो आहेस, मग बुवा का म्हणत नाहीत – अर्जुन, आता तू स्वतंत्र कार्यक्रम कर म्हणून!”
“नाही म्हणत हे मात्र खरं.”
“बुवा आता 80 वर्षांचे आहेत, पण त्यांची तब्येत ठणठणीत. मग त्यांच्या शिष्यांना कार्यक्रम कसे मिळणार? ओरिजिनल समोर असताना डुप्लिकेटना कोण बोलवणार? बुवांना मिळणाऱ्या बिदागीतून तुला पाच टक्के तरी देतात का ते? कार्यक्रम ठरला की, तुझी किती धावपळ! मग ते चार-पाच दिवस तुला धड झोप नसते, कार्यक्रमाची तयारी तुझ्यावर सोपवून ते निर्धास्त असतात. फक्त आयत्यावेळी येऊन गायच. सर्व कौतुक ‘वा, वा’ बुवांना. तू मागे बसून साथसंगत करत असतोस. त्यांचा स्वर कुठे कमी पडतोय, असं वाटलं की, स्वर बरोबर ॲडजस्ट करतोस, म्हणून बुवांचं गाणं परिपूर्ण होतं. पण बुवांना त्याची किंमत नसते.”
“किंमत नसते, असं म्हणू नकोस अनघा… लोकांकडे माझं कौतुक करत असतात, अर्जुन पाठीमागे असतो म्हणून मी निर्धास्त असतो.”
“…आणि शिव्याही घालतात. जरा कुठे साथीदार चुकला की, शिव्या तुला! कोण साथीदार उशिरा आला की शिव्या तुला! पडद्याच्या पाठीमागे बाटलीची सोय केली नसेल तर, शिव्या तुला!!”
“मग मी तरी काय करू, बुवांखेरीज माझं अस्तित्वच नाही…, अशी परिस्थिती आहे.”
“मग समज, उद्या बुवांचं काही बरं-वाईट झालं तर, तू काय करशील? बुवांचा मुलगा परेश नाहीतरी तुझ्यावर जाळफाळत असतो… तुला हाकलून देईल तो.”
“गेली वीस वर्षे मी बुवांसमवेत आहे, आता अचानक वेगळा होऊ?”
एवढ्यात जेवण आले. अनघाने दोन प्लेटमध्ये जेवण वाढून घेतले आणि ती जेवता जेवता बोलू लागली… “बुवांना न दुखवता हळूहळू वेगळे कार्यक्रम घ्यायचे… माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे. तू आता 32 वर्षांचा आहेस, उंच, गोरा देखणा आहेस. भाषा स्वच्छ आहे, माझ्या मते तू संगीत नाटकांसाठी योग्य आहेस.”
“मी आणि संगीत नाटक! कधी स्टेजवर उभा राहिलो नाही अजून, स्टेजवर जातो तो बैठक घालून बसतो गाण्यासाठी…”
“सरावानंतर सर्व जमेल, स्टेजवर काय लगेच उद्या जायचं नसतं… त्याकरिता तालमी असतात, घोटून घोटून तालमी घेतल्या जातात, मग रंगीत तालमी असतात आणि स्टेजवर सहकलाकार पण असतात.”
“पण मला नाटकात कोण घेईल?”
“निश्चित घेतील, आपली परांजपे नाट्य कंपनी आहे ना, ती संगीत नाटकांसाठी प्रसिद्ध आहे. आता वर्षाताई वयस्क दिसू लागल्यात, त्यांच्या नाटक कंपनीत तरुण गायक नसल्याने त्यांची नाटके बंद झाली आहेत. पण त्यांना नाटके सुरू करायची आहेत, तरुण गायक नटाच्या त्या शोधात आहेत.”
“पण त्यांना विचारणार कोण?”
“मी विचारीन, तू संगीत नाटकात काम करायला तयार असशील तर, मी उद्या त्यांच्या घरी जाते. एकदा तू नाटकात गायक नट म्हणून प्रसिद्ध झालास की, मग तुला मैफलीसाठी विचारतात की नाही बघ!”
