भाग – 25
संध्याकाळचे साडेसात वाजले होते. ऑफिसमधल्या इनफॉर्मल मीटिंगसाठी ठरवलेली जागा म्हणजे शहराच्या एका नामांकित स्काय लाऊंजचा टॉप फ्लोअर. मोठ्या काचांमधून वेगवेगळ्या दिव्यांच्या प्रकाशाने न्हालेला मुंबईचा नजारा दिसत होता. हलकासा संगीताचा स्वर, टेबलांवर टप्प्याटप्प्याने मांडलेले स्नॅक्स, आणि हलकीशी उत्साही कुजबूज वातावरणात भर घालत होती.
आराध्या थोड्या संकोचानेच तिथे पोहोचली. आज तिच्या पोशाखातही थोडासा बदल होता – एक सॉफ्ट पिच कलरचा कुर्ता, खाली स्ट्रेट फिट पँट आणि हलकीशी लिपस्टिक आणि झुमके – साधं, पण उठावदार. शर्वाय तिला लांबून पाहतो आणि थोडसं आश्चर्य वाटल्यासारखा तिच्याकडे येतो.
माधव आणि निशा लांबूनच त्यांच्याकडे नजर ठेवून असतात. निशाच्या डोळ्यांत स्पष्ट असूया आणि चिडचिड मिसळलेली असते… ती माधवकडे वळून म्हणते, “हे पाहिलंत? आता हिला आपल्या वाटेतून दूर करायची वेळ आलीय. हिच्या भोळेपणावर विसंबून राहून उपयोग नाही. आता प्लॅन ‘बी’ लागेल.”
“निशा, शांत राहा. माझं लक्ष आहे तिच्यावर. शर्वायचं हे प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे. पण आपला खेळ अजून पूर्ण व्हायचा आहे.” माधवचा आवाज गंभीर होता…
त्या लाऊंजमध्ये आराध्या आणि शर्वाय एक टेबलजवळ बसलेले असतात. गप्पा, हलकासा हास्य-विनोद सुरू असतो. पण तेवढ्यात शर्वायच्या फोनवर एक मेसेज येतो. तो वाचतो आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात…
“काय झालं?” आराध्या विचारते.
“काही विशेष नाही… बस, सावध राहा. इथे सगळे आपले हितचिंतक नाहीत.” तो हळू आवाजात म्हणतो.
हेही वाचा – कॉन्फरन्स रूममध्ये ‘ती’ व्यक्ती पाहून आराध्याचा श्वासच अडखळला
आराध्या थोडी घाबरते. “तुम्हाला काय वाटतंय, कोण…?”
शर्वाय काहीच उत्तर देत नाही. पण त्याची नजर आता माधव आणि निशा यांच्याकडे रोखलेली होती.
“खेळ सुरू झाला आहे, आराध्या… आता खरं रूप हळूहळू समोर येईल.”
त्या रात्री, लाऊंजमधील हलक्याशा आनंदाच्या वातावरणातही काहीसा तणाव होता — एक अनामिक सावली सतत आपल्या भोवती फिरत असल्यासारखे तिला जाणवत होते. शर्वाय काही वेळाने तिच्याजवळून उठला आणि फोनवर बोलत लाऊंजच्या दुसऱ्या टोकाकडे गेला. आराध्या पाण्याचा ग्लास हातात घेत खिडकीतून मुंबईचा नजारा बघू लागली… आणि तेव्हाच, मागून कुणीतरी तिच्या खांद्यावर हळूवारपणे हात ठेवला…
तिने चमकून मागे पाहिलं – माधव!
“आराध्या, तुझं खरंच खूप कौतुक वाटतं… एवढ्या कमी वेळात इतका आत्मविश्वास मिळवणं काही साधं नाही.” तो हलकं स्मित करत म्हणतो.
आराध्या सावधपणे सौम्य हसली, “धन्यवाद, पण मी अजून शिकतेय.”
“हो… शिकशील. पण सगळं शिकण्यासाठी वेळ हवा असतो… आणि योग्य मार्गदर्शकही!” तो तिच्या डोळ्यांत डोळे घालून बोलला.
आराध्याला त्याचं हे बोलणं अस्वस्थ करून गेलं. ती काही बोलायच्या आतच, एका वेटरचा ट्रे मागून हलकेच तिच्यावर आदळला. ती किंचित डगमगली, पण कोणीतरी तिला पाठीमागून आधार दिला.
शर्वाय होता तो… माधवला तिच्याजवळ पाहून परत आला होता,
“सॉरी माधव काका, मी थोडा वेळ आराध्याला घेऊन जाईन, आम्हाला थोडं बोलायचंय.”
