आज ताटात गरमागरम पोळी वाढून घेताना मला अचानक आईच्या ताटाची आठवण आली. ती संध्याकाळी सकाळची पोळी घ्यायची आणि सकाळी आदल्या रात्रीची. अगदी रोजच नाही, पण बऱ्याचदा हे असंच व्हायचं.
बरं, सासूबाईंचंही तसंच. एकदा सकाळच्या जेवणाच्या वेळी मी त्यांना विचारलंच, “काय लॉजिक आहे हे? ताटात कालची शिळी पोळी घेतली आहे. त्यामुळे या ताज्या पोळ्यांमधून तुमची जी उरणार आहे, तीच तुम्ही रात्री खाणार. त्यापेक्षा ती आत्ताच घ्या ना — गरम, मऊ आणि ताजी!”
मी त्यांना माझं ‘शिळी-ताजी, ताजी-शिळी’ हे संपूर्ण चक्र अगदी व्यवस्थित समजावून सांगितलं. पण त्याचा कधीच काही उपयोग झाला नाही. अर्थात, या सगळ्यात काटकसर, अन्नाची नासाडी किंवा घर चालवण्याचं शहाणपण या गोष्टी बाजूला ठेवल्या, तरी एक गमतीदार विचार माझ्या मनात आला…
हेही वाचा – स्त्रीचे सौंदर्य अन् पुरुषाचे देखणेपण खुलते…
जीवनही आपल्याला रोज एक ताजी पोळी देत असतं; पण आपण मात्र कालच्या शिळ्या गोष्टींमध्येच रमून जातो. बघा ना, आपला वर्तमान जेव्हा भूतकाळ होतो, तेव्हा तो आपल्याला अधिक सुंदर वाटू लागतो. आपण आज सहज म्हणतो, “अरे, बालपण किती सुंदर होतं! तो तर एक सुवर्णकाळ होता.” पण खरंच, तेव्हा आपल्याला तसं वाटायचं का? उलट लवकर मोठं व्हायचं असायचं, काहीतरी नवीन करायचं असायचं… आणि गंमत म्हणजे, आजपासून वीस वर्षांनी आपण कदाचित आजच्या दिवसांबद्दलही असंच म्हणणार आहोत — “काय मस्त दिवस होते ते!” पण सध्या हे दिवस जगताना ते आपल्याला तेवढे सुंदर वाटत नाहीत.
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मागचा टप्पा अधिक सुंदर वाटत राहतो. असं का होत असेल? कदाचित स्मृती, काळानुसार दुःखाचे कोपरे गुळगुळीत करत असाव्यात आणि आनंदाचे रंग अधिक गडद. त्यामुळे भूतकाळ हा वास्तवापेक्षा थोडा अधिक सुंदर दिसू लागतो.
पण पुन्हा प्रश्न तोच…
जर भूतकाळ इतका सुंदर होता, तर तो जगताना आपल्याला तसं का वाटलं नाही?
किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर—
उद्या ज्या दिवसांना आपण आपल्या आयुष्यातला सुवर्णकाळ म्हणणार आहोत, ते दिवस आपण आज जगत आहोत… आणि त्याची आपल्याला जराही कल्पना नाही!
कदाचित, म्हणूनच आयुष्याची खरी गंमत आपल्याला नंतर समजते. आपण ज्या क्षणाची वाट पाहत असतो, त्याच क्षणातून नकळत पुढे निघून जात असतो. मोठं होण्याची घाई करताना बालपण मागे राहतं, स्थिर होण्याच्या धावपळीत तारुण्य हातातून निसटतं आणि एक दिवस मागे वळून पाहताना लक्षात येतं की, ज्याला आपण साधासुधा वर्तमान समजत होतो, तोच आपल्या आयुष्यातला सर्वात सुंदर काळ होता.
वेळ मात्र कोणासाठी थांबत नाही. ती नदीसारखी असते. वाहून गेलेल्या पाण्याला स्मृतींची झळाळी लाभते म्हणून ते अधिक सुंदर दिसू लागतं. पण वाहून गेलेल्या प्रवाहाच्या मोहात हरवून जाण्यापेक्षा, आपल्या समोरून वाहणाऱ्या प्रवाहात मनसोक्त भिजून घ्यावं, मनासारखं जगून घ्यावं…
किती वेगाने
मला एकाच ठिकाणी घुटमळण्याची सवय
आणि किती वेगाने पुढे निघून जातंय वय
घरासमोर डबक्यात सोडलेली होडी
सावरलेल्या अंगणात काढलेली रांगोळी
पुस्तकातलं मोरपिस अन् पिंपळाचं पान
मोगऱ्याच्या सुवासाने हरवलेलं भान
कट्टी बट्टीच्या मैत्रिणींची खूप येते सयं
आणि किती वेगाने पुढे निघून जातंय वय


