अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोलकात्यामध्ये एका झालमुरीच्या दुकानाजवळ आपला ताफा थांबवून तेथील स्थानिक दुकानातील भेळीचा म्हणजेच तेथील झालमुरीचा आस्वाद घेतला, या बातमीने सर्वांचे लक्ष वेधले… या भेळीमध्ये वेगळेपण असं काय आहे, त्याचा शोध घ्यायला मी सुरुवात केली.
भेळ… नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं! दिसायला अगदी साधा, खिशाला परवडणारा, चवीलाही तितकाच लाजवाब असलेला हा पदार्थ. श्रीमंतांच्या पार्ट्यांपासून ते गरिबांच्या झोपडीपर्यंत… शाळेच्या बाहेरचे आजीचे दुकान ते ऑफिसच्या कट्ट्यापर्यंत भेळीचं साम्राज्य पसरलेलं आहे. सर्व आबालवृद्धांना आवडणारा पदार्थ म्हणजे भेळ! या साध्याशा वाटणाऱ्या भेळीचा इतिहास आणि भूगोल दोन्ही तितकेच रंजक आहेत.
मुंबईला भेळीचे ‘माहेरघर’ म्हटलं तर वावगं ठरणार नाही. भेळीचा खरा उगम आणि प्रसिद्धी मुंबईत झाली. 19व्या शतकात जेव्हा मुंबईत गिरण्यांचं जाळं पसरलं होतं, तेव्हा कामगारांसाठी झटपट आणि स्वस्त काहीतरी खाणं हवं होतं. अशा वेळी उत्तर भारतीय ‘चाट’ आणि महाराष्ट्रातील ‘मुरमुरे’ यांची सांगड घातली गेली आणि ‘मुंबईया भेळपुरी’ जन्माला आली. गिरगाव आणि जुहू चौपाट्यांवर या भेळीने आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आणि आणि तिथूनच ती जगप्रसिद्ध झाली. इथली ‘ओली भेळ’ म्हणजे चिंच-गुळाची चटणी, मिरचीचा ठसका आणि वरून पेरलेली बारीक शेव!
हेही वाचा – वर्ध्यातील गोरस पाक म्हणजे स्वर्गीय सुख!
विठ्ठल कोळी यांचे मुंबईतील गिरगाव चौपाटीवर ‘विठ्ठल भेळपुरी’ नावाचे जुने दुकान आहे. असे मानले जाते की, 1930-40च्या दशकात त्यांनी भेळीला एक विशिष्ट व्यावसायिक ओळख मिळवून दिली. त्यांनी मुंबईच्या सीएसटी येथील दुकानापासून भेळविक्री करायला सुरुवात केली, असेही सांगितले जाते. मुंबईचे विविध समुद्र किनाऱ्यांवर फिरायला येणाऱ्या लोकांना या भेळ नावाच्या पदार्थाने विशेष आकर्षित केले. 60-70 च्या दशकात किंबहुना त्याही आधी मुंबईत सर्व समुद्र किनाऱ्यांवर भेळेची तसेच पाणीपुरीची दुकाने उभी राहिली. सिने इंडस्ट्रीतील बड्या बड्या स्टार्स लोकांनाही भेळीचा आस्वाद घ्यायला आवडायचे.
मुंबईत भेळ प्रसिद्ध करण्यात गुजराती समुदायाचाही वाटा आहे. चिंच-गुळाची आंबट-गोड चटणी आणि विविध प्रकारचे फरसाण यांची चव मुरमुऱ्यात मिसळून गुजराती बांधवांनी भेळीला आणखी एक ओळख मिळवून दिली.
नाशिकची ‘झटका भेळ’
मुंबईहून पुढे निघालं की, नाशिकमध्ये आपल्याला भेळीचं एक वेगळं आणि रांगडं रूप पाहायला मिळतं… ते म्हणजे ‘नाशिकची झटका भेळ’. नाशिककर म्हणजे तिखटाचे शौकीन! या भेळीच्या नावातच सर्व काही आलंय. हिरव्या मिरचीचा सढळ वापर करून बनवलेली याची विशेष चटणी इतकी तरतरी आणणारी असते की, ती खाल्ल्यावर जिभेला अक्षरशः ‘झटका’ बसतो. याशिवाय, तिथला भेळभत्ताही प्रसिद्ध आहे. कुरमुरे, फरसाण आणि इतर सामग्री त्यात असते. आपण त्यात फक्त, कांदा, टोमॅटो, उकडलेला बटाटा (ऐच्छिक), बारीक चिरलेली कोथिंबीर आणि वाटलेली मिरची त्यात मिक्स करावी लागते.
भडंग, गिरमिट आणि बरंच काही…
भेळीचा हा प्रवास इथेच संपत नाही, तर तिच्या या प्रवासात वाटेतील अनेक थांबे आहेत जिथे ती भडंग, गिरमिट, सुशीला यासारख्या अनेक नावांनी नटली आहे. लसणाचा ठसका आणि कुरकुरीत मुरमुरे असलेला ‘भडंग’ म्हणजे कोल्हापूरची शान. तर, उत्तर कर्नाटकात याच भेळीला ‘गिरमिट’ म्हणतात. यात फोडणीचा मसाला आणि डाळ्यांच्या पिठाचा वापर असतो. पुण्यात भेळ थोडी सुकी आणि जास्तीची लसूण चटणी तसेच चिंच, पुदिन्याच्या चटणीसह खाण्याची पद्धत आहे.
