प्रसिद्ध लेखक रणजीत देसाई यांची ‘स्वामी’ कादंबरी 1962मध्ये प्रसिद्ध झाली आणि 1964चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. या कादंबरीच्या 35पेक्षा जास्त आवृत्या निघाल्या आहेत. आजही ही वाचकांची आवडती कादंबरी आहे. ‘स्वामी’ नावाची मालिका दूरदर्शनवर आली होती. तीही खूप गाजली होती. थोरले माधवराव पेशवे आणि पत्नी रमाबाई यांच्यावर ही कादंबरी असली तरी, ती केवळ प्रेमकथा नाही. माधवरावांच्या राजकीय कारकिर्दीची 11 वर्षे यात दाखवली आहेत. त्यांचा राज्याभिषेक ते अकाली मृत्यू इतका हा कालखंड आहे. प्रस्तावनेत लेखक म्हणतात की, हे पुस्तक त्यांच्या हातून लिहून झाले, कारण पेशव्यांचे गतजन्मीचे काही ऋण फेडायचे राहून गेले असावे; पण या पुस्तकाचे यश पाहता वाटते की, पेशव्यांनीच माझे गतजन्मीचे ऋण फेडले आहे!
मुखपृष्ठावर गजाननाचे सुंदर चित्र आहे. हे पेशव्यांचे दैवत. माधवराव गजाननाचे निस्सीम भक्त होते. पानिपतच्या युद्धापेक्षाही मराठेशाहीचे अधिक नुकसान या पेशव्याच्या अकाली निधनाने झाले, असे ग्रँट डफ यांनी लिहिले आहे.
पानिपतच्या युद्धात झालेल्या पराभवामुळे राज्याला अवकळा आली होती. अत्यंत अपमानास्पद हार स्वीकारावी लागल्याने प्रजेचे मनोबल खचले होते. माधवराव केवळ 16 वर्षांचे असताना त्यांना पेशवेपद सांभाळावे लागले. विषम परिस्थितीत एवढे मोठे जबाबदारीचे पद त्यांना कोवळ्या वयात स्वीकारावे लागले, तेव्हा त्यांच्या गुणांची कसोटी लागली. हैदर, निजामसारखे बाहेरचे शत्रू आणि घरात सख्खा काका रघुनाथराव या मोठ्या शत्रूंशी सामना करायचा होता. त्यांनी आधी राज्याची घडी नीट बसवायला सुरवात केली. आर्थिक व्यवहार सुरळीत केले.
यानंतर त्यांना अवघ्या अकरा वर्षांच्या कारकिर्दीत 22 मोठ्या लढाया लढाव्या लागल्या. निजामाचा पराभव आणि हैदरवर वचक यामुळे शत्रूंचा बंदोबस्त झाला. यानंतर उत्तरेत फौजा पाठवून राजपूतांना नमवले आणि इंग्रजांच्या ताब्यातून सोडवून दिल्लीच्या तख्तावर शहा आलमला बसवले. यामुळे दिल्लीत मराठेशाही पुन्हा प्रस्थापित झाली. पानिपतच्या पराभवाचा डाग काही अंशी धुऊन निघाला.
हेही वाचा – जापनीज वाइफ… अजब प्रेम की गजब कहानी!
