सहकारी आहेत एक माझे, शिरीष आपटे नावाचे. वय सत्तर पार, पण प्रत्येक कामात तरुणांना लाजवेल असा उत्साह. अगदी हाडाचे संघवाले. संघात वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडूनही, आदेश आल्यावर परत एकदा दैनंदिन बाल शाखेची जबाबदारी त्याच उत्साहाने स्वीकारणारे आदर्श स्वयंसेवक! तब्बेत एकदम उत्तम. मधुमेह आहे, पण योग्य ती काळजी घेऊन साखरेवर ताबा मिळवत, आयुष्य मनमुराद जगणारे… हसणारे आणि हसविणारे…
परवा फोन आला त्यांचा, इकडचं तिकडचं बोलणं झालं आणि म्हणाले, “आता काही दिवस शाखेत नाही येऊ शकणार मी.” आमच्या शाखेचा कणा, शाखेचा आधारस्तंभ येऊ नाही शकणार, म्हणजे तसंच काहीतरी कारण असणार होतं; तशीच अपेक्षा केली होती मी!
अतिशय संयत आणि शांत स्वरात म्हणाले, “तीन दिवसांनी शस्त्रक्रिया आहे माझी.” हे काहीतरी नवीनच होतं मला.
“काय झालं?”
“काहीच नाही झालं. होऊ नये म्हणून करायची आहे.”
“अहो, पण कसली शस्त्रक्रिया? कुठे आणि कधी?”
आपटे सांगू लागले…
गेला आठवडाभर सकाळी चालताना दम लागत होता मला. छाती गच्च व्हायची, कोणीतरी दाब देतंय छातीवर असं वाटायचं. दोन मिनिटं उभं राहून शांत, खोल श्वास घेतला, की सगळं सुरळीत. कळतच नव्हतं काही! आमच्या डॉक्टरांकडे गेलो आणि एकंदर लक्षणं सांगितल्यावर म्हणाले, “चिठ्ठी देतोय लिहून, लगेच हृदयरोग तज्ज्ञांना भेटा. मला हे काहीतरी वेगळं वाटतंय.”
हेही वाचा – कुणीतरी आहे तिथे!
घरचे सगळे हवालदिल, पण जायला तर हवंच होतं. हे दुखणं अंगावर काढून चालण्यासारखं नव्हतं. मी म्हणालो, “काळजी करू नका, डोंबिवलीत आता सगळ्या सोयी आहेत. होईल सगळं नीट.”
अर्थात, मी पण जरा हबकलो होतोच, पण आता जे समोर येईल त्याला तोंड देणं भाग होतंच. ते टळणार नव्हतं. डॉक्टरांकडे गेल्यावर रक्त तपासण्या, ईसीजी, 2D Echo, वगैरे चाचण्या झाल्यानंतर डॉक्टरांचं मत पडलं की Angiography करावी, म्हणजे चित्र स्पष्ट होईल…
मामला थोडा गंभीर व्हायला लागला होता आता. Angiography साठी पटापट सूत्रं हलली. कल्याणच्या Fortis चं नाव मुक्रर झालं आणि दोन दिवसानंतरची वेळ मिळाली… ते दोन दिवस मी अस्वस्थतेत काढले. गरज असेल आणि शक्य असेल, तर लगेचच Angioplasty करू, असंही म्हणाले डॉक्टर, म्हणून मग दुसऱ्याच दिवशी गेलो तपासणीला. सोबत बायको, लेक, भाऊ असा लवाजमा…
तपासणी झाली आणि कळलं, बऱ्याच रक्तवाहिन्या बंद आहेत आणि bypass शास्त्रक्रियेला पर्याय नाही. ती करावीच लागेल. डॉक्टर म्हणाले, अगदी वेळेत आलात तुम्ही. आणखी वेळ घालवला असतात तर परिस्थिती गंभीर झाली असती!
ती शस्त्रक्रिया आहे परवा, म्हणून आजच कळवलं. आज दुपारी दाखल होतोय, इस्पितळात.
000
निर्व्यसनी, शांत, तृप्त आयुष्य जगणारा हा मनुष्य आता मोठ्याच दिव्याला सामोरा जाणार होता. शस्त्रक्रिया पण तिथेच होणार होती कल्याणला… कुठले डॉक्टर करणार शस्त्रक्रिया यावर बराच खल झाला आणि शेवटी ‘डॉक्टर सतीश जावळी’ हे नाव निश्चित झालं. अतिशय कुशल आणि निष्णात म्हणून त्यांची ख्याती. शेकडो यशस्वी शस्त्रक्रिया त्यांच्या नावावर जमा असल्याने चिंता अशी नव्हतीच कोणालाच, पण हुरहूर मात्र होती. ती कशी टळणार आणि टाळणार?
दाखल झाल्यावर काही तपासण्या झाल्या आणि परवा सकाळी शस्त्रक्रिया करायची असं ठरलं. आपटे निवांत होते, त्यांचा हास्यविनोद सुरूच होता. बायको दटावत होती त्यांना, तरी! रात्री झोपले ते निवांत. उद्याचा दिवस मधे होता आणि परवा शस्त्रक्रिया! सकाळी ताजेतवाने होते उठले… भीतीचा, चिंतेचा लवलेश नव्हता चेहेऱ्यावर. काही तपासण्या उरल्या होत्या, त्या पार पडल्या आणि count down सुरू झालं.
जेवण झालं आणि तेवढ्यात, अतिशय दुःखद बातमी येऊन थडकली, डॉक्टर सतीश यांच्या वडिलांच्या निधनाची!
