हिमाली मुदखेडकर
भाग – 5
केस सुरू होऊन दोन वर्षे उलटून गेली होती… दोन वर्षे! अनिकेतच्या आयुष्यातील ही दोन वर्षे न्यायालयाच्या तारखा, वकिलांच्या बैठका, कागदपत्रे, प्रतिज्ञापत्रे आणि अंतहीन प्रतीक्षेमध्ये निघून गेली होती. अपघातानंतर चार वर्षे उलटली होती. त्या छोट्या भ्रुणाला प्रयोगशाळेतील क्रायो स्टोरेजमध्ये ठेवूनही आता जवळ जवळ पाच वर्षे होत आली होती…
न्यायालयात आता भावना नव्हे तर विज्ञान, नैतिकता आणि कायदा साक्षीदारांच्या पिंजर्यात उभे राहिले होते. न्यायालयीन लढाई आता एका निर्णायक टप्प्यावर पोहोचण्यात होती…
त्या दिवशी कोर्टरूम खचाखच भरली होती. पत्रकार, कायद्याचे विद्यार्थी, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते… पण बहुतेकांना निकालापेक्षा वादात अधिक जास्त रस होता.
न्यायमूर्ती प्रधान खंडपीठावर विराजमान होताच सुनावणी सुरू झाली.
आजच्या पहिल्या साक्षीदार होत्या डॉ. मृणालिनी पाटील… IVF तज्ज्ञ!
ॲड. विभा शेलारांनी सुरुवात केली.
“डॉ. पाटील, संबंधित भ्रूण आजही वैद्यकीयदृष्ट्या सक्षम आहे का?”
“हो.”
“पाच वर्षांनंतरही?”
“हो.”
“त्यातून निरोगी गर्भधारणा होण्याची किती शक्यता आहे?”
“वैद्यकीय दृष्टीने ते भ्रूण पूर्णपणे निरोगी आणि एक जीव म्हणून जन्माला येण्यास सक्षम आहे. त्यातून एक निरोगी बालक जन्माला येण्याची पूर्ण शक्यता आहे,” डॉ. मृणालिनी पाटील म्हणाल्या.
विभा यांनी विचारलं, “गोठवून ठेवलेल्या भ्रूणांच्या यशस्वी गर्भधारणांची काही उदाहरणे तुमच्या नोंदित आहेत का?”
“अनेक आहेत. पण त्यांची नावे आणि माहिती गुप्त ठेवावी लागते. आम्हाला त्यांची वैयक्तिक माहिती त्यांच्या परवानगीशिवाय इतरांना देता येणार नाही.”
“म्हणजे, विज्ञान या प्रक्रियेला अशक्य मानत नाही?”
“अजिबातच नाही.”
“अशी किती उदाहरणे आहेत, ज्यात एका स्त्रीचे गोठवलेले भ्रूण दुसरी स्त्री जन्माला घालते?”
“अशी अनेक उदाहरणे आहेत. जेव्हा काही शारीरिक त्रुटीमुळे IVF ट्रीटमेंट घेणारी स्त्री गर्भ धारण करू शकत नसेल… किंवा भ्रूणाचे भरणपोषण करण्यास जैविक मातेचे गर्भाशय सक्षम नसेल, तेव्हा त्या परिस्थितीत सरोगसीचा पर्याय दिला जातो.”
हेही वाचा – संकर्षण… खरी लढाई आता सुरू झाली
“म्हणजे IVF तंत्रात आणि नियमांत अशी तरतूद आहे, याची कृपया नोंद घ्यावी माय लॉर्ड…”
आता ॲ[. राघव आपटे उभे राहिले.
“डॉक्टर, IVF कायदा व्यक्तीच्या मृत्यूनंतर भ्रूण वापरण्याची स्पष्ट परवानगी देतो का?”
“नाही.”
“मग अशा परीस्थितीत तुम्ही काय करता?”
“आम्ही यात असलेल्या व्यक्तीच्या कनसेंटने ते भ्रूण नष्ट करतो.”
राघव न्यायमूर्तींकडे वळून म्हणाले, “माय लॉर्ड, जेथे कायद्यात तरतूद नाही, तिथे न्यायालयाने अपवाद निर्माण करणे धोकादायक ठरू शकते.”
“माय लॉर्ड…” विभा शेलारांचा आवाज घुमला, “मी आणखी एक प्रश्न डॉक्टरांना विचारू इच्छिते…”
न्यायमूर्तींची परवानगी मिळाल्यावर विभा शेलार म्हणाल्या, “कायदा मृत व्यक्तीचे भ्रूण वापरण्यास स्पष्ट बंदी घालतो का?”
“नाही… म्हणजे या बाबतीत तितकीशी स्पष्टता नाही कायद्यात.”
“म्हणजे कायदा मौन बाळगतो.”
“हो.”
“माय लॉर्ड, हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की, जैविक तंत्रज्ञानाच्या नियमावलीमध्ये अशा बाबींची स्पष्ट नोंद नाही.”
