भाग – 2
मी दादांच्या कपाळावर हात ठेवून थोपटत असताना दादांनी महत्प्रयासाने डोळे उघडले… तेव्हा मी त्यांच्या जवळ जाऊन म्हणालो की, दादा तुम्ही मघाशी काहीतरी हळू आवाजात बोललात!
दादांनी मोठा सुस्कारा सोडला आणि मला म्हणाले, “तेव्हा रागाच्या भरात मोठी चूक करून बसलो. अरुणच्या सच्च्या प्रेमाचे रंग मी नाही रे ओळखू शकलो. त्याला घराबाहेर काढण्याएवढा त्याचा गुन्हा निश्चितच गंभीर नव्हता. पण तेव्हा माझ्या डिवचलेल्या अहंकाराने माझ्यातील वडिलांच्या मायेवर विजय मिळवला आणि त्या दिवशी पराकोटीला पोहोचलेल्या आणि रागीट शब्दांच्या हमरातुमरीवर आलेल्या आमच्या नात्याच्या तिसऱ्या अंकाचा पडदा मी अरूणला मी घराबाहेर काढून पडला. मी क्रोधाने इतका लालबुंद झालो होतो की, अरुणची आई माझा एकंदर अवतार बघून कमालीची घाबरलेली होती. तिने त्यावेळी आणि त्यानंतर आजतागायत कितीतरी वेळा अरुणला माफ करण्यासाठी माझ्याकडे हट्ट केला होता, पण कालपर्यंत मी तो हट्ट पुरा केला नव्हता.
पण आज मात्र माझा अहंकार गळून पडला आहे. कारण ज्या शरीरात तो अहंकार ठासून भरलेला होता त्याच शरीराला उद्याचा दिवस दिसेल का नाही याची खात्री उरलेली नाहीये. आता माझ्यातला बाप फक्त जिवंतपणी पुत्रवियोगाचे चटके सोसत आहे आणि त्या बापाचे मन त्याने आजवर अरूण आणि त्याच्या आईवर केलेल्या घोर अन्यायाच्या वणव्यात सुकलेल्या पानगळीप्रमाणे पेटत चालले आहे. सुहास म्हणून मी तुझ्या पाया पडतो हवं तर, पण हे डोळे कायमचे मिटायच्या अगोदर त्यांच्यासमोर त्या पुत्रप्रेमाचा ‘अरुणोदय’ होऊ दे. काही करून माझी त्याची गळाभेट घडवून आण तू. त्याचा ठावठिकाणा शोधून काढ. हवंतर वर्तमानपत्रातून जाहिरात देऊन विनंती कर त्याला. ही माझी ‘शेवटची इच्छा’ केवळ अरुणला भेटण्याची नाहीये तर, माझ्यावर आजवर लागलेल्या, माझ्या बायकोच्या मातृत्वाचा मी केलेल्या घोर अन्याय आणि अपमानाच्या कलंकातून कायमची मुक्ती मिळण्याची.
दादांची विवशता पराकोटीला पोहोचली होती आणि त्यांना मला अरुणविषयी समजलेली माहिती सांगण्याची हीच योग्य वेळ आहे, याची जाणीव झाली. मी सांगितलेली गोष्ट ऐकून आजवर त्याचं तोंड देखील न बघण्याच्या दुःखापुढे तो आदिवासी मुलांच्या आयुष्यात जगण्याची जिद्द निर्माण करून त्यांच्यातील सुप्त गुणांची इंद्रधनुष्यं जगाच्या आकाशात पसरविण्यासाठी घेत असलेली अहोरात्र मेहनत दादांना कैक पटीने आनंद आणि समाधान मिळवून देणारी ठरणार आहे, याची जाणीव मला प्रकर्षाने झाली.
नंतर क्षणाचाही विलंब न करता मी सहा महिन्यांपूर्वी अचानकपणे झालेल्या माझ्या आणि अरुणच्या भेटीचा सर्व वृत्तांत दादांच्या कानांवर घातला. ते ऐकून दादा नुसते भावनाविवश झाले नाहीत तर, त्यांचा कंठ दाटून आला आणि ते ओक्साबोक्शी रडू लागले. त्याच अवस्थेत असताना ते मला म्हणाले की, “सुहास, नशिबाच्या जीवघेण्या वादळात नखशिखांत अडकून परिस्थितीच्या जमिनीवर उघडा पडून देखील माझ्या अरुणने त्यातून तावूनसुलाखून बाहेर पडण्यासाठी दाखवलेली जिद्द आणि चिकाटी खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. तो अरुण होता म्हणूनच आजवर तग धरून राहू शकला, नाही तर दुसरा कोणी असता तर एव्हाना परिस्थिती समोर शरणागती पत्करून हतबलतेचं आयुष्य जगला असता किंवा मधेच त्याने श्वास सोडला असता. पण त्याच्या नावाला जागत तो आजवर परिस्थितीवर मात करून नवीन सुखी समाधानी आयुष्याचा अरूणोदय करण्यात यशस्वी ठरला. माझ्या मुलाच्या कामगिरीने माझी आजारी छाती आज उसन्या अभिमानाने भरून गेली आहे. तू त्याला फोन करून माझी शारीरिक आणि मानसिक अवस्था सांग. शिवाय माझी शेवटची इच्छा सांगून त्याला माझ्यावतीने कळकळीची विनंती करून तातडीने मुंबईला येऊन मला भेटायला सांग.”
