दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 29 नोव्हेंबर 2025; वार : शनिवार
- भारतीय सौर : 08 अग्रहायण शके 1947; तिथि : नवमी 23:14; नक्षत्र : पूर्वा भाद्रपदा 26:21
- योग : हर्षण 09:26; करण : बालव 11:50
- सूर्य : वृश्चिक; चंद्र : कुंभ 20:32; सूर्योदय : 06:52; सूर्यास्त : 17:59
- पक्ष : शुक्ल; मास : मार्गशीर्ष; ऋतू : हेमंत; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – नवीन व्यवसाय करार होतील. कोणाशी तरी वाद किंवा भांडण होण्याचा धोका असेल. ज्यांना हितचिंतक मानता तेच लोक पाठीमागे तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. मानसिक आणि शारीरिक थकवा येईल. घाईघाईत निर्णय घेताना चूक होण्याची शक्यता आहे. उत्पन्न आणि खर्च सामान्य राहील.
वृषभ – गोष्टी अपेक्षेप्रमाणे होतील का, याबद्दल साशंकता राहील. तथापि, निराधार शंकांमुळे मानसिक त्रास होऊ शकतो. आर्थिक व्यवहारात अस्पष्टता चांगली नाही. इतरांच्या कामात अनावश्यक हस्तक्षेप टाळा. मागील काळात बरेच काम अपूर्ण सोडलेले आहे, त्याची भरपाई आज तुम्हाला करावी लागू शकते.
मिथुन – व्यवसायावर लक्ष केंद्रित केल्याने यश मिळेल. रिअल इस्टेट किंवा शेतीविषयक एखादा उपक्रम हाती घेण्यात रस निर्माण होईल. प्रियजनांकडून सहकार्य मिळेल. व्यवसायाची परिस्थिती चांगली असेल. शैक्षणिक कामे सहज पूर्ण होईल. अभ्यास आव्हानात्मक वाटेल, मात्र विषयातील रूचीमुळे तो समजून घेणे सोपे असेल. आरोग्य चांगले राहील.
कर्क – कामातील अडथळे दूर होतील, प्रगतीचा मार्ग सापडेल. आदर आणि सन्मान वाढेल. व्यापारातला नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. देव जे काही करतो ते योग्यच असते, या भावनेने आणि पूर्ण समर्पणाने काम करत राहा. तब्येतीची काळजी घ्या, खाण्यावर नियंत्रण ठेवा.
सिंह – उत्पन्न आणि खर्चात संतुलन राहील. कामाच्या ठिकाणी आनंददायी वातावरण असेल. व्यवसायात प्रगती होत राहील. परिश्रमपूर्वक केलेल्या प्रयत्नांमुळे फायदा होईल. इतरांच्या कामात अडकण्याऐवजी तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. प्रभावी आणि महत्त्वाच्या पदांवरील लोकांशी संपर्क वाढविण्यासाठी विविध कार्यक्रमांना उपस्थित राहावे लागेल.
हेही वाचा – चाळ नावाचे एकत्र कुटुंब!
कन्या – भावनांचा उद्रेक होईल. मात्र त्यानंतर मानसिक शांतता लाभेल. जोडीदाराचा सल्ला फायदेशीर ठरेल. एखाद्या धार्मिक कार्यात वेळ आणि पैसा खर्च होईल. एखादा तुमच्याकडे उधारी मागायला येईल, पण पूर्ण विचारांती मदतीबाबत निर्णय घ्या. तब्येतीकडे लक्ष द्या. पथ्यपाणी सांभाळा. कुटुंबात सकारात्मक वातावरण राहील.
तुळ – व्यवसायात विविध योजना राबविण्यासाठी हा काळ अनुकूल आणि सकारात्मक ठरत आहे. व्यवसायात नवीन समन्वय आणि सहकार्य निर्माण होईल. तुमच्या जोडीदारासह मित्रांनी पाठबळ दिल्याने अनुकूल परिणाम पाहायला मिळतील. यश निश्चित आहे. तुमचे काम सुव्यवस्थित पद्धतीने सुरू ठेवा. व्यवसायात स्वत:ची विश्वासार्हता निर्माण कराल.
वृश्चिक – व्यवसायात प्रतिस्पर्धी त्रास देऊ शकतात. त्यांचा सतत सामना करावा लागेल. वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करणे हे देखील फलदायी ठरणार नाही. त्यामुळे कामावर लक्ष केंद्रीत करावे. विशेषत: महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण करणे फायदेशीर ठरेल. परिचितांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. प्रवास करताना सर्व महत्त्वाची कागदपत्रे बरोबर ठेवा.
धनु – फायदेशीर उपक्रम राबविण्याचे जोरदार प्रयत्न कराल. समाजात तुमच्याबद्दलचा आदर वाढेल. आर्थिक व्यवहार सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न कराल. व्यवसाय आणि व्यापारावर लक्ष केंद्रित केल्याने यश मिळेल. एकंदर कामातील अडथळे दूर होतील, प्रगतीचा मार्ग मिळेल. धार्मिक यात्रा शक्य आहे. आरोग्य चांगले राहील.
