वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय पाचवा
एऱ्हवीं तरी अवधारा । जो दाविला तुम्हीं अनुसारा । तो पव्हण्याहूनि पायउतारा । सोहपा जैसा ॥165॥ तैसा सांख्याहूनि प्रांजळा । तरी आम्हांसारिखियां अभोळां । एथ आहाति कांही परि काळा । तो साहों ये वर ॥166॥ म्हणोनि एक वेळ देवा । तोचि पडताळा घेयावा । विस्तरेल तरी सांगावा । साद्यंतुचि ॥167॥ तंव कृष्ण म्हणती हो कां । तुज हा मार्ग गमला निका । तरी काय जाहलें ऐकिजो कां । सुखें बोलों ॥168॥ अर्जुना तूं परिससी । परिसोनि अनुष्ठिसी । तरी आम्हांसीचि वानी कायसी । सांगावयाची ॥169॥ आधींच चित्त मायेचें । वरी मिष जाहलें पढियंताचे । आतां तें अद्भुतपण स्नेहाचें । कवण जाणे ॥170 ॥ ते म्हणों कारुण्यरसाची वृष्टि । कीं नवया स्नेहाची सृष्टि । हें असो नेणिजे दृष्टी । हरीची वानूं ॥171॥ जे अमृताची वोतली । कीं प्रेमचि पिऊन मातली । म्हणोनि अर्जुनमोहें गुंतली । निघों नेणे ॥172॥ हें बहु जें जें जल्पिजेल । तेथें कथेसि फांकु होईल । परि तें स्नेह रूपा नयेल । बोलवरी ॥173॥ म्हणोनि विसुरा काय येणें । तो ईश्वरु आकळावा कवणें । जो आपुलें मान नेणे । आपणचि ॥174॥ तरी मागीला ध्वनीआंतु । मज गमला सावियाचि मोहितु । जे बलात्कारें असे म्हणतु । परिस बापा ॥175॥ अर्जुना जेणें भेदें । तुझें कां चित्त बोधे । तैसें तैसें विनोदें । निरुपिजेल ॥176॥ तो काइसया नाम योगु । तयाचा कवण उपेगु । अथवा अधिकारप्रसंगु । कवणा येथ ॥177॥ ऐसें जें जें कांहीं । उक्त असे इये ठाई । तें आघवेंचि पाहीं । सांगेन आतां ॥178॥ तूं चित्त देऊनि अवधारीं । ऐसें म्हणोनि श्रीहरी । बोलिजेल ते पुढारी । कथा आहे ॥179॥ श्रीकृष्ण अर्जुनासी संगु । न सांडोनि सांगेल योगु । तो व्यक्त करूं प्रसंगु । म्हणे निवृत्तिदासु ॥180॥
॥ पाचवा अध्याय समाप्त ॥
हेही वाचा – Dnyaneshwari : तें परब्रह्म निर्वाण, जें आत्मविदांचें कारण…
अर्थ
सहज पाहिले तर देवा, ऐका, तुम्ही जो मार्ग दाखवला, तो पोहून जाण्यापेक्षा पायउताराने जाणे जसे सोपे, ॥165॥ तसा हा (योगमार्ग) सांख्यमार्गाहून सोपा आहे. परंतु आमच्यासारख्या दुर्बळांना (समजण्यास) येथे काही विलंब लागेल, पण तो सहन करता येईल. ॥166॥ म्हणून देवा, एक वेळ त्याचाच अनुवाद करावा, जरी विस्तार होईल, तरी हरकत नाही. (पण) तो योगमार्ग आरंभापासून अखेरपर्यंत सांगाच. ॥167॥ तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, असे का? तुला हा मार्ग चांगला वाटतो, तर सांगायला आमची काय हरकत आहे? ऐक, आम्ही तो आनंदाने सांगतो. ॥168॥ अर्जुना तू ऐकतोस आणि ऐकून त्याप्रमाणे आचरण करतोस असे जर आहे, तर आम्हीच सांगावयास का कमी करू? ॥169॥ (ज्ञानेश्वर महाराज म्हणतात) अगोदरच आईचे अंत:करण, त्यात आवडतेपणाचे निमित्त झाले, मग त्या ममतेच्या अद्भुततेची कल्पना कोणाला येईल? ॥170॥ ती हरीची कृपादृष्टी करुणरसाचा वर्षाव आहे, असे म्हणू का, अथवा नव्या स्नेहाची सृष्टी आहे, असे म्हणू? हे राहू द्या. कृष्णाच्या त्या दृष्टीचे वर्णन कसे करावे, हे आम्हाला कळत नाही. ॥171॥ ही हरीची दृष्टी (जणू काय) अमृताचीच ओतलेली होती अथवा अर्जुनाविषयीचे प्रेम पिऊन मस्त झाली होती. म्हणून अर्जुनाच्या मोहात अडकलेल्या त्या (हरीच्या) दृष्टीस बाहेर निघण्याचे कळेना. ॥172॥ या हरीच्या दृष्टीसंबंधाने जितके जास्त बोलावे, तितकी कथेची संगती सुटून या वर्णनाचा विस्तार वाढेल. परंतु हरीच्या अर्जुनाविषयीच्या प्रेमाचे यथार्थ वर्णन शब्दांनी करता येणार नाही, ते नाहीच. ॥173॥ यात आश्चर्य ते काय? कारण जो आपले मोजमाप आपणच जाणत नाही, तो ईश्वर कोणी आकलन करावा? ॥174॥ तर मागील बोलण्याच्या अभिप्रायावरून मला सहज असे वाटते की, देव अर्जुनाच्या प्रेमरूपी मोहात गुंतले आहेत, कारण ते अर्जुनाला बलात्काराने ‘अरे बाबा, ऐक’, असे म्हणत होते. ॥175॥ अर्जुना, ज्या प्रकाराने तुझ्या चित्ताला पटेल, त्या त्या सोप्या रीतीने, कौतुकाने सांगण्यात येईल. ॥176॥ योग हे कशाला नाव आहे? त्याचा उपयोग काय? अथवा योगाचा अधिकार कोणाला आहे? ॥177॥ याप्रमाणे जे जे काही याबाबतीत (शास्त्रात) सांगितलेले असेल, ते सर्वच मी तुला आता सांगेन, पाहा. ॥178॥ तू मन लावून ऐक. असे म्हणून श्रीहरी जे बोलले ती कथा पुढे आहे, ती सांगण्यात येईल. ॥179॥ अर्जुनाशी असलेल्या सख्यात बिघाड होऊ न देता, श्रीकृष्ण अर्जुनाला अष्टांगयोग सांगतील, तो प्रसंग निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात, मी स्पष्ट करून सांगेन ॥180॥
॥ पाचवा अध्याय समाप्त ॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : तैसें मनपण मुदल जाये, मग अहंभावादिक कें आहे…


