‘नॉट विदाऊट माय डॉटर’ हे पुस्तक म्हणजे इराणमध्ये अडकलेल्या अमेरिकन स्त्रीची कहाणी आहे. बेट्टी महमूदी या लेखिका आणि विल्यम हॉफर सहलेखक असून लीना सोहोनी यांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे. बेट्टीने अमेरिकेत राहणाऱ्या इराणी डॉक्टर सय्यद बोझोर्ग महमूदीशी (मूडी) विवाह केला आणि पाच वर्षांच्या मुलीला घेऊन ती त्याच्याबरोबर इराणला गेली, तेव्हा तिला पंधरा दिवसांनी अमेरिकेत परत जायचे आहे, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात ती तिथे गेल्यावर कुटुंबाच्या नजरकैदेत राहिली. या संकटातून तिने अपरिमित धैर्य दाखवून वाट शोधली आणि स्वतःची सुटका करून घेतली. ही अशक्यप्राय वाटणारी घटना होती; कारण इराणमधले कायदे फार कडक होते.
ती घटस्फोट घेऊन परत जाऊ शकत होती; पण मग तिला मुलीला इराणमध्येच सोडून जायला लागलं असतं… कारण मुले ही पतीची संपत्ती मानली जात होती. मुलीला सोडून जाण्याची ती कल्पनाही करू शकत नव्हती. इथे संघर्ष सुरू झाला! म्हणून या पुस्तकाचे नाव ‘नॉट विदाऊट माय डॉटर’!
मूडी भूलतज्ज्ञ आणि अस्थीतज्ज्ञ होता. इराणमध्ये विमानतळावर उतरण्यापूर्वीच मूडीने, दोघींचे पासपोर्ट काढून घेतले. त्याच्या घरी गेल्यावर तिथली अस्वस्थता, ओंगळपणा पाहून तिला आणि मोहताबला (मुलीला) जीव नकोसा झाला. पण पंधरा दिवसांत परत जायचे आहे, या आशेवर त्या दिवस कंठत होत्या. मूडीच्या कुटुंबीयांना स्वच्छता, नीटनेटकेपणा वगैरे गोष्टींशी सोयरसुतक नव्हतं. अगदी भातातले पोरकिडे सुद्धा काढलेले नसायचे. झुरळांचा सुळसुळाट होता. घाणेरड्या न धुतलेल्या चादरी, अभ्रे असायचे. एक दिवस तिला कळून चुकलं की, तिला इथे कायमच राहावं लागणार आहे. तिची फसवणूक झाली आहे. स्त्रियांसाठी असणाऱ्या कडक कायद्यांचं पालन करावं लागणार आहे. तिचा नवरा पूर्ण बदलून गेला आहे… तिच्यावर आभाळ कोसळतं. पण ती ठरवते की, तीच स्वतःची मदत करणार आणि या नरकातून सुटका करून घेणार!
नजरकैदेतून सर्वांची नजर चुकवून ती अमेरिकन दूतावासात जाते. तिथली अधिकारी स्त्री तिला सांगते, तू मुलीला सोडून एकटी परत जा. ती नकार देते, तेव्हा ती स्त्री सांगते की, दोघींना अमेरिकेला पाठवणे फार कठीण आहे. इराणी व्यक्तीशी लग्न केल्यामुळे ती आता इराणी नागरिक झाली आहे आणि त्या कायद्यांचे पालन करावे लागेल. अशा बऱ्याच स्त्रिया अडकल्या आहेत, असेही ती सांगते. बेट्टीचा आई-वडील आणि पहिल्या नवऱ्यापासूनच्या मुलांशी संपर्क सुटलेला असतो. तरी आई आणि आजारी वडील आपल्या परीने प्रयत्न करत असतात. तिथल्या काही स्त्रिया आणि पुरुष सुद्धा तिला मदत करायला पुढे येतात; पण सतत भीती असते. मूडीला समजले तर तो मारून टाकेल, याची तिला खात्री असते. तो तिला मारहाण करत असतो, कोंडून ठेवतो. कुटुंबीय आणि परिचितांपैकी कोणीच तिला मूडीपासून वाचवत नाहीत.
