सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय नववा
जंव आकारु एक पुढां देखती । तंव हा देव येणें भावें भजती । मग तोचि बिघडलिया टाकिती । नाहीं म्हणोनि ॥170॥ मातें येणें येणें प्रकारें । जाणती मनुष्य ऐसेनि आकारें । म्हणऊनि ज्ञानचि तें आंधारें । ज्ञानासि करी ॥171॥
मोघाशा मोघकर्माणो मोघज्ञाना विचेतस: । राक्षसीमासुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिता: ॥12॥
यालागीं जन्मलेचि ते मोघ । जैसे वार्षियेवीण मेघ । कां मृगजळाचे तरंग । दुरुनीचि पाहावे ॥172॥ अथवा कोल्हेरीचे असिवार । नातरी वोडंबरीचे अळंकार । कीं गंधर्वनगरीचे आवार । आभासती कां ॥173॥ सांवरी वाढिन्नल्या सरळा । वरी फळ ना आंतु पोकळा । कां स्तन जाले गळां । शेळिये जैसे ॥174॥ तैसें मूर्खांचें तयां जियालें । आणि धिक् कर्म तयांचें निपजलें । जैसें सांवरी फळ आलें । घेपे ना दीजे ॥175॥ मग जें कांहीं ते पढिन्नले । तें मर्कटें नारळ तोडिले । कां आंधळ्या हातीं पडिलें । मोतीं जैसें ॥176 ॥ किंबहुना तयांचीं शास्त्रें । जैशीं कुमारींहातीं दिधलीं शस्त्रें । कां अशौच्या मंत्रें । बीजें कथिलीं ॥177॥ तैसें ज्ञानजात तया । आणि जें कांहीं आचरलें गा धनंजया । तें आघवेंचि गेलें वायां । जे चित्तहीन ॥178॥ पैं तमोगुणाची राक्षसी । जे सद्बुद्धीतें ग्रासी । विवेकाचा ठावोचि पुसी । निशाचरी ॥179॥ तिये प्रकृती वरपडे जाले । म्हणऊनि चिंतेचेनि कपोलें गेले । वरि तामसीयेचिये पडिले । मुखामाजीं ॥180॥ जेथ आशेचिये लाळे । आंतु हिंसा जीभ लोळे । तेवींचि संतोषाचे चाकळे । अखंड चघळी ॥181॥ जे अनर्थाचे कानवेरी । आवाळुवें चाटीत निघे बाहेरी । जे प्रमादपर्वतींची दरी । सदाचि मातली ॥182 ॥ जेथ द्वेषाचिया दाढा । खसखसां ज्ञानाचा करिती रगडा । जे अगस्तीगवसणी मूढां । स्थूलबुद्धी ॥183॥ ऐसें आसुरिये प्रकृतीचां तोंडीं । जे जाले गा भूतोंडीं । ते बुडोनि गेले कुंडीं । व्यामोहाचां ॥184॥ एवं तमाचिये पडिले गर्ते । न पविजतीचि विचाराचेनि हातें । हें असो ते गेले जेथें । ते शुद्धीचि नाहीं ॥185॥ म्हणोनि असोतु इयें वायाणीं । कायशीं मूर्खाचीं बोलणीं । वायां वाढवितां वाणी । शिणेल हन ॥186॥ ऐसें बोलिलें देवें । तेथ जी म्हणितलें पांडवें । आइकें जेथ वाचा विसवे । ते साधुकथा ॥187॥
हेही वाचा – Dnyaneshwari : तेविं मी म्हणोनि प्रपंचीं, जिहीं बुडी दिधली कृतनिश्चयाची…
अर्थ
जेव्हा एखादी मूर्ती आपल्यापुढे पाहतात, त्यावेळेला त्या मूर्ती एवढाच देव आहे, अशा समजुतीने भक्ती करतात आणि मग तीच मूर्ती भांगली म्हणजे, आता देव नाहीसा झाला, असे समजून पूजा करण्याचे थांबवतात. ॥170॥ अशा या प्रकारांनी आकारावरून, इतर देहधार्यांसारखाच मी एक मनुष्य आहे, असे समजतात. म्हणून त्यांचे ते विपरीत ज्ञान माझ्या शुद्ध स्वरूपाच्या यथार्थ ज्ञानास झाकून टाकते. ॥171॥
त्यांच्या इच्छा निष्फळ आहेत, त्यांची कर्मे निष्फळ आहेत, त्यांचे ज्ञान निष्फळ आहे, (कारण) ते विवेकशून्य लोक राक्षसी आणि आसुरी अशा मोहमय प्रकृतीवर अवलंबून राहतात. ॥12॥
