Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    अज्ञानाची रात्र संपते, तेव्हा…

    September 17, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं नानाप्रयोजनशीळें, दीर्घें वक्रें वर्तुळें

    September 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 सप्टेंबर 2026

    September 17, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, September 17
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » अज्ञानाची रात्र संपते, तेव्हा…
    अध्यात्म

    अज्ञानाची रात्र संपते, तेव्हा…

    डॉ. शिरीष कुलकर्णीBy डॉ. शिरीष कुलकर्णीSeptember 17, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी साहित्य, मराठी आर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी कथा, मराठी लेख, अध्यात्म साहित्य, शिरीष कुलकर्णी, अध्यात्मिक शिरीष कुलकर्णी, माया, द्वैत अद्वैत, आद्य शंकराचार्य माया, ज्ञानाचा प्रकाश, सत्यज्ञान
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    माया / भाग – 4

    आपण अज्ञान आणि सत्यज्ञान यातील भेद समजून घेतला. आता आपण ज्याच्याभोवती हे सर्व तत्वज्ञान गुंफलेले आहे, त्या आत्मा या परमोच्च विषयाचे चिंतन करणार आहोत.

    सत्स्वरूपो ज्ञानरूपः

    आत्मा ज्ञेयो हि यत्नतः।

    तस्माद् दीर्घं प्रकुर्वीत

    ध्यानं ब्रह्मणि सर्वतः॥

    – गीताव्रत

    आत्मा हा सत्स्वरूप आणि ज्ञानस्वरूप आहे. सत् म्हणजे जे नेहमी अस्तित्वात असते, ज्याचा कधीही नाश होत नाही, जे अमर आहे आणि जे सत्य आहे… आणि ज्ञान म्हणजे जे स्वयंप्रकाशित आहे. समजा, आपल्याला शास्त्रीय गायन शिकायचे आहे. तर, आपण संगीताची शेकडो पुस्तके वाचली तरी, आपल्या गळ्यातून आपोआप सुरेल गाणे बाहेर पडणार नाही. त्यासाठी आपल्याला रोज पहाटे उठून रियाज करावा लागेल. आपल्याला आपल्या आवाजाला वळण लावावे लागते. कित्येक वर्षांच्या अखंड साधनेनंतर तो सूर आपल्या गळ्यात स्थिर होतो आणि मग आपण गाऊ लागतो. आत्मज्ञानाचेही अगदी तसेच आहे. प्रत्यक्ष साधनेशिवाय आपण ज्ञान ग्रहण करू शकणार नाही. म्हणूनच, ज्या साधकाला परमज्ञान प्राप्त करून घेण्याची अत्यंत तीव्र इच्छा आहे, त्याने आपल्या ध्येयपूर्तीसाठी आणि आत्मसाक्षात्कारासाठी परब्रह्माचे दीर्घ चिंतन केले पाहिजे. हे चिंतन उठता, बसता, चालता, बोलता आपल्या मूळ स्वरूपाची जाणीव सतत जिवंत ठेवून केले पाहिजे. हा साधनेचा रियाज जेवढा सखोल, तेवढा साक्षात्कार अधिक स्पष्ट होत जातो.

    यथा दीपेन भासन्ते

    कुम्भाद्या वस्तुराशयः।

    तथा मनः प्रकाशेत

    आत्मनैवाखिलाशयः॥

    – गीताव्रत

    आपल्या आजूबाजूला असलेल्या जगाकडे पाहण्याची आपली दृष्टी खूप वरवरची असते. रात्रीच्या अंधारात जर एखाद्या खोलीत अनेक सुंदर सुरया, चित्रे किंवा काही भांडी ठेवली असतील, तर ती आपल्याला दिसत नाहीत. पण तिथे एखादा दिवा लावला आणि त्या वस्तू जवळ घेतल्या की, त्या वस्तूंवरची नक्षी, कलाकुसर बारकाईने पाहता येते. ती नक्षी आणि कलाकुसर पाहण्याची दृष्टी आपल्याला मिळायला पाहिजे.‌ कलाकुसरीमध्ये अवर्णनीय सौंदर्य आणि कला असते. जेव्हा आपल्याला समजणारी कला बारकाईने पाहता येईल, त्या क्षणी आपल्याला त्या कलेचे समाधान मिळेल. ही कलाकुसर समजणे म्हणजे ज्ञान! या ज्ञानानेच आनंद उजळून निघतो. इथे आपण अत्यंत बारकाईने विचार केला तर, आपल्या लक्षात येईल की, त्या सुरईमध्ये किंवा भांड्यामध्ये स्वतःला प्रकाशित करण्याची कोणतीही शक्ती नाही. ते केवळ जड आणि निर्जीव पदार्थ आहेत. दिव्याचा प्रकाश त्यांच्यावर पडेल आणि आपली दिव्यदृष्टी त्याच्यावर पडेल, मगच आपल्याला त्याचे सौंदर्य समजेल!

