डॉ. अस्मिता हवालदार
‘आहे मनोहर तरी’ हे सुनीताबाई देशपांडे यांचे आत्मचरित्र आले आहे, अशी चर्चा मी घरात ऐकली होती. त्यावरून एवढंच समजलं की, याबद्दल बरीच उत्सुकता सर्वांना आहे. याचे कारण त्या महाराष्ट्राचं लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडेंच्या पत्नी आहेत… असेच असावे, असं मला वाटलं होतं. पण सुनीताबाई स्वत: एक विलक्षण व्यक्तिमत्व आहेत, हे इतरांच्या बोलण्यातून समजलं. त्यावेळी मी पुस्तक वाचलं होतं, पण एक-दोन प्रसंग वगळता फारसं काही लक्षात राहिलं नाही.
पुस्तकाच्या नावापासूनच उत्सुकता निर्माण होते, कारण पुढची ओळ ‘गमते उदास’ अशी विरोधाभासी आहे… अर्धवट उघडलेल्या दाराबद्दल वाटावी तशी! प्रस्तावनेत त्या ‘गमते उदास‘बद्दल सुतोवाच करायला सुरुवात करतात. एक होता राजा आणि एक होती… कोण? असे म्हणत राणी म्हणायला त्या धजावत नाहीत. हे आत्मचरित्र नाही, असे सुरुवातीलाच सांगून टाकतात. काही माणसांचे उल्लेख करायचे राहून गेले असतील ते विसरल्यामुळे नव्हे!
आई, अप्पांबद्दल भरभरून आठवणी लिहिताना त्यांच्याबद्दलचे प्रेम व्यक्त होत राहते. आईवर प्रेम असते आणि तिच्या अनेक गोष्टी आवडत सुद्धा नसतात. अगदी प्रत्येक मुलगी हेच म्हणेल. ते नातं त्या फार हळूवारपणे सांगतात. शेवटी आईची झालेली असहाय्य अवस्था, तिची वेदना सहन न झाल्यामुळे भलताच विचार मनात येतो, पण सद्सद्विवेक बुद्धीचा विजय होतो. सासू आईसारखी असते, पण आई नसते. हा सूक्ष्म फरक त्या सांगतात. ते अगदी नैसर्गिक वाटते. विशेषत:, त्या काळाच्या पार्श्वभूमीवर अधिकच! त्या नास्तिक असण्याबद्दल लिहितात.
धामपूरची आजी आणि भैय्या या दोन व्यक्तींचा त्यांच्यावर प्रभाव पडला. धामपूरची आजी विकेशा, लाल आलवण नेसणारी, कुठल्याही समारंभांना न जाणारी, पण लेखिकेच्या आंतरजातीय विवाहाला सहज संमती देणारी, अशी होती. घरातली विहीर शालीन स्त्रीसारखी वाटते, तिच्यात कोणी जीव कधी दिला नाही, असं वर्णन लेखिका करते. एकदा आजीची बाजू घेऊन त्या बरंच काही घरातल्यांना सुनावतात, तेव्हा आजीचे पाणावलेले डोळे आजही लक्षात आहेत, तिला दुखवण्याचा अपराध घडला, असं म्हणतात. आस्तिक असणाऱ्यांचा हेवा वाटतो, कारण आस्तिक्य बिनबुडाचे असले तरी अज्ञानात असलेले सुख त्यांना मिळते. तर्कनिष्ठ माणसाच्या मनात हे द्वंद्व सुरू असतेच.
भैय्या त्यांचा मित्र. सुखदुखात पाठीशी उभा राहणारा. त्याच्याबद्दलच्या भावना लेखिकेने मोकळेपणाने लिहिल्या आहेत. 1942च्या चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. बॉम्ब बनवणे, मोर्चाचे नेतृत्व करणे, अटक होणे सगळे सक्रियतेने केले. त्यांचे वेगळेपण इथे दिसून येते. नंतर इतरांशी जुळवून घेणे जमणार नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी काम सोडले. काही वेळा रक्ताच्या नात्यापेक्षा हृदयाचे बंध अधिक बळकट असतात, असे त्या दाखवून देतात. संदर्भ नसणारी लहानसहान सुखे, हळूवार आठवणी प्रत्येकाच्या जीवनातील परिपक्व जाणीव आहे.
हेही वाचा – डॉ. आनंदीबाई जोशी… जीवनाचे सापडलेले ध्येय!
