आजकाल सगळं झटपट हवं असलेली पिढी स्वतःबद्दल आणि कुटुंबातील व्यक्तींच्या नातेसंबंधांबद्दल इतका खोलवर जाऊन विचार करत असतील, याचं मला आश्चर्य वाटलं… जेव्हा मी माझ्या नातवाने आमच्यातील संवादादरम्यान व्हॉट्सॲपवर पाठवलेला खालील लांबलचक मेसेज वाचला… तेव्हा लक्षात आलं. लहानपणापासूनच तो मला ‘बाबा’ म्हणतो आणि त्याच्या वडिलांना ‘पप्पा’ म्हणतो. एखादी गोष्ट गळी उतरवायची असली की, इमोशनल ब्लॅकमेल कसं करायचं, ते हल्लीच्या पिढीकडून शिकावं.
0000
“बाबा, मुंबईत होणाऱ्या माझ्या नाटकाच्या प्रत्येक प्रयोगाला तुम्ही यायलाच पाहिजे म्हणजे पाहिजे. मी तुमच्याकडून न येण्याचं कुठलंही कारण ऐकून घेणार नाही.”
“अरे, असं झालं तर माझं सगळं नाटक पाठ होईल…” माझा लटका विरोध.
“ते काही नाही. तुम्ही काही बोलूच नका. माझ्या जन्मापासून आजवरच्या आयुष्यात तुमचं असणं किती महत्त्वाचे आहे, हे मी पुरेपूर जाणतो. 20 वर्षांपूर्वी मी जन्मलो त्याच्या दुसऱ्याच दिवशी विलेपार्ल्याहून विरारच्या आजीकडे छोट्या बाळाला लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घेऊन तुम्ही पप्पासोबत आला होता. तुम्ही सुचवलेल्या नावामधूनच मम्मीने माझं नाव ठेवले… मी विरारहून पार्ल्याला कधी आलो, ती तारीख तुम्हाला आजही आठवते… आठवायला बसलो तर, आज कितीतरी गोष्टी आठवल्या मला. मी सहा महिन्यांचा असताना तुमच्या दोन्ही हातांच्या पाळण्यात धरून तुम्ही जीवदानीचा डोंगर चढून मला देवीच्या चरणांवर ठेवले होते…”
“तुम्ही म्हटलेल्या गणपतीच्या आरत्या ऐकून मी म्हणे माझं रडणं थांबवायचो. रोज संध्याकाळी न चुकता तुम्ही मला पार्ला स्टेशनवर लोकल ट्रेन बघायला न्यायचात. तुम्ही आणलेली तीन चाकी सायकल, नंतर मोठं झाल्यावर आणलेली दुचाकी सायकल… त्यावरून आमच्या गल्लीत मी फेऱ्या मारायचो. तुम्ही माझ्या मागे धावायचात आणि दोन ठिकाणी मला श्रीखंडाच्या गोळ्या द्यायचात. मी पहिली, दुसरीत असताना रामरक्षेचे पहिले 10 श्लोक म्हणायच्या स्पर्धेत तुम्ही रोज रात्री आमच्या घरी येऊन न कंटाळता माझ्याकडून ते म्हणून घेतले आणि मला पहिले बक्षीस मिळाल्यावर कौतुकाने फोटो स्टुडिओमध्ये जाऊन माझा फोटो काढला होता…”
“मी मोठा होत गेलो, तसं आपलं नातं आणखी घट्ट होत गेले. जगासाठी जरी आपल्यात रक्ताचे नाते नव्हते तरी, मी तुम्हाला कायम त्याच नात्याने बघत आलो आजवर आणि म्हणूनच जेव्हा पप्पा-मम्मी काही गोष्ट द्यायचे नाहीत, तेव्हा मी तुमच्याकडून हक्काने प्रत्येक गोष्ट मागून घेतली आणि तुम्ही देखील तितक्याच प्रेमाने मला ती दिलीत. मग तो मोबाइल असो, शूज असोत, कपडे, बेल्ट गॉगल्स असो, पॉकेटमनी असो… पूर्वी मी गंमतीने तुम्हाला माझं एटीएम कार्ड म्हणायचो. आता तर काय जीपेच्या जमान्यात मी तुम्हाला कंगाल करणार अशी गंमतीने तक्रार तुम्ही करता…”
“तुमच्याशिवाय माझं आयुष्य मी विचारच करू शकत नाही. आज कॉलेज शिक्षणासोबतच अभिनयाच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी तुमचा मिळालेला पाठिंबा फार मोलाचा आहे माझ्यासाठी. अभिनय क्षेत्र बेभरवशी असल्याने मी पदवीधर होणं किती महत्त्वाचे आहे, हे तुम्ही माझ्या मनावर बिंबवत असता. मला कधी कधी ते सतत ऐकून कंटाळा येतो आणि मी रागाच्या भरात काहीतरी उलटसुलट बोलून जातो, तरी देखील तुम्हाला शांत बघून मी खजील होतो.”