अर्जुनने मान डोलावली. जेवण संपवून हॉटेलचं बिल देऊन ती दोघं सदाशिव पेठेतील आपल्या घरी गेली. अर्जुनची आई जागीच होती. ती दोघं बाहेरून जेवून येणार आहेत, याची तिला कल्पना होती.
दुसऱ्या दिवशी अनघा वर्षाताईंकडे गेली, वर्षाताईंकडे संगीत शिकायला येणारी मुलं होती, ती आता घरी गेली होती. त्यामुळे वर्षाताई निवांत बसल्या होत्या. अनघा घराचे फाटक उघडून आत गेली, तेव्हा वर्षाताईंनी तिला “या” म्हटलं.
“कोण आपण?” वर्षाताईंनी विचारले.
“वर्षाताई, मी अनघा साठे, अर्जुन साठेची पत्नी.”
“अर्जुन म्हणजे बुवांचा साथीदार! अरे वा, अर्जुन म्हणजे मोठा कलाकार, इकडे कशी काय आलीस?”
“वर्षाताई, अर्जुनची इच्छा आहे संगीत नाटकात काम करायची. नाटकामुळे प्रेक्षकांची आणि स्टेजची भीती चेपते म्हणून…”
“अर्जुन संगीत नाटकात काम करणार?” क्षणार्धात वर्षाताईंच्या डोळ्यासमोर उंच, गोरा, भरदार शरीरयष्टीचा अर्जुन साठे उभा राहिला. शिवाय, बुवांच्या तालमीत उत्तम गाणारा!
हेही वाचा – मला माहेर हवे… स्मिताताई आणि अंजलीचे स्नेहबंध
“अगं, मी खरंतर अशा तरुण गायक नटाच्या शोधात आहे. मी आमची नाटके बंद केलीत कारण पुण्यातील बहुतेक गायक नट वृद्ध झालेत, अगदी माझ्यासकट…” वर्षाताई हसल्या. “संगीतावर प्रेम करणारे नट राहिले नाही. त्यांना टीव्ही मालिका किंवा रियालिटी शोची आवड. त्यामुळे अर्जुन काम करायला तयार असेल तर, मी माझ्या कंपनीची संगीत नाटके सुरू करणार! एक चांगला देखणा गायक नट मिळाल्यावर इतर कलाकार जमवायला वेळ लागत नाही. अर्जुन काम करायला तयार असेल तर, मी प्रथम ‘संगीत सौभद्र’ उभं करीन. कृष्णाच्या भूमिकेत अर्जुनसारखा देखणा गायक नट हवा. एकदा घेऊन ये अर्जुनला!”
“उद्याच येतो आम्ही…” असे म्हणताना अनघाच्या मनात भीती होती… अर्जुन कृष्ण तर रुक्मिणी कोण करणार? स्वतः वर्षाताई करणार की काय? वर्षाताईंचं आता वय दिसायला लागलंय… असे विचार सुरू असतानाच फाटक उघडून एक वीस-बावीस वर्षाची देखणी गॉगल लावलेली तरुणी आत आली. वर्षाताई तिच्याकडे पहात म्हणाल्या, “अनघा या नवीन सौभद्रमध्ये ही माझी मुलगी मयुरी रुक्मिणीच्या भूमिकेत असेल…” अनघा मयुरीकडे पाहातच राहिली. एकदम देखणी मुलगी. “अनघा ही उत्तम गाते बरं का, माझ्याकडे शिकतेच शिवाय अनंतराव धर्माधिकारी बुवांकडे पण शिकते.”
मयुरी येऊन आईच्या शेजारी बसली, तिच्या चेहऱ्यावर, “ही कोण?” असं प्रश्नचिन्ह होतं.
“अगं, ही अनघा, बुवांचा साथीदार अर्जुन आहे ना, त्याची पत्नी.”
“हो का, नमस्ते.” मयुरीने अनघाला नमस्कार केला.
“अगं, अर्जुनला संगीत नाटकामध्ये काम करण्याची इच्छा आहे, हे सांगायला अनघा आली होती. मी तिला म्हटलं, अर्जुन नाटकात काम करत असेल तर आम्ही ‘सौभद्र’चा विचार करू.
“हो, हो… अर्जुन सर काम करत असतील तर, छानच होईल.”
