|| श्री स्वामी समर्थ ||
आज लग्न हा यक्षप्रश्न झालेला आहे. आपल्या मुलांच्या डोक्यावर अक्षता कधी पडतील, याची अक्षरशः चातकासारखी वाट पालक बघताना दिसत आहेत. सुस्वरूप आहे, निर्व्यसनी आहे… सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, मग घोडे अडतंय तरी कुठे? यामुळे पालकसुद्धा त्रस्त झालेले आहेत. “काय ठरले का मुलाचे / मुलीचे लग्न?” हा प्रश्न मनापासून असो अथवा खवचटपणे विचारला गेलेला असो, तो विचारणे आता बंद झाले पाहिजे. काय आहे, तुमच्या भावना कितीही चांगल्या असतील, पण हे ऐकणारा आता या प्रश्नाने सुद्धा त्रासला आहे. विवाह ठरला की, तुम्हाला नक्की बोलावणार! मग कशाला विचारायचे? यावर नक्की विचार करा.
अनेकदा मुलगा / मुलगी मला क्लिक (click) म्हणजे पसंत पडत नाही म्हणून स्थळ नाकारले जाते. आजकाल तर फोन उचलत नाहीत, नकाराची साधी कारणं सांगत नाहीत, अशी अनेकविध घटना ऐकायला मिळतात. त्याला मुलगी आवडायला हवी, असे जेव्हा पालक म्हणतात, त्याचवेळी लक्षात येते की, स्थळाच्या पसंतीत पालकांचा सहभाग किंवा त्यांचे मत हे किती अंशी असणार आहे. आज विवाहाची वये पाहता, ही पिढी संपूर्णतः अविवाहित राहणार की काय, अशी भीती वाटू लागलेली आहे.
असो. आपल्याला क्लिक झालेली मुलगी म्हणजे नेमके काय? तिचे दिसणे, हसणे अर्थात बाह्य रूप. ती जरा सर्वसाधरण आहे की, मॉर्डन लूकची आहे? थोडक्यात, तिची देहबोली आणि रंगरूप. जो चेहरा रोज आयुष्यभर पाहायचा, तो आपल्या पसंतीचा हवा, हे नक्की पण फक्त दिसणे, हसणे, कपडे आणि so called modern look हाच पसंतीचा जर निकष असेल, तर मात्र आपला निर्णय चुकू शकतो. कारण, आपण व्यक्तीचे गुण पहिलेच नाहीत, फक्त बाह्यरूपावर निर्णय घेऊ पाहात आहोत. रंग-रूप शाश्वत नाही. एखादे स्थळ अगदीच प्रथमदर्शनी नाहीच आवडले…. की, मुलगी खूप जाडी आहे, आपल्या व्यक्तिमत्वाला शोभणार नाही… तर, तिथेच थांबा. पण इतर वेळी मुलीला / मुलाला भेटा. एकमेकांचे विचार जाणून घ्या. समोरच्या व्यक्तीचे अनेक चांगले पैलू जे संसार करण्यासाठी उपयुक्त ठरतील, ते त्या भेटीत उलगडतील आणि एक चांगले स्थळ आपण नाकारले नाही, याची खंत वाटणार नाही.
प्रत्यक्ष भेट महत्त्वाची आहे. लहानसहान गोष्टीतून सुद्धा आपल्याला अनेक बाबी समजतात. आजकालची मुले-मुली तितकी समंजस नक्कीच आहेत. पण त्यात आता थोडे पालकांनी त्यांचे मतसुद्धा मांडले पाहिजे, आपल्या मुलांचे हित त्यांनाही समजते. दर दोन दिवसांनी मुले स्थळे नाकारत आहेत, तर ती का? हाही अभ्यासाचा विषय बनला आहे, आज पालकांसाठी.
आर्थिक बाजू म्हणजे मिळकत हा विषयसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. कारण तो नेहमी तसाच राहणार नाही, वाढतच जाणार आहे. पण त्याचसोबत आपले वयसुद्धा वाढणार आहे, हेही विसरता उपयोगी नाही. आपल्याला आयुष्यात हौसमौज करण्याची, फिरण्याची, मजा करण्याची, सगळी उमेदीची वर्षं निघून जात आहेत, त्याचाही विचार केला पाहिजे. आपापले so called attitude बाजूला ठेवले, तर अनेक विवाह असेच जुळून येतील. याचा पालक आणि पाल्यांनी सुद्धा विचार करावा.
ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीकोनातून गुणमिलन, ग्रहमिलन केले, तर संसारिक आयुष्याची दिशा नेमकी काय ती ठरवता येईल. हे शास्त्र तुमच्या सदैव मदतीला आहे. पुढील चांगल्या वाईट गोष्टींचे सूतवाक्य करणारे, हे शास्त्र तुम्हाला मार्गदर्शक ठरेल, यात वादच नाही.
हेही वाचा – जातकांचे ज्योतिष ज्ञान
आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी – जसे बाळाचे नामकरण, मुंज, विवाह अशा मंगल कार्यासाठी तसेच घराचे वास्तुशांतीचे मुहूर्त यासाठी आपण ज्योतिषाची मदत घेतो. पूर्वापार चालत आलेले गुणमिलनही करतो, पण आज काळाची गरज ओळखून ग्रहमिलन हे सुद्धा करायला पाहिजे. पूर्वी, मुलगी नोकरी करते का? हा प्रश्नच नव्हता, कारण तेव्हा स्त्रिया चूल आणि मूल यातच गुंतलेल्या होत्या, किंबहुना त्यांच्याकडून तेच अपेक्षित होते. आजचे प्रगत युग आहे, वैचारिक स्वातंत्र आहे. तरीही आज आपल्या समाजाची पाळेमुळे ही रूढी आणि परंपरा मान्य करणारी असल्यामुळे बहुतेक विवाह हे पत्रिका बघूनच जुळवले जातात. शेवटी सर्व गोष्टी जुळून येणे म्हणजेच मनोमिलन होय.
