कानडा राजा पंढरीचा
वेदांनाही नाही कळला
अंतपार ज्याचा…
निराकार तो निर्गुण ईश्वर
कसा प्रकटला असा विटेवर
उभय ठेविले हात कटिवर,
पुतळा चैतन्याचा…
परब्रह्म हे भक्तांसाठी
मुके ठाकले भीमेकाठी
उभा राहिला भाव सावयव,
जणू की पुंडलिकाचा…
हा नाम्याची खीर चाखतो
चोखोबांची गुरे राखतो
पुरंदराचा हा परमात्मा,
वाली दामाजीचा…
– ग. दि. माडगूळकर
गदिमांच्या सिद्धहस्त आणि प्रासादिक लेखणीतून अवतरलेले हे गीत आपल्या कानांवर पडले की, विलक्षण असा सात्विक शहारा हमखास येतो… आणि अलौकिक अशा चैतन्यमयी प्रवासाची सुरुवात होते.
पंढरीचा सावळा पांडुरंग भक्तासाठी अजूनही विटेवर उभा असलेला देव! पुंडलिकाची आठवण देत कोट्यावधी वारकऱ्यांच्या आणि भक्तांच्या हृदयाची धडधड सांभाळत तो आपल्या सर्वांच्या श्वासात मिसळलेला एक शाश्वत असा भाव आहे. पंढरीचा राजा कानडा आहे आणि खुद्द वेदांनाही त्याचा अंत किंवा पार लागलेला नाही, हे आपण ऐकत राहतो. कानडा या शब्दाचा अर्थ गूढ असा आहे, तो कर्नाटकचा आहे म्हणून कानडा नव्हे! कर्नाटक राज्याशी किंवा कन्नड, कानडी भाषेशी संबंधित आहे म्हणून हा कानडा शब्द आलेला नाही.
कानडा म्हणजे जो अगम्य आहे, ज्याचे आकलन सामान्य बुद्धीला होऊ शकत नाही, असा तो गूढ अनाकलनीय परमेश्वर!
आपल्या भारतीय संस्कृतीत उपनिषदे आणि वेदांना ज्ञानाचे सर्वोच्च आणि अंतिम स्रोत मानले जाते. ते तसे आहे ही! हजारो वर्षे ऋषीमुनींकडून या अथांग ईश्वरी तत्वाचे वर्णन करण्यासाठी वेदांची आणि उपनिषदांची निर्मिती झाली. पण जेव्हा त्या परब्रह्माचे संपूर्ण स्वरूप शब्दांत मांडण्याची वेळ आली, तेव्हा ते महान वेद सुद्धा थबकले आणि त्यांनी ‘नेति नेति’ म्हणजे हे ते नाही, हे ते नाही असे सांगून आपली असमर्थताही व्यक्त केली.
हेही वाचा – कान्होपात्रेचे समर्पण
ज्या अथांग तत्वाचा पार खुद्द वेदांनाही लागला नाही, पण तेच अथांग तत्व एका अत्यंत छोट्याशा विटेवर येऊन उभे राहिले आहे. जो ईश्वर मुळात निराकार आहे, ज्याला कोणताही विशिष्ट आकार नाही आणि …जो निर्गुण आहे, म्हणजे ज्याला प्रकृतीचे कोणतेही गुण बांधून ठेवू शकत नाहीत. पण तोच ईश्वर असा सगुण आणि साकार होऊन एका विटेवर कसा काय प्रकट झाला आणि आजवर तो भक्तांसाठी तिथेच ताटकळत उभा आहे! भक्तांनीही एवढा जीव, एवढा जीव लावला की, त्याची हलण्याची काय बिशाद? भक्त एक कष्ट घेत असेल तर हा कानडा चार कष्ट घेईल. पण तो विटेवर कसा? हा असा अत्यंत भोळा आणि तरीही भारलेला प्रश्न येथे विचारला आहे. या प्रश्नाचे उत्तर केवळ एकाच शब्दात आहे आणि ते म्हणजे भक्ताचे अथांग प्रेम!
जेव्हा ईश्वराला भक्ताच्या प्रेमाची ओढ लागते, तेव्हा तो आपले निराकार आणि निर्गुण रूप, मर्यादा, कलियुग, नियम, मोठेपण सगळे सगळे विसरून जातो आणि भक्तासाठी सगुण रूप धारण करतो. विटेवर उभे राहणे आणि दोन्ही हात कमरेवर ठेवणे यामागे एक आश्वासन दडलेले आहे, असं भक्त जाणतात. कमरेवर हात ठेवून तो सावळा विठ्ठल आपल्या प्राणप्रिय भक्तांना अगदी प्रेमाने सांगतो की, या भवसागराची किंवा या जन्म-मृत्यूच्या दुःखाची पातळी केवळ माझ्या कमरेइतकीच आहे. तुम्ही जर पूर्ण श्रद्धेने आणि प्रेमाने भक्ती, अहिंसा, श्रद्धा, मानवता जपलीत तर हा दुःखाचा महासागर तुम्हाला कधीही बुडवू शकणार नाही.
