|| श्री स्वामी समर्थ ||
“स्वामींची सेवा करावी तरी कशी?” असा प्रश्न कित्येकांना नेहमीच पडतो आणि विचारलाही जातो. मी नामस्मरण करू की पोथी वाचू? मी स्मरण करू की मानसपूजा करू? की सरळ अक्कलकोटला जाऊन दर्शन घेऊ? असे नानाविध प्रश्नांची सरबत्ती केली जाते.
मुळात स्वामींची सेवा करावी, हा विचार मनात यायला सुद्धा त्यांची कृपा लागते. आपले पूर्वसुकृत (पूर्वपुण्याई) सुद्धा बळकट असावे लागते, तरच संतचरण लाभतील. सेवा करायची आहे, हा एकदा का हा विचार मनात रुजला की, समजावे या जन्मातील तुमची आणि स्वामींची भेट आता फार दूर नाही. एखाद्या देवतेची भक्ती करताना याच देवतेची भक्ती मी का करत आहे, याचे कारण निदान स्वतःपुरते तरी मनात सुस्पष्ट हवे. ज्या देवतेचे स्मरण करतो, त्या देवतेबद्दल मनात प्रेम, माया आणि श्रद्धा हवी. संपूर्ण शरणागत होऊन समर्पित व्हावे, मग बघा ते काय काय सेवा करून घेतील तुमच्याकडून!
अनेक जण गुरुवारी मठात जातात म्हणून मी जातोय का? देखावा करण्यासाठी, लोकांना दाखवण्यासाठी जातोय का? की 8.23ची ट्रेन चुकली तरी चालेल, पण महाराजांचे दर्शन घेणारच, इतक्या आर्ततेने दर्शनाला जातो आहे? प्रदक्षिणा घालायच्या म्हणून घालतोय की, कसे? हे सर्व प्रश्न आपल्यालाच विचारून बघा काय काय उत्तरे मिळतात. हे प्रश्न विचारायला सुद्धा धाडस लागते.
हार-तुरे, पेढे काहीच नकोय त्यांना, ते भुकेले आहेत आपल्या एका क्षणासाठी. एक क्षण उभा राहा माझ्यासमोर, तू मला आणि मी तुला प्रेमाने डोळेभरून बघू तरी… इतकेच हवे आहे त्यांना! तो क्षण भरभरून दे आणि घे. त्या क्षणी इतर कुठलाही विचार मनात आणू नकोस, इतकेच मागत आहेत ते आपल्याकडे. जीवनातील भौतिक सुखे हवीत, पण ती मागत राहिलो, तर जीवन संपून जाईल, पण मागण्या संपणार नाहीत. आपल्या दोघात ‘मागणे’ हे नकोच! हवे आहे ते प्रेम… नि:स्वार्थी प्रेम! आणि त्याच प्रेमाची भूक आहे म्हणून महाराज सर्व भक्तांपाशी येत राहतात.
खरं सांगा, आपला प्रगट दिन असो अथवा इतर काहीही, दिवसभरात इतकी सजावट, पै-पाहुण्यांची सरबराई करताना एक क्षणभर तरी आपण त्यांचे होतो का? क्षणभर तरी त्यांच्या चरणाशी विसावतो का? त्यांना डोळे भरून पाहतो का? त्यांचे असणे आपल्या वास्तूत अनुभवतो का? नाही, खरंच नाही. वस्तुत:, त्यांचे आपल्याजवळ असणे, हेच तर आपले आयुष्य आहे. ते आहेत म्हणून चार लोक आपल्याकडे येत आहेत… केवळ त्यांच्यासाठी, आपल्यासाठी नाही, हे लक्षात आले पाहिजे. ते आहेत म्हणून श्वास चालू आहे आणि ते आहेत म्हणूनच सर्व काही आहे.
हेही वाचा – शुक्राचे अध्यात्म
स्वामींची सेवा करताना सर्वप्रथम अंतर्मुख झाले पाहिजे. जीवनाच्या नेमक्या कुठल्या टप्प्यावर महाराज मला भेटत आहेत. वयाच्या पंचविशीत की, पन्नाशी ओलांडल्यावर? नक्की कधी? अंतर्मुख व्हा आणि विचारा स्वतःलाच हे प्रश्न. जन्मापासूनच ते आपल्यासाठी खूप काही करत आहेत, आणि करत राहणार आहेत. मी काय करतो त्यांच्यासाठी, हे महत्त्वाचे आहे.
