अध्याय तेरावा
बाहेरी धीट जैसी । दाटुगा पति कळासी । करी टेहणी तैसी । प्रवृत्तीसीं ॥505॥ सचेतनीं वाणेपणें । देहासकट आटणें । संयमावरीं करणें । बुझूनि घाली ॥506॥ मनाचां महाद्वारीं । प्रत्याहाराचां ठाणांतरीं । जो यम दम शरीरीं । जागवी उभे ॥507॥ आधारीं नाभीं कंठीं । बंधत्रयाचीं घरटीं । चंद्रसूर्यसंपुटीं । सुये चित्त ॥508॥ समाधीचे शेजेपासीं । बांधोनि घाली ध्यानेंसी । चित्त चैतन्यसमरसीं । आंतु रते ॥509॥ अगा अंतःकरणनिग्रहो जो । तो हा हें जाणिजो । हा आथि तेथ विजयो । ज्ञानाचा पैं ॥510॥ जयाची आज्ञा आपण । शिरीं वाहे अंतःकरण । मनुष्याकारें जाण । ज्ञानचि तो ॥511॥
इंद्रियार्थेषु वैराग्यमनहंकार एव च । जन्ममृत्युजराव्याधिदुःखदोषानुदर्शनम् ॥8॥
आणि विषयांविखीं । वैराग्याची निकी । पुरवणी मानसीं कीं । जिती आथी ॥512॥ वमिलेया अन्ना । लाळ न घोंटी जेवीं रसना । आंग न सूये आलिंगना । प्रेताचिया ॥513॥ विष खाणें नागवे । जळत घरीं न रिगवे । व्याघ्रविवरां न विचवे । वस्ती जेवीं ॥514॥ धडाडीत लोहरसीं । उडी न घालवे जैसी । न करवे उशी । अजगराची ॥515॥ अर्जुना तेणें पाडें । जयासी विषयवार्ता नावडे । नेदी इंद्रियांचेनि तोंडें । कांहींच जावों ॥516॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : वाहुटळीचेनि बळें, पृथ्वी जैसी न ढळे
अर्थ
ज्याप्रमाणे घराबाहेर ढालगजपणाने वागणार्या स्त्रीला, तिचा दांडगा नवरा बाहेर फिरकू न देता तिला घरात कोंडून ठेवतो; त्याप्रमाणे आपली मनोवृत्ती बाहेर इंद्रियांकडे जाऊ नये म्हणून तिच्यावर जो पहारा करतो ॥505॥ चित्ताला संकोच होण्याकरिता देहसुद्धा झिजतो व इंद्रियांची समजूत घालून, त्यांना चुचकारून निग्रहावर आणून ठेवतो ॥506॥ या शरीरात मनरूपी महाद्वारात, अंतर्मुखतेच्या पहार्याच्या जागेत, जो यम व दम यांस उभे जागे ठेवतो ॥507॥ गुद व मेढ्र यांच्या मध्यभागी आधारचक्राच्या ठिकाणी मूळबंधाची व नाभीमधे मणिपूरचक्राच्या ठिकाणी ओडियाणा बंधाची व कंठामधे विशुद्धचक्राच्या ठिकाणी जालंदर बंधाची याप्रमाणे तीन बंधांची, गस्त घालतो आणि इडा पिंगळा यांच्या संगमस्थानी म्हणजे सुषुम्नेत चित्त घालतो. ॥508॥ समाधिरूपी शय्येजवळ ध्यानाला बांधून टाकतो (म्हणजे समाधि लागेपर्यंत ध्यान दृढ करतो) व चित्त आणि चैतन्य यांच्या समरसतेने अंतर्मुखतेत रममाण होतो. ॥509॥ अर्जुना, अंत:करणनिग्रह जो म्हणतात तो हा, हे समज. व जेथे हा (अंत:करणनिग्रह) आहे, तेथेच ज्ञानाचा विजय आहे. ॥510॥ ज्याची आज्ञा अंत:करणाला शिरसावंद्य असते, तो मनुष्यरूपाने साक्षात ज्ञानच आहे, असे समज. ॥511॥
इंद्रियांच्या विषयांच्या ठिकाणी वैराग्य, (कर्माच्या विषयी) अहंकाराचा अभाव, जन्म, मृत्यु, म्हातारपण, रोग, दु:ख व दोष यांचे अनुदर्शन ॥8॥
आणि विषयाच्या संबंधाने ज्याच्या मनात वैराग्याचा चांगला जिवंत पुरवठा असतो, ॥512॥ ओकलेल्या अन्नासंबंधी ज्याप्रमाणे जीभ लाळ घोटीत नाही, अथवा प्रेतास आलिंगन देण्याकरिता जसे कोणीही अंग पुढे करीत नाही ॥513॥ जसे (कोणालाही) विष खाववत नाही, जळत असलेल्या घरात प्रवेश करवत नाही व वाघाच्या दरीमधे वस्ती करण्यास जाववत नाही. ॥514॥ रसरशीत तापलेल्या लोखंडाच्या रसामधे जशी उडी घालवत नाही किंवा अजगराची उशी करवत नाही, ॥515॥ अर्जुना, तितक्या मानाने ज्याला विषयांची गोष्ट आवडत नाही व जो इंद्रियांच्या द्वाराने (मनाकडे) कोणत्याच विषयाला जाऊ देत नाही. ॥516॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : क्षीरार्णवाचिया कल्लोळीं, कंपु नाहीं मंदराचळीं