यामध्ये कोलकातामधील ‘झालमुरी’चा ठसका काही औरचं आहे. जसे आपण भारताच्या नकाशावर पूर्वेकडे सरकतो, तसं भेळीचं रूप पूर्णपणे बदलतं आणि समोर येते ती म्हणजे ‘झालमुरी’. बंगालची झालमुरी आणि महाराष्ट्राची भेळ यात एक मुख्य फरक आहे – तो म्हणजे कच्चं मोहरीचं तेल. कोलकात्याच्या झालमुरीमध्ये मोहरीचे तेल आणि एक खास ‘भाजा मोशला’ (भाजलेला मसाला) वापरला जातो. ही झालमुरी टिनच्या डब्यात जोरजोरात हलवून मसाला एकजीव करून दिली जाते. मी माझ्या बंगाली मैत्रीणीकडे ही झालमुरी कैक वेळेस खाल्ली आहे, तिला मात्र आमच्या विदर्भातील प्रसिद्ध कच्चा चिवडा आवडतो, जो भारतातील विविध प्रांतातील अनेक लोकांचा आवडता पदार्थ आहे. करायला अत्यंत सोपा आणि चविष्ट कच्चा चिवडा उन्हाळ्यात तर कैरीमुळे अजूनच चविष्ट लागतो.
काळाच्या ओघात आता भेळ केवळ रस्त्यावरील गाडीवर मर्यादित राहिलेली नाही. आज बाजारात इन्स्टंट भेळीची पाकिटं उपलब्ध आहेत. अगदी आपल्या नागपूरची प्रसिद्ध हल्दीरामची भेळ असो किंवा ‘Top Tip – ताम्हणकर दीदी की इन्स्टंट भेळ’ असो किंवा इतर ब्रँड्स; यामुळे भेळ आता प्रवासाचा सोबती झाली आहे. या पाकिटांमुळे तुम्ही कुठेही असा या भेळीचा तुम्हाला आनंद घेता येतो. ही इन्स्टंट भेळीची पाकीट सोबत असतील तर अगदी परदेशातही, तुम्हाला हवी तेव्हा, काही मिनिटांत चटपटीत भेळ तयार करता येते.
भेळ म्हणजे ‘ऐक्याचं’ प्रतीक
भेळ हा पदार्थ आपल्याला बरंच काही शिकवतो. वेगवेगळ्या चवींचे घटक – गोड चिंच, तिखट मिरची, आंबट लिंबू, कुरकुरीत मुरमुरे आणि मऊ बटाटा, शेव, फरसाण – जेव्हा एकत्र येतात, तेव्हाच ती चविष्ट लागते. भारतीय संस्कृतीही या भेळीसारखीच आहे, जिथे विविध चवींचे लोक एकत्र येऊन एक सुंदर समाज बनवतात.
आजकाल आहारतज्ज्ञही भेळीला ‘हेल्दी स्नॅक’ मानतात, कारण त्यात भाजलेले मुरमुरे आणि ताज्या भाज्यांचा वापर करता येतो. थोडक्यात काय तर… भेळ हा केवळ एक पदार्थ नाही, तर तो एक सोहळा आहे. कागदाच्या द्रोणातली शेवटची पापडी आणि त्यावर उरलेली थोडीशी ‘सुकी भेळ’ खाण्यात जो आनंद आहे, तो जगातील कोणत्याही महागड्या डिशमध्ये नाही! इथे खाली मी विदर्भातील प्रसिद्ध कच्च्या चिवड्याची पद्धत दिलेली आहे.
हेही वाचा – जगाचा नकाशा आणि इतिहास बदलणारा ‘सुगंधी’ प्रवास!
बहुतांश लोकांना कच्चा चिवडा कसा करतात ते माहीत असावे. कच्चा चिवडा आणि भेळ यामध्ये खूप फरक आहे. घरी भेळ करायची असेल तर ती खाली सांगितल्याप्रमाणे करता येईल.
साहित्य
- कुरमुरे (मुरमुरे) – 2-3 वाट्या
- बारीक शेव – 1 वाटी,
- फरसाण – अर्धी वाटी
- तळलेले शेंगदाणे – मुठभर
- तळलेल्या डाळवा – मुठभर
- खारी बुंदी – अर्धी वाटी
- कांदा – 1 मध्यम (बारीक चिरलेला)
- टोमॅटो – 1 लहान (बारीक चिरलेला)
- उकडलेला बटाटा – 1 (लहान तुकडे केलेला)
- हिरवी चटणी – 1-2 चमचे
- (हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना आणि लिंबू घालून केलेली)
- चिंच-गुळाची चटणी – 2-3 चमचे (गोडव्यासाठी)
- लाल तिखट — अर्धा चमचा
- चाट मसाला – 1 चमचा
- लिंबाचा रस – 1 चमचा
- कोथिंबीर – एक वाटी (बारीक चिरलेली)
- मीठ – चवीनुसार
कृती
- एका मोठ्या बाऊलमध्ये कुरमुरे घ्या. कुरमुरे थोडे मऊ वाटत असतील, तर कढईत थोडे मीठ किंवा हळद टाकून दोन मिनिटे परतून घ्या, जेणेकरून ते कुरकुरीत होतील.
- कुरमुऱ्यांमध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि उकडलेल्या बटाट्याचे तुकडे घाला.
- आता यात हिरवी तिखट चटणी आणि चिंच-गुळाची गोड चटणी आवडीनुसार घाला.
- त्यानंतर लाल तिखट, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ टाका.
- मग यात अर्धी वाटी शेव आणि फरसाण घालून सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करा.
- शेवटी लिंबाचा रस आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा एकदा मिक्स करा.
- वरून तळलेले शेंगदाणे, तळलेल्या डाळवा तसेच भरपूर शेव घालून लगेच खायला द्या.