या ऐतिहासिक घटनांच्या आधारे या कादंबरीत कथानकाची गुंफण केली आहे. त्यांना अनेक पुस्तकांचा आधार घ्यावा लागला… स्थळे पहावी लागली. त्यांनी म्हटले आहे की, भाऊसाहेब खांडेकरांनी त्यांना सर्व साहित्य पुरवले. लेखकाने सुयोग्य वापर करून त्याचे सोने केले आहे! माधवराव, रमाबाई यांच्याव्यतिरिक्त इतर अनेक पात्रे कथानकात येतात. राघोबादादा ऊर्फ दादासाहेब वयाने मोठे असूनही माधवरावांच्या विरुद्ध कारवाया करत असल्याने शेवटी त्यांना नजर कैदेत ठेवायला लागले होते. अटकेपार झेंडे लावणारे राघोभरारी हेच! लेखकाने त्यांचे पात्र पूर्ण खलनायकी न दाखवता ‘ग्रे’ दाखवले आहे. त्यांना माधवराव ‘गंगोदकासारखे निर्मळ मन’ असणारे असे म्हणतात, परंतु हलक्या कानाचे असल्याने कान भरणाऱ्या लोकांच्या बोलण्यात ते आले. गोपिकाबाई, पार्वतीबाई, आनंदीबाई, गंगोबा, सखाराम बापू, रामशास्त्री, श्रीपती, मैना, विठी, रामजी इत्यादी पात्रे येतात. रमाबाई आणि माधवराव यांच्यातले तरल, हळूवार नाते संवादांतून व्यक्त होते. ते संवाद लक्षात राहण्यासारखे आहेत. माधवरावांना रमाबाई खंबीरपणे साथ देतात. त्या दोघांचे मन इतके जुळलेले आहे की, शब्दांची गरज पडत नाही. रमाबाई जितक्या भावनाशील, मृदू तितक्याच कर्तव्यनिष्ठ पेशवीणबाई होत्या! भावनेत वाहून जाणाऱ्या नव्हत्या. लोभस तितकीच आदर वाटावा अशी स्त्री, लेखकाने रंगवली आहे. माधवराव जितके रणांगणावर पराक्रमी वीरपुरुष आहेत, तितकेच रसिक आहेत. त्यांच्या रखरखीत आयुष्यातला गारवा म्हणजे रमाबाई!
माधवरावांचे व्यक्तिमत्व परिपूर्ण दाखवले आहे. माधवराव आधी शासक आहेत, मग इतर नाती आहेत, हे कधी विसरत नाहीत. त्यामुळे कठोर निर्णय घ्यावे लागतात. आप्त-स्वकीयांना दुखवावे लागते. राघोबांच्या कटकारस्थानांमुळे ते व्यथित होतात. प्रजेचे दुख जाणून घेतात. ते चतुर राजकारणी होते, हे लेखकाने काही प्रसंगातून पटवून दिले आहे. जसे नजरकैदेत असलेल्या बापूंचा सारीपाटाच्या चालीतून भोसल्यांना दिलेला संदेश ते ओळखतात किंवा निजामाचा पुण्यावर हल्ला करण्यामागचा हेतू ओळखतात. हैदरशी लढाई तर त्यांच्या कुशलतेचे परिमाण आहे. इंग्रज अधिकारी त्यांच्याकडे साष्टीला किल्ला बांधण्याची परवानगी मागतो, तेव्हा ते ‘तुमच्या मुलखात पण दोन जागी किल्ला बांधायची परवानगी द्या,’ असं सांगतात. तसेच, निजाम आणि हैदर याच भूमीतले, तुम्ही परके… याची जाणीव करून देतात.
त्यांच्यामुळे मराठेशाहीला ऊर्जितावस्था येते, तरी ते शेवटी रमाबाईंना म्हणतात की, वैयक्तिक पातळीवर मी हरलेलो आहे. कुटुंबीयांशी वैमनस्य त्यांची दुखरी बाजू आहे. रामशास्त्री प्रभुण्यांना ते सांगतात की, न्यायासनासमोर मी आलो तरी डगमगू नका. रामशास्त्रीही त्यांना सांगतात – क्षात्रधर्म स्वीकारला आहे, तेव्हा कर्मकांड कमी करा आणि राज्याकडे लक्ष द्या. माधवराव त्यांचा सल्ला मानतात.
या कादंबरीत प्रामुख्याने कौटुंबिक कलह दिसतात. काका-पुतण्या संघर्ष तर पराकोटीचा! रास्ते मामा आणि भाचा संघर्ष… यातून गोपिकाबाईंचे घर सोडून जाणे आणि शेवटी मुलाच्या अंत्ययात्रेलाही न येणे. सासरा-जावई संघर्ष, यात त्यांची जहागीर काढून दुसऱ्याला देणे… कर्तव्यनिष्ठ व्यक्तीला अशा प्रसंगांना सामोरे जावेच लागते. माधवराव सतत छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वागतात. असे असले तरी राघोबा हैदरबरोबर तह करायला लावतात, तो प्रसंग वाचताना महाराज असे वागले असते का? असे वाटते. राघोबा केवळ त्यांचे काका आहेत म्हणून त्यांनी त्यांच्यावर मारेकरी घालून सुद्धा त्यांना माधवराव माफ करतात! या प्रसंगीही तसेच वाटते. कदाचित, माधवरावांच्या व्यक्तिमत्वातला हाच एक दुबळा भाग असेल, जो लेखकाने दाखवला आहे किंवा राघोबादादा पित्याच्या स्थानी असल्यामुळे ते नजरकैदेहून अधिक शिक्षा करायला धजत नाहीत.