    अगदी याच न्यायाने आपण आपल्या शरीराचा आणि मनाचा विचार करूया. आपले मन, आपली बुद्धी आणि आपले डोळे-कान यासारखी सर्व इंद्रिये ही अतिशय चंचल आणि कार्यरत वाटत असली तरी, ती मुळात त्या सुरईसारखी जडच आहेत. ती स्वतःहून काहीही करू शकत नाहीत. त्यांच्यावर जेव्हा आतून ज्ञानाचा प्रकाश पडतो, तेव्हाच ती सर्व इंद्रिये आणि मन प्रकाशित होतात आणि आपले काम करू लागतात.

    एखादा अत्यंत प्रगत असा संगणक असतो, ज्यामध्ये अनेक गोष्टी करण्याची क्षमता असते; पण जोवर त्याला विजेचा प्रवाह जोडला जात नाही, संगणक चालवण्याचे ज्ञान आपण घेत नाही, तोवर तो संगणक म्हणजे आपल्यासाठी केवळ प्लास्टिक आणि धातूचा निर्जीव, निरुपयोगी खोके ठरेल. पण ज्याच्याकडे संगणक चालवण्याचे ज्ञान आहे, तो ते फार प्रेमाने, आनंदाने वापरेल. त्यालाच त्याचा उपयोग होईल. वीज, त्यातले सॉफ्टवेअर हा त्याचा आत्मा आहे. त्यानुसार आपले मन आणि बुद्धी ही केवळ उपकरणे आहेत, त्यांना चेतना देणारा खरा प्रकाश म्हणजे ज्ञान आणि आत्माच आहे. तो प्रकाश काढून घेतला की, शरीर आणि मन एका क्षणात मातीमोल होते.

    यथा प्रदीप्तदीपाय

    नान्यदीपः प्रयुज्यते।

    तथा स्वयंप्रकाशाय

    नात्मनेऽन्योपयुज्यते॥

    – गीताव्रत

    आता एक अत्यंत सुंदर आणि गमतीदार प्रश्न निर्माण होतो. आपण पाहिले की, इतर सर्व वस्तूंना पाहण्यासाठी दिव्याची गरज असते, पण त्या दिव्याला पाहण्यासाठी आपल्याला आणखी एका दुसऱ्या दिव्याची गरज असते का? जर खोलीत अंधार असेल आणि आपण तिथे एक दिवा लावला, तर तो दिवा शोधण्यासाठी आपल्याला बॅटरी शोधावी लागेल का? तर नक्कीच नाही.

    एका प्रदीप्त दिव्याला आपला स्वतःचा प्रकाश दाखविण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही दिव्याची किंवा बाह्य प्रकाशाची अजिबात आवश्यकता नसते. दिवा जसा इतरांना प्रकाशित करतो, तसा तो स्वतःलाही प्रकाशित करतो. आत्म्याचेही अगदी तंतोतंत असेच आहे. आत्मा हा स्वतःच ज्ञानस्वरूप आणि स्वयंप्रकाशित असल्यामुळे त्याला प्रकाशित करण्यासाठी किंवा त्याला जाणून घेण्यासाठी अन्य कोणत्याही बाह्य साधनांची आवश्यकता नसते. आपण डोळ्यांनी रूप पाहतो, कानांनी शब्द ऐकतो, पण “आत्म्याला पाहण्यासाठी कोणतेही इंद्रिय काम करू शकत नाही, कारण सर्व इंद्रियांना प्रकाश देणारा तोच आहे!”