हेही वाचा – मनाची श्रीमंती… मित्राची अनोखी कहाणी!
“माझ्या आणि पप्पा मम्मीच्या पिढीला अधूनमधून ताणलेल्या परिस्थितीत देखील बांधून ठेवण्यात तुम्ही आजवर खूप कष्ट घेतले आहेत, याची मला जाणीव आहे. तुमच्या आयुष्यात तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या गंभीर आणि दीर्घकाळ सुरू राहिलेल्या आजारपणाला समर्थपणे तोंड देण्यासाठी एकटं रहाणं पसंत केले. त्या दोघांच्या पश्चात कितीतरी जणांना न थकता अविरत कष्ट घेऊन तुम्ही आधार दिलात, मोठं केलंत, मार्गदर्शन केलंत. धडपडणाऱ्यांना सावरत त्यांची आयुष्यं मार्गी लावलीत. तुम्ही सुद्धा आता साठी पार करून आणखी पुढे गेला आहात. आता तुम्ही तुमचं उरलेले आयुष्य मनसोक्त जगा, आनंदी रहा जमेल तेवढी भटकंती करा. मी आहे तुमच्यासोबत शेवटपर्यंत…”
“माझ्या या पुढील प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर मला तुम्ही हवे आहात, माझ्या डोळ्यांसमोर! म्हणूनच माझ्या नाटकाच्या प्रत्येक प्रयोगाला तुम्ही हक्काने यायचं आहे, कुठलीही सबब पुढे न करता… तुमच्या सारखं कोणीतरी आपलंसं, आपल्या हक्काचं असणं सगळ्यांच्या नशिबात नसतं. पण मी त्या बाबतीत खूप भाग्यवान आहे…”
“फेसबुक तुमचं दुसरं घर आहे, असं तुम्ही नेहमी म्हणता. तुमची तिथली लोकप्रियता मी जाणून आहे. तुमच्या पोस्ट आणि त्यावरच्या कमेंट्स वाचल्या की, एक गोष्ट लक्षात येते ती ही की, वयाचं अंतर दूर करून तुम्ही प्रत्येकाला आपलंसं करून घेतलं आहे आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमचा वाचकवर्ग पसरलेला आहे. जे कधी भेटतील याची खात्री नाही, तरीही अशा प्रत्येकाला आयुष्य सुखाने कसं जगायचं, हे तुम्ही सोप्या भाषेत समजावून सांगता तुमच्या पोस्ट आणि चारोळ्यांच्या माध्यमातून. फेसबुकवरील काही समुहात तुम्ही लेखक म्हणून लोकप्रिय आहात हे मी ऐकून आहे.”
हेही वाचा – विचार, संस्कार अन् जीवनमूल्यांचं कुंपण…
“म्हणूनच तुम्ही ग्रेट आणि ऑसम आहात. ‘फेसबुक काका’ हे तुमच्या वाचकमित्रांनी तुम्हाला प्रेमाने दिलेले नाव खरोखरच योग्य आणि सार्थ आहे. तुमच्याच लिहिलेल्या ओळीत सांगायचे तर मी अभिमानाने म्हणेन –
आजोबा नातू जीवाभावाचे मैतर
जरी असले दोन पिढ्यांचे अंतर
लव यू बाबा फॉर एव्हर…
टीप : मी इतका लांबलचक मराठी निबंध कसा आणि कधी लिहिला याचा विचार नका करू. झी मराठी वाहिनीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ या माझ्या मालिकेच्या सेटवर बसूनच मी दोन सीनच्या दरम्यान शांतपणे लिहिला आहे.”
एवढं वाचून मी नि:शब्द झालो! परमेश्वर काही नाती आपल्याला जन्माला घालायच्या आधीच जोडून ठेवतो. फक्त योग्य वेळी ती तुम्हाला कळतात आणि वेगळ्याच भावनेत बांधून ठेवतात. मी आणि माझा नातू रूचिर देखील याला अपवाद नाहीत. कधी कधी रक्ताच्या नात्यापेक्षा देवाने निर्माण केलेली अनोखी नाती अधिक घट्ट असतात, या गोष्टीला आम्ही दोघेही अपवाद नाही आणि म्हणूनच मला आमच्यातील ह्या अनोख्या नात्याचा अभिमान आहे.