मकर – तुमच्याबद्दलचा आदर आणि सन्मान वाढेल. चांगल्या कामासाठी मार्ग मोकळा कराल. स्वतःची फायदेशीर कामे आधी पूर्ण करा. जुन्या मित्राच्या मदतीने कामातील अडथळे दूर होतील. प्रवास फलदायक ठरेल. आर्थिक लाभासाठी केलेल्या कृतींचे तत्काळ फळ मिळेल.
कुंभ – गुंतागुंतीच्या बाबींमध्ये अडकण्याऐवजी स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा. आर्थिक व्यवहारातील अडथळे दूर करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. समाजात आदर वाढेल. मनोरंजनावर पैसा खर्च होईल. उत्पन्न आणि खर्चात संतुलन राहील. कामातील अडथळे दूर होतील. शैक्षणिक कार्य सहज पूर्ण होईल.
हेही वाचा – अज्ञात व्यक्तीच्या स्मितहास्याने तरुणाच्या मनातील वादळे शमली!
मीन – सकाळच्या महत्त्वपूर्ण कामगिरीनंतर, तुम्हाला दिवसभर उत्साह वाटेल. फायदेशीर उपक्रम राबविण्यासाठी परिस्थिती फारशी अनुकूल नाही. तथापि, इतर कामांमध्ये मात्र कमीत कमी प्रयत्नांनीही फायदा होईल. कामातील अडथळे दूर होतील, प्रगतीचा मार्ग सापडेल. नियोजित निधीतून नफा मिळू लागेल. तुमच्या ओळखींचे वर्तुळ विस्तारेल.
दिनविशेष
भारतरत्न जे.आर.डी. टाटा
टीम अवांतर
भारतरत्न पुरस्काराने सन्मानित आणि भारतातील पहिले पायलट म्हणून ओळखले जाणारे जहांगीर रतनजी दादाभॉय ऊर्फ जेआरडी टाटा यांचा जन्म 29 जुलै 1904 रोजी पॅरिस येथे झाला. त्यांनी लंडनमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. अभ्यासानंतर ते फ्रेंच सैन्यात दाखल झाले तिथे त्यांनी एक वर्ष सेवा बजावली. लष्करी गुणवत्तेसाठी सर्वोच्च पुरस्कार ‘फ्रेंच लिजन ऑफ ऑनर’ देऊन सन्मानित करण्यात आले होते. भारतात परतल्यावर जे.आर.डी. टाटा यांनी टाटा अँड सन्समध्ये बिनपगारी प्रशिक्षणार्थी म्हणून काम सुरु केले. 12 वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर आणि समर्पणानंतर ते टाटा अँड सन्सचे अध्यक्ष झाले. पायलट लायसन्स मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. तेव्हा ती त्यांची यशाची पहिली पायरी होती. 1932 मध्ये त्यांनी टाटा एअरलाइन्स बनवली ज्याला आता एअर इंडिया म्हणतात. त्यामुळे भारतीय हवाई उड्डाणांचे जनक म्हणून देखील ते ओळखले जातात. टाटा अँड सन्सचे अध्यक्ष म्हणून त्यांनी 50 वर्षे टाटा समूहाला उत्तम उंची आणि यश मिळवून देण्यासाठी काम केलं. त्यांनी पदभार सांभाळला तेव्हा टाटा सन्स उद्योगसमूहाच्या 14 कंपन्या होत्या… जेआरडींच्या काळात त्यात 91 कंपन्यांची भर पडली. यात रसायन, वाहन, चहा, माहिती, हॉटेल आणि तंत्रज्ञान अशा नवीन क्षेत्रात त्यांनी टाटा उद्योग समूहाचा विस्तार केला. उद्योग समूहाच्या विस्ताराबरोबरच त्यांनी इतर अनेक संस्था स्थापन केल्या. भारतात मूलभूत संशोधन व्हावे म्हणून त्यांनी 1936 साली टाटा समाज विज्ञान संस्था आणि 1945 साली टाटा मूलभूत संशोधन संस्था या संस्था स्थापण्यात पुढाकार घेतला. ते 50 वर्षे डोराबजी टाटा ट्रस्टचे विश्वस्त होते. ट्रस्टने आशिया खंडातील पहिले कर्करोग रुग्णालय स्थापन केले. 1941 मध्ये जे.आर.डी. टाटा यांच्या मार्गदर्शनाखाली टाटा मेमोरियल सेंटर फॉर कॅन्सर सुरू करण्यात आले. जेआरडींना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यापैकी विशेष उल्लेखनीय म्हणजे 1957 साली भारत सरकारने त्यांना ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने गौरवले, तर 1992 साली त्यांना ‘भारतरत्न’ या भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले. 29 नोव्हेंबर 1993 साली वयाच्या 89व्या वर्षी त्यांचे जिनेव्हा येथे निधन झाले.


