दर्शन कुलकर्णी
आज, भारतीय सौर : 27 ज्येष्ठ शके 1947
अर्थात,
दिनांक : 17 जून 2025, वार : मंगळवार
तिथि : षष्ठी 14:46, नक्षत्र : शततारका 25:01, योग : विश्कंभ 09:33, करण : विष्टी 26:13, सूर्य : मिथुन, चंद्र : कुंभ
सूर्योदय : 06:00, सूर्यास्त : 19:17
पक्ष : कृष्ण, मास : ज्येष्ठ, ऋतू : ग्रीष्म,
सूर्य अयन : उत्तरायण
संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – दिवस थोडा व्यग्र असू शकतो. पैशाचे नवीन स्रोत खुले होऊ शकतात, ज्यामुळे आर्थिक परिस्थिती बळकट होईल. मात्र, अनावश्यक चिंता आणि राग कामात अडथळा आणू शकतो. कुटुंबातील कोणाशी तरी वाद होऊ शकतो, त्यामुळे बोलण्यात संयम ठेवा.
वृषभ – एखाद्या नवीन व्यक्तीची भेट होईल, जी भविष्यात फायदेशीर ठरेल. या व्यक्तीसोबत भविष्यात एखादे नवीन काम सुरू करण्याची शक्यता आहे. कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. फक्त कोणाच्याही भावना दुखावू नका. कुटुंबासमवेत संध्याकाळ घालवण्याची संधी मिळेल.
मिथुन – मालमत्तेशी संबंधित जुन्या वादात विजय मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या मदतीने काम सोपे होईल. नोकरदारांना नवीन कंपनीकडून चांगली ऑफर मिळू शकते. मित्रांच्या मदतीने दिवसातली महत्त्वाची कामे पूर्ण होतील.
कर्क – नोकरी, व्यवसायासाठी दिवस सामान्य राहील, परंतु काही नवीन संधी मिळण्याची चिन्हे आहेत. जोडीदाराची तब्येत अचानक बिघडण्याची शक्यता आहे, त्यामुळे धावपळ वाढेल. एखाद्या कार्यक्रमाला किंवा बैठकीला उपस्थित असाल तर तिथे विचारपूर्वक बोला, अन्यथा लोकांचा गैरसमज होईल.
सिंह – नोकरदार असाल तर कारकीर्दीत चांगल्या संधी मिळतील. पदोन्नतीची बातमी मिळू शकते. जे आयात-निर्यातीचे काम करतात, ते एखाद्या मोठ्या व्यवहाराला अंतिम रूप देऊ शकतील. विद्यार्थ्यांना एकाग्रतेचा फायदा होईल. भावंडांकडून मदत मिळेल.
कन्या – अनावश्यक खर्चांमुळे त्रास होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. शत्रू त्रास देऊ शकतात, चातुर्याने त्यावर मात करावी लागेल. आर्थिक समस्या उद्भवू शकतील. मात्र, आधी गुंतवलेल्या पैशांचा तुम्हाला फायदा होईल.
तुळ – आपल्या क्षेत्रात प्रगती कराल. उत्पन्नाचे अनेक स्रोत समोर येतील. तुमच्या विचारांचा लोकांवर प्रभाव पडेल. प्रभावशाली लोकांना भेटणे फायदेशीर ठरेल. आरोग्याच्या ज्या समस्या तुम्हाला त्रास देत होत्या, त्या आता दूर होतील.
वृश्चिक – रखडलेली कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणचा निष्काळजीपणा मोठा परिणाम करून जाईल. तथापि, नवीन कामे सुरू करण्यासाठी दिवस चांगला असेल. मात्र जोडीदाराशी एखाद्या गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे. यामुळे तणाव निर्माण होऊ शकतो.
धनु – खर्च वाढण्याची शक्यता असली तरी, चांगल्या उत्पन्नामुळे दिवस तणावमुक्त राहील. घरातील ज्येष्ठांशी शुभ कामाबाबत चर्चा होऊ शकते. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. भावंडांसोबतच्या नात्यातील तणाव दूर होईल, प्रत्येकजण एकमेकांसोबत उत्तम वेळ घालवेल.
मकर – हा संपूर्ण आठवडाच उत्तम जाणार आहे. आज इतरांचे भले कराल. एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत वेळ घालवू शकाल. मात्र, त्याचवेळी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा.
कुंभ – मित्र, मैत्रिणींसोबत वेळ घालवण्याचा दिवस असेल. मालमत्ता खरेदीचा विचार असेल तर पूर्ण माहिती घेऊन मगच पुढे जा. नोकरदार व्यक्तीला नोकरीसंदर्भात चांगली ऑफर मिळू शकते. बऱ्याच काळापासून रखडलेली कामे पूर्ण होतील.
मीन – या राशीतील व्यापाऱ्यांसाठी दिवस शुभ असेल. मात्र मानसिकदृष्ट्या काहीसा तणावाचा दिवसही असू शकतो. वाहन काळजीपूर्वक चालवा, दुखापत होण्याचा धोका आहे. नोकरदार व्यक्तींनी कामाला प्राधान्य द्यावे. मुलांच्या संदर्भात काही चांगली बातमी मिळू शकते.
दिनविशेष
‘सुधारक’ गोपाळ गणेश आगरकर
‘सुधारक’ या टोपणनावाने प्रसिद्ध असलेले गोपाळ गणेश आगरकर हे फक्त समाजसुधारकच नव्हते तर मोजक्याच उदारमतवादी, बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंतांपैकी एक होते. लोकमान्य टिळकांचे अत्यंत जवळचे मित्र म्हणून देखील आगरकरांची ओळख आहे. त्यामुळे अनेकदा असं म्हणतात की, जितकं महत्त्व लोकमान्य टिळकांचं स्वातंत्र्यलढ्यात आहे, तितकंच आगरकरांचं महत्त्व समाज प्रबोधनात आहे. समाजातील वाईट चालीरीतीबाबत अत्यंत कठोर शब्दांमध्ये आगरकर आपले विचार व्यक्त करत असत. त्यामुळे समाजातून निर्माण झालेल्या मोठ्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागायचे. इतकेच नाही तर सनातनी लोकांनी आगरकरांच्या जिवंतपणीच त्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा देखील काढली होती. 1881 साली स्थापन झालेल्या ‘केसरी’ या वृत्तपत्राचे पहिले संपादक म्हणजे गोपाळ गणेश आगरकर. पुढे संमती वयाच्या कायद्यावरून टिळक आणि आगरकर यांच्यातील वाद विकोपाला गेले आणि आगरकर केसरीतून बाहेर पडले. त्यानंतर 1888मध्ये त्यांनी ‘सुधारक’ नावाचे वृत्तपत्र सुरू केले. ‘इष्ट असेल ते बोलेन आणि साध्य असेल ते करेन’ या त्यांच्या प्रसिद्ध वाक्याप्रमाणेच ते आयुष्यभर जगले. वयाच्या अवघ्या 39व्या वर्षी दम्याचा विकार बळावल्याने 17 जून 1895 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.