    सूर्याला पाहण्यासाठी आपल्याला दुसऱ्या कोणत्याही सूर्याची किंवा प्रकाशाची गरज नसते. केवळ आपले डोळे उघडणे आणि त्याकडे पाहणे पुरेसे असते. आता सूर्योदय पाहण्याच्या आणि सूर्यास्त पाहण्याच्या पद्धती आपण जाणतो. ह्रदय तृप्त होते ते सौंदर्य पाहताना… ती कलाकुसर पाहताना… या सृष्टीचा तो चमत्कार पाहताना! हो ना?

    हेही वाचा – स्वयंपूर्ण आत्मानंदाची प्राप्ती

    आत्म्याला जाणण्यासाठी केवळ स्वतःच्या अंतरंगात डोकावणे पुरेसे असते. तो कायम प्रकाशितच आहे, फक्त आपले लक्ष बाहेरच्या जगात अडकलेले असते, त्यामुळे आपण त्या आंतरिक प्रकाशाला पारखे होतो. त्या आत्म्याशी संवाद साधायचा आहे… त्या आत्म्यावरची कलाकुसर पाहायची आहे, तो सृष्टीचा, परमेश्वराचा, अद्वैताचा, प्रकाशाचा चमत्कार आहे, तो आपल्याला पाहायचा आहे आणि त्या आत्म्याच्या माध्यमातून परमात्म्यापर्यंत जायचे आहे. पण आधी आपल्याला आत्म्याशी संवाद साधता आला पाहिजे आणि तो केवळ ध्यानातूनच साधता येईल.

    यथा स्थाणुं नरो रात्रौ

    चोरोऽयमिति मन्यते।

    तथात्मानं भ्रमाज्जीवं

    मत्वा भीतो हि जायते॥

    – गीताव्रत

    आपल्या मनात जी अनेक प्रकारची भीती घर करून असते तिचे मूळ कशात आहे, हे या श्लोकातून अत्यंत मार्मिकपणे उलगडले आहे. कल्पना करूया की, एक मनुष्य रात्रीच्या वेळेस एका निर्जन रस्त्यावरून चालला आहे. रस्त्याच्या कडेला एक लाकडाचा जुना आणि वाळलेला ओंडका उभा आहे. अंधारामुळे त्या माणसाला तो ओंडका नीट दिसत नाहीये आणि त्याच्या मनात असा भ्रम निर्माण होतो की, तिथे कोणी चोर, लुटारू आपल्यावर हल्ला करण्यासाठी दबा धरून बसला आहे. या एका चुकीच्या कल्पनेमुळे त्या माणसाच्या अंगाला दरदरून घाम फुटतो, त्याच्या हृदयाची धडधड वाढते आणि तो जिवाच्या आकांताने पळत सुटतो. त्याची ती भीती अगदी खरी असते, त्याला होणारा त्रासही खरा असतो, पण त्या भीतीचे कारण मात्र पूर्णपणे खोटे असते. तिथे माणूस किंवा चोर नव्हताच, तिथे केवळ एक लाकडाचा ओंडका होता. आता प्रश्न असा आहे की, माणूस वाटला तरी तो चोर वाटला म्हणून आपण घाबरलो. खरंतर, अंधाऱ्या रस्त्यावरती एखादा माणूस भेटला तर, त्याचा आधार वाटायला हवा. पण तसे नाही वाटत. तो दरोडेखोर लुटारू आहे तो आपल्याला लुटेल, ठार करेल असे वाटते.

    आपला आत्मा हा मुळात निर्भय आणि अविनाशी आहे, पण अज्ञानाच्या अंधारामुळे तो स्वतःला जीव समजतो. जीव समजणे म्हणजे मी हा देह आहे, मी मर्यादित आहे आणि मला कधीतरी मृत्यू येणार आहे, असे मानणे. या एका चुकीच्या समजुतीमुळे तो जन्म-मृत्यू, रोगराई आणि मान-अपमान यांच्या भीतीने पूर्णपणे ग्रस्त होतो. पण ज्ञानाच्या प्रकाशात मी जीव नसून साक्षात परमात्माच आहे, हा प्रत्यक्ष बोध होताच, तो चोर जसा ओंडका बनतो, तशी ती भीती कायमची नष्ट होते आणि आत्मा पुन्हा एकदा पूर्ववत अत्यंत निर्भय आणि शांत बनतो.