माधव काहीच न बोलता मागे सरकला. पण त्याच्या नजरेत होता – खवळलेला अस्वस्थपणा!
शर्वाय आराध्याला एका शांत कोपऱ्यात घेऊन गेला. तिथे आधीच दत्ता उभा होता,
“आपण निघूया. आता इथे तुझ्यासाठी थांबणं सुरक्षित नाही.” शर्वायच्या आवाज धीरगंभीर होता.
“का? काय झालं?”
“आराध्या… आपल्याला वाटतं तितकं सोप्पं नाही हे सगळं. तू एक वेगळ्या जगात पाय ठेवला आहेस… जेथे नकळत तू काही महत्त्वाच्या गोष्टींचा भाग बनली आहेस. आता तुला खोटं वाटेल, पण तुझ्यावर काहींची नजर आहे… आणि काहींना तू नको आहेस.”
“पण…. शर्वाय, मी फक्त नोकरीसाठी आले!”
ही नोकरी नव्हती, हे नियोजन होतं… तूच का, हाच प्रश्न तुला नाही पडला स्वतःला?”
तो दत्ताकडे पाहून मान हलवतो. काही क्षणात आराध्या, शर्वाय आणि दत्ता लाऊंजमधून वेगाने बाहेर पडले.
लाऊंजमधून शर्वाय निघाल्याचं पाहून निशा आणि माधव मात्र चिडून उठले…
“गेला… तिच्याच सोबत?” निशा फुरगटून म्हणाली.
“जाऊ दे…. पण पुढच्या खेपेस ती घरी पोहचणार नाही.”
माधव कसले संकते देत होता?
आराध्या घरी पोहोचली तेव्हा रात्रीचे बारा वाजलेले होते. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता… पण डोळ्यांत एक वेगळीच शांतता दिसत होती. आई – प्राजक्ता तिची वाट पाहतच होती….
“कुठं होतीस एवढा वेळ? चिंता लागली होती.”
आराध्याने थकलेल्या सुरात उत्तर दिलं… “आई, काम थोडं वाढलं होतं… पण चांगलं झालं. मोकळं वाटतंय आता.”
प्राजक्ता तिला मिठीत घेते. आराध्या हसून तिच्या खोलीत जाते. ड्रेस बदलून ती बिछान्यावर टेकते तोच शांताबाई (लक्ष्मी आजी) दार ठोठावतात.
“बाळा, हे पोस्टातून आलंय तुझ्या नावाचं.”
आराध्या चमकते… “माझ्या नावाचं?”
ती पार्सल उघडते. एक साधं तपकिरी रंगाचं लिफाफ्यासारखं पार्सल… आत एक जुनी डायरी आणि एक लिफाफा. लिफाफ्यावर हाताने लिहिलेलं होतं –
“वेळ आली आहे. हे वाच… आणि कोणालाही न सांगता नीट समजून घे.”
आराध्याचं काळीज धडधडू लागतं. ती डायरी उघडते. पहिल्याच पानावर लिहिलेलं असतं –
“जाहगीरदार वंश आणि त्या गूढशक्तीचा इतिहास…”
आराध्या थरथरत पुढचं वाचू लागते. शब्दागणिक तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य, भय आणि ओढ यांची एक गुंतागुंतीची छाया उमटते.
त्याच वेळी, दुसऱ्या टोकाला, एका काळ्या पडद्याआड, माधव निशासोबत फोनवर बोलत होता…
“ती डायरी मिळालीये तिला. आता ती आपल्याला मिळवायला वाट पाहावी लागेल. पण लक्षात ठेव… वेळ आली की, तिच्या समोरचं सगळं अंधारात गडप करून टाकायचं आहे.”
आराध्या हळूहळू त्या डायरीतील पाने उलटू लागली. प्रत्येक पानावर काळ्या शाईने लिहिलेली अक्षरं थोडीशी विस्कळीत, पण एक प्रकारचा भार असलेली जाणवत होती…
पहिल्या काही ओळींमध्येच लिहिलेलं होतं –
“हा इतिहास केवळ रक्तातून पुढे गेला पाहिजे… जाहगीरदार वंशाच्या एका विशिष्ट शाखेकडे एक शक्ती आहे… ती शक्ती बॉक्समध्ये बंद आहे. आणि हा बॉक्स – जर चुकीच्या हातात गेला तर विनाश अटळ आहे.”
