“राज, पुढच्या महिन्यात तुझा वाढदिवस आहे. बाबा तुला वाढदिवसाची भेट म्हणून नवी कोरी मर्सिडीज देणार आहेत. ती गाडी आणि तिचा ड्रायव्हर फक्त तुझ्यासाठी असेल.”
“आई, खरंच?” राजने आश्चर्याने विचारले.
“हो राज. काल रात्री बाबांनी सांगितलं. नवीन तंत्रज्ञान आणि विशेषतः एआयचा वापर करून कंपनीचा खर्च खूप कमी होणार आहे. त्यामुळे कंपनीला भरघोस नफा होईल, असं बाबा म्हणत होते.”
राज आनंदाने अक्षरशः हवेत तरंगत होता. मित्रांना काहीच न सांगता वाढदिवसाच्या दिवशी मर्सिडीज घेऊन शाळेत जायचं आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का द्यायचा, असा त्याने बेत केला.
वाढदिवसाला अजून आठ दिवस बाकी होते. शाळेतून परतला, तेव्हा त्याचा चेहरा पूर्णपणे उतरलेला होता.
“राज, काय झालं?” आईने काळजीने विचारलं.
“आई… माझे दोन जिवलग मित्र आणि माझ्या आवडत्या मॅम पुढच्या महिन्यात शाळा सोडून दुसऱ्या गावी जाणार आहेत.”
“अरे, तुझ्या मित्रांच्या बाबांना आणि मॅमच्या हसबंडना दुसरी चांगली नोकरी मिळाली असेल.”
राजने नकारार्थी मान हलवली.
“नाही आई. माझ्या मित्रांच्या बाबांना आणि मॅमच्या हसबंडना त्यांच्या कंपनीने कामावरून काढलं आहे.”
“मग आपण तुझ्या बाबांना विचारू या. आपल्या कंपनीत त्यांना काम देता येईल का?”
राजचा आवाज भरून आला.
“आई, ते तिघेही बाबांच्या कंपनीतच आहेत… आणि खर्च कमी करण्यासाठी बाबांनीच त्यांना कामावरून काढलं आहे.”
आई नि:शब्द झाली. तिच्यासमोर पहिल्यांदाच एआय, नफा आणि माणुसकी यांचा संघर्ष उभा राहिला होता.
रात्री जेवताना राज फारसा बोलत नव्हता.
“काय रे? इतका शांत का?” बाबांनी विचारलं.
“बाबा, एआयमुळे कंपनीचा नफा वाढतो, हे खरं आहे ना?”
“हो बेटा.”
“पण त्या नफ्यामुळे जर आपले प्रिय आणि जवळचे आपल्यापासून दूर जाणार असतील, तर तो नफा कोणासाठी?”
बाबा शांत होते.
हेही वाचा – अबोली, मी अन् ती…!
राज पुढे म्हणाला, “बाबा, एआयच्या पलीकडे काय असतं?”
बाबांनी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं.
“बाबा, माणसं… त्यांची स्वप्नं… त्यांची घरं… त्यांचं आयुष्य… हे सगळं एआयच्या पलीकडे नाही का?”
बाबांच्या हातातील घास तसाच राहिला.
त्या रात्री ते बराच वेळ जागे होते. लॅपटॉपवर नफ्याची आकडेवारी होती… कर्मचाऱ्यांची यादी होती… आणि मनात घुमत होता मुलाचा तो प्रश्न —
“एआयच्या पलीकडे काय असतं?”
खूप विचाराअंती त्यांनी मनोमन एक निर्णय घेतला.
दुसऱ्या दिवशी सकाळी ते नेहमीपेक्षा लवकर कंपनीत पोहोचले. एचआर प्रमुख आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांनी बोलावून घेतलं.
“आजपासून कोणत्याही कर्मचाऱ्याला केवळ एआयमुळे कामावरून कमी केलं जाणार नाही.”
“सर, मग ज्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला होता, त्यांचं काय?”
“त्यांना नव्या कौशल्यांचं प्रशिक्षण द्या. नव्या जबाबदाऱ्या द्या. एआयसोबत काम करण्यासाठी त्यांना सक्षम करा.”
क्षणभर थांबून ते पुढे म्हणाले, “एआय माणसांसाठी आहे… माणसं एआयसाठी नाहीत.”
सभागृहात शांतता पसरली. त्या शांततेत प्रत्येकाला जाणवलं — आज कंपनीचा निर्णय बदलला नव्हता; कर्मचाऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला होता.
राजच्या वाढदिवसाचा दिवस उजाडला. बंगल्याच्या पोर्चमध्ये काळीभोर मर्सिडीज दिमाखात उभी होती. गाडीची पूजा झाल्यावर बाबा म्हणाले,
“राज, आधी हे बघ.”
त्यांनी खिशातून एक दुमडलेला कागद बाहेर काढला.
“हा कागद ओळखतोस?”
राजने तो उघडला.
“अरे… हे तर माझं पत्र!”
त्यात लिहिलं होतं—
प्रिय बाबा,
मला मर्सिडीज नको. तिच्या बदल्यात माझ्या मित्रांच्या बाबांची आणि माझ्या आवडत्या मॅमच्या हसबंडची नोकरी परत द्या. माझ्यासाठी तीच सर्वात मोठी वाढदिवसाची भेट असेल.
द्याल ना, बाबा?
तुमचा राज
“बाबा, हे… तुमच्याकडे कसं आलं?”
“तू झोपल्यानंतर आईने मला दिलं.”
“मग…?”
बाबा हसले… “मग मला तुझ्या प्रश्नाचं उत्तर सापडलं.”
“काय?”
“एआयच्या पलीकडे माणुसकी असते!”
क्षणभर शांतता पसरली.
हेही वाचा – बायकोची साडी खरेदी अन् मी
“राज, मी फक्त निर्णय बदलला नाही…”
राज आश्चर्याने बाबांकडे पाहू लागला.
“मी माझा दृष्टिकोन बदलला.”
“म्हणजे?”
“आता तुझे मित्र शाळा सोडणार नाहीत. तुझ्या आवडत्या मॅमही जाणार नाहीत. एआय आपल्या कंपनीत असेल… पण माणसांच्या जागी नाही; त्यांच्यासोबत असेल.”
राजच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले. त्याने बाबांना घट्ट मिठी मारली. राज आणि त्याच्या बाबांच्या प्रसन्न चेहऱ्याकडे पाहत आई हसून म्हणाली,
“एआय हे तंत्रज्ञान म्हणून स्वीकारा. त्याचा वापर करून नवी क्षितिजं गाठा. पण एआयच्या पलीकडे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा —
माणसाने माणसाशी माणसासम वागणे — हीच खरी बुद्धिमत्ता आणि हीच खरी नीतिमत्ता.”