    बुद्ध्या सम्यक् जगत्सर्वं

    विलाप्यात्मनि सर्वदा।

    ध्यायते निर्मलं तत्त्वं

    व्योमवत् ज्ञानिको मुदा॥

    – गीताव्रत

    जो खऱ्या अर्थाने ज्ञानी झाला आहे, त्याने या जगात कसे वागावे आणि आपली साधना कशी टिकवून ठेवावी, याचा एक अत्यंत सुंदर मार्ग यातून दाखवला आहे. ज्ञानी माणसाने आपल्या कुशाग्र बुद्धीचा अतिशय योग्य आणि नीट उपयोग करावा. बुद्धीचा उपयोग केवळ संसारात पैसे कमवण्यासाठी किंवा तर्कट लढवण्यासाठी करू नये तर, त्या बुद्धीने संपूर्ण जगत आपल्या आत्म्यात विलीन करावे. जगत आत्म्यात विलीन करणे म्हणजे नक्की काय, हे समजावे म्हणून आपण समुद्राचे आणि लाटांचे उदाहरण घेऊया. समुद्रावर रोज लाखो लाटा निर्माण होतात आणि काही क्षणांत विरून जातात. लाटेला असे वाटते की, माझा जन्म झाला. माझा आकार मोठा आहे आणि आता मी किनाऱ्यावर आपटून मरणार आहे. पण जेव्हा लाटेला हे सत्य उमजते की, मी लाट नसून केवळ अथांग पाणीच आहे, समुद्र आहे. तेव्हा तिचे लाट असणे पाण्यामध्ये विलीन होते. पाणी कधीच मरत नाही. तसेच, या जगात दिसणारी सर्व रूपे आणि आकार हे एकाच आत्मतत्त्वाचे अविष्कार आहेत, हे ज्ञानी मनुष्य सतत जाणतो. तो या संपूर्ण सृष्टीला स्वतःमध्येच पाहतो आणि मग तो निरभ्र आकाशाप्रमाणे असलेल्या आत्म्याचे सतत अत्यंत आनंदाने चिंतन करत राहतो.

    हेही वाचा – अहंकाराचे समूळ उच्चाटन करणारे सत्यज्ञान

    आकाशात अनेक ढग गर्दी करून येतात आणि जातात, पण आकाशाला त्याचा काहीच लेप लागत नाही. आकाशाला कायमचा डाग लागत नाही. आकाशाला लागलेला काळ्या ढगांचा डाग आपल्याला धुवावा लागत नाही. कारण ते नेहमी निरभ्र आणि अलिप्तच असते. तसेच, ज्ञानी माणसाचे मन सुखदुःखाच्या ढगांना पाहते, पण स्वतः त्या निरभ्र आकाशासारखे शांत आणि स्थिर राहते.

    उषसा तमसो नाशे

    यथा सूर्यः प्रकाशते।

    ज्ञानेनाज्ञाननाशे तु

    तथात्मा सम्प्रकाशते॥

    – गीताव्रत

    सकाळची वेळ निसर्गातील एक अत्यंत सुंदर आणि अद्भुत घटना असते. रात्रभर सर्वत्र दाट काळोख पसरलेला असतो. पण जेव्हा पहाट होते आणि उषःकाल होतो तेव्हा तो गडद अंधार हळूहळू नाहीसा होऊ लागतो. उषःकाल स्वतः सूर्य नसतो, पण तो सूर्याच्या आगमनाची चाहूल असते. उषःकालाने तमाचे म्हणजेच अंधाराचे पूर्णपणे हरण केल्यानंतर ज्याप्रमाणे अत्यंत तेजस्वी असा सूर्योदय होतो आणि संपूर्ण जग प्रकाशाने न्हाऊन निघते अगदी, त्याच क्रमाने मानवी जीवनात ज्ञानाचा उदय होतो. आपल्या बुद्धीवर अज्ञानाचा आणि मोहाचा जो गडद काळोख साचलेला असतो, तो दूर करण्यासाठी आधी विवेकाचा आणि वैराग्याचा उषःकाल व्हावा लागतो. शुद्ध विचार आणि शास्त्रांचा अभ्यास यांमुळे जेव्हा, “अज्ञानाची रात्र संपते, तेव्हा अचानक एका क्षणी अंतःकरणात आत्मज्ञानाचा प्रखर सूर्योदय होतो आणि आत्म्याचा साक्षात साक्षात्कार होतो.”