पानिपतवर हरवलेल्या भाऊंचा तोतया पुण्यात वाजत-गाजत येतो त्यावेळी माधवरावांची खरी परीक्षा होते. त्याला तोतया ठरवलं, तर पेशवेपदाच्या मिषाने मुद्दामून ठरवले, असे बोलले गेले असते आणि स्वीकारले तर ते अधिक धोक्याचे! शिवाय, पार्वतीबाईंना दुखावण्याचे संकट.
शेवटच्या भागात माधवरावांचे आजारपण आणि मृत्यू याचे वर्णन आहे. रोगाशी लढणारे माधवराव, त्यांच्यासाठी व्रत करणाऱ्या रमाबाई, वैद्यराज, डॉक्टर कनिंगहम यांचे औषधोपचार आणि त्यांचे वाईट चिंतणारे, त्यासाठी अनुष्ठाने करणारे राघोबा. वेदना सहन न होऊन कट्यार मागणारे माधवराव, आसुडाचे फटके मुकाटपणे खाणारे इच्छाराम आणि मी कट्यार देते म्हणणाऱ्या रमाबाई… सगळेच डोळ्यांसमोर उभे राहते.
शेवटचा प्रसंग सतीचा! वाचताना मनात शब्दातीत रिक्तता येते. दुःखाच्या पलीकडे पोहोचल्याची भावना होते. लेखकाने इतके जिवंत वर्णन केले आहे की, जणू समोर प्रसंग घडतो आहे असे वाटते. फडफडणारा श्वेतपदर अश्रू गोठवतो!
हेही वाचा – माचीवरला बुधा : एकटेपण हाच कादंबरीचा गाभा
लेखकाने प्रतिकांचा, रूपकांचा वापर फार सुरेख केला आहे. राघोबासमोर माधवराव शरणागती पत्करतात, तो प्रसंग रंगवताना एकटा पडलेला चिंकारा शिकाऱ्याच्या तावडीत सापडतो, तो प्रसंग अगदी चपखल वाटतो. राघोबादादांच्या अंगरख्यावर पडलेला लांच्छनास्पद डाग कधीच पुसला जाणार नाही, असे माधवराव म्हणतात आणि रमाबाईंच्या कुंकवाचा अंगरख्यावर पडलेला अभिमानास्पद डाग तसाच राहून देण्याचा आग्रह धरतात. माधवराव समुद्राचे, सूर्यास्ताचे आणि हरिहरेश्वराचे वर्णन रमाबाईंना सांगतात, तेही अप्रतिम! कितीतरी वाक्य मनात रेंगाळत राहतात.
पुस्तकाचे नाव ‘स्वामी’ आहे, ते कोणाला उद्देशून? हा विचार साहजिकच मनात येतो. माधवराव स्वामी आहेत? रमाबाई त्यांना एकदा स्वामी अशी हाक मारतात… की हे राज्य गजाननाचे असल्याने स्वामी गजानन आहे? स्वामी या शब्दाला मालक, धनी यापेक्षा गहन अर्थ आहे. त्यात एक वैराग्याची छटा आहे. स्वामी राजापेक्षा उदात्त आहे. माधवरावांचे व्यक्तिमत्व राजा म्हणण्यापेक्षा ‘स्वामी’ म्हणावे असेच होते.
या कादंबरीचे जितके कौतुक झाले, तितकी यावर टीकाही झाली. काही ऐतिहासिक घटनांत फेरफार केला आहे… माधवराव अगदीच दोषरहित दाखवले आहेत… राघोबादादांच्या पराक्रमाकडे दुर्लक्ष केले आहे किंवा कौटुंबिक कलहाला अधिक महत्त्व दिले आहे… अशा प्रकारची टीका झाली. ऐतिहासिक सत्य डावलले आणि नाट्यमयतेला महत्त्व दिले, असाही आरोप होतो. पण ही कादंबरी आहे, शुद्ध रूपातला इतिहास नाही; त्यामुळे लेखकाने घेतलेले स्वातंत्र्य योग्यच आहे. या कादंबरीचे मोठेपण वादातीत आहे. या कादंबरीने एक नवप्रवाह सुरू केला. कालजयी म्हणता येईल, अशी ही कादंबरी वाचायला हवी, संग्रही ठेवायला हवी.