आराध्याचा श्वास क्षणभर थांबला. नकळत गळ्यातील लॉकेटकडे तिचा हात गेला… तो बॉक्स… तेच गूढ… ज्यावेळी तिला ते सुरुंगात सापडलं होतं!
डायरीत पुढे लिहिलं होतं…
“हा बॉक्स फक्त जहागीरदार वंशातील ‘व्रतधारी’च्या हातूनच कार्यरत होतो आणि त्याचे अस्तित्व काळाच्या गाभ्यात लपलेलं आहे… पण एक संकेत आहे… त्या मुलीच्या डोळ्यांत सागराची शांतता आणि वादळाची ताकद असेल… तीच निवडली गेलेली आहे.”
आराध्याच्या मनात वादळ उसळतं. ती डायरी मिटते. ती आता स्वतःकडे पुन्हा नव्याने पाहते… एक साधी मुलगी, की निवडलेली? आणि का? कोणासाठी?
तेवढ्यात तिचा फोन वाजतो –
“शर्वाय बोलतोय… उद्या सकाळी लवकरच तुझं स्पेशल ट्रेनिंग सुरू होईल… तुला तयार राहावं लागेल.”
आराध्या एक शब्दही न बोलता फोन ठेवते. तिच्या डोळ्यांत एक निर्धार असतो. तिला आता तिच्या हातात पडलेल्या बॉक्सचा आणि त्या गूढ शक्तीचा शोध घ्यायचा होता…
दुसऱ्या दिवशी सकाळी आराध्या लवकरच तयार झाली. तिच्या मनात काल रात्री वाचलेल्या डायरीच्या ओळी घोळत होत्या. ‘व्रतधारी’, ‘वादळ आणि सागराची ताकद’… या शब्दांचा अर्थ समजून घेण्याचा ती प्रयत्न करत होती.
शर्वायने तिच्यासाठी पाठवलेली गाडी वेळेवर आली. ड्रायव्हरने एका वेगळ्याच ठिकाणी नेलं —शहराच्यापासून दूर असलेलं शांत, आधुनिक आणि गुप्त असं एक ट्रेनिंग सेंटर. त्या जागेच्या भिंतीही बोलत असल्यासारख्या वाटत होत्या.
हेही वाचा – माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!
शर्वाय तिथे आधीच हजर होता…
“आराध्या, तू खास आहेस, हे तुला अजून कळालं नसेल. पण काही क्षमतांशी सामना करायला, त्यांचा उपयोग करायला तुला तयारी करावी लागेल,” तो शांत, पण ठाम आवाजात म्हणाला.
आराध्याच्या मनात शंकेचं काहूर उठलेलं. “पण मला का? मी तर एक साधी मुलगी…”
शर्वाय हसला, पण त्या हसण्यात करुणा आणि गूढता मिसळलेली होती…
“अगं, साधी नाहीस तू. त्या डबीने तुला स्वीकारलंय. हे सामान्य नाही… तिची ओळख ज्याला होते, त्यालाच ती मार्ग दाखवते. आजवर किती तरी वेळा तिला मिळावायचे प्रयत्न झाले, पण तो काय आणि नेमका कसा हेच कळलं नाही… पण तुला ती गवसली अगदी सहज…”
त्या दिवशी तिचं ट्रेनिंग सुरू होतं. मानसिक स्थैर्य, निरीक्षणशक्ती, प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया —सगळं शिकवलं जाणार होतं.
एका खोलीत तिच्यासमोर एक वेगळा ‘प्रोजेक्शन डोम’ उभा केला जातो, जिथे तिला भूतकाळातील काही चित्रफीत दाखवल्या गेल्या — जाहगीरदार कुटुंबाच्या जुन्या गोष्टी, काही गूढ घटना आणि एक घाबरलेली स्त्री, जिने ती डबी वाचवण्यासाठी आपलं प्राण अर्पण केलेलं असतं…
त्या रात्री, ट्रेनिंगनंतर थकून आराध्या बसलेली होती. शर्वाय तिच्या शेजारी येऊन बसतो.
“तुझ्या डोळ्यांत मी ते वादळ पाहिलंय, आराध्या… आणि ते वादळ जेव्हा योग्य दिशेने वाहतं, तेव्हा इतिहास घडतो.”
तेवढ्यात, शर्वायच्या फोनवर एक मेसेज झळकला —
“माधव काहीतरी हालचाल करत आहे. निशाला आराध्याच्या मागे लावलं आहे.”
शर्वायचे डोळ्यांत क्षणभर कठोर भाव उमटतात.
तो स्वतःशी म्हणतो, “खरा डाव आता सुरू होतोय…”


