भाग – 29
माधव विचार करू लागला, “शर्वाय आराध्याला काहीच कसं बोलला नाही? उलट तिच्यावर विश्वास दाखवला… हे असं झालंच कसं?”
कामात जराही चूक झालेली जराही चालत नसणारा शर्वाय तिला काहीच बोलला नाही, याचेच त्याला आश्चर्य वाटत होते. माधव मनातून नुसता चरफडत होता. आपला हा डाव फसला, आता अजून एका डावाची योजना करावी लागेल, अशाच विचारात तो होता.
शर्वायच्या त्या शांत राहण्यामुळे आणि विश्वासामुळे आराध्याच्या मनात शर्वायविषयीची ओढ वाढू लागली. तिला आता वाटू लागतं की, शर्वाय फक्त एक यशस्वी व्यावसायिकच नाही, तर एक आदर्श प्रमुख आणि उत्तम माणूसही आहे.
माधवला शर्वाय आणि आराध्या यांच्या नात्यात काहीतरी खास फुलू लागतंय, हे जाणवू लागलं. त्याला हे बिल्कूल आवडलं नाही. त्याला हे ठाऊक होतं की, शर्वायची सहानुभूती आणि आपुलकी जर आराध्याकडे वळली, तर त्याच्या योजना धोक्यात येतील. त्यामुळे हे नातं फुलू नये, यासाठी काही कारस्थानं घडवूनच आणायला हवी, याच विचारात तो होता.
शर्वायच्या ऑफिसमध्ये एक महत्त्वाचा प्रोजेक्ट सुरू झाला होता. आराध्याही त्या प्रोजेक्टचा एक भाग बनली आहे, हे पाहून माधवला इथेच एक डाव सुचला. त्याने शर्वायच्या विश्वासातल्या एका कर्मचार्याला पटवलं. आराध्याला चुकीची कागदपत्रं आणि सूचना द्यायला सांगितलं. जेणे करून यामुळे शर्वायसमोर आराध्याची चूक ठळकपणे समोर येईल आणि त्याचा तिच्यावरचा विश्वास डळमळेल.
आराध्या अतिशय प्रामाणिकपणे काम करत होती… झालेल्या कामाची पाहणी करत असताना अचानक तिच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी निघाल्यामुळे ती खूपच गोंधळली. शर्वायच्या समोर तिला स्वतःला दोषी वाटू लागलं. हे अस कसं आपल्याकडून घडलं?
हेही वाचा – शर्वायने आराध्याला सांगितले, त्या गूढ बॉक्सचे महत्त्व!
एवढी मोठी चूक पाहून शर्वायला थोडासा राग आला, पण त्याने आराध्याला थेट काहीही बोलणं टाळलं. इतकी मोठी चूक पाहून मात्र, तिच्या क्षमतेबद्दल त्याच्या मनात थोडासा संभ्रम निर्माण झाला… पण तो क्षणिकच. आराध्याकडून इतकी मोठी चूक होऊन सुद्धा शर्वायला आराध्या अशी चुकूच शकत नाही, याची पूर्ण खात्री होती. झाल्या घटनेचा विचार करता त्याला जाणवतं की, हे काहीतरी बनावटी आहे.
शर्वायने तपास सुरू केला. ज्या कर्मचाऱ्याच्या मदतीने आराध्या काम करत होती त्या कर्मचार्यावर नजर ठेवली गेली. आपल्याकडून इतकी मोठी चूक होऊन सुद्धा शर्वाय सरांच्या तोंडून काही ऐकवलं गेलं नाही, ते शांतच होते म्हणून तिला खूपच वाईट वाटलं. तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. यापुढे आपण कष्ट करून आपल्या चुका सुधारून स्वतःला सिद्ध करण्याचं ठरवलं आणि ते तसं शर्वायसमोर बोलूनही दाखवलं.
