त्याचं नुकतंच लग्न झालं आणि कंपनीने त्याची प्रमोशनवर बदली केली. पत्नीचा पायगुण म्हणून सगळे सुखावले. ते दोघंच नव्या ठिकाणी गेले. ती कंपनीची प्रचंड अशी टाऊनशीप होती. हजारोंच्या संख्येने स्टाफ होता. तिथं त्यांना ओळखणारं कुणीच नव्हतं. म्हणून तिला फार कंटाळा येत असे. मग तिच्यासाठी त्याने कंपनीच्या सुसज्ज अशा रिक्रीएशन क्लबची मेंबरशिप घेतली. आता ती रोज क्लबमध्ये जायला लागली. तिच्यात बरेच कलागुण असल्याने ती अल्पावधीतच पॉप्युलर झाली. तो सुरुवातीला तिच्याबरोबर क्लबमध्ये जात असे. पण त्याला तिथलं वातावरण फारसं भावलं नाही. तिथला उच्चभ्रू वर्गातला मोकळेपणा त्याला पटला नाही. आपण या क्लबचे मेंबर व्हायलाच नको होतं असं त्याला वाटलं.
पण ती मात्र चांगलीच रमली होती. कंपनीच्या वरिष्ठ वर्गाच्या फंक्शन्सना तिला आमंत्रण येऊ लागलं. तो सुद्धा जात असे. पण त्याला तिथं फारच ऑकवर्ड व्हायचं. ती मात्र अगदी सहजपणे लोकांत मिसळत असे. असंख्य स्त्रिया तर तिच्या मैत्रिणी होत्याच, पण अनेक पुरुष मित्र पण होते. ते सगळे एकत्र कोंडाळं करुन हास्यविनोद करताना एकमेकांना सहजपणे टाळ्या द्यायचे, टाळ्या घ्यायचे… ते पाहून तो मात्र अस्वस्थ होत असे. हल्ली तो कामावरुन येत असताना तिचा फोन सतत एंगेज लागत असे. घरापाशी आल्यावर त्याला दिसायचं की, ती फोनवर हसतहसत बोलत असायची. ते बघून त्याचा तीळपापड व्हायला लागला. एके दिवशी त्याच्या या कोंडमाऱ्याचा स्फोट झाला…
ती सहजच त्याला म्हणाली, ” सगळे आपल्याला बोलवतात. आपण सुद्धा एक छोटंसं फंक्शन करून तुमच्या मित्रांना बोलवूयात.”
तिचं बोलणं ऐकून तो संतापाने तिच्यावर ओरडला, “मित्र कशाला हवेत? मी एकटा पुरेसा नाही का?”
तिचा स्वतःच्या कानांवर विश्वास बसेना. मग त्यांचं प्रचंड भांडण होऊन ती बॅग भरून माहेरी निघून गेली. तोही सुट्टी घेऊन घरी आला.
हेही वाचा – काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली
सर्व प्रकार ऐकल्यावर त्याची आई त्याला घेऊन माझ्याकडे आली. मी त्याची जन्मपत्रिका काळजीपूर्वक तपासली आणि त्याला म्हणालो, ” तुमच्या वैवाहिक स्थानात राहू आहे. सध्या राहू महादशा सुरू असल्यामुळे तुम्हाला पत्नीशी बोलताना खूप विचारपूर्वक बोलावे लागेल, असं मला वाटतं.”
तो उद्विग्न होऊन म्हणाला, “मला संयम ठेवणं कठीण होत आहे, कारण ती पुरुष मित्रांशी नको तितक्या सलगीने वागते.”
मी त्याला म्हणालो, “तुमच्या पत्नीच्या सलगीची लेव्हल निश्चित करताना तुम्ही खूप विचार केला पाहिजे. पंचवीस वर्षांपूर्वी स्त्रियांनी पुरुषांशी किती सलगीने बोलावं, याची मर्यादा वेगळी होती. आजचा काळ फॉरवर्ड आहे. स्त्री-पुरुष मैत्री हे आजच्या काळाचं वास्तव आहे…”
“दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमचा दृष्टीकोन.
हे जग म्हणजे मयासुराची मयसभा आहे, हे लक्षात असू द्या. जिथं जमीन असते तिथं तुम्हाला पाणी दिसू शकतं आणि जिथं पाणी असतं तिथे तुम्हाला जमीन दिसू शकते हे समजून घ्या! कोणत्याही दृश्याचं अचूक आकलन होण्यासाठी तुमची नजर पूर्वग्रहदूषित असायला नको. राहूच्या महादशेत गैरसमज होण्याची शक्यता खूप जास्त असते. तुम्ही तुमच्या पत्नीच्या घरी जाऊन तिची माफी मागून तिला सन्मानपूर्वक घेऊन यावं, असा माझा तुम्हाला सल्ला आहे.”
हेही वाचा – तणाव कमी करणारा त्रिवेणी संगम
तो काही न बोलता उठून निघून गेला. त्याच्या आईने मात्र माझे आभार मानले आणि मला नमस्कार करून निघून गेली.
या प्रसंगाला बराच काळ लोटला. रोजच्या कामाच्या रहाटगाडग्यात मी हा प्रसंग साफ विसरुन गेलो होतो.
एके दिवशी एका लग्नसमारंभात मला कुणीतरी हाक मारली. मी वळून पाहिले तर, तो तोच होता. त्याच्यासोबत एक तरुणी आणि तिच्या कडेवर बाळ होतं.
तो मला म्हणाला, “हे जग म्हणजे मयासुराची मयसभा आहे, हे मला आता निश्चितपणे कळलं आहे. त्यामुळे मी कोणत्याही घटनेवरून कसलाही निष्कर्ष काढण्याआधी सर्व बाबींचा विचार करायला शिकलो आहे. म्हणूनच आज मी खूप सुखात आहे.”
त्याचं बोलणं ऐकून मला खूप आनंद झाला. सत्य जाणून घेण्याचं महत्त्व त्याला पटलं होतं. मग त्यानंतर त्याच्याशी थोडावेळ बोलून मी समाधानाने तिथून निघालो.