हेही वाचा – बनगरवाडी… लहानसे खेडं पूर्ण विश्वाचे प्रतिनिधी
शेवटी ती पळून जाण्यात यशस्वी होते. तिला काही चांगली माणसे भेटतात. पलायनाच्या आठवड्याची कहाणी विस्मयकारक आहे. इराण ते तुर्कस्तान प्रवासात तिने मृत्यूला आव्हान दिले. हा सर्वात अवघड मार्ग… कारण बर्फाळ पर्वतरांगा असलेली सीमा आहे. वाचताना सुद्धा भीती वाटते. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवून जीव धोक्यात घालावा लागला – तिचा आणि मुलीचा सुद्धा! केवळ दुर्दम्य इच्छाशक्ती असल्याने हे घडले. लेखिका म्हणते, याच देशात मूडीसारखी वाईट माणसे भेटली आणि हमीद, अमाल, हेलनसारखी चांगली माणसे भेटली. माणसाचे चांगले-वाईट असणे देशावर नाही, केवळ त्या व्यक्तीवर अवलंबून असते. अमेरिकन नागरिक असूनही बेट्टीला मदत मिळायला इतका त्रास झाला. सरकारी यंत्रणा हलवणे सोपे नसतेच.
पुस्तक वाचताना लेखिकेचे एक वाक्य मनात घर करून राहते – ‘स्वातंत्र्य अत्यंत मौल्यवान असते आणि त्याची खरी किंमत पारतंत्र्यात गेल्यावर कळते.’ व्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करणाऱ्या, स्त्री-पुरुषांना समान मानणाऱ्या देशात राहणाऱ्याला कदाचित त्याचं मोल लक्षात येणार नाही, पण अशा हृदयद्रावक कहाण्या वाचल्यावर आपल्या भाग्याची जाणीव होते. स्वातंत्र्य मूल्यवान असतं म्हणून ते झगडूनच मिळवावं लागतं, सहज कोणी हातात आणून देत नाही. रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळेना?
जगभरातल्या स्त्रियांनी अनेक वर्षं त्रास सहन केला आहे. त्यांना समान अधिकार मिळायला 20वे शतक उजाडावे लागले आणि हे प्रगत वाटणाऱ्या, व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर करणाऱ्या देशांत सुद्धा घडले. मग ज्यांनी आधुनिकता नाकारली आहे, त्यांच्याबद्दल काय सांगावे? आजही काही स्त्रियांना हेच भोगावे लागत आहे.
हेही वाचा – डॉ. आनंदीबाई जोशी… जीवनाचे सापडलेले ध्येय!
दुसरी एक गोष्ट तितकीच मनावर ठसते – संकट कितीही भयंकर असो, त्यावर मात करण्यासाठी लढावे लागते. हार मानून चालत नाही. एकदा दृढनिश्चय केला की, मार्ग निघण्याची शक्यता वाढते. एक आई आपल्या मुलांसाठी निष्ठूर, बलाढ्य ताकदीशी लढू शकते… मनाची ताकद मोठी असते!
लेखिकेने शेवटी लिहिले आहे की, तिला आणि तिच्या मुलीला मूडीपासून कायम धोका आहे. मोहताबला पळवून नेण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. अर्थात, हे तितकेसे सोपे नाही. आता तर मोहताब मोठी झाली आहे. तिनेही एक पुस्तक लिहिले आहे. तिच्या मुलाखती युट्यूबवर आहेत.
ही कहाणी वाचताना कित्येकदा डोळे भरून येत असले तरी, ही सकारात्मक कहाणी आहे. त्यासाठी हे पुस्तक वाचायला हवे. यावर सिनेमा सुद्धा आहे.