शर्वाय तिचा निश्चय पाहून प्रभावित झाला. त्याने तिच्या प्रयत्नांना पाठिंबा दिला. हळूहळू त्याला तिच्याबद्दल आपुलकी वाटू लागली. शर्वायचं एकूण वागणं पाहून माधवला वाटतं की, हा डाव यशस्वी झाला, पण शर्वाय अजूनही आराध्याला संधी देत असल्याने माधव अस्वस्थ झाला. आणखी काही कट आखता येईल, का याचा तो विचार करू लागला.
मनातच काही ठरवून माधव शर्वायच्या ऑफिसमध्ये आला, त्याने शर्वायशी अगदी आपुलकीने आणि किती काळजी आहे, असं दाखवत एक खेळी खेळण्याचं ठरवलं होतं.
माधव हसत केबिनमध्ये शिरत म्हणाला,
“काय रे शर्वाय, कामात खूप बिझी दिसतोस?”
शर्वाय माधवला असं आपल्या केबिनमध्ये आलेलं पाहून गंभीरपणे म्हणाला…
“हो काका, काही महत्त्वाच्या प्रोजेक्ट्सवर काम सुरू आहे.”
माधव थोडा विचार करत म्हणाला…
“शर्वाय, तुझं लग्नाचं वय झालंय आता. मला वाटतं, आता तू लग्नाचा विचार करायला हवा.”
शर्वाय गोंधळून… “लग्न? आणि आता?”
“हो, अगदी बरोबर वेळ आहे ही. तुझ्यासाठी एक चांगली मुलगी पाहिली आहे. आमच्या ओळखीचीच आहे — सक्षम, सुशिक्षित, आपल्याच स्तराची आहे. तुझ्यासारख्या हुशार आणि कर्तबगार मुलासोबत तिच लग्न होणं उत्तम होईल…” – माधव.
शर्वाय थोडा विचारात पडला. त्याला हे असं अचानक आणि अनपेक्षित वाटलं होतं… त्याच्या मनात विचार सुरू झाला — आराध्यासोबत आपली वाढत असलेली आपुलकी आणि माधवकाकांनी आणलेला हा प्रस्ताव… शर्वाय थोडा संभ्रमातच होता….
“काका, सध्या माझं लक्ष व्यवसायावर आहे. हे लग्नाचं प्रकरण जरा पुढे ढकलू या का?”
माधव हसून म्हणाला, “व्यवसायाचं काय, तो तर आयुष्यभर चालणारच आहे. पण लग्न मात्र वेळेवर व्हायला हवं. आजी आणि आनंदीलाही खूप आनंद होईल.”
माधवला माहीत होतं की, शर्वायने जर लग्नाचा विचार केला, तर त्याचं लक्ष आराध्याकडून हटेल आणि त्यांच्यात फुलू लागलेलं नातं वेळेच्या आत संपृष्टात येईल. माधव शर्वायच्या केबीनमध्ये शिरताना त्याने दार काही अंशी उघडं ठेवलं होतं, आराध्याला आपल्या केबिन बाहेर पडताना त्यानं पाहिलं होतं. आराध्या इथे आलीच तर…
माधवचा अंदाज अगदी 100% खरा ठरला. माधव आणि शर्वायचा हा संवाद आराध्याच्या कानावर पडला. तिला कळून चुकलं की, शर्वायच्या आयुष्यात कुणीतरी दुसरी येणार आहे. तिच्या मनात एक प्रकारची अस्वस्थता आणि हुरहूर निर्माण झाली.
तिने स्वतःला समजवलं… “आपला शर्वायवर हक्क नाही…” पण असं स्वतःला सांगताच तिच्या डोळ्यांतून नकळत अश्रू येऊ लागले. ती तशीच पाठी फिरली.
माधव बोलून गेल्यानंतर काही बदल जाणवू लागला. शर्वायला आराध्याच्या मनातल्या भावना जाणवत होत्या. त्याला तिची अस्वस्थता दिसत होती, ती काहीशी अस्वस्थ वाटत होती.
