भाग – 2
स्कॉर्पिओने वळण घेतलं आणि एका हॉटेलसमोर गाडी थांबली. महेशराव विचारांच्या तंद्रीतून बाहेर आले. शरद नाना म्हणाले, “वॉशरूमला जाऊया. थोडा चहा घेऊया… म्हणजे फ्रेश वाटेल.”
टेबलवर चहा आला सर्वजण चहा घेऊ लागले. चहा घेत घेत महेशराव म्हणाले, “हे स्थळ घेरडीच्या विलास नानाने सुचवले आहे. त्याने स्वतः जाऊन खात्री केली आहे. मुलीचं नाव वैशाली आहे. वडील किराणा दुकानात अकाऊंटंट आहेत. आई शेतमजुरी करते. मुलगी बी.ए. झालेली आहे. बोलण्यात गोडवा आहे. वागण्यात साधेपणा आहे. अत्यंत मनमिळाऊ आहे. रोज संध्याकाळी आजी-आजोबांच्या फोटोसमोर दिवा लावल्याशिवाय घरी कोणी जेवत नाहीत. वारकरी संप्रदायाचा वारसा आहे. अत्यंत सुसंस्कृत कुटुंब आहे. त्यामुळे गेल्या वेळेसारखा आपल्याला अनुभव येणार नाही. काळजी करू नका.”
बाहेर येऊन सर्वजण पुन्हा गाडीत बसले. गाडी रस्त्याला लागली. ड्रायव्हरने गाडीचा वेग वाढवला. तोपर्यंत महेशरावना संदीपचा फोन आला. “मी परभणीत पोहोचलो आहे. तुम्ही कुठेपर्यंत आला आहात?”
“आम्ही अर्ध्या तासात पोचतोय.”
अंगणातच सर्वजण स्वागतासाठी उभा राहिले होते. महेशरावसह सर्वजण गाडीतून उतरताच विलास नानांनी नमस्कार केला. पाहुण्यांचे मनापासून स्वागत केले. हातपाय धुवून सर्वजण आत हॉलमध्ये येऊन बसले… स्वच्छ रंगीत सतरंज्या अंथरल्या होत्या. खिडकीचे पडदे वाऱ्याने झुळझुळत होते. माजघरातल्या रेडिओवर मंजुळ प्रसन्न संगीत चालू होते.
सुरुवातीला थंडगार सरबताचे ग्लास आले. सर्वांनी सरबत घ्यायला सुरुवात केली. विलासरावनी सर्वांची ओळख करून दिली. “ही मुलगी…. हे मुलीचे वडील जयंतराव, ही मुलीची आई, हे मुलीचे चुलते, पलीकडे बसलेले मुलीचे दोन मामा…”
जयंतरावनी सर्वांना नमस्कार केला. म्हणाले, “मुलगा आणि मुलगीचा स्वभाव आणि विचार जुळणे गरजेचे असते. त्यामुळे आपण एकमेकांना काही विचारण्यापेक्षा त्यांनीच एकमेकांना प्रश्न विचारावेत.”
जयंतरावचे म्हणणे सर्वांना पटले. सर्वांनी माना डोलावल्या… काही मोजके प्रश्न झाले. उत्तरे झाली. शेवटी वैशालीने संदीपला फक्त एवढंच सांगितलं,
“तुम्ही खूप मोठी परीक्षा पास झाला. एवढ्या मोठ्या पदावर असूनही गाव सोडलं नाही. आईला सोडून वेगळं राहण्याचा विचार केला नाही… हे मला खूप आवडलं.”
संदीपने हसत विचारलं, “तुम्हाला माझ्या पगाराबद्दल, जमिनीबद्दल, फ्लॅटबद्दल काही विचारायचं नाही?”
वैशालीची आई हसली. म्हणाली, “बाळा, आम्हाला एवढंच बघायचं आहे की, मुलगा माणूस म्हणून कसा आहे. बाकी पैसा आज आहे, तर उद्या नाही. पण स्वभाव कायमचा असतो.”
संदीपच्या आईच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं… यावेळी ते अपमानाचं नव्हतं, समाधानाचं होतं.
लग्न साधेपणाने ठरलं. कोणतीही दिखाऊ मागणी नाही. ना अतिचौकशी, ना संशय, ना अहंकार…!
संदीप आणि वैशालीचं लग्न झालं. वैशाली घरात आली आणि घर बदललं. तिने संदीपच्या आईला स्वतःची आई मानली. गावाकडचं घर स्वच्छ, उबदार आणि जिवंत झालं. घराला घरपण आलं. संदीप नोकरीत व्यग्र असला तरी घरी परतल्यावर त्याला एक शांत, प्रेमळ जग मिळू लागलं.
