दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 13 नोव्हेंबर 2025; वार : गुरुवार
- भारतीय सौर : 22 कार्तिक शके 1947; तिथि : नवमी 23:33; नक्षत्र : मघा 19:36
- योग : ब्रह्मा 06:57, ऐंद्र 30:26; करण : तैतिल 11:10
- सूर्य : तुळ; चंद्र : सिंह; सूर्योदय : 06:43; सूर्यास्त : 18:01
- पक्ष : कृष्ण; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – कामात सोयीसुविधा मिळाल्याने प्रगती होईल. महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण करणे चांगले राहील. तुम्हाला सर्वांकडून पाठिंबा मिळेल, ज्यामध्ये सल्ला आणि आर्थिक मदतीचाही समावेश असेल. काही आवश्यक कामे पूर्ण होतील. अनावश्यक धावपळ टाळणे प्रकृतीसाठी चांगले. प्रियजनांना भेटण्याची संधी मिळेल.
वृषभ – कालच्या मेहनतीचे आज फळ मिळेल. आशा आणि उत्साह तुमच्या क्रियाशील वृत्तीत वाढ करतील. प्रगतीच्या संधी फायदेशीर ठरत आहेत. काही आर्थिक अडचणी येऊ शकतात. तुम्हाला एखादी आवडती वस्तू किंवा नवीन कपडे मिळू शकतात. धार्मिक कार्याची इच्छा पूर्ण होईल. हा सुखाचा आणि आनंदाचा काळ आहे.
मिथुन – कमी-अधिक नफा मिळेल. फायदेशीर कामे करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवा. काहीतरी महत्त्वाचे साध्य करण्यावर भर द्याल. आनंदाच्या काळामुळे मानसिक संतुलन चांगले असेल. पण त्याचबरोबर खर्च वाढू शकतात. अध्यात्मिक विषयात रूची उत्पन्न होईल.
कर्क – भूतकाळातील काही संकटे पुन्हा डोके वर काढतील. प्रियजनांना आधार देण्यासाठी तुम्हाला आर्थिक भार सहन करावा लागेल. इच्छित कामे केवळ अपवादात्मक परिश्रमानेच पूर्ण होतील. कामातील व्यग्रपणाचा ताण तुमच्या आराम आणि विश्रांतीवर परिणाम करणारा असेल. तुमच्या संघर्षात एकटे पडल्यासारखे वाटेल. धार्मिक कार्यांमध्ये रस निर्माण होईल.
सिंह – आज उशिराने नफा होईल, पण तो परिस्थिती अनुकूल करेल. लाभदायक कामे करण्यावर भर द्या. पूर्वनियोजित कार्यक्रम सुरळीतपणे पूर्ण होतील. जोखीम टाळणे शहाणपणाचे ठरेल. शुभ कार्ये होतील, तुम्हाला चांगली बातमी मिळेल. तथापि, कोणाकडूनही काहीही ऐकल्यावर लगेच प्रतिक्रिया देण्याचे टाळा, अन्यथा निस्तारत बसावे लागेल.
हेही वाचा – जोशी सर… भलेपणाचा वसा
कन्या – नकारात्मक परिणाम देणारा हा काळ आहे. कामाच्या प्रगतीत तुम्हाला अडथळे जाणवतील. विरोधक सक्रिय होण्याची शक्यता आहे. कामाच्या बाबतीत तडजोडीची भूमिका स्वागतार्ह असेल. सध्या व्यवसायाशी निगडीत प्रवास शक्यतो पुढे ढकला. हाती घेतलेले काम काळजीपूर्वक पूर्ण करा.
तुळ – हा काळ नकारात्मक परिणामांचे फळ देणारा आहे. विरोधक सक्रिय होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी नकारात्मक मानसिकता घेऊन काम उरकणे, हे शहाणपणाचे ठरणार नाही. चांगल्या हेतूने केलेल्या प्रयत्नांमध्ये अडथळे येऊ शकतात. कुटुंबातील वडीलधाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. वादविवाद होण्याची भीती आहे.
वृश्चिक – काही प्रमाणात आर्थिक चिंता कमी होतील. नियोजित निधीतून नफा मिळेल. कुटुंबातील सदस्य मदत करतील. त्यामुळे आर्थिक अडचणींमधून थोडीशी सुटका होईल. तोट्याचे प्रमाण कमी झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळेल. तुमच्या वेळेचा चांगला वापर करा. संपत्ती आणि सुखसोयींसाठी भरपूर संधी उपलब्ध होतील.