म्हणून त्यांचे जन्माला येणेच फुकट आहे. ज्याप्रमाणे पावसाळ्यावाचून आलेले ढग किंवा मृगजळात दिसणार्या लाटा या गोष्टी दुरूनच दिसण्यास बर्या असतात, ॥172॥ अथवा मातीचे घोडेस्वार किंवा गारुडीविद्येने केलेले दागिने किंवा आकाशात ढगांच्या आकृतीमुळे दिसणार्या गावाचे गावकूस, हे ज्याप्रमाणे दिसतात मात्र, पण वास्तविक मिथ्या असतात. ॥173॥ सरळ वाढलेल्या कांड्यानिवडुंगाला वर फळ नसते आणि आत गाभाही नसतो (पोकळ असतो) किंवा शेळीचे गलोल व्यर्थ असतात. ॥174॥ त्याप्रमाणे त्या अविचारी लोकांचे जीवित व्यर्थ आहे. ज्याप्रमाणे सांवरीला आलेले फळ देवघेवीच्या उपयोगाचे नसते, (त्याप्रमाणे त्यांचे कर्म व्यर्थ असते). म्हणून त्यांच्या हातून घडलेल्या कर्माला धिक्कार असो. ॥175॥ मग ते अज्ञानी जे काही शिकलेले असतात ते त्यास, माकडाने नारळ तोडल्यासारखे अथवा आंधळ्याच्या हातात मोती पडल्यासारखे (निरूपयोगी आहे.) ॥176॥ फार काय सांगावे? त्यांची जेवढी म्हणून शास्त्रे आहेत, तेवढी जशी का लहान मुलीच्या हातात दिलेली शस्त्रे अथवा अशुद्ध मनुष्यास सांगितलेले बीजमंत्र (त्याप्रमाणे निरर्थक असतात). ॥177॥ त्याप्रमाणे अर्जुना, त्यांचे संपूर्ण ज्ञान आणि जे काही त्यांनी आचरण केले असेल, ते संपूर्ण व्यर्थ जाते. कारण की, त्यांचे चित्त स्थिर नसते. ॥178॥ सद्बुद्धीला गिळून टाकणारी आणि विचाराचा ठावठिकाणा नाहीसा करणारी तसेच (अज्ञानरूपी) रात्रीत संचार करणारी तमोगुणारूपी राक्षसी, ॥179॥ त्या आसुरी प्रकृतीच्या आधीन झाले, म्हणून ते चिंतारूपी गालाच्या द्वारे आणखी त्या तामसी राक्षसीच्या मुखात पडले गेले. ॥180॥ जिच्या मुखात आशेच्या लाळेमधे हिंसारूपी जीभ लोळते, त्याचप्रमाणे जी राक्षसी संतोषरूपी चघळ नेहेमी चघळत असते (म्हणजे संतोष नेहमी नाहीसा करते), ॥181॥ जी राक्षसी अनर्थाच्या कानांपर्यंत ओठांचे काठ चाटीत बाहेर निघते आणि जी राक्षसी नेहेमीच प्रमादरूपी पर्वताची माजलेली (भयप्रद) दरी आहे. ॥182॥ जिच्या तोंडामध्ये द्वेषरूपी दाढा ज्ञानाचा खसखसा चुराडा करीत आहेत आणि जी अगस्ती ऋषीस आवरण असलेल्या कुंभाप्रमाणे स्थूलबुद्धीच्या मूर्खांना आवरण करणारी आहे. ॥183॥ अशा आसुरी प्रकृतीच्या तोंडात, जे भूताला टाकलेल्या बळीप्रमाणे पडले, ते भ्रांतीच्या कुंडात बुडून गेले. ॥184॥ याप्रमाणे जे तमोगुणांच्या खळग्यात पडले, ते विचाराच्या हाताला लागत नाहीत. हे असो! ते अशा ठिकाणाला गेले की, जेथे त्यांचा पत्ताच लागत नाही. ॥185॥ म्हणून हे निष्फळ वर्णन राहू दे. मूर्ख लोकांची कथा कशाला? तिच्या विस्ताराने वाचेला व्यर्थ शीण मात्र होणार आहे. ॥186॥ श्रीकृष्ण याप्रमाणे म्हणाले, त्याप्रसंगी अर्जुन म्हणाला होय, महाराज. (तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले,) ज्या साधूंच्या वर्णनात वाणीला विश्रांती मिळते, ती साधुकथा ऐक. ॥187॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : मी सर्वदा स्वतःसिद्धु, तो कीं बाळ तरुण वृद्धु…