पारिजातकाच्या फुलांच्या सड्यात न्हाऊन जाण्याचा प्रसंग लिहिताना त्या म्हणतात, या अनुभवाचे वर्णन करायला कवीची प्रतिभा हवी. प्रेम आहे मग लग्नाचे सोपस्कार नकोत, असे त्यांचे मत काळाच्या बरेच पुढचे होते. पु.लं.ना हवं होतं म्हणून त्यांनी लग्न केलं. त्यांनी दोघांच्या स्वभावातली तफावत सांगितली आहे. पती पत्नीच्या आवडीनिवडी जुळत असल्या तरी स्वभाव वेगळा असतोच. कदाचित, हेही आकर्षणाच एक कारण असतं. भाई आणि सुनीताबाई दोघांना कवितांचं प्रचंड वेड. कितीतरी कविता त्यांना तोंडपाठ होत्या. पण त्यातही संगीत हे भाईंचे पहिले प्रेम आणि लेखिकेला कवितेच्या शब्दांचं अधिक आकर्षण. काटकसरीने, कष्टाळू वृत्तीने राहणे, पाण्याचा थेंबही वाया जाऊ नये इतकी दक्षता, स्पष्टवक्तेपणा, मतांशी ठाम असणे, पैशाबद्दल अनासक्ती, पण व्यावहारिकपणा… अशी त्यांची काही स्वभाव वैशिष्ट्य आणि भाईंची त्या अगदी उलट. कोणालाही नकार देता न येणे, अव्यावहारिक वृत्ती, आराम करण्याची वृत्ती… असा त्यांचा स्वभाव. त्या तक्रारीच्या सुरात हे सांगत नाहीत. त्यांच्याऐवजी एखादी हो ला हो म्हणणारी पत्नी भाईना मिळाली असती तर, काय झाले असते? हेही त्या सांगतात.
मोठ्या कलाकारांच्यात सुद्धा असलेली असूया, चढाओढ वाचून तीही आपल्यासारखी माणसेच आहेत, हे जाणवते. उदारमतवादी भाई ‘भैय्या सुनीताचा मित्र’ न म्हणता आपला मित्र अशी ओळख करून देत, याची त्यांना गंमत वाटते. त्या कार चालवायच्या आणि भाई बाजूला बसायचे. त्यावेळचे सगळे किस्से वाचण्यासारखे आहेत. “बया कार चालवतीय…” असे एक गावातला मुलगा म्हणतो आणि मग पुन्हा म्हणतो “खेळा हो पोरे हो, शिकीवनारा बाबा बाजूला बसलाय!”
मालेगावच्या शिक्षण संस्थेत काम करताना, राजकारणी लोकांचे अनुभव सांगताना त्या लिहितात, राजकारणात पडली की, माणसे दरिद्री होऊन जातात. सामान्य माणसांना परवडणारी जीवनमूल्येही त्यांना परवडेनाशी होतात. रमी खेळण्याचा नाद अचानक सुटला, तेव्हा त्यांना समजलं की, कुठल्याही सवयीतून त्यांना सुटता येऊ शकेल. लग्नसंस्थेबद्दल त्या म्हणतात, लग्न हे जसे कृत्रिम बंधन तसेच घटस्फोट हे कृत्रिम स्वातंत्र्य आहे. ‘अतिपरिचयात अवज्ञा’ ही या संस्थेतली मोठी उणीव आहे. पु.लंच्या पाहुण्यासमोर वागण्याच्या पद्धतीचा त्यांना त्रास होत असे, पण पाहुण्यांना मात्र काहीच वाटत नसे. त्यांच्या बोलण्याचे विषय इतके प्रसन्न असत की, लोकांना स्नान झाल्यावर वाटते तसे ताजेतवाने वाटत असे. सुनीताबाईंचा अभिनय चांगला असून सुद्धा पुलंना त्यांच्या नाटकासाठी त्यांचे नाव सुचायचे नाही आणि त्यांना स्वत:चे नाव सुचवायला संकोच वाटत असे.
भाईंचे हजरजबाबी विनोद लिहून ठेवायचे राहून गेले, असं त्या लिहितात. त्यांना पु ल उपदेशपांडे म्हणत त्याचे मजेदार स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. लेखिकेने लोकप्रियता दुधारी शस्त्र कसे असते? याबद्दल जे सांगितले आहे, ते सर्वांनी मनन करण्यासारखे आहे. त्यांनी सार्वजनिकतेचा शाप असे म्हटले आहे. सिनेमाच्या लेखनाचे, कॉपी राईटचे हक्क डावलून लोक पैसे बुडवत, त्यावेळी त्यांनी कठोर पावले उचलली… पण भाईंच्या भोळसट स्वभावामुळे नुकसानच झाले. त्यांनी घरात राहणेच पसंत केले. लोकांच्यात मिसळणे टाळले. फारशी कोणाशी मैत्री केली नाही. “भाई माझा मित्र होऊ शकला नाही, जोडीदार राहिला,” असं त्या लिहितात. यासाठी त्यांचाच स्वभाव कारणीभूत आहे, असं त्यांना वाटत. माणूस एकाकी असतो, यावर त्यांचा विश्वास आहे. संकोची स्वभाव, तीव्र मानापमान हेही याला कारणीभूत. पुल लेखक, नट, कलाकार असले तरी त्यांच्यावर अबलंबून होते. त्यांनी घरावर राज्य केलं आणि पुलंनी स्वतचे लाड करून घेतले. ते असे नसते तर लेखिकेला त्यांच्याबरोबर राहाणं जमलं नसतं. ते कायम लहान मुलासारखे राहिले. लेखिकेला मुलांची उणीव तितकीशी जाणवली नाही. डाळिंबाच्या दाण्यांचा प्रसंग सर्वश्रुत आहे. त्यांनी तो इतका जिवंत केला आहे, नकळत तोंडातून ‘अरेरे’ बाहेर पडतं. आणीबाणीच्या काळात त्या पुन्हा देशसेवेसाठी काम करू लागल्या. त्यावेळी पुलंची भाषणे गाजली, पण सक्रीय राजकारणात त्यांना रस नव्हता. पुलंना भीड पडली असती, पण सुनीताबाईंनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. विजय मिळाल्यानंतरच्या सभेत त्यांनी भाषण करू नये, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. लोकांचा आणि पुलंचा रोष पत्करून! पण या निर्णयाची नंतर वाहवाच झाली. कार्यसिद्धीनंतर पूर्ण अलिप्त होता येते, पोहून झाल्यावर पैलतीर गाठल्यावर वाटते तसे… असे त्या लिहितात. किती समर्पक उपमा आहे ही!