वैशाली कधीच म्हणाली नाही, “आपण शहरात फ्लॅट घेऊया. तुमच्या पगारात वाढ का नाही? माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याकडे दीड कोटीची मालमत्ता आहे, तुमच्याकडे का नाही?”
ती फक्त एवढंच म्हणाली, “तुम्ही प्रामाणिक राहा. तुमचं यश माझ्यासाठी तेवढंच पुरेसं आहे.”
अशा स्त्रीसोबत माणूस फक्त संसार करत नाही, तो आयुष्य जगतो. तिने संसाराला सोन्याची भांडी दिली नाहीत. पण मनाची ऊब दिली. तिने माहेरकडून पैसा अडका दिला नाही. पण मनमिळाऊ स्वभाव दिला. संदीपला समजलं, सुख श्रीमंतीत नसतं. सुख म्हणजे संध्याकाळी घरी परतल्यावर कोणीतरी विचारणं, “ लै थकलात का?”
पाच-सहा वर्षे गेली. संदीप कंपनीत उत्तम काम करत होता. कालच एक मोठी नऊ हेक्टरची साइड मिळाली होती. कामगार टेप धरून मोजत होते. संदीप फरची कॅप घालून त्यांच्या मागोमाग फिरत होता. तरीही उन्हामुळे त्याला घाम आला होता. एवढ्यात त्याला हुक्केरी साहेबांचा फोन आला. हुक्केरी साहेब संदीपचे वर्गमित्र. ते सुद्धा न्यायाधीशाची परीक्षा देत होते. म्हणाले, “अभिनंदन संदीप. तुम्ही जेएमएफसीची एक्झाम चांगल्या मार्काने पास आऊट झालात. तुम्ही आता न्यायाधीश झालात.” संदीपचा आनंद गगनात मावेना. कधी एकदा वैशाली आणि आईला सांगतोय असं त्याला झालं. त्या दिवशीचे काम झटपट आवरून तो घरी आला.
गावात पुन्हा एकदा जल्लोष झाला. आईने देव्हाऱ्यात दिवा लावला. वैशालीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. “तुम्ही जे आहात, ते तुमच्या कष्टामुळे आहात. तुमचा स्वभाव असाच ठेवा.” संदीपच्या वडिलांच्या फोटोसमोर नतमस्तक होत आईने फक्त एवढंच म्हटलं, “अहो, आपल्या मुलाचे कष्ट वाया गेले नाहीत. पण ते पाहायला तुम्ही पाहिजे होता…”
हेही वाचा – …अन् संदीपने स्वतःचा स्वाभिमान वाचवला!
एक दिवस तो न्यायाधीश म्हणून नांदेड येथे नियुक्त झाला. त्याच्या कामकाजाला सुरुवातही झाली. न्यायाधीश म्हणून काम करताना अनेक केसेस त्याच्या समोर येत होत्या. संपत्तीचे वाद, पोटगी, मारहाण, विश्वासघात, विभक्त राहणी, आर्थिक फसवणूक…
सोमवारचा दिवस. दुपारी त्याच्या डायसवर एक केस आली. घरगुती हिंसाचार अधिनियमाखालील याचिका होती ती. त्याने फाइल उघडली. नावावर नजर गेली. निकिता विनय सरवदे… आणि त्याचा हात क्षणभर थबकला. तेच नाव… तीच मुलगी… जिचं स्थळ सहा-सात वर्षांपूर्वी पाहिलं होतं… क्षणभर भूतकाळ समोर उभा राहिला – पगाराची चौकशी. जमिनीची चौकशी. वरचे काही आहे का? नवोदयला खरोखर होता का? – त्याने स्वतःला सावरलं. न्यायासनावर बसल्यावर भूतकाळाला जागा नसते. तिथे फक्त पुराव्याला जागा असते.
केस सुरू झाली. समोर आलेली स्त्री ओळखू येत होती, पण बदललेली होती. चेहऱ्यावर कमालीचा थकवा होता. उन्हाच्या तडाख्याने सुकलेल्या, रोगट फळासारखं तिचं शरीर दिसत होतं. डोळ्यांत मात्र असंतोष भरला होता. आत्मविश्वासापेक्षा तक्रारी जास्त होत्या.
कोर्टात सादर केलेल्या अर्जातून समजलं, तिचं लग्न एका सुशिक्षित, आर्थिकदृष्ट्या सक्षम मुलाशी झालं होतं. लग्नाच्या सुरुवातीला सर्व ठीक होतं. पण नंतर सतत अपेक्षा वाढत गेल्या. सतत तुलना होत राहिली. सतत नियंत्रण होऊ लागले. तुलना… अटी… अपेक्षा… हस्तक्षेप… अविश्वास… या गोष्टी संसाराला रोज थोडं थोडं पोखरत राहिल्या. माहेरच्या नको तितक्या हस्तक्षेपामुळे वाद जास्तच वाढत गेले…
“माझ्या मुलीला हे हवं.”
