भाग – 27
शर्वायचा नवा प्लॅन सुरू होतो — आतल्या माणसाला शोधणं. त्याच्या कॉर्पोरेट सिस्टममध्येच कुणीतरी माहिती लीक करत होतं. तो आराध्याला न सांगता, तिच्यावर नजर ठेवण्याचा आणि तिला सावध ठेवण्याचा निर्णय घेतो.
ट्रेनिंगदरम्यान आराध्याला एक फाइल सापडली… जी आजवर कोणाच्याही हाती लागली नव्हती आणि पूर्वकल्पना नसताना तिच्या हाती ती सहज लागली होती आणि इथेच सुरुवात झाली एक नवा गूढ धागा वीणायला… ती फाइल पहिल्यांदा पाहिल्यावर आराध्याला काहीच विशेष वाटलं नाही. पण जसजशी तिने ती फाइल वाचण्यास सुरुवात केली, तिच्या कपाळावर आठ्या पडू लागल्या.
फाइलमध्ये काही पुरावे होते — अशा प्रोजेक्ट्सचे संदर्भ, जे अधिकृतपणे कंपनीमध्ये सुरूच नव्हते. काही नावं, काही कोडवर्ड्स आणि एक स्केच… जे बघून तिचं काळीज दडपून गेलं.
ते स्केच म्हणजे होतं त्याच बॉक्सचं चित्र — जे तिच्याकडे आहे!
“हे इथे कसं आलं?” ती थरथरत विचार करू लागली.
तिच्या नकळत, माधव तिच्यावर लक्ष ठेवून होता आणि शर्वायच्या खास टीममधल्या एका व्यक्तीने शर्वायला माहिती दिली —
“ती फाइल चुकून, तिच्या डेस्कवर पोहोचली. ती काहीतरी समजतेय… काळजी घ्या.”
शर्वायने आराध्याला ऑफिसच्या विशेष गार्डनमध्ये बोलावलं. जे फक्त अन् फक्त त्याच्या करिता होतं… जेव्हा कधी त्याला ताण असह्य होई, तेव्हा तो तिथे जाऊन स्वतःला शांत करीत असे. आराध्या तिथे आल्यावर दोघं शांत बसले.
नंतर शर्वायने तिला विचारलं, “आराध्या, काही सापडलं का असं काही जे तुला विचित्र वाटतंय?”
तिने त्याच्याकडे पाहिलं… आता तिला शर्वायविषयी पूर्णपणे विश्वास निर्माण झाला होता.
हळू आवाजात ती म्हणाली… “तुमचा एक विशेष बॉक्स… त्याचं चित्र त्या फाइलमध्ये आहे आणि काही अनोळखी कोडही आहेत… ‘प्रोजेक्ट शिव’, ‘सुदर्शन’… हे काय आहे?”
हेही वाचा – “खरा डाव आता सुरू होतोय…”
शर्वाय गप्प होतो. मग तो शांतपणे म्हणतो — “कदाचित तुला आता खऱ्या मिशनमध्ये उतरायची वेळ आली आहे, आराध्या.”
शर्वायने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाला, “आराध्या, तुला हा बॉक्स कुठे मिळाला?”
आराध्या विचारात पडली…
“तो मला तुमच्या घरी गेले होते, तेव्हा मिळाला.”
मग तिने त्यादिवशी घडलेला सर्व प्रसंग त्याला जशाचा तसा वर्णन करून सांगितला. तिने घेतलेला तो अनुभव ऐकून तो निःशब्द होता. हा बॉक्स मिळायला कित्येकांनी प्रयत्न केला होता. अगदी त्यानेही तो प्रयत्न केला होता, पण त्याला यश मात्र आलं नव्हतं… आणि तिला मात्र त्याबद्दल काहीही माहीत नसताना तिच्या हाती तो इतका सहज लागावा, याचंच त्याला नवल वाटलं… पण हे ज्यासाठी घडत होतं, ती गोष्टच किती विलक्षण होती…
शर्वायने हळू आवाजात तिला सांगितलं,
“हा बॉक्स म्हणजे जहागीरदार कुटुंबाच्या भूतकाळातील काही गोष्टींशी संबंधित आहे. ते एका विशिष्ट परंपरेशी निगडित आहे. हा बॉक्स ज्या व्यक्तीच्या हातात येईल, ती व्यक्ती त्याच्याशी काही संबंधातून जोडलेली असते… इतकंच काय ते मला माहीत आहे. बाकीबाबत गुरुजीच काही ते सांगू शकतील…”
आराध्या गोंधळली… “परंपरा? आणि माझं त्याच्याशी काय संबंध?”