उतरत्या वयात तत्वाशी तडजोड की तपशीलाशी? याबद्दल त्यांच्या मनात संभ्रम होता. लग्न नकोसे झाल्यावर का तोडले नाही? हे त्या प्रांजळपणे मांडतात. प्रेम, शारीरिक आकर्षण आणि आपुलकीची व्याख्या करतात. तर दुसरीकडे, शत्रू निर्माण करण्यात हातखंडा आहे, असं म्हणतात.
हेही वाचा – बनगरवाडी… लहानसे खेडं पूर्ण विश्वाचे प्रतिनिधी
अनेक विषयांवरचे विचार लिहिताना वाचन व्यासंगातून निवडून काढलेली वचने आणि जागतिक कीर्तीचे लेखक, त्यांचे लेखन सांगत राहतात. ही मेजवानीच वाटते. वाचता वाचता आपण अंतर्मुख होतो. अनेक प्रश्न आपल्याला पडलेलेच असतात. स्वातंत्र्य मिळाल्यावर स्वप्न उद्ध्वस्त झाली. हळूहळू निराशा आली. बाजारात भारतीय चलनाची किंमत घसरली… त्यापेक्षा अधिक वेगाने जीवनमूल्ये घसरली. माणूस हा केवळ एक आकडा असलेला बिनचेहऱ्याचा झाला. त्यामुळे स्व पुढे काही उरले नाही. खेद, खंत वाटणे बंद झाले. शेवट करताना त्या नातं हा शब्द दिवंगत होत असताना प्रलयात पिंपळपानावर काय वाचेल? असा प्रश्न विचारतात.
पुस्तक वाचायला सुरुवात करताना मनात पु.ल.देशपांडे या आपल्या अतिशय आवडत्या लेखकाच्या पत्नीचं आत्मकथन वाचत आहोत ही भावना असते. त्यांच्या आणि पुलंच्या लेखनशैलीत काही साम्य आढळते का? असे पाहतो. पण वाचायला लागल्यावर हे पूर्वग्रह पुसले जातात. पुलंची पत्नी असणे, हा पूर्ण व्यक्तिमत्वाचा एक भाग असलेल्या सुनीताबाई नावाच्या स्वतंत्र व्यक्तीशी ओळख व्हायला लागते. फारच लोभस दर्शन होतं. स्वत:चे गुण-दोष सांगत कोणाचंही महिमामंडन न करता आणि कुणाचीही भीड न ठेवता लिहिले… हे कथन चकित करतंच, त्यापेक्षा त्यांच्या धाडसाचं, स्पष्टवक्तेपणाचं आश्चर्य वाटत राहतं. खरोखरच, असामान्य वाटतं. त्यांना पु.लंची खूप स्तुती करणे, Larger than life प्रतिमा तयार करणे सहज शक्य होते. काहींनी अशी अपेक्षा ठेवली असेल. त्यांनी पुलंबद्दल केलेल्या तक्रारी आवडल्याही नसतील. खरंतर, टीकाही झाली आहे. पण मला मात्र हे पुस्तक फार आवडले. इतके तत्वनिष्ठ होता येते, मूल्यांशी तडजोड न करता जगता येते, खऱ्या अर्थाने वैचारिक श्रीमंतीने जगता येते हा विचार बळ देतो, स्त्री असल्याची बलस्थान दाखवतो. मी स्त्री आहे म्हणून मी हे करू शकेन असे वाटू लागते. गृहिणींनी तसेच ज्या अर्थार्जन करीत नाहीत, त्यांनी तर हे आवर्जून वाचावे. एकतर यासाठी न्यूनगंड असण्याची गरज नाही आणि असलाच तर हे पुस्तक वाचून तो निघून जाईल. हेच या पुस्तकाचे मोठे यश आहे.