दादांच्या समोरच मी अरूणला फोन करून दादांची शारीरिक अवस्था आणि त्यांचा निरोप सांगितला. ते ऐकून हादरून गेलेल्या अरुणने मला स्पीकर ऑन करून मोबाइल दादांच्या उशाशी ठेवायला सांगितले. मी तसे केल्यावर समोरून शब्द आले, ‘दादा, तुमच्यापेक्षा तुमचा हा लाडका बबड्या तुम्हाला भेटायला आतूर आहे. मिळेल त्या वाहनाने मी मुंबईला येऊन तुम्हाला आपल्या घरी येऊन भेटतो. माझी शपथ आहे तुम्हाला की, मी येईस्तोवर तुमचा श्वास चालू ठेवा. तुमच्या सारखीच माझी देखील ‘शेवटची इच्छा’ आहे तुमच्या कुशीत शिरून आजवर साचलेले दुःख संपवून टाकण्याची. दादा मी लवकरात लवकर इथून निघेन. तोपर्यंत प्लीज माझी वाट बघा… आलोच मी…’
मी अरुणची सांगितलेली कहाणी ऐकून सगळ्यांनाच गहिवरून आलं. इतकी वर्षे काय गमावलं याची प्रकर्षाने जाणीव झाली. पण खरी कसोटी अरुण दादांसमोर उभा राहील, तेव्हा होती. दादांनी त्याला मनातल्या मनात माफ जरूर केले होते. पण त्यांची सध्याची शारीरिक अवस्था बघता त्यांची भेट साधेपणाने व्हावी ही आमच्या सगळ्यांची अपेक्षा होती.
हेही वाचा – नात्यातील निरगाठी
मी अरुणला घेऊन दादांच्या खोलीच्या दरवाज्यावर जाऊन उभा राहिलो. दार हळूच उघडून मी आत डोकावून बघितले. दादा शांतपणे झोपले होते. मी अरुणला आत बोलावून दादांच्या बेड समोर उभं केलं.
क्षण दोन क्षण गेल्यावर मी दादांच्या कानांजवळ जाऊन त्यांना हाक मारली. दादांनी डोळे उघडले. मी त्यांना बसतं केलं आणि अखेर त्यांच्या दृष्टीसमोर अरुण आला.
“दादा तुमची शेवटची इच्छा मी पूर्ण केली आहे, माझं काम संपले आहे. आता या पुढचे क्षण फक्त तुमच्या दोघांचे आहेत. मी फक्त त्या क्षणांचा साक्षीदार असणार आहे…” मी दादांना म्हणालो. एव्हाना काकू आणि दिप्ती देखील न रहावून आत खोलीत आल्या.
थरथरत्या हातांनी दादांनी त्यांचा चष्मा डोळ्यांवर चढवला आणि आजवर रागाच्या ढगाआड लपलेला त्यांच्या मायेचा अरुणोदय झाला.
अरुणला बघून दादांच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. त्यांनी जेमतेम दोन्ही हात बाजूला पसरले आणि पुढच्याच क्षणी अरुणने भावनाविवश होऊन त्या हातांमध्ये स्वतःला झोकून दिले. पितापुत्रांचे भावनिक मिलन अखेर झाले. दादांना बरंच काही बोलायचं होतं, हे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते, पण अरुणने त्यांना बोलून दिले नाही.