0000
दुसर्या साक्षीदार होत्या प्रसिद्ध बालमानसशास्त्रज्ञ डॉ. शीतल थोरात.
राघव आपटे यांनी सुरुवात केली.
“डॉक्टर, मुलाच्या आयुष्यात आईची भूमिका महत्त्वाची असते का?”
“हो… नक्कीच!”
“आईच्या अनुपस्थितीचा मुलांच्या जडणघडणीवर परिणाम होऊ शकतो का?”
“काही परिस्थितींमध्ये होऊ शकतो.”
राघव समाधानी दिसत होते.
विभा शेलार प्रश्न विचारण्यासाठी उभ्या राहिल्या…
“डॉक्टर, एकल पालक असलेल्या प्रत्येक कुटुंबातील मूल मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असते का?”
“नाही.”
“पालक पुरुष आहे की, स्त्री यापेक्षा प्रेम, स्थैर्य आणि संगोपन अधिक महत्त्वाचे असते की नाही?”
“हो… पण बहुतांश एकल पालकांची यशस्वी उदाहरणे लक्षात घेता… एकल पालकत्व स्त्रिया जास्त चांगलं पेलू शकतात, असं म्हणावं लागेल.”
“अस कसं म्हणता तुम्ही डॉक्टर? अगदी पुरातन काळापासून आजपर्यत पुरूष एकल पालक असल्याची उदाहरणे आहेत आपल्याकडे. त्याचे प्रमाण कमी असेल… पण नगण्य नाही. खूप मागे जाऊन पुराण काळातील उदाहरण घ्यायचे झाले तर, ऋषी पराशर यांनी त्यांचे पुत्र व्यास यांना जन्मापासून एकट्यानेच वाढवल्याचा दाखला महाभारतात सापडतो.”
“माझी हरकत आहे माय लॉर्ड…” ॲड. आपटे जागेवरून उठत म्हणाले.
“माय लॉर्ड, पुराणकथा आणि आधुनिक कायदा यांची तुलना करता येणार नाही.”
“मी कायद्याची तुलना करत नाही…” विभा शांतपणे म्हणाल्या, “मी समाजमनाची चर्चा करते आहे. आपल्या इतिहासात पुरुषाचे एकल पालकत्व ही नवीन गोष्ट नाही, हे सिद्ध करू इच्छित आहे.”
न्यायालयाने विभा शेलारांना पुढे बोलण्याची परवानगी देताच त्या म्हणाल्या,
“माझे सहकारी मित्र आपटे साहेबाच्या समाधानासाठी मी अलीकडचे म्हणजे इतिहासातील उदाहरण देते मनकर्णिका तांबे म्हणजेच ज्यांना आपण सगळेच झाशीची राणी लक्ष्मीबाई या नावाने ओळखतो, त्यांचे जन्मापासून संगोपन त्यांचे पिता मोरोपंत तांबे यांनी त्यांच्या पत्नीच्या मृत्यू पश्चात एकट्यानेच केले असल्याचा दाखला आहेच की! समाज बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण प्रेमाने मुल वाढवण्याची क्षमता केवळ स्त्रीकडे आणि पुरुषांकडे ती नाही, असं कसं म्हणता येईल?”
राघव आपटे उभे राहिले, “माय लॉर्ड, चुकीची उदाहरणे देत आहेत शेलार मॅडम! यापैकी कोणत्याही व्यक्तीचा जन्म हा आईच्या मृत्यूपश्चात झालेलाच नाही!!”
न्यायमूर्ती म्हणाले, “हरकत मान्य आहे… अॅड. विभा, पुढील सुनावणीदरम्यान तुमच्या मुद्द्याला अनुसरून तुम्ही तुमचा पक्ष मांडावा, हे अपेक्षित आहे…”
पुढील सुनावणीची तारीख आठ आठवड्यानंतरची देण्यात आली.
हेही वाचा – संकर्षण… ‘त्या’ स्वप्नाने अनिकेतला दिलं बळ
0000
माध्यमांमध्ये आता नव्या चर्चांना उधाण आलं. काहींचे म्हणणे होते, “वडिलांच्या अधिकारासाठीची ऐतिहासिक लढाई.”
काही म्हणत होती, “मृत स्त्रीच्या इच्छेवर अतिक्रमण?”
सोशल मीडियावर तर अराजक माजलं होतं. काही पोस्टमध्ये अनिकेतला नायक दाखवलं जात होतं तर, काहींमध्ये खलनायक!
एका व्हिडीओमध्ये त्याच्या अपघाताचे फोटो वापरून भावनिक संगीत लावण्यात आलं होतं.
हताश अनिकेत विभा शेलारांच्या ऑफिसमध्ये बसला होता.
“मला आता थकवा आलाय,” अनिकेत म्हणाला, “दोन वर्षे झाली. आणखी किती?”
विभा एकटक खिडकीबाहेर पाहात म्हणाल्या,
“माहीत नाही.”
क्रमश:
(Disclaimer : ही कथा काल्पनिक असून याचा कोणत्याही घटना अथवा व्यक्तीशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)