    सूर्य जसा बाहेरून आणावा लागत नाही, तो तिथेच असतो… केवळ पृथ्वी स्वतःभोवती फिरल्यामुळे, तो दिसू लागतो किंवा दिसत नाही. तो दिसत नाही म्हणून अंधार होतो. अगदी तसेच आत्मा नेहमी तिथेच असतो, केवळ आपल्या अज्ञानाचे आवरण दूर झाले की, तो आपल्या पूर्ण तेजाने आणि आनंदाने तो प्रकट होतो.

    क्रमश:
    Avatar photo
    डॉ. शिरीष कुलकर्णी

    डॉ. शिरीष कुलकर्णी M.J. M.B.A.B.A. GDC&A., P.HD.... सहकार प्रशिक्षण केंद्रावर प्राचार्य म्हणून पाच वर्ष सेवा. कथा, कादंबरी, कविता, गझल, आध्यात्मिक चिंतन अशा विविध विषयावर 51 पुस्तके लिहिलेली आहे. कर्णधार हे व्यवस्थापनावरील पुस्तक, चौथा स्तंभ हे पत्रकारितेतील अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेले पुस्तक, यासोबत संतसम्राज्ञी, संत सत्संग, विश्वाराधन, सजल, गीताव्रत साधना - 3 भाग प्रसिद्ध, हिंदोळा, अमात्र, नामसाधना, नासदीय, ईशोवास्य, कबीराऽ रे, संपादकीय, माया, ब्रह्मजिज्ञासा, Editorials, luminous thoughts हे इंग्रजी संपादकीय लेखा़चे पुस्तक, किंचितरेषा, साधनारंभ, खराखुरा कर्मयोग, संत मीराबाईंच्या जीवनावर सखोल अभ्यास करून लिहिलेली संत मीराबाईंवरील पहिलीच कादंबरी 'संतसम्राज्ञी'. या कादंबरीचे हिंदी, इंग्रजीतून अनुवादही झालेले आहेत. स्वर्गोपनिषद, वीणा आणि वाणी, गीताव्रत साधना ही पुस्तके विशेष उल्लेखनीय ठरली. संशोधन हा त्यांच्या साहित्यनिर्मितीचा मुख्य आत्मा आहे. सजल या गझल संग्रहास अरुण दाते यांनी प्रस्तावना दिली. बायबल, कुराण आणि भगवद्गीता यावर अभ्यासपूर्ण लेखमाला आणि पुस्तके प्रकाशित झाली. ‘मुस्लिम धर्म आणि अहिंसा’, ‘संत कबीर’, ‘येशू ख्रिस्त आणि अहिंसा’, ‘रूमी आणि अद्वैत सिद्धांत’ या विषयावर लेखन आणि व्याख्याने. 2016नंतर सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेऊन साहित्यिक आणि अध्यात्मिक संशोधनासाठी पूर्ण आयुष्य अर्पण करण्याचा निर्णय. महाराष्ट्र पत्रकार संघाचे, मुख्य राज्य संघटक म्हणून सलग पंधरा वर्षं सेवा. चित्रपट कथा-पटकथा, संवाद आणि गीतलेखन. काही चित्रपटासाठी त्यांची गाणी रवींद्र साठे, वैशाली माडे, स्वप्निल बांदोडकर, अभिजीत कोसंबी, वैशाली चितळे, यांनी गायलेली आहेत. 14 चित्रपटांमधून छोट्या-मोठ्या भूमिका. ब्रह्मचैतन्यसाठी कथा-पटकथा आणि संवाद लेखन. कथालेखन, कादंबरी लेखन, कविता लेखनाच्या 40पेक्षा जास्त विनामूल्य कार्यशाळा घेतलेल्या आहेत. अथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून वीस वर्षं अविरोध सेवारत. लायन्स क्लब योगा आणि मेडिटेशन टेरिटरी चीफ म्हणून सेवा. दोन मंदिरे, अनाथ आश्रम, शाळा, ग्रंथालये, टेक्सटाइल मिलची उभारणी निरपेक्ष भावनेने विनामूल्य केली. लोकव्रत प्रकाशनाचे मानद सचिव म्हणून वीस वर्षे विनामूल्य सेवा. त्या माध्यमातून आजवर हजारो पुस्तके प्रसिद्ध केली. आजवर 1600हून अधिक मुखपृष्ठे तयार केली आहेत. 1500पेक्षा जास्त संपादकीय लेख आणि वृत्तपत्रासाठी तितकेच लेख लिहिलेले आहेत. अनेक वृत्तपत्रांतून स्तंभ लेखन केलेले आहे. स्त्री मुक्ती, समस्या निवारण केंद्र आणि कामगार चळवळीच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण, भाऊ फाटक आणि सर्वोदय चळवळीचा प्रदीर्घ सहवास. भारतातील पहिल्या शासकीय पोलीस ठाण्यातील समस्या निवारण केंद्राचा सेक्रेटरी म्हणून सलग पंधरा वर्षे सेवा. अनेक साहित्य संमेलने, आणि ग्रामीण साहित्य संमेलनाची संकल्पना मांडून ती साहित्य संमेलने यशस्वीपणे पार पाडली. स्त्रीभ्रूण हत्या, नकूसा नामबदल चळवळ, स्वयंसहायता बचत गट चळवळ यासाठी पाचशेहून अधिक बचत गट स्थापनेच्या कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन आणि व्याख्याने. पन्नासहून अधिक सामाजिक आणि साहित्यिक पुरस्कार. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, दिल्ली यांच्या शुभहस्ते आणि पू. विष्णू महाराज पारनेरकर यांच्या उपस्थितीत 'अक्षर वाड्.मय' पुरस्कार. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे अनुग्रहीत. त्यांच्या सजल या पेजला 75 हजारपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.