“दादा तुम्ही मला जवळ घेतलं यात सगळं काही आलं. इतकी वर्षे तुम्ही आणि आई असून देखील मी पोरकेपणाचं आयुष्य जगलो. इथून बाहेर पडल्यावर आयुष्याच्या सारीपाटावर सगळंच चुकीचे घडत गेले. शेवटी मी एकटाच राहिलो. वैवाहिक आयुष्य देखील फार काळ टिकलं नाही. शेवटी आदिवासी मुलांच्या मधे मी रमलो. आता तीच माझी कर्मभूमी आहे. अजूनही मुख्य शैक्षणिक प्रवाहापासून कोसो दूर असलेल्या आदिवासी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी मी बिनपुस्तकांची शाळा सुरू केली आहे, माझ्या तिथल्या घराच्या ओसरीवर. सरकारी शाळा सुटल्यावर सगळी मुलं माझ्याकडे धावतपळत येतात. निसर्गातील उदाहरणे देत मी मुलांना नुसतं व्यावहारिक ज्ञान देत नाही तर, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत यासाठी प्रयत्न करतो मी. हळूहळू मला अपेक्षित असा बदल त्या मुलांमध्ये व्हायला सुरुवात झाली आहे. अमरावती येथे एका शेयर ब्रोकरकडे केलेल्या नोकरीतील अनुभवाच्या जोरावर मी शेयर बाजारात अभ्यासपूर्ण गुंतवणूक करून त्यातून उपलब्ध झालेला फायदा माझं घर चालवण्यासाठी आणि मुलांसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वापरतो.
मला आजही किंचित देखील पश्चात्ताप होत नाही माझ्या तेव्हाच्या वागण्याचा कारण प्रेम हे सांगून होत नाही आणि तसंच मरण देखील मागून मिळत नाही. आम्ही दोघांनीही तेव्हा पूर्ण विचारांती विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला होता, दुर्दैवाने दोन्ही घरांतून या निर्णयाला विरोध झाला. पण त्याही परिस्थितीत आम्ही स्वबळावर जगण्याचा प्रयत्न केला. सुरुवात तर झाली होती, पण वृंदाच्या अचानक जाण्याने मी साफ कोसळून गेलो होतो. माझा उरलासुरला आधार माझ्यापासून दूर निघून गेला होता. तेव्हा क्षणभर परत तुमच्या जवळ यावंस वाटलं. नाक घासून तुमची माफी मागावीशी वाटली. पण तुम्ही मला स्वीकारायला नकार दिलात तर पुढे काय, हा प्रश्न मला सतावत होता. पण माझी ही अवस्था फार काळ टिकली नाही. आदिवासी मुलांच्या रूपांत मला आयुष्याची पुढची दिशा सापडली आणि आता तेच झाले आहेत माझा आधार!
तुम्ही भेटलात. माझ्या मायेच्या स्वर्गात माझं हक्काने स्वागत झालं. मी भरून पावलो. हा सुहास मध्यंतरी अपघातानेच भेटला आणि तुम्हाला भेटण्याची माझी शेवटची इच्छा त्याने पूर्ण केली. उद्या मी निघेन इकडून परत जायला. तुम्ही पूर्ण बरं झाल्यावर जरूर या माझ्या घरी आईसोबत. मला कळवा तसं. मी येईन गाडी घेऊन तुम्हाला न्यायला,” अरुण एवढं बोलून रडला.
दादांनी अरुणच्या डोक्यावर थोपटत त्याला शांत केले.
“सुहास इकडे ये पुढे. दादांनी मला हाक मारली. मी दादांसमोर येऊन उभा राहिलो. आज खूप दिवसांनी दादांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसला मला…
“सुहास तू माझी शेवटची इच्छा पूर्ण केलीस, त्याबद्दल तुझे मी मनापासून आभार मानतो.”
हेही वाचा – दु:ख विसरायला लावणारे कॅडबरी चॉकलेट
“दादा, मी केवळ निमित्त ठरलो आहे, या भेटीसाठी. आभार मानायचे असले तर, त्या परमेश्वराचे माना. कारण त्याने तुमची शेवटची इच्छा पूर्ण करण्याचे मनावर घेतले आणि माझी आणि अरुणची अचानकपणे गाठ घालून दिली. अन्यथा, अरुणला शोधून काढणं अशक्य होते. म्हणूनच परमेश्वराचे अस्तित्व मान्य करून त्याच्यावर भक्तीभावाने ठेवलेला विश्वास आपल्याला कठीण परिस्थितीतून मार्ग दाखवतोच, हे जे मी शिकलो त्याचा आज प्रत्यय मला आला… तुम्ही आता लवकर बरं होऊन अरुणच्या घरी हवापालट करण्यासाठी रहायला जावं, ही माझी इच्छा तुम्ही नक्की पूर्ण कराल याची खात्री मला आहे,” असं मी दादांना म्हणालो.
दादांनी अरुणचा हात हातात घेतला आणि मला म्हणाले, “सुहास तू बघच आता लवकरच मी बरा होऊन तुझी आणि अरूणची इच्छा पूर्ण करीन.”
दादांच्या या आश्वासक बोलण्याने त्यांच्या खोलीचा कोपरा न कोपरा आनंदाने आणि समाधानाने उजळून निघाला होता हे काही वेगळं सांगायला नको.