त्याला हेही समजून चुकलं की, लग्नाचं प्रकरण माधवने मुद्दाम पुढे आणलं आहे. त्याच्या मनात आराध्याच्या प्रति ओढ वाढत चालली होती… पण माधवचा हा हट्ट आणि कुटुंबाचा विचार करून तो मात्र संभ्रमात पडला होता.
माधवच्या या खेळीमुळे शर्वाय आणि आराध्याच्या नात्यात एक अनपेक्षित तणाव निर्माण झाला. आराध्याला कसं सांभाळाव, हे शर्वायला कळत नव्हतं… तर आराध्याला आपल्या भावना दडवाव्या लागत होत्या. माधव मात्र आपली योजना यशस्वी झाल्याबद्दल आनंदीत झाला होता.
सालाबाद प्रमाणेच यावर्षीही जहागीरदार इंडस्ट्रिजमध्ये एक सामाजिक समारंभ आयोजित केला होता. त्या अंतर्गत वर्षभरात उत्तम काम केलेल्यांना गौरवलं जात असे. आराध्याला काहीच महिने झाले होते, जहागीरदार इंडस्ट्रिज जॉइन करून; पण तरीही शर्वायने आराध्याला स्वतःहून बोलावलं आणि या समारंभाला उपस्थित राहण्याचं आमंत्रण दिल.
आराध्याने समारंभासाठी सोज्वळ पोशाख परिधान केला… नाजूक गुलाबी रंगाची साडी, साधा गजरा आणि हलका मेकअप. साधेपणातूनही तिच्या सौंदर्याचा तेजस्वीपणा उठून दिसत होता…
आराध्याला पाहून आई प्राजक्ता आश्चर्यचकित होऊन म्हणाली, “अरे वा! आज माझी आराध्या अगदी सुंदर दिसतेय. ”
आईच्या कौतुक करण्याने आराध्या लाजत म्हणाली, “आई, काहीही काय?”
“हो, अगं! आता कसं, तुला पाहून शर्वायची नजर हटणार नाही…” असं प्राजक्ताजवळ जात शांता आजी आनंदाने हळू आवाजात म्हणाली.
समारंभ एका आलिशान हॉलमध्ये ठेवला गेला होता. शर्वाय आधीच तिथे पोहोचलेला, पाहुण्यांचे स्वागत करत होता. तेवढ्यात त्याची नजर समोरून येणाऱ्या आराध्यावर गेली. ती साध्या साडीमध्येही इतकी सुंदर दिसत होती की, शर्वाय काही क्षण तिच्याकडे एकटक पाहत राहिला.
हेही वाचा – आराध्याविरोधात माधवने कटकारस्थान पुन्हा सुरू केले…
शर्वाय मनातच… “काय आहे हिच्यात? साध्या पेहरावातही इतकी मोहक का वाटतेय?”
विचार करतच तो आराध्याकडे जातो. शर्वाय हलकसं स्मित करत म्हणतो, ” आराध्या, आज तू खूपच सुंदर दिसतेयस!”
आराध्या हलक हसून, “धन्यवाद, सर!”
शर्वायशी बोलून आराध्या हॉलमध्ये शिरतच होती, तेवढ्यात माधवही हॉलमध्ये आला. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू होतं… त्याला शर्वाय आणि आराध्याला एकत्र पाहून अस्वस्थ वाटलं.
माधव मात्र मनातच… “हे कधीपासून एकत्र आले? हे काही चांगलं नाही! काहीतरी करायलाच हवं…” असा विचार करू लागला. माधवने ऑफिसमधल्या काही कर्मचाऱ्यांना गुपचूप बोलावून घेतलं आणि आपला सुप्त कट रचायला सुरुवात केली. आराध्या नवीन असल्यामुळे समारंभात काहीतरी चूक करेलच, याची त्याला खात्री होती…
म्हणून त्याने त्या कर्मचाऱ्यांना सांगितलं… “तुम्ही तिला मदत करत असल्याचं दाखवा आणि तिच्याकडून काही चूक घडेल असं बघा…”


