आपल्या आयुष्यात अनेक समस्या येतात. आपण अनेकदा त्यासाठी परिस्थिती, नशीब किंवा इतर लोकांना दोष देतो. पण खरं पाहिलं, तर आपल्या अनेक समस्यांचं मूळ आपल्या मनातच असतं. म्हणूनच आपल्या ऋषी-मुनींनी हजारो वर्षांपूर्वी मन, भावना आणि आत्म्याचा खूप सखोल अभ्यास केला होता.
आजचं आधुनिक मनोविज्ञान सांगतं की राग, भीती, दुःख किंवा चिंता आली तर, त्या भावनांमध्ये वाहून जाऊ नका. त्या भावनांकडे फक्त बघा. पण वेदांत इथे आणखी एक पाऊल पुढे जातो. तो विचारतो – या भावना पाहणारा नेमका कोण आहे? म्हणजे राग येतो, दुःख होतं, आनंद होतो… पण हे सगळं अनुभवणारा आणि पाहणारा कोण? याचं उत्तर शोधायला वेदांत शिकवतो.
आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की, मन हेच माणसाच्या प्रगतीमधला सर्वात मोठा अडथळा आहे. मनात सतत विचार सुरू असतात. कधी राग, कधी भीती, कधी अपेक्षा, कधी मोह, कधी आसक्ती… त्यामुळे मन कधीच शांत राहत नाही आणि जोपर्यंत मन शांत होत नाही, तोपर्यंत माणूस स्वतःला खऱ्या अर्थाने ओळखू शकत नाही. यासाठी आपल्या योगशास्त्रात मनावर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचं मानलं आहे.
काश्मीर शैव परंपरेतील विज्ञान भैरव तंत्र या ग्रंथात मन शांत करण्याच्या अनेक पद्धती सांगितल्या आहेत. त्यांचा उद्देश विचार दाबणे नाही, तर विचारांपासून थोडं बाजूला उभं राहायला शिकवणं आहे. यासाठी एक सोपा प्रयोगही करता येतो. तुम्ही कोणतंही काम करत असाल, अचानक स्वतःलाच मनात ‘स्टॅच्यू’ अशी आज्ञा द्या. काही क्षण शरीर स्थिर ठेवा आणि फक्त आजूबाजूला काय चाललं आहे ते पाहा. त्या क्षणी मनाची धावपळ थोडी कमी होते आणि आपण फक्त पाहणाऱ्याच्या भूमिकेत जातो. हा अनुभव छोटा असला तरी मन शांत करण्याची सुरुवात इथूनच होते.
हेही वाचा – भारतातील शक्तिपीठे
वेदांतात “शिवोऽहम्” किंवा “मी मन नाही, मी अहंकार नाही” असं का म्हटलं आहे, यामागेही हाच अर्थ आहे. आपलं खरं स्वरूप हे राग, भीती, आनंद किंवा दुःख नाही. त्या सगळ्याचा अनुभव घेणारं जे शांत अस्तित्व आहे, तेच आपलं खरं रूप आहे… इथेच ज्योतिषाची खरी भूमिका सुरू होते.
वेदांत आपल्याला अंतिम सत्य सांगतो. पण त्या सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक माणसाचा स्वभाव, विचार करण्याची पद्धत आणि मनाची जडणघडण वेगळी असते; हे समजून घेण्यासाठी ज्योतिष खूप मदत करतं.
कुंडलीतील प्रत्येक ग्रह आणि प्रत्येक भाव फक्त भविष्य सांगत नाही, तर तो आपल्या मनाच्या एखाद्या भागाचंही प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे ज्योतिष फक्त घटना सांगणारं शास्त्र नाही, तर माणसाचं मन समजून घेणारं शास्त्रही आहे. यालाच आजच्या भाषेत ज्योतिषीय मनोविज्ञान (Astro Psychology) असं म्हणता येईल.
उदाहरणार्थ, चतुर्थ भाव हा फक्त आईचा भाव नाही. तो मनाला मिळणारा आधार, प्रेम, जिव्हाळा आणि भावनिक सुरक्षितता दाखवतो. जर एखाद्याचा चतुर्थेश सप्तम भावात असेल, तर अनेक वेळा अशी व्यक्ती नकळत आपल्या जोडीदारामध्ये आईसारखी माया, काळजी आणि भावनिक आधार शोधत असते. त्या व्यक्तीला वाटतं की, ती चांगला जीवनसाथी शोधते आहे. पण प्रत्यक्षात ती बालपणी अपूर्ण राहिलेल्या भावनेचा शोध घेत असते! म्हणून अशा व्यक्तीला कितीही चांगला जोडीदार मिळाला, तरी मन पूर्ण समाधानी होत नाही. कारण समस्या जोडीदारात नसते, तर मनात दडलेल्या अपूर्ण भावनांमध्ये असते.
अशाच प्रकारे अनेक लोक पैसा, प्रसिद्धी, प्रेम किंवा यश यांच्या मागे धावत असतात. पण खरं म्हणजे ते या गोष्टी शोधत नसतात. ते मनातली एखादी रिकामी जागा भरून काढण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणूनच बाहेरचं यश मिळूनही अनेकांना मनःशांती मिळत नाही.
यामुळे ज्योतिष आणि मनोविज्ञान एकत्र अभ्यासलं, तर माणसाला स्वतःला समजून घेणं खूप सोपं होतं. मनोविज्ञान आपल्याला आपल्या भावना समजावून सांगतं, तर ज्योतिष त्या भावनांचं मूळ कारण कुठे आहे हे दाखवतं.
ग्रह आपल्याला दुःख देत नाहीत. ते फक्त आपल्या स्वभावाचं, विचारांचं आणि कर्मांचं प्रतिबिंब दाखवतात. अनुभवी ज्योतिषी जेव्हा कुंडलीकडे या दृष्टीने पाहतो, तेव्हा तो फक्त भविष्य सांगत नाही. तो माणसाच्या मनात दडलेल्या भीती, असुरक्षितता, सवयी आणि वारंवार घडणाऱ्या घटनांमागचं कारण समजावून सांगू शकतो. म्हणूनच प्रत्येक ग्रह, प्रत्येक भाव आणि प्रत्येक योग हा आपल्या मनाशी जोडलेला असतो. संपूर्ण कुंडली म्हणजे माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसाच असतो.
हेही वाचा – देशविदेशातील शक्तिपीठे
आजच्या काळात मानसिक ताण, चिंता, नैराश्य आणि नात्यांमधील समस्या खूप वाढल्या आहेत. अशा वेळी अध्यात्म, मनोविज्ञान आणि ज्योतिष या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या, तर माणसाला स्वतःला समजून घेणं आणि स्वतःमध्ये चांगला बदल घडवून आणणं खूप सोपं होतं.
म्हणून ज्योतिषाचा अभ्यास करताना फक्त “भविष्यात काय होईल?” एवढाच विचार करू नका. “मी असा का विचार करतो?”, “माझ्या आयुष्यात हेच प्रसंग पुन्हा पुन्हा का येतात?” आणि “माझ्या मनाची खरी जडणघडण कशी आहे?” हे प्रश्नही विचारायला शिका.
कारण खऱ्या अर्थाने ज्योतिष म्हणजे फक्त भविष्य सांगणं नाही, तर स्वतःला ओळखण्याचा आणि स्वतःमध्ये योग्य बदल घडवून आणण्याचा मार्ग आहे.