अध्यात्म नेमके काय आहे? मला का यात यावेसे वाटले? कुठल्या प्रसंगाने भारावून ओढल्यासारखा आलोय मी? कुणी आणले की, मी स्वतः आलोय? भास होत आहेत का त्यांचे? जवळ असलेल्या त्यांच्या शक्तीची अनुभूती मिळतेय? आजवर आयुष्य कसे गेले? काय मिळवले आणि काय गमावले? सगळे लख्ख डोळ्यासमोर आहे, एका क्षणात आयुष्याचा चित्रपट डोळ्यासमोरून जातोय आणि समजत आहोत आपण केलेल्या चुका, अपराध, केलेला आळस आणि अपमान… जे कधी आपण केले तर कधी नकळत झाले.
महाराजांचे अधिष्ठान आपल्या आयुष्यात नेमके कुठे, कसे आहे? नुसते ‘स्वामी स्वामी’ करून होत नाही, तर त्यांच्या आज्ञेत रहाणे आणि त्यांचा शब्द खाली पडू न देणे, ही तर खरी कसोटी आहे.
नामस्मरण सुरू झाले की, आपल्यातील दोष स्वतःलाच दिसायला लागतात आणि आपल्यात अंतर्बाह्य अनमोल असे परिवर्तन होते. देह सर्वत्र आणि आत्मा, मन त्यांच्या चरणी, अशी अवस्था प्राप्त होते. आपल्यातील अहंकार लोप पावू लागतो आणि देण्याची वृत्ती बळावते. घेणे-मागणे आपोआप कमी होत जाते. सततची जीवघेणी स्पर्धा आणि त्यात टिकण्यासाठी केलेला संघर्ष यातून दोन सुखद क्षण गुरूपदी अनुभवणे, हा खास अनुभव म्हणावा लागेल.
आज मनुष्याने सर्व काही कमावले आहे, पण मनाची शांतता घालवली आहे. सुखाची इतकी लालसा की, नेमके सुख गुरूंच्या चरणाशी आहे, याचाही जणू विसर भक्ताला पडावा! अंतर्मुख व्हा, दीर्घ श्वसन करा. श्वास ही एकमेव गोष्ट आहे, ज्याकडे आपले संपूर्ण दुर्लक्ष आहे. आता त्याकडेच लक्ष देऊन ध्यानस्थ व्हा आणि सर्व काही त्यांच्यावर सोपवा. तुमच्याकडून काय सेवा करून घ्यायची, ते तेच ठरवतील.. नव्हे तो त्यांचाच अधिकार आहे!
कुणाचीही ओंजळ रिती राहणार नाही, इतके भरभरून सुख-समृद्धी आपल्या ओंजळीत ते घालणार आहेतच. त्यामुळे मागणे आता काहीच उरणार नाही. त्यांचा सहवास लाभणे, चांगले विचार मनात रुजणे, दुसऱ्याला मदत करायची बुद्धी होणे, हे सर्व महत्त्वाचे. सतत दुसऱ्याचा तिरस्कार, मत्सर यातून निर्माण होतात, ते फक्त दीर्घकालीन आजार! त्यापासून परावृत्त होण्यासाठी मनापासून अंतर्मुख व्हा. तसे झालात तर तुमच्या आभाळा इतक्या चुका आणि अपराध तुमचे तुम्हालाच दिसतील.
काहीतरी कुठेतरी राहून गेले आहे? नक्की काय ते शोधा… कुणाचे पैसे द्यायचे राहून गेले आहेत (मुद्दामून की अनावधानाने)?, कुणाचा अपमान केलाय? कुणाची बदनामी केली आहे? कुणाची निंदा? कुणाच्या दु:खाला कारणीभूत ठरला आहात? नक्की काय? विचारा आपल्याच मनाला आणि बघा कशी सोळा नंबरी सोन्यासारखी खरी उत्तरे मिळतील आणि डोळे खाडकन उघडतील.
आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपल्याच पाशी, आपल्याच कृतीत आहे. ‘महाराज महाराज’ केले की, सर्व चांगले झाले पाहिजे, अशी अपेक्षा असते. आळशी, आयतोबा झालो आहोत आपण; तरीही, आपल्याला सतत यश हवे आहे. हव्यास वाईट असतो. घर आहे, पण मोठे हवे… बंगला हवा! अजून हवे… अजून हवे… हे हवे, ते हवे… हे ‘हवे’ न संपणारे आहे आणि आपण जीव तोडून या हव्यासापोटी धावत आहोत. आज प्रपंच करणे इतके कठीण झाले आहे, डोळ्यांसमोर घरातील अनेक प्रश्न उभे असतात आणि त्यामुळे मन व्यथित होते. सतत भेडसावणारे भविष्य समोर नेहमीच आ वासून उभे असते, या आणि अशा कित्येक विचारांचा अतिरेक झाला की, शरीर आणि मन दोन्ही थकून जाते आणि मनासारखी सेवा घडत नाही, असे मनच कौल देते.
ज्या महाराजांच्या चरणाशी, त्यांच्या सान्निध्यात आनंद आहे, परमोच्च सुख आहे तिथे नको जायला? महाराजांच्या चरणाशी गाद्या-गिरद्या, एसी वगैरे सर्व सुखाची साधने नाहीत, उंची अत्तरे नाहीत की, मेजवानी नाही. पण आयुष्याच्या संध्याकाळी आपण शोधात असणारी शांतता मात्र त्यांच्याच चरणाशी आहे आणि तिच्या शोधात शेवटी आपण तिथेच पोहोचतो, हे त्रिवार सत्य आहे. आपण सगळ्या जगाला फसवू, पण आपल्या मनाला नाही!
हेही वाचा – श्वासागणिक नामस्मरण हीच निष्काम साधना
रात्री झोप का येत नाही, कारण अनेक चुकीच्या कर्मांचे मणामणाचे ओझे आहे मनावर. अशा वेळी आधी माफी, मग सगळ्यांशी प्रेमाने वागा, झोप नक्की येणार. मुळात आपले कुठेतरी चुकले आहे ते स्वीकारा; केलेल्या सर्व कृत्यांची जबाबदारी घ्या. बस्स, इतकेच करायचे आहे! आपल्याला जे कठीण आहे.
स्वीकारा सर्व काही जे जे केले आहे, मग ते चांगले-वाईट काहीही असो. कुणाला दुखावले असेल, तर त्यांची माफी मागावी, तरच, महाराज सुद्धा आपल्याला माफ करतील. त्यांच्या चरणी आपला प्रपंच वाहा. यापुढे ते सांगतील ते आणि ते नेतील तिथे! बुद्धी देणारे तेच आहेत… शेवटी कर्ते आणि करवते सुद्धा. यावर दृढ निश्चय ठेवा आणि समर्पित व्हा. हाच तो क्षण ज्याने आपले जीवन कात टाकल्यासारखे बदलून जाईल. आनंदाला बहार येईल आणि आशेला नवीन पालवी फुटेल. जीवन घडवण्यासाठी मिळालेली ही सुवर्णसंधी आहे आणि त्याचा उपयोग करून घेणे निव्वळ आपल्याच हाती आहे.
दूषित कर्मे जीवनात पाठ सोडत नाहीत म्हणून कर्म करताना महाराजांचा चेहरा डोळ्यांसमोर आला पाहिजे. त्यांना हे आवडेल का? हा प्रश्न सतत मनाला पडला पाहिजे आणि त्यानुसार आपले वर्तन असायला हवे. रागालोभाच्या पलीकडे गेलेला आणि स्वतःशी अत्यंत प्रामाणिक राहणारा भक्त महाराजांच्या सेवेत निरंतर दाखल होतो, यात वाद नाही. पुण्यस्मरण म्हणजे अधिकाधिक स्मरण, सतत त्यांचा ध्यास… त्यांच्याच विचारात जीवन व्यतीत करणे म्हणजेच खरी सेवा!