गुणमिलनाचे निकष लावताना डोळसपणे लावले पाहिजेत, कारण हे गुणमिलन आणि त्याचे नियम हे प्राचीन काळापासून आहेत. तेव्हाची समाजव्यवस्था आणि काळ हा वेगळा होता. ‘एक नाड दोष’ यावरून स्थळे नाकारली जातात; पण एक नाड असेल आणि नक्षत्राचे चरण वेगळे असेल, तर तो दोष मानला जात नाही. तसेच, एक नाड असेल तर शास्त्रात त्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, त्या तपासून न बघता स्थळ नाकारू नये.
सर्वात मुख्य म्हणजे दोघांच्या सद्यस्थितीतील महादशा काय सांगत आहेत आणि पुढे येणाऱ्या सुद्धा बघितल्या पाहिजेत. कारण, शेवटी दशा महत्त्वाच्या आहेत. त्याचप्रमाणे विवाह योग निर्माण करणारे गोचरीचे योग, त्यांना डावलून कसे चालेल? अनेक योग येतात आणि जातात, पण जेव्हा अतिप्रखर योग येतो, तेव्हा विवाह ठरतो आणि होतो सुद्धा.
वैवाहिक सुख, एकंदरीत आयुष्यातील अर्थार्जन, संतती होणार का? आणि स्वतःचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य या बाबी तपासण्यासाठी पत्रिकेचा अभ्यास उपयोगी पडतो. थोडक्यात, सहजीवन कसे असेल, याचा वैयक्तिक अभ्यास करून मग ग्रहमिलन करावे. त्यात आपल्याला दोघांचेही विचार करण्याची वृत्ती आणि क्षमता समजते. मानसिक दुर्बलता किंवा सक्षमता, हेही समजते. तसेच, एखाद्या समस्येशी दोन हात करण्याची वृत्ती, संसाराकडे असलेली ओढ दिसून येते; म्हणून गुणमिलन अति अतिमहत्त्वाचे आहे. उद्या मुले झाली की, त्यांची आजारपणे आहेत, त्यांचे संस्कार आहेत, शिक्षण आहे… हे दोघांनीही पाहिले पाहिजे. स्त्रीने जन्म दिला म्हणून ती तिची एकटीची जबाबदारी नाही, तर दोघांचाही समान वाटा – जबाबदारी सगळ्या प्रश्नांत असायला हवी. ती असणार आहे का? प्रत्येक वेळेस ‘मला काम आहे’, हे उत्तर चालणार नाही. कारण काम तिलाही असते, किंबहुना काकणभर जास्तीच असते. या बाबतची मानसिकता दोघांच्या भेटीत समजेल, पण पत्रिकेतील ग्रह बोलतील, तेव्हा अनेक गोष्टी अधिक सुस्पष्ट होतील.
हेही वाचा – पत्रिका गुणमिलन करताना
एखादा मुलगा जर करिअरमागे खूप धावणारा असेल, व्यवसायात बुडून गेलेला असेल, तर तो बायकोच्या मागे पिंगा घालणार नाही आणि तिची नेमकी तीच अपेक्षा असेल, म्हणजे नवऱ्याने गजरा आणावा वगैरे तिला वाटते, पण ते त्याच्याकडून पूर्ण होत नसेल तर मग दोघांच्यात एक मानसिक दरी निर्माण होते आणि काही काळाने ती मोठी होत जाते. अर्थात, गजरा आणणे हेच प्रेमाचे द्योतक नाही, पण मानसिक दृष्टीने पहिले तर अनेकदा स्त्रिया तेच तेच धरूनही ठेवतात. त्यामुळे संसारात प्रत्येक गोष्टीत समंजसपणा असायला लागतो. कारण संसार शेवटी त्या दोघांचाच असतो. पतीकडून किंवा पत्नीकडून असलेल्या अपेक्षा तसेच आपल्या आयुष्यातील प्राधान्यक्रम – करिअर पैसा वगैरे – सर्व गोष्टी मोकळेपणाने बोलल्या गेल्या पाहिजेत.
म्हणूनच आजकाल क्लिक झालेले स्थळ हे सर्वार्थाने क्लिक होण्यासाठी वरती नमूद केलेले सर्व परामर्श तपासले पाहिजेत आणि त्यात बहुतांशी अपेक्षा (सगळ्या पूर्ण होणार नाहीत, कारण आपणही परिपूर्ण नाहीत) पूर्ण झाल्या तर स्थळ खर्या अर्थाने ‘क्लिक’ होईल.
मुळात विवाह करण्याची मानसिकता तयार व्हावी लागते, कारण ही एक मोठी जबाबदारी सुद्धा आहे. विवाह उत्सुक सर्वाना खूप शुभेच्छा आणि त्यांचे विवाह लवकर जुळून यावेत यासाठी महाराजांकडे अंतर्मनापासून प्रार्थना.


