अथांग, गूढ, तरीही मनाच्या सर्वात जवळचा… ज्याला समजणे जितके कठीण, तितकाच तो भावनेने हाक मारताच धावून येणारा! श्रीकृष्णाच्या याच विरोधाभासी पण लोभस व्यक्तिमत्त्वावर आणि ‘कृष्णार्पणमस्तु’ या भावनेवर मांडलेला हा एक विचारप्रपंच…
ॐ नमो भगवते वासुदेवाय!
श्रीकृष्ण… भारतवर्षाला लाभलेले एक दैवी दिव्यास्त्र! लोभस रूप असलेले बालपण, मोहक हास्य असलेले तरुणपण आणि अचाट बुद्धिमत्ता असलेले व्यक्तिमत्त्व. कोणाचा आराध्य देव, कोणाचा सखा, तर कोणाचा प्रियकर! संपूर्ण मानवजात आपापल्या पसंतीनुसार स्वतःला त्याच्या बंधनात अडकवून ठेवू पाहते. विशेष म्हणजे, प्रत्येकाला असेच वाटते की, आपणच त्याच्या सर्वात जवळचे आहोत, त्याचे फक्त आपल्याकडेच लक्ष आहे. असा हा विलक्षण देव – होय, देवच!
मला रामही आवडतो, पण कृष्ण विशेष हृदयाच्या जवळचा आहे. रामाला मर्यादा होत्या, पण याचे सगळेच अचाट आणि अमर्याद! याला समजणे तसे अवघडच. रामाला जशी गोंडस विशेषणे आहेत, तशी यालाही आहेत; पण काही विशेषणे मात्र खोडकर, लोणी खाणारा चोर, किंवा काही कारनामे केले की ‘कृष्णकृत्य’ अशी संभ्रमित करणारी! मग मनात लगेच प्रश्न येतो – हा खरंच देव होता की, देवत्व प्राप्त झालेला मानव? असा हा कृष्ण आयुष्यभर तुम्हाला याच अवस्थेत फिरवत ठेवतो. ज्याला तो समजला तो भाग्यवानच! पण त्याला समजायला माझ्यासारखीला एक आयुष्य तर फारच कमी. त्याच्याबद्दल जितके ज्ञान प्राप्त करता येईल तितके करायचे आणि बाकी ‘कृष्णार्पणमस्तु’ म्हणून त्याच्यावर सोडून द्यायचे, एवढेच आपल्या हातात असते.
सर्व विश्वाला व्यापलेला, “अहं ब्रह्मास्मी” म्हणणारा, चराचरात आपले अस्तित्व दाखवणारा हा श्रीकृष्ण! कोणाला विठोबाच्या रूपात भेटणारा, कोणाला कपाळावर चंदनलेप लावलेल्या व्यंकटेश रूपात दिसणारा, कोणाला श्रीनाथ तर कोणाला राधारमण म्हणून भासणारा… किती रूपे आणि किती नावे! याचे सगळेच निराळे, एकेक रूप विलोभनीय. मनापासून हाक मारली तर, लगेच धावून येणारा आणि हाक मारलीच नाही तर वाऱ्यावर सोडून देणारा, म्हणूनच महाभारतात पांडव द्युतात हरले, ते हरणार आहेत हे काय त्याला माहीत नसेल? नक्कीच माहीत असणार! पण युधिष्ठिराने पोकळ आत्मविश्वास दाखवला, जशी दुर्योधनाला शकुनी मामाची गरज वाटली, तशी युधिष्ठिराला कृष्णाची गरज भासली नाही; मग तो तरी तिथे कसा थांबणार? युधिष्ठिराचा अहंकार त्याला केवढ्या लयाला घेऊन गेला असेल किंवा कृष्णालाच महाभारत घडवून आणायचे असेल. अधर्मावर धर्माचा विजय करायचा असेल आणि द्रौपदीच्या अपमानामागे कौरवांचा विनाशकाळ जवळ आणायचा असेल, म्हणून तो द्युताच्या वेळी थांबला नसेल. त्या वेळेसही संभ्रमित अवस्थाचं होती, असे मानावे लागेल नाही का?