“अर्जुन कृष्ण आणि तू रुक्मिणी… नारद, सुभद्रा, अर्जुन ही पात्रे शोधायला लागतील.”
“अनंतरावांच्या क्लासमध्ये काही नवीन नट तयार होत आहेत, त्यांना मी विचारते उद्या…”
“हो, उद्या त्यांना घेऊनच ये. आता श्रावण महिन्यापासून नाटकाचा व्यवसाय सुरू होतो. गणपतीच्या अकरा दिवसांत साखर कारखान्यांना नाटके हवी असतात. आपलं नाटक एका महिन्यात स्टेजवर जायला पाहिजे. अनघा, तू उद्याच अर्जुनला घेऊन ये…” असं सांगून त्या आतल्या खोलीत गेल्या आणि संगीत सौभद्रचे पुस्तक घेऊन आल्या. “हे घे अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे अजरामर ‘सौभद्र’ अर्जुनला वाचायला सांग.”
अनघा आनंदाने घरी गेली, दुसऱ्या दिवशी पुन्हा अर्जुन आणि अनघा वर्षाताईंकडे आली. मयुरीने आपल्या क्लासमधून तीन तरुण पुरुष कलाकार आणि दोन स्त्री कलाकार आणले होते. काल अनघाने नेलेले सौभद्रचे पुस्तक अर्जुनने पूर्ण वाचलेच होत. वर्षाताईंनी अर्जुनला कृष्णाची भूमिका त्याचा वावर बोलणे, हे समजावून सांगितले. गाणी पाठ करायला दिली. नारद सुभद्रा बलराम अर्जुन हे पण निवडले गेले…
आता रोज चार-पाच तास सौभद्रच्या तालमी सुरू झाल्या. मयुरीला तसे सर्व नाटक पाठच होते, गाणी पाठ होती. अर्जुनने झटपट पाठांतर केले. सहाव्या दिवसापासून त्यांच्या उभ्याने तालमी सुरू झाल्या. अर्जुन आणि मयुरी यांच्या कृष्ण आणि रुक्मिणीच्या संवादासह हालचाली वर्षाताईंनी बसवल्या.
नारदाच्या भूमिकेसाठी भरत हा एक चांगला नवीन तरुण मुलगा मिळाला. संगीत साथ करणारे परांजपे नाट्यमंडळीचे नेहमीचे होतेच. ते येऊन गाणी बसवू लागले.
सुदैवाने यावेळी सर्व तरुण मंडळी मिळाली आहेत, तर नेपथ्य पण नवीनच करायचे, असं वर्षाताईंनी ठरवले. त्यांनी नवीन प्लॉट्स तयार केले. प्रायोगिक नाटकांसाठी उत्तम प्रकाशयोजना करणारा सहाय्यक बोलावला गेला. वर्षाताईंनी कपडेपट नवीनच बनवले. मागील पडदे, गॅलरी… सर्व चकाचक नवीन!
हेही वाचा – माहेर : मी आणि माझं लेकरू!
वर्षाताईंना अंदाज आला होता, हे नाटक चांगला धंदा करणार. नाटकाच्या तीन रंगीत तालमी झाल्या आणि पुण्याच्या टिळक नाट्यमंदिरमध्ये परांजपे नाट्यमंडळीचे सलग चार प्रयोग लावले. लोकांत कुतुहूल निर्माण झाले. अर्जुन साठेला गायक म्हणून लोक ओळखत होतेच, तो कृष्णाची भूमिका करणार होता. वर्षाताईंची तरुण मुलगी मयुरी रुक्मिणी करणार होती. भरत हा नवीन गायक नारद करणार होता.
स्थळ – टिळक नाट्य मंदिर, पुणे
सायंकाळी पाच वाजता पडद्यामागे पात्र परिचय सुरू झाला. परांजपे नाट्यमंडळी पुणे सविनय सादर करीत आहे, अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे अजरामर नाटक… ‘संगीत सौभद्र’!
कलाकार : नारद – भरत जोशी, कृष्ण- अर्जुन साठे आणि द्रौपदी मयुरी परांजपे.