धनु – आळस सोडून द्या. कठोर परिश्रम केल्याने चांगला फायदा होईल. पण अन्य कोणत्या गुंतागुंतींमध्ये अडकण्याऐवजी, कामावर लक्ष केंद्रित करा. व्यवसायात नवीन समन्वय आणि सहकार्य प्रस्थापित होईल. तुमच्या ओळखीचे वर्तुळ विस्तारेल. संपत्तीत वाढ होईल.
मकर – जोखीम टाळणे शहाणपणाचे ठरेल. महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण करणे योग्य. उत्पन्न आणि खर्च स्थिर असतील. कामातील अडथळे हळूहळू दूर होतील. तुम्हाला कार्यालयीन सहकारी आणि कुटुंबातील सदस्य यांच्याकडून भक्कम पाठिंबा मिळेल. गुंतागुंतीच्या बाबींमध्ये अडकण्याऐवजी स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा.
कुंभ – आर्थिक व्यवहारातील अडथळे दूर करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. परिश्रमपूर्वक केलेल्या प्रयत्नांमुळे फायदा होईल. शैक्षणिक काम सहज पूर्ण होईल. आरोग्य चांगले राहील. व्यवसायावर लक्ष केंद्रित केल्याने यश मिळेल. नोकरीत मात्र सावधगिरी बाळगा.
हेही वाचा – वैद्य सर… सर्वात श्रीमंत मीच!
मीन – व्यवसायात प्रगती होईल. सहकाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळणार नाही, पण प्रियजनांकडून पाठिंबा मिळेल. जोडीदार आणि संततीबद्दल थोडी चिंता वाटेल. चांगल्या आरोग्यासाठी व्यसनांचा त्याग करा. विद्यार्थ्यांचे अभ्यासात फार लक्ष लागणार नाही. खाण्याच्या सवयींबद्दल काळजी घ्या.
दिनविशेष
प्रसिद्ध विधिज्ञ बॅ. मुकुंद जयकर
टीम अवांतर
भारतातील प्रसिद्ध विधिज्ञ, वक्ते आणि राजकीय पुढारी म्हणून ओळख असणाऱ्या मुकुंद रामराव जयकर यांचा जन्म 13 नोव्हेंबर 1873 रोजी मुंबईत झाला. वयाच्या चोविसाव्या वर्षी इंग्लंडला जाऊन ते बॅरिस्टर झाले आणि मुंबई उच्च न्यायालयात कायदेपटू म्हणून लवकरच त्यांनी नाव कमावले. 1919 साली पंजाबमध्ये झालेल्या हत्याकांडाची चौकशी करण्याकरिता काँग्रेसने जी एक समिती स्थापन केली होती, तिचे ते सदस्य होते. त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत सक्रिय असा भाग घेतला नसला तरी, अनेक राजकीय वाटाघाटींमध्ये मध्यस्थाची भूमिका त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. 1931 सालचा गांधी–आयर्विन करार किंवा आणि 1932 मधील पुणे करार यासाठी त्यांची मध्यस्थी विशेष उल्लेखनीय होती. याशिवाय, त्यांनी टिळक स्वराज्य फंडाला मोठी देणगी दिली. मुंबईच्या विधिमंडळात त्यांनी 1923 ते 1926 या काळात स्वराज्य पक्षाचे नेतृत्व केले. पुढे ते 1926 ते 1930 या काळात मध्यवर्ती विधिमंडळात राष्ट्रीय पक्षाचे उपनेते होते. नंतर त्यांनी केळकर प्रभृतींबरोबर प्रतिसहकार पक्ष काढला. ते प्रिव्ही कौन्सिल आणि फेडरल कोर्टातही न्यायाधीश झाले. तिन्ही गोलमेज परिषदांचे ते सभासद होते. पुढे संविधान समितीचे सभासद म्हणून त्यांची निवड झाली, पण तिथे त्यांनी फार दिवस काम केले नाही. आयुष्याच्या उत्तरार्धात पुणे विद्यापीठाची स्थापना ही त्यांची महत्त्वाची कामगिरी ठरली. पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून त्यांनी कामकाज सांभाळले होते. वकिली करून मिळवलेल्या पैशांपैकी दोन लाख रुपये त्यांनी शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत काम करणाऱ्या संस्थांना देणगी रूपाने दिले. स्टडीज इन वेदान्त हे पुस्तक त्यांनी संपादित केले. त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे. शास्त्रीय संगीताचाही त्यांनी अभ्यास केला होता. इंग्रजी वक्तृत्व सुद्धा अत्यंत प्रभावी होते. मुंबई येथे 10 मार्च 1959 रोजी त्यांचे निधन झाले.


