अध्याय तेरावा
केळींचें दळवाडें । हळू पोकळ आवडे । परि फळोनिया गाढें । रसाळ जैसें ॥212॥ कां मेघाचें आंग झील । दिसे वारेनि जैसें जाईल । परि वर्षती नवल । घनवट तें ॥213॥ तैसा जो पूर्णपणीं । पाहतां धाती आयणी । एऱ्हवीं तरी वाणी । तोचि ठावो ॥214॥ हें असो या चिन्हांचा । नटनाचु ठायीं जयाचां । जाण ज्ञान तयाचिया । हाता चढलें ॥215॥ पैं गा अदंभपण । म्हणितलें तें हें जाण । आतां आईक खूण । अहिंसेची ॥216॥ तरी अहिंसा बहुतीं परीं । बोलिली असे अवधारीं । आपुलालां मतांतरीं । निरूपितां ॥217॥ परि ते ऐसी देखा । जैसा खांडूनियां शाखा । मग तयांचिया बुडुखा । कुंप कीजे ॥218॥ कां बाहु तोडोनि विकिजे । मग भूकेची पीडा राखिजे । नाना देऊळ मोडूनि कीजे । पौळी देवा ॥219॥ तैसी हिंसाचि करूनि अहिंसा । निफजविजे हा ऐसा । पैं पूर्वमीमांसा । निर्णो केला ॥220॥ जे अवृष्टीचेनि उपद्रवें । गादलें विश्व आघवें । म्हणोनि पर्जन्येष्टी करावे । नाना याग ॥221॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : आथिलेचि गुण वानितां, मान्यपणें मानितां
अर्थ
केळीचे सर्व अंग हलके व पोकळ असे वाटते, पण त्या केळीला फळे आल्यावर ते केळीचे सर्व अंग रसाने दाट भरलेले असे वाटते ॥212॥ अथवा मेघांचे अंग पाहिले तर ते अगदी हलके व दिसण्यात वार्याने नाहीसे होईलसे दिसते; पण तेच मेघ एकदा का वर्षाव करावयाला लागले की दाट वर्षाव करतात (जिकडे तिकडे आश्चर्यकारक रीतीने एकसारखे जलमय करून टाकतात) ॥213॥ त्याप्रमाणे पूर्णतेच्या दृष्टीने तो पुरुष पाहिला तर इच्छा तृप्त होतात, एरव्ही पाहिले तर कमीपणाला तोच जागा आहे, (त्याच्या येथे सर्व गोष्टींचे दारिद्र्य आहे) ॥214॥ हे वर्णन पुरे! या वर सांगितलेल्या गुणांचा उत्कर्ष ज्याच्या ठिकाणी असेल, त्याच्या हाताला ज्ञान आले असे समज ॥215॥ अर्जुना, अदंभपण म्हटलें ते हे असे समज. आता अहिंसेचे लक्षण ऐक ॥216॥ आपापल्या निरनिराळ्या मतांचे निरूपण करतांना पुष्कळ प्रकारांनी अनेक लोकांनी अहिंसा सांगितली आहे; ऐक ॥217॥ परंतु त्यांनी सांगितलेली अहिंसा ही जशा वृक्षाच्या फांद्या तोडून मग त्या शाखांनी वृक्षाच्या बुडाशी (त्या वृक्षाच्या रक्षणार्थ) कुंपण करावे तशी आहे. ॥218॥ किंवा हात तोडून तो विकावा व जे पैसे मिळतील त्यांनी भुकेची पीडा शांत करावी; अथवा देऊळ मोडून देवाच्या रक्षणाकरिता देवळाच्या सामानाने आवाराची भिंत बांधावी; ॥219॥ त्याप्रमाणे हिंसाच करून अहिंसा उत्पन्न करावी, असा हा निर्णय पूर्वमीमांसेने (कर्मकांडाने) केला आहे ॥220॥ पाऊस न पडल्यामुळे अतिशय पीडा होऊन सर्व प्राणी जर्जर झाले म्हणजे त्यावर उपाय म्हणून, पाऊस पाडणारे नाना याग वगैरे अनेक यज्ञ करावेत ॥221॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : माझें असतेपण लोपो, नांवरूप हारपो