नाटक हाऊसफुल्ल होतं. पहिल्यांदा नारदाचा प्रवेश “लग्नाला जातो मी…”, म्हणत त्याने प्रेक्षकांची मने जिकंली. मग अर्जुन, बलराम, सुभद्रा ही पात्रं येऊन गेली… आणि मग रुक्मिणीच्या महालातील प्रवेश सुरू झाला. रुक्मिणीवर प्रकाशझोत पडला मात्र, लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तरुण देखणी, रुक्मिणी त्यांनी गेल्या कित्येक वर्षांत पहिली नव्हती!
मग रुक्मिणीच्या महालात आला कृष्ण… उंच, देखणा अर्जुन साठे कृष्णाच्या भूमिकेत शोभून दिसत होता. मग नाट्यसंगीतांची मेजवानी सुरू झाली, “नभ मेघानी आक्रमिले…”, “नच सुंदरी करी कोपा…”. मग कृष्ण रुक्मिणी यांच्या बोलण्याच्या नादात रात्र संपत आली आणि आता पहाट होते आहे, अचानक स्टेजवरील लाइट मंद झाले. खिडकीतून मंद निळा प्रकाश कृष्ण आणि रुक्मिणीच्या चेहऱ्यावर पडला आणि कृष्ण गाऊ लागला, “प्रिये पाहा, रात्रीचा समय सरुनी… प्रिये पाहा…”
प्रेक्षकांनी अख्ख नाट्यगृह डोक्यावर घेतलं! “वन्स मोअर, वन्स मोअर”ने नाट्यगृह दणाणलं… विंगेतून वर्षाताई आनंदाश्रू पुसत होत्या… त्यांच्या बाजूला अनघा होती, तिच्याही डोळ्यात आनंदाश्रू होते.
चार तासानंतर नाटक संपले, प्रेक्षकांचा लोंढा कलाकारांना भेटायला स्टेजवर आला. सर्वांना अतिशय उत्तम असे सौभद्र बघायला मिळाले. सर्व तरुण रसरशीत कलाकार. टिळक नाट्यमंदिरमधले ओळीने चारही प्रयोग हाऊसफुल्ल झाले. मग दोन दिवसांची विश्रांती घेऊन कोथरूडच्या नाट्य मंदिरातही चार प्रयोग हाऊसफुल्ल झाले. पुण्याच्या सर्व पेपर्समध्ये कौतुक करणारी उत्तम परीक्षणं आली. प्रेक्षकांच्या झुंडीच्या झुंडी नाट्यगृहाकडे वळल्या होत्या. मग पिंपरी चिंचवडचे प्रयोग पण हाऊसफुल्ल झाले. मग मुंबई दौरा, ओळीने आठ प्रयोग, सर्व प्रयोग हाउसफुल्ल. मग नाशिक, सोलापूर, सांगली, कोल्हापूर… सर्व ठिकाणी हाउसफुल्लचा बोर्ड.
…मग गोवा दौरा सुरू झाला, गोव्यातील वर्तमानपत्रातून अर्जुनच्या गाण्याचे कौतुक सुरू झाले होते, इथेही प्रेक्षकांनी प्रयोगांना गर्दी केली. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या घरी अर्जुनचे गाणे ठेवले. खरंतर, अर्जुन याआधी स्वतंत्र असा कधीही गायला नव्हता. त्याला भीती वाटत होती, पण अनघा त्याच्या मागे होती. “घाबरू नकोस, हीच संधी आहे, तुझं नाव लोकांपर्यंत पोहोचू दे.”
अर्जुनने गोव्यातील साथीदार घेऊन उत्तम कार्यक्रम सादर केला. गोव्यातील अनेक मातब्बर लोकांशी अर्जुनची ओळख झाली. त्याला गोव्यात अनेक सुपाऱ्या येऊ लागल्या. पण अनघाने सौभद्रचे प्रयोग सुरू असल्याने या सुपार्या स्वीकारल्या नाहीत. पुन्हा एकदा पुण्यात परांजपे नाट्यमंडळीचे सौभद्रने पुण्यात धुमाकूळ घातला!
याच काळात पुण्यात दुसरीकडे एक नाट्य रंगलं होतं.
स्थळ – डेक्कन जवळील बुवांचा बंगला.
क्रमश:
मोबाइल – 9307521152 / 9422381299


