घरात तीन पिढ्या आनंदाने नांदत आहेत. छोटे-मोठे खटके तर सगळीकडेच उडत असतात, त्याला हे अपवाद कसे असतील? तर, असे हे एकत्र कुटुंब आजी-आजोबा त्यांची दोन मुलं, त्यांची पुन्हा दोन दोन मुलं असे 10 जण एका छताखाली गुण्यागोविंदाने रहातात. (काय स्वप्नातील गोष्ट वाटते ना? पण खरंच असे कुटुंब आहे) 10 जणांचे 10 स्वभाव म्हणजे 10 वेगवेगळे मणी, पण तरी सगळे एका धाग्यात बांधले गेले आहेत.
कोणाला कधी कोणाची गोष्ट पटते तर, कधी पटत नाही. पण सगळ्यांनीच रात्री जेवण एकत्र करायचे असे ठरविले आहे. त्यामुळे दिवसभराच्या सगळ्या कुरबुरी झोपण्यापूर्वीच संपवायच्या! ज्यामुळे शांत झोप लागते, असे त्यांचे म्हणणे.
आता मुलांमुळे थोडे वेळेचे गणित चुकते, पण तेवढे चालते. मुलं जेवणं झाली की, मोबइल, टीव्ही बघत बसतात. त्यामुळे सगळीच मुलं त्यांच्या वेगळ्याच विश्वात! दोघेजण कॉलेजला जातात तर, दोघे शाळेत… पण म्हणतात ना “ढवळ्या शेजारी बांधला पवळा, वाण नाही पण गुण लागला”… मोठ्यांचे बघून लहान पण मोबाइलवरच जास्त दिसायला लागले होते. आधीच्या सारखे कोणत्या कामात मदत नाही की, गप्पांमध्ये सहभागी नाहीत. सुटीच्या दिवशी तर विचारायलाच नको! आजी-आजोबा बघत होते की, मुलं जास्तच मोबाइलमध्ये रमत आहेत.
सध्या घरातील वातावरण बदलले आहे थोडेसे, हे मोठ्या नातवाच्या लक्षात आले. जेवणात बदल झाला आहे. त्याने तसे रात्री जेवताना विचारले सुद्धा! (मोठे सगळेजण तर याचीच वाट बघत होते, कधी यांच्याबरोबर बोलता येईल.)
मग आजीने विचारले “काय रे आपण नेहमी उपवास करतो, तो का करतो असे वाटते तुम्हाला?”
मोठा नातू, “पहिल्यापासून करत आलो म्हणून आता पण करतो!”
आजोबा, “कसे रे तुम्ही? काही विचारले तर लगेच मोबाइल काढता, तुमचा त्याच्यावरच जास्त विश्वास! मग असा प्रश्न कधी मोबाइलवर का नाही विचारला? आम्ही करतो म्हणून तुम्ही करणार का?”
हेही वाचा – चला तोंड गोड करूया…
मोठी नात, “तसं नाही, पण वातावरण खराब असते, त्यामुळे जे पचेल तसे पदार्थ प्रत्येक ऋतुमध्ये खातात ना? मग तसेच या उपवासाचे असेल.”
मोठी सून, “ताईसाहेब तुमचे बरोबरच आहे, पण यामध्ये फक्त खाण्याकडे लक्ष असते का?”
छोटी नात, “काकू, ताई बरोबरच म्हणते ना? म्हणजे वेगवेगळे पदार्थ खाण्यासाठीच तर उपवास करतात…”
आजी, “अरे, ते तर आहेच! पण उपवासामुळे मन देवपूजा, जप, ध्यान आणि सत्संगाकडे वळते.”
आजोबा, “एवढेच नाही तर, आरोग्याची काळजी, त्याग, शिस्त यासारख्या गोष्टी पण येतात बरं का.”
नातू, “आता त्याचा येथे काय संबंध?”
आजी, “आता बघा, जसे खाण्याच्या पदार्थांच्या पद्धतीत बदल झाला. म्हणजे आपण काय फक्त खाण्यासाठी जेवतो का? उपवासाचा मुख्य उद्देश केवळ अन्नत्याग नसून मन, वाणी आणि आचरण यांची शुद्धी हा आहे.”
मोठा मुलगा, “त्यामुळे चातुर्मासात केवळ अन्नाचा नव्हे, तर मन विचलित करणाऱ्या सवयींचाही त्याग करायचा; म्हणजे आपण त्यामधून संयम शिकतो.”