    Related Posts

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं नानाप्रयोजनशीळें, दीर्घें वक्रें वर्तुळें

    September 17, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : छत्तीसही वानीभेद, तोडोनियां निर्विवाद

    September 16, 2026 अध्यात्म

    अंतर्मुख होऊन करावी स्वामींची सेवा

    September 15, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं नानाप्रयोजनशीळें, दीर्घें वक्रें वर्तुळें

    By Team AvaantarSeptember 17, 2026

    अध्याय तेरावा यावत् संजायते किंचित् सत्त्वं स्थावरजंगमम् । क्षेत्रक्षेत्रज्ञसंयोगात् तद्विद्धि भरतर्षभ ॥26॥ तरी क्षेत्रज्ञ येणें…

    सार्थ ज्ञानेश्वरी : छत्तीसही वानीभेद, तोडोनियां निर्विवाद

    September 16, 2026

    अंतर्मुख होऊन करावी स्वामींची सेवा

    September 15, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : प्रकृति येणें जिये, याचिया सत्ता जग विये

    September 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    अज्ञानाची रात्र संपते, तेव्हा…

    September 17, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं नानाप्रयोजनशीळें, दीर्घें वक्रें वर्तुळें

    September 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 सप्टेंबर 2026

    September 17, 2026

    सुधाकररावांची प्रस्तावना

    September 16, 2026

    ललिताची गीता

    September 16, 2026

    वास्तुशास्त्र… मानसिक तणाव आणि नैराश्य

    September 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 438
    • अवांतर 208
    • आरोग्य 147
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 585
    • फिल्मी 68
    • फूड काॅर्नर 255
    • मैत्रीण 29
    • ललित 923
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    अज्ञानाची रात्र संपते, तेव्हा…

    September 17, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं नानाप्रयोजनशीळें, दीर्घें वक्रें वर्तुळें

    September 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 सप्टेंबर 2026

    September 17, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.