सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
मग सत्यलोकौनि गंगाजळ । सुटलिया वाजत खळाळ । तैशी वाचा विशाळ । बोलतां तया ॥483॥ नातरी महामेघांचे उमाळे । घडघडीत एके वेळे । घुमघुमिला मंदराचळें । क्षीराब्धी जैसा ॥484॥ तैसें गंभीरें महानादें । हें वाक्य विश्वकंदें । बोलिलें अगाधें । अनंतरूपें ॥485॥ तें अर्जुनें मोटकें ऐकिलें । आणि सुख कीं भय दुणावलें । हें नेणों परि कापिन्नलें । सर्वांग तयाचें ॥486॥ सखोलपणें वळली मोट । आणि तैसेचि जोडले करसंपुट । वेळोवेळां ललाट । चरणीं ठेवी ॥487॥ तेवींचि कांहीं बोलों जाये । तंव गळा बुजालाचि ठाये । हें सुख कीं भय होये । हें विचारा तुम्ही ॥488॥ परि तेव्हां देवाचेनि बोलें । अर्जुना हें ऐसें जाहलें । मियां पदांवरि देखिलें । श्लोकींचिया ॥489॥ मग तैसाचि भेणभेण । पुढती जोहारूनि चरण । मग म्हणे जी आपण । ऐसें बोलिलेती ॥490॥
अर्जुन उवाच :- स्थाने हृषीकेश तव प्रकीर्त्या जगत् प्रहृष्यत्यनुरज्यते च ॥
रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसंघाः ॥36॥
ना अर्जुना मी काळु । आणि ग्रासिजे तो माझा खेळु । हा बोलु कीर अढळु । मानूं आम्ही ॥491॥ परि तुवां जी काळें । आजि स्थितीचिये वेळे । ग्रासिजे हें न मिळे । विचारासी ॥492॥ ऐसेनि आंगींचें तारुण्य मोडावें । कैचें नव्हे तें वार्धक्य काढावें । म्हणोनि करूं म्हणसी ती नव्हे । बहुतकरुनी ॥493॥ हां जी चौपाहारी न भरतां । कोणेही वेळे श्रीअनंता । काय माध्यान्हीं सविता । मावळतु आहे ॥494॥
हेही वाचा – Dnyaneshwari : पृथ्वी सगळीचि गिळूं, आकाश वरिच्यावरि जाळूं
अर्थ
मग ज्याप्रमाणे गंगेचे पाणी सत्यलोकापासून सुटले असता सारखे खळखळ वाजत जाते, त्याप्रमाणे तो श्रीकृष्ण बोलत असता गंभीर वाणीचा ओघ खळखळाटाने चालला होता ॥483॥ अथवा मोठमोठ्या मेघांचे लोट एकाच वेळेला उठले असता जसा गडगडाट व्हावा किंवा मंदर नावाच्या पर्वताने क्षीरसमुद्रामध्ये ज्याप्रमाणे मंथनाचा आवाज एकसारखा घुमावा ॥484॥ त्याप्रमाणे अगाध आणि अनंतरूपधारी, विश्वाचे कारण असलेल्या श्रीकृष्णाने गंभीर अशा मोठ्या शब्दाने भाषण केले. ॥485॥ ते अर्जुनाने थोडेसे ऐकले, तोच सुखाचा म्हणा की भीतीचा म्हणा, दुप्पट जोर झाला, कशाचा हे आम्हास माहीत नाही, परंतु एवढे खरे की, त्यामुळे त्याचे सर्व शरीर थरथरा कापावयास लागले. ॥486॥ त्यास झालेले सुख अथवा भय थेट हृदयापर्यंत जाऊन भिडल्यामुळे तो आपल्या पायापर्यंत लवला आणि त्याच झपाट्यात कसे तरी करून त्याने हात जोडले आणि तो आपले मस्तक पुन्हा पुन्हा प्रभूच्या पायावर ठेऊ लागला. ॥487॥ याचप्रमाणे काही बोलण्याचा प्रयत्न करावा, तो त्याचा कंठ भरून राही; हे सुख झाल्याचे लक्षण आहे की भीतीचे आहे, याचा तुम्ही आपल्या मनातच विचार करून निर्णय करा. (असे ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना सांगतात). ॥488॥ परंतु त्यावेळी देवाने केलेले भाषण ऐकून अर्जुनाची अशी ही स्थिती झाली, हे मी श्लोकाच्या वरील ‘भीतभीत: प्रणम्य’ या पदावरून जाणले. ॥489॥ मग तसाच भीत भीत तो पुन्हा श्रीकृष्णाच्या चरणाला नमस्कार करून म्हणाला, महाराज, आपण असे बोललात. ॥490॥
अर्जुन म्हणाला, हे हृषीकेशा, तुझ्या माहात्म्याने जग हर्ष आणि प्रेम पावते हे योग्यच आहे. भयभीत राक्षस दशदिशांना पळत आहेत. सर्व सिद्धांचे समुदाय तुला वंदन करत आहेत (तेही योग्यच आहे). ॥36॥
की, ‘अर्जुना, मी सर्वभक्षक काळ आहे आणि सर्वांचा नाश करणे, ही तर माझी लीलाच आहे’, हे जे तुझे बोलणे, ते आम्ही खरोखरच खरे मानू. ॥491॥ परंतु हे परमेश्वरा, आपण जे काळ, त्यांनी आज (स्थितिकाली) पालन करण्याच्या वेळेसच जगाचा संहार करावा, हे माझ्या विचाराला पटत नाही. ॥492॥ शरीरात असलेले तारुण्य कसे नाहीसे करावे आणि नसलेले म्हातारपण कोठून आणावे? (या गोष्टी जर करू म्हटले तर, जशा व्हावयाच्या नाहीत त्याप्रमाणे) जरी तू या स्थितिकाली संहार करू म्हणतोस, तरी ते बहुतकरून होणार नाही. ॥493॥ अहो देवा, चार प्रहर दिवस भरला नसताच कोणत्या तरी वेळी सूर्य मध्यान्ही मावळला आहे काय? ॥494॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : बापा विरुद्ध जें जाहलें, तें उपजतांचि वाघें नेलें