आजी, “आले का लक्षात? मन विचलित करणाऱ्या गोष्टी महत्त्वाच्या… आम्ही जेवणावर संयम ठेवतो आता तुमची पिढी नवीन, विचार नवीन बघा काय नवीन सुचते का? कोणत्या गोष्टी संयमाने बाजूला ठेवू शकता?”
मुलांसमोरच प्रश्न ठेवला, त्यामुळे मुलं विचार करू लागली. आपण कोणती गोष्ट बाजूला ठेवू शकतो. त्यांच्यासाठी आत्ता अभ्यास महत्त्वाचा, त्यामुळे तो कसा बाजूला ठेवणार? घरातील कामं करणे, हे तर घरातील एकट्याचे काम नसल्यामुळे ते पण बाजूला ठेवू शकत नाही. मग काय??
घरातील बाकीचे सगळे मुलांकडे बघत होती. मुलं काय ठरवतात ते ऐकण्यासाठी उत्सुक होती. कारण उपवास कसा करायचा, हा प्रत्येकाचा वैयक्तिक विचार, असा घराचा विश्वास! जो तो आपल्या कुवतीनुसार, इच्छेनुसार उपवास करत होता ना…
मुलांनी “आम्हाला थोडी मदत करा,” असे सांगितले, त्यामुळे घरच्यांनी वाचन करा, वेगवेगळ्या मंदिरात जाऊन तेथील वेगळेपण बघा, लोक संपर्क वाढवा, नवीन काहीतरी शिका असे प्रकार सुचवले. पण सगळ्या मुलांनी “आम्हाला वेळ कुठे हे करायला!” असे सांगितले. मग वेळ कसा काढता येईल, याचा विचार करायला सांगितले तर, मुलं म्हणाली थोडा वेळ नक्कीच काढू शकतो. चौघा मुलांनी शाळा, कॉलेज, इतर गोष्टी यामधून अर्धा तास काढायचा ठरवले आणि मंदिरात जायचे ठरविले.
त्यावर घरातील इतर मोठ्यांनी त्यांचे कौतुक केले आणि आठ दिवसांनी आपापले अनुभव सांगायचे ठरवले.
0000
ठरल्याप्रमाणे आठ दिवसांनी सगळे गप्पा मारत होते. मुलं त्यांचे अनुभव सांगत होते – मंदिरात कसे वाटले? काय काय बघितले? कशी वेगवेगळ्या प्रकारची लोकं बघितली?
चौघेजण आपापल्या क्षमतेनुसार सांगत होते… छान वाटत होते त्यांना!
आजोबा, “बघा म्हणजे वेळ नाही, असे म्हणायचे नाही, तो मुद्दाम काढायचा. ज्यामुळे वेगळे काही बघायला, शिकायला मिळते.”
आजी, “चला म्हणजे तुमचे पण उपवास सुरू झाले तर आमच्याबरोबर तुम्हाला फराळाचे खायला मिळेलच, तसेच जसा वेळ मिळेल तसे तुमच्याबरोबर आम्ही पण तुमच्या या नवीन उपवासामध्ये सामील होऊ.”
हेही वाचा – सगुण साकार उपासना
छोटी नात, “आजी, पण नेहमी एकाच ठिकाणी नाही जायचे बरं का? कधी मंदिरात जाऊ, कधी जवळ असलेल्या एखाद्या प्रेक्षणीय ठिकाणी जाऊ… तेथे जाऊन स्वच्छता करू! कधी नवीन ठिकाणी जाऊन तिथली माहिती घेऊ… असेही आम्हाला शाळेत सांगतातच ना की, या ठिकाणची माहिती लिहून आणा, एखाद्या आश्रमाला भेट द्या, गरजूंना मदत करा… मग ते या निमित्ताने पूर्ण करू.”
घरातील सगळ्यांनाच हा नवीन उपवास आवडला. शेवटी उपवासाचा मुख्य उद्देश केवळ अन्नत्याग नसून मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यास हातभार लावणे हा आहे. (सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, काही न सांगता मोबाइल पण थोडा बाजूला झाला. नवीन शब्दांत सांगायचे तर “डिजिटल डिटॉक्स”ला सुरुवात झाली की मुलांच्या! तेच तर हवे होते…)
म्हणतात ना काय करू नको, हे सांगण्यापेक्षा काय करायचे हे सांगायला हवे!