“तो असा का नाही?”
“त्याच्या घरच्यांनी हे का केलं नाही.”
“तुझं घर एवढंच कसं?”
“अजून मोठं घर घ्या.”
“आमच्या मेहुणीच्या मुलाने गाडी घेतली. तुम्ही अजून का घेतली नाही?”
“स्वतंत्र राहा…” संसार विखाराने पोखरला. स्वभाव नडले. नातं कोसळलं. कारण लग्नानंतरही माहेरचा हस्तक्षेप संपला नव्हता.
शेवटी नातं तुटलं. दोन घरं उद्ध्वस्त झाली. वरिष्ठ न्यायालयात जाऊन घटस्फोट घेण्याच्या अटीवर तडजोड झाली. कायद्याच्या कागदांवर ती एक “घटस्फोटाची याचिका” होती. पण प्रत्यक्षात तो अतिअपेक्षांचा मृत्यूलेख होता. या घटस्फोटाचा खरा आरोपी ‘अतिअपेक्षा’ होती. दुसरा आरोपी ‘अहंकार’ होता आणि तिसरा आरोपी ‘माहेरचा अतिरेकी हस्तक्षेप’ होता.
संदीपने पूर्ण संयमाने केस हाताळली. ना चेहऱ्यावर ओळखीचा भाव. ना मनात सूड. ना कुठलाही अहंकार. कारण न्यायाधीशाच्या खुर्चीत बसल्यावर माणूस स्वतःचा इतिहास विसरतो.
त्या दिवशी कोर्ट उठल्यानंतर तो केबिनमध्ये बराच वेळ शांत बसून राहिला. खिडकीबाहेर सायंकाळ उतरली होती. कातरवेळी बाहेरचं वातावरण उदास वाटत होतं. त्याला वैशालीची आठवण आली. तिचा साधा चेहरा. तिचा विश्वास. तिचं न मागता प्रत्येक गोष्टीत साथ देणं.
घरी गेल्यावर वैशालीने नेहमीप्रमाणे विचारलं, “आज उशीर झाला. खूप काम होतं का?” तो तिच्याकडे पाहत राहिला.
“काय झालं?” ती हसत म्हणाली.
संदीपने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, “आज पुन्हा एकदा समजलं… माणसाने आयुष्यात जोडीदार निवडण्याचा निर्णय घेताना पद, पैसा, रूप, प्रतिष्ठा यापेक्षा स्वभाव निवडला पाहिजे. संस्कार पाहिले पाहिजेत. बाकी सगळं नंतर येतं. कारण लग्न हे ऑडिट नसतं. तो विश्वासाचा करार असतो. जिथे पहिल्या भेटीतच संशयाचं बी पेरलं जातं, तिथे पुढे संसाराचा वृक्ष कधीच फुलत नाही.”
हेही वाचा – सुटका सावकारी पाशातून…
वैशाली म्हणाली, “काय झालं नीट सांगा की तरी.”
संदीप पुन्हा जवळ सरकला. वैशालीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, “आज न्यायालयात एक केस आली होती. घरगुती हिंसाचाराची होती. त्यातून मला पुन्हा एकदा कळलं की, संसार श्रीमंतीने नाही तर, समजूतदारपणाने टिकतो.”
वैशालीने सहजपणे उत्तर दिलं, “म्हणूनच तर निर्मात्याने आपली जोडी लावली.”
संदीपच्या डोळ्यांत समाधान उतरलं.
तो टेरेसवर गेला. बाहेरचा अंधार गडद होऊ लागला होता. रस्त्यावरचे नगरपालिकेचे दिवे मिणमिणत होते. हवेत गारठा पसरला होता. अंधाऱ्या आकाशात चांदण्या चमकू लागल्या होत्या. टेरेसच्या कठड्याला धरून तो आकाशाकडे पाहत स्थिर उभा राहिला.
त्याच्या डोळ्यांसमोर दोन चेहरे उभे होते.
एक त्या निकिताचा… दुसरा या वैशालीचा.
एकीकडे संशय… दुसरीकडे विश्वास.
एकीकडे अपेक्षांचा बाजार… दुसरीकडे साधेपणातलं समाधान.
एकीकडे “वरचं काही आहे का?”
दुसरीकडे “लै थकलाय का? मी आहे ना.”
आणि त्या क्षणी त्याने मनात एक विचार कोरून ठेवला. संसाराला श्रीमंती लागत नाही. संसाराला मिळताजुळता स्वभाव लागतो. संसाराला बंगल्याची गरज नसते. संसाराला विश्वासाची गरज असते. संसाराला अफाट पैसा लागत नाही. संसाराला दोघांचीही समजून घेण्याची वृत्ती असावी लागते.
आपल्या वैशालीच्या अंगी हे सर्व गुण आहेत. त्याला भरून आलं….!!!