पांडुरंग हा चैतन्याचा पुतळा आहे, असे म्हटले आहे. ती मूर्ती म्हणजे प्रत्यक्ष शुद्ध अशा चैतन्याचे घनीभूत झालेले रूप आहे. साक्षात परब्रह्म हे भक्तांसाठी उभे ठाकले. नकळतपणे ज्या पांडुरंगाला आठवून, स्मरून, पाहून वारकऱ्यांच्या, भक्त मंडळींच्या हृदयातून भक्तीचे वारे वाहू लागतात तो परब्रह्म म्हणजे या संपूर्ण विश्वाची निर्मिती करणारी आणि त्याचे पालन करणारी ती सर्वोच्च आणि अत्यंत प्रबळ अशी चैतन्यमय ऊर्जा.
पण ही इतकी मोठी ऊर्जा चंद्रभागेच्या आणि भीमेच्या वाळवंटात आपल्या भक्तांसाठी अत्यंत मौन आणि स्तब्ध होऊन उभी राहिली आहे. ईश्वर भक्ताच्या प्रेमात पडतो तेव्हा शब्दांची, कुठल्या नियमांची गरजच उरत नाही.
भक्त पुंडलिकाने आपल्या मातापित्यांची सेवा करताना जी एक वीट ईश्वराच्या दिशेने भिरकावली होती, त्याच विटेवर तो परमेश्वर युगानुयुगे उभा आहे. पुंडलिकाच्या अंतःकरणातील तो अत्यंत शुद्ध असा मातृपितृभक्तीचा भावच जणू काही प्रत्यक्ष विठ्ठलाच्या रूपाने तिथे साकार झाला आहे.
पंढरपूरच्या मंदिरात पुंडलिकाच्या अत्यंत उत्कट अशा भक्तीचाच एक सजीव आणि सावयव असा आविष्कार आहे. हा तोच ईश्वर आहे ज्याने संत नामदेवांच्या बालसुलभ हट्टापायी त्यांच्या हातातील दुधाची आणि खिरीची वाटी अत्यंत प्रेमाने चाखली होती. समाजाकडून सतत अवहेलना सहन करावे लागलेले संत चोखामेळा देवाचा धावा करतात, तेव्हा हाच देव स्वतःला हाक येण्याआधीच कितीतरी वेळ आधी गुराखी होऊन त्यांची गुरे राखतो आहे.
हेही वाचा – चिंचेच्या पानावर देऊळ रचिले
हा केवळ पुरंदरदासांचा परमात्मा नाही तर भयंकर दुष्काळात जेव्हा दामाजीपंतांनी स्वतःच्या जिवावर उदार होऊन गोरगरिबांसाठी धान्याची कोठारे खुली केली होती, तेव्हा त्या दामाजीला वाचवण्यासाठी हाच ईश्वर स्वतः विठूमहार माऊलीचे रूप धारण करून बादशहाच्या दरबारात हजर झाला होता.
ईश्वराला तुमच्या संपत्तीची, स्त्री पुरुष असण्याची, तुमच्या जातीची किंवा तुमच्या विद्वत्तेची, ज्ञानाची, साधनेची कोणतीही अट नसते. त्याला केवळ तुमच्या अंतःकरणातील अत्यंत शुद्ध आणि निष्पाप अशा प्रेमाची भूक असते.
अगम्यः पाण्डुरङ्गोऽयं
वेदैर्नापि च बुध्यते।
निर्गुणः सगुणो भूत्वा
इष्टकायां हि तिष्ठते॥
पुण्डलीकस्य भावेन
साक्षद्रूपं प्रकाशते।
भक्तानां प्रेमरज्जुभिः
बद्धो भूत्वा हि वर्तते॥
– गीताव्रत
हा जो पांडुरंग आहे ना, तो अत्यंत अगम्य आहे आणि प्रत्यक्ष वेदांनाही त्याचे आकलन पूर्णपणे होऊ शकत नाही. जो मुळात निर्गुण आणि निराकार आहे, तो केवळ भक्तांच्या प्रेमापोटी सगुण साकार रूप धारण करून एका छोट्याशा विटेवर अत्यंत शांतपणे उभा राहिला आहे.
भक्त पुंडलिकाच्या अंतःकरणातील त्या अत्यंत शुद्ध अशा भावामुळेच त्या परब्रह्माचे साक्षात रूप या चंद्रभागेच्या वाळवंटात प्रकाशित झाले आहे आणि हा अथांग असा ईश्वर आपल्या भक्तांच्या अत्यंत शुद्ध अशा प्रेमाच्या दोरीने बांधला जाऊन त्यांच्यासाठी तिथे अत्यंत मौन आणि स्तब्ध होऊन उभा राहतो.
असे पांडुरंगाच्या गूढ आणि गोड, लोभस अशा लीलांचे वर्णन केले आहे. हा चैतन्याचा पुतळा, परब्रह्म आत्मस्वरूपात आपल्याच अंतःकरणात कायमचे विराजमान रहावेत.