हॉस्पिटलच्या म्हणण्याप्रमाणे उद्या डॉक्टर शस्त्रक्रिया करणार नाहीत. उद्याच्या ठरलेल्या दोन्ही शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागतील.
सगळेजण हवालदिल. आता आयत्यावेळी काय करणार, दोष तरी कोणाला देणार? परिस्थितीच तशी होती. बऱ्याच जणांचं म्हणणं पडलं, थांबायला हरकत नाही थोडं, पण याच डॉक्टरांकडून व्हायला हवं सगळं. पण थोडं म्हणजे किती, यावर घोडं अडलं… सगळे विधी करून आले डॉक्टर, तर कमीतकमी दहा ते बारा दिवस जाणार होते. तेवढे दिवस थांबणं तर शक्य दिसत नव्हतं!
कोणीतरी सुचवलं, ठाण्याला चौकशी करू. तिथे होणार असेल तर हलवू तिथे लगेच. सल्ले काय, फुकट असतात, काय जातंय द्यायला? कस निर्णय घेणाऱ्या व्यक्तीचा लागतो!
काय करावं, कोणालाच सुचत नव्हतं. सगळेच चिंतेत. हे असं काहीतरी होईल, हे कोणी गृहीतच धरलं नव्हतं. डॉक्टरांनाच फोन करावा का, असा विचार सुरू होता आणि तेवढ्यात डॉक्टरांचाच फोन आला आपट्यांच्या मुलाला…
थोडं सांत्वनपर बोलणं झाल्यावर डॉक्टर स्वतःच म्हणाले, “वडील 88 वर्षांचे होते माझे. आजारी होते बरेच दिवस, त्यामुळे हे अपेक्षित होतंच. आजचे अंत्यसंस्कार पार पडले की, मी उद्या ठरल्याप्रमाणे शस्त्रक्रिया करेन, तुम्ही निश्चिंत राहा… माझे वडील गेल्याचं दु:ख खचितच आहे, पण आणखी दोन वडिलांची आयुष्यही माझ्या हातात आहेत, याची जाणीव मला आहे.”
हे ऐकताच सगळ्यांच्याच डोळ्यांत अश्रू तरारले कृतज्ञतेचे. देवाचा अंश असतो म्हणतात डॉक्टरांच्यात, हे अगदी पुरेपूर पटलं. बांधिलकी जपणारी अशी माणसं असतात आणि माणुसकी त्यांच्यामुळेच तरते, रामाच्या विटेसारखी किंवा तुकोबांच्या गाथांसारखी… हे जाणवत गेलं मनाला.
दुसऱ्या दिवशी डॉक्टर ठरलेल्या वेळी आले आणि स्वदुःखाला पिछाडीला टाकत, त्यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. सगळं अगदी सुरळीत पार पडलं आणि आपट्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आलं. तिथे जाऊन त्यांना भेटणं शक्य नव्हतं. तीन-चार दिवसांनी, ते घरी आल्यावर भेटायला गेलो आणि त्यांची उत्तम प्रकृती बघून, खूप छान वाटलं.
मोठ्या शास्त्रक्रियेचा शीण होता चेहेऱ्यावर, पण ते प्रसन्न होते. एक कर्तव्य परायण आणि कुशल धन्वंतरी काय किमया करू शकतो, हे त्यांच्याकडे बघून कळत होतं.
1999च्या विश्वचषक स्पर्धेत असंच काहीसं सचिन तेंडुलकरच्या बाबतीत घडलं होतं. स्पर्धा ऐन भरात असताना वडिलांच्या निधनाची बातमी थडकली आणि स्पर्धा सोडून त्याला परतावं लागलं भारतात. संघाला त्याची गरज होती आणि त्यालाही त्याची पुरेपूर जाणीव होती, पण पर्याय नव्हताच. पुढचा महत्त्वाचा सामना केनिया विरुद्ध होता आणि त्या सामन्यासाठी मनावर दगड ठेवून तो परत संघात सामील झाला. अपरिमित दु:ख झेलत असताना सुद्धा, त्या सामन्यात 140 धावा करून, तो सामना जिंकून देण्यात सचिनचा वाटा फार मोलाचा होता. अतिशय आगळीवेगळी अशी ती श्रद्धांजली होती पित्याला!
हेही वाचा – केल्याने होत आहे रे!
अशीच माणसं समाजाला ललामभूत असतात. स्वतःच्या उदाहरणांनी एक आदर्श ठेवतात आपल्या सगळ्यांसमोर. म्हणूनच ती थोर असतात. डॉक्टर त्या दिवशी नसते आले, तरी कोणीही त्यांना दोष दिला नसता, कारण पित्याचा मृत्यू ही अत्यंत क्लेशदायक घटना असते आयुष्यातली… आपलं दु:ख मोठं, का समाजाची किंवा देशाची गरज मोठी, हे ज्याला कळतं आणि जो स्वतःच्या दु:खाला कुरवाळण्यापेक्षा समाज किंवा राष्ट्रहिताला प्राधान्य देतो तोच अजरामर होतो आणि तोच वंदनीयही ठरतो…
एका अनामिक हिंदी कवीच्या ओळी इथे अगदी समर्पक आहेत!
न देखो तुम बाधाओं को,
न सोचो क्या होगा अंजाम।
जो रखे विश्वास हृदय में,
कर लेता हैं हर कठीन काम।
चलो उठो, मत रुको कहीं,
हर क्षण हो संकल्प महान।
कर्तव्य से जो जुड़ा रहे,
जीवन उसका हो कल्याण।
कर्तव्यपरायण डॉक्टर सतीश जावळी, यांना ही माझी छोटीशी मानवंदना. खात्री आहे, ती नक्की पोहोचेल त्यांच्यापर्यंत.