हेही वाचा – राजयोगिनी कुंती अन् दुर्वास ऋषी
पांडव त्याच्या इतके जवळचे, तरी त्यांच्याशी स्नेहसंबंध सांभाळत त्यांच्या चुकांची जाणीव करून देणारा तोच. अर्जुनाला युद्धाला प्रवृत्त करणारा, हातात शस्त्र न धरता गीतेचे महात्म्य सांगणारा आणि अर्जुनाचे सारथ्य करताना वेळोवेळी त्याला धर्माच्या रक्षणाची आठवण करून देणाराही कृष्णच! या प्रवासात गांधारीचा शाप स्वीकारत “धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे” म्हणत पांडवांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. रणभूमीत जेव्हा द्रोणाचार्यांसारख्या महापराक्रमी गुरूंचा पराभव करणे अशक्य झाले होते, तेव्हा कृष्णानेच ‘अश्वत्थामा’ नावाचा हत्ती मारला गेल्याची युक्ती सुचवली. धर्माची आणि सत्याची मूर्ती मानल्या जाणाऱ्या युधिष्ठिराच्या मुखातून “अश्वत्थामा हत: … नरो वा कुंजरो वा” (अश्वत्थामा मारला गेला, माणूस की हत्ती माहीत नाही) हे वाक्य उच्चारायला लावून कृष्णानेच कौरवांच्या छावणीत संभ्रम निर्माण केला. प्रसंगी धर्माच्या रक्षणासाठी असत्याचा आधार घेणारा, पण त्याचे उत्तरदायित्व स्वतःकडे घेणारा हा कृष्णच! अर्जुनाने आणि युधिष्ठिराने युद्धातील असे कठीण तसेच संभ्रमित करणारे निर्णयही ‘कृष्णार्पणमस्तु’ म्हणत त्याच्यावर सोपवले आणि युद्धातील विजयाचा तोच खरा शिल्पकार ठरला.
श्रीकृष्ण म्हणजे सत्य, प्रसंगी असत्यही! श्रीकृष्ण म्हणजे धर्म आणि अधर्माचे निर्दालन. युद्धनीतीचे धडे देणारा वीरपुरुष, तर दुसरीकडे रणछोडदास! मानले तर मायावी, नाहीतर सत्यनारायण! निर्मोही, तरी सर्वांना मोहात पाडणारा, कूटनीती अवलंबणारा कुशल राजकारणी, तरीही तितकाच निरागस आणि निर्लोभी, पांडवांचा जिवश्चकंठश्च सखा, तर कौरवांचा प्रिय शत्रू! आपले देवत्व विसरून पेंद्या आणि सुदामाशी घट्ट मैत्री जपणारा मित्र तर गोपिकांचा सखा! म्हणूनच तो श्रीमंत-गरीब, लहान-थोर, स्त्री-पुरुष या सर्वांना आपलासा वाटतो. तो जितका राधेचा, तितकाच सत्यभामा आणि रुक्मिणीचा स्वामी, जितका यशोदेचा लडिवाळ कान्हा, तितकाच देवकीच्या काळजाचा तुकडा!
हेही वाचा – पश्चात्तापदग्ध राजयोगिनी कुंती…
जीवन कसे जगावे, हे श्रीकृष्णाच्या चरित्रातून शिकावे. त्याच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रसंगाचा त्याने सहर्ष स्वीकार केला. प्रचंड सकारात्मकता ठेवून कठीणातल्या कठीण प्रसंगावर मात केली. चित्तवृत्ती प्रसन्न ठेवून शत्रूलाही आपलेसे केले. दुःखी-दुर्बळांचा तारणहार बनला.
“कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन” या वचनाप्रमाणे अर्जुनाने कृष्णावर पूर्ण विश्वास ठेवून ‘कृष्णार्पणमस्तु’ म्हटले आणि ते महायुद्ध जिंकले. आज आपण युद्ध तर नाही लढत, पण कठीण प्रसंगात जर त्या श्रीकृष्णावर डोळे मिटून विश्वास ठेवला, “सर्व भार तुझ्यावर आहे, तूच तारणहार आहेस” असे म्हणत ‘कृष्णार्पणमस्तु’ केले, तर तो आपली पाठराखण नक्कीच करेल!
हा माझा लेखही त्यालाच समर्पित…
॥ कृष्णार्पणमस्तु ॥


