दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 31 मे 2026; वार : रविवार
- भारतीय सौर : 10 ज्येष्ठ शके 1948; तिथि : पौर्णिमा 14:14; नक्षत्र : अनुराधा 16:11;
- योग : सिद्ध अहोरात्र; करण : बालव 27:25;
- सूर्य : वृषभ; चंद्र : वृश्चिक; सूर्योदय : 06:00; सूर्यास्त : 19:11;
- पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128.
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
संगीतकार अनिल बिस्वास
टीम अवांतर
संगीतकार अनिल बिस्वास यांचा जन्म 7 जुलै 1914 रोजी सध्याच्या बांगलादेशमधील बारिसाल गावी झाला. कलकत्ता येथे संगीतक्षेत्रात थोडे काम केल्यावर अनिलदा 1934च्या सुमारास मुंबईला आले. वास्तविक, अनिलदा हिंदी चित्रपट सृष्टीत आले त्यावेळेस पार्श्वगायन अस्तित्वात नव्हते. बंगाली संगीताची पार्श्वभूमी, भारतीय शास्त्रोक्त संगीताचा अभ्यास आणि नवीन काहीतरी निर्माण करायची उर्मी, ही त्यांच्या संगीताची प्राथमिक वैशिष्ट्ये सांगता येतील. त्यावेळचे प्रसिद्ध दिग्दर्शक हिरेन बोस यांनी अनिल बिस्वास यांना मुंबईत आणले.
1935 पासून संगीतकार म्हणून त्यांच्या कारकीर्दीला प्रारंभ झाला. जागीरदार, अलीबाबा, औरत इत्यादी चित्रपटांना उत्तम संगीत देऊन त्यांनी 1940 पर्यंत चित्रपट सृष्टीत जम बसवला. 1941 ते 1950 या दशकात त्यांची प्रतिभा बहरत गेली. 1942च्या सुमारास आलेल्या ‘रोटी’ आणि ‘किस्मत’ या चित्रपटातील गाण्यांनी बरीच प्रसिद्धी मिळवली आणि त्यांचे हिंदी चित्रपटातील स्थान अधिक मजबूत झाले. ‘किस्मत’ चित्रपटातील ‘दूर हटो ये दुनियावालो हिंदुस्तान हमारा है…’ हे कवी प्रदीप यांनी लिहिलेले आणि अनिल बिस्वास यांनी संगीतबद्ध केलेले देशभक्तीपर गीत प्रचंड गाजले. सुरेंद्र, पारुल घोष, अख्तरी फ़ैज़ाबादी (बेगम अख्तर), अमीरबाई कर्नाटकी, खान मस्ताना, अरुण कुमार, अश्रफ खान, सुरैया ही त्यांच्या संगीतावर गाणी गायलेल्या गायकांची ठळक नावे. स्वतः अनिलदा उत्तम गात असत.
हेही वाचा – बटाटा वडा ते फ्रेंच फ्राइज… ‘किमयागार’ बटाट्याची गोष्ट!
वाद्यवृंद रचना, संगीत लेखन. नोटेशन पद्धतीचा अनिलदांनी पहिल्यांदा अवलंब केला आणि ते करण्यासाठी, त्यांनी पाश्चात्य संगीताचा विलक्षण खोलात जाऊन अभ्यास करून, त्यातील आपल्या संगीताला काय नेमके भावेल, हे मनाशी ताडून, त्याचा आपल्या संगीतात अंतर्भाव केला. तसेच त्यांनी वाद्यवृंदात पाश्चात्य वाद्यांचा अंतर्भाव केला, पण तसे करताना, रचनेचे भारतीयत्व कायम राखले.
1950च्या उत्तरार्धात लता मंगेशकर, मुकेश, तलत महमूद, मीना कपूर हे नवीन कलाकार त्यांच्या रचना गाऊ लागले होते. या कलाकारांबरोबर त्यांनी 1955-56 पर्यंत काम करत अत्यंत दर्जेदार संगीत दिले. नूरजहाँ यांच्या प्रभावातून बाहेर काढून लता मंगेशकर यांना स्वतःचा स्वतंत्र आवाज आणि शैली अनिलदांनीच मिळवून दिली. तर, तलत मेहमूद यांच्या आवाजातील कंप हेरून त्याला त्यांची खासियत बनवण्यास प्रोत्साहन दिले. त्यांनी जसे नवे गायक, त्यांचे आवाज पुढे आणले तसेच हाताखाली असणाऱ्या रोशन, मदन मोहन, सी. रामचंद्र असे असामान्य संगीतकार सहाय्यक म्हणून पुढे आणले. त्यांच्याच कारकिर्दीत या तिन्ही संगीतकारांनी स्वत:ची स्वतंत्र ओळख चित्रपट सृष्टीत निर्माण केली. मात्र त्यानंतर त्यांचा सिनेसृष्टीशी संबंध कमी होत गेला.
हेही वाचा – सावली… शेवटपर्यंत साथ देणारी!
1960-61 मधे मित्र पन्नालाल घोष, भाऊ सुनील बिस्वास, मुलगा प्रदीप बिस्वास यांच्या निधनामुळे अनिलदा खचले आणि मुंबई सोडून त्यांनी आपली पत्नी मीना कपूर यांच्याबरोबर दिल्लीला मुक्काम हलवला. या दशकातल्या सौतेला भाई, छोटी छोटी बातें या चित्रपटांतल्या गाण्यांतही दादांच्या प्रतिभेचा प्रत्यय रसिकांना मिळतो. त्यांच्या उत्कृष्ट सांगीतिक योगदानासाठी त्यांना 1986 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 31 मे 2003 रोजी या संगीतकाराचे नवी दिल्ली येथे निधन झाले.
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