शर्वायने तिला समजावलं, “हे प्रोजेक्ट एक अत्यंत गुप्त आणि धोकादायक मिशन आहे. त्यात अशा लोकांचा समावेश आहे, जे या गोष्टींच्या सुरक्षेचं रक्षण करतात. पण या प्रोजेक्टच्या कागदपत्रांवर तुझ्याजवळ असणाऱ्या बॉक्सचं चित्र कसं आलं, हे एक कोडंच आहे.”
आराध्या अजूनच गोंधळली.
“मग आता काय करायचं? आणि हा तुमचा माधव काका माझ्या मागे का आहे?”
शर्वायने तिच्याकडे रोखून पाहात सांगितलं, “माधव आणि त्याच्या गटाला या प्रोजेक्टच्या माहितीची गरज आहे. त्यांना कदाचित तुला एका साध्या मोहरेसारखं वापरायचं असेल. तुला बॉक्स मिळाल्यामुळे त्यांना वाटतं की, त्याचं कोडं तुला माहीत आहे.”
आराध्या विचारमग्न झाली… ‘म्हणजे यात कोण कोण गुंतलेल असेल?’
शर्वायने डोळे बंद करत शांतपणे म्हणाला… ” यात काही गुप्त इतिहास दडलेला आहे. हे कदाचित खरे असेल, किंवा नसेल… पण अजून स्पष्ट काहीच माहीत नाही. आता आपण काळजीपूर्वक पुढे जायचं आहे. माधववर लक्ष ठेवायच आहे.”
शर्वाय पुढे म्हणाला…
“आपल्याला यामध्ये कोणावरही विश्वास ठेवता येणार नाही. आपण काहीतरी मोठ्या कटात अडकतोय.”
त्याचवेळी शर्वायचा फोन वाजतो — “साहेब, माधवने एका गुप्त फाइलमध्ये तांत्रिक बदल केले आहेत. काही गोष्टी चोरीला जाण्याची शक्यता आहे.”
शर्वायने शांततेने उत्तर दिलं, “सगळ्या हालचालींवर लक्ष ठेवा. आपल्याला कळायला हवं की, तो काय शोधतोय.”
शर्वाय आराध्याकडे पाहून म्हणाला… “तू एक काम कर. सध्या ऑफिसमध्ये काही न बोलता काम कर. तुझ्या वागण्यात कोणताही बदल दिसून देऊ नकोस. माधव काय करतो, हे लक्ष ठेव. आपण त्याचा पुढचा कट उधळून लावायचा आहे.”
आराध्याने निर्धाराने मान हलवली.
शर्वायच्या या धाडसी आणि निर्णायक स्वभावामुळे आराध्याच्या मनात एक वेगळीच भावना उमलू लागली होती. त्याच्या आत्मविश्वासपूर्ण नजरेत काहीतरी खास होतं, जे तिच्या हृदयात गोड स्पंदन निर्माण करत होतं.
असंच एका संध्याकाळी, ऑफिसमधून निघताना शर्वाय आराध्याला म्हणाला…
“आज थोडं लवकर निघूया का? मला काही खास सांगायचंय.”
आराध्या थोडी चिंतित झाली.
“काही विशेष आहे का?”
शर्वायने एक हलकं हसत उत्तर दिलं, “हो, पण तुझ्यासाठी एक सुखद आश्चर्य आहे.”
ते दोघं ऑफिसच्या बाहेर पडले. शर्वायने तिला एका शांत, समुद्रकिनाऱ्यावर नेलं. सूर्य मावळतीला जात असताना, त्या निर्मनुष्य किनाऱ्यावर फक्त समुद्राच्या लाटांचा आवाज आणि त्यांच्यातील निःशब्द संवाद होता.
शर्वायने समुद्राकडे पाहत सांगितलं, “आराध्या, मला माहीत आहे की तू सध्या एका अवघड परिस्थितीत आहेस. पण तुझ्या धैर्याने आणि निष्ठेने मला खूप प्रभावित केलंस. जेव्हा तू त्या हॉटेलमधून स्वतःचं रक्षण करत आलीस, तेव्हा मला कळलं की तू किती निडर आहेस.”
आराध्याच्या चेहऱ्यावर लाजरे हसू उमटलं.
“मी तर घाबरले होते… पण तुमच्यामुळेच मला आधार मिळाला.”
शर्वाय तिच्याकडे एकटक पाहत म्हणाला, “आधाराची गरज तुला नाही, आराध्या. तुझ्या नजरेत एक अशी चमक आहे, जी प्रत्येक अडचणीला पार करेल आणि… मला वाटतं, त्याच क्षणी तू एक वेगळं स्थान निर्माण केलंस.”
आराध्या गोंधळली, पण तिच्या डोळ्यांत चमक आणि हलकीशी लाज स्पष्ट दिसत होती.
“शर्वाय सर तुमचं बोलणं… काहीतरी वेगळं वाटतंय.”
शर्वायने तिच्या हातावर हलकेच स्पर्श करत सांगितलं, “हो आराध्या, कदाचित हेच खरं आहे. तुझ्या धाडसी आणि नि:स्वार्थ स्वभावाने माझं मन जिंकलंस. माझ्या आयुष्यात खूप लोक आले, पण तुझ्या सच्चेपणाची आणि निखळतेची जादू वेगळीच आहे.”
आराध्या थोडीशी गोंधळली, पण मनात एक सुखद धडधड वाढली होती…
“शर्वाय सर… मला कधीच वाटलं नव्हतं की, असं काही घडेल. तुमच्यासारख्या मोठ्या माणसाचं माझ्याबाबत असं मत आहे, हेच खूप आहे.”
शर्वायने शांतपणे सांगितलं, “अनेकदा मनाचा कधीच अंदाज येत नाही. जेव्हा योग्य व्यक्ती समोर येते, तेव्हा शब्दांची गरजच उरत नाही. फक्त भावना बोलतात.”
त्या संध्याकाळी समुद्राच्या साक्षीने त्यांच्या नात्याचा एक नवा अंकुर फुलू लागला होता. शर्वाय आणि आराध्या एकमेकांकडे पाहत न बोलता त्या भावनेत हरवून गेले. शर्वाय आणि आराध्याच्या नात्याचा रंग हळूहळू गडद होत चालला होता. शर्वायचा आत्मविश्वास, त्याचा कणखरपणा आणि त्याच्या नजरेतला जिव्हाळा आराध्याच्या मनात एक वेगळीच भावनांची लहर निर्माण करत होता.
एके दिवशी ऑफिसमधून बाहेर पडताना शर्वाय आणि आराध्या एकत्र निघाले. हलका पाऊस सुरू होता. शर्वायने गाडी थांबवली आणि आराध्याला म्हणाला, “चल, थोडं चालून जाऊ या. पाऊस खूप छान आहे.”
आराध्या थोडी गोंधळली… “पण पाऊस… भिजू ना आपण?”
शर्वायने हलकंसं हसत उत्तर दिलं, “कधी कधी पावसात भिजण्याची मजा वेगळीच असते मिस आराध्या…”
ते दोघं रस्त्यावर चालत होते. पावसाच्या सरी अंगावर घेताना आराध्या थोडीशी लाजली. शर्वाय तिच्याकडे पाहत होता — तिच्या ओलेत्या केसांतून पडणारे थेंब, तिच्या गालांवरून ओघळणारा पाऊस… ती साधेपणातही अप्रतिम दिसत होती.
हेही वाचा – ट्रेनिंगदरम्यान आराध्याला एक फाइल सापडली…
शर्वायने हलकेच तिच्या हातावर हात ठेवला, “आराध्या, कधी कधी काही गोष्टी नकळत घडतात. तुझ्या साधेपणात जी गोडी आहे, तीच माझ्या मनाला बांधून ठेवते.”
आराध्याचं हृदय जोरात धडधडू लागलं.
“शर्वाय सर, तुम्ही का इतकं काही बोलताय?”
शर्वायने तिच्या डोळ्यांत पाहत उत्तर दिलं, “कारण कदाचित हेच खरं आहे. तुझं साधं हसणं, तुझी कष्टाळू वृत्ती… सगळंच वेड लावतं. तुझ्याभोवती असणारी निरागसता मला माझ्या आयुष्याच्या गुंतागुंतीतून दूर नेते.”
आराध्याच्या गालावर हलकीशी लाली आली.
“शर्वाय… मला हे सगळं नवीन आहे. कधीच असं वाटलं नव्हतं की, माझ्या साध्या आयुष्यात असा कुणी येईल जो मला इतकं महत्त्व देईल.”
शर्वायने तिचा हात घट्ट पकडला आणि म्हणाला, “माझं मन सांगतंय की, तुझा माझ्यावर एक हक्क आहे. तुझं सुख, तुझी सुरक्षितता, सगळी माझी जबाबदारी आहे.”


