न्यायालय म्हणजे फक्त कायद्याची भाषा बोलण्याची जागा नसते, तिथं रोज माणसांच्या आयुष्याची असंख्य पानं उलटली जातात. काही पानांवर अन्याय असतो… काही पानांवर अपराध असतो… तर काही पानांवर अश्रू असतात. काहींवर मात्र काळाने शिकवलेला कठोर धडा असतो.
कालचा दिवस तसाच होता. कोर्टाचं काम सुरू होण्याआधीच पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं. त्याने तारीख चुकवली होती. त्यामुळे त्याच्यावर अटक वॉरंट होते. आरोपी परजिल्ह्यात राहणारा होता. योगायोग असा की, आज त्याचे वकील कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यामुळे तेही आले नव्हते. घरी तर पोलीस येऊन गेले होते, नेमका तो त्यावेळी घरात नव्हता, नाहीतर तो आता तुरुंगात असता.
अटक वॉरंट रद्द करण्यासाठी तो माझ्याकडे आला. त्याच्या चेहऱ्यावर भीती होती. डोळ्यांत अस्वस्थता होती. आवाजात विनवणी होती.
वॉरंट रद्द करण्यासाठी त्याचा अर्ज लिहिताना मी त्याला माहिती विचारली… “गैरहजर राहण्याचे कारण काय? किती तारखांना आला नव्हता?”
तो हळू आवाजात म्हणाला, “साहेब… तब्येत बरी नव्हती. दोन-तीन तारखा चुकल्या असतील. पण… परवाच माझी आई वारली. अजून तिचे विधीही पूर्ण झालेले नाहीत. मला तुरुंगात पाठवलं तर, आईच्या शेवटच्या विधीलाही जाता येणार नाही. कोर्टाला तसं सांगा. कोर्ट दया दाखवतील.”
‘आई’ हा शब्द उच्चारताना त्याचा कंठ दाटून आला. क्षणभर माझ्याही मनात त्याच्याविषयी सहानुभूती निर्माण झाली. मी त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवला. पकड वॉरंट रद्द करण्यासाठी अर्ज तयार केला. त्यात आईच्या निधनाचा उल्लेख करून न्यायालयाकडे विनंती केली. अर्ज न्यायाधीशांसमोर ठेवला.
हेही वाचा – दादू… घराचेच वासे फिरले!
मी मनातल्या मनात अपेक्षा केली होती की, न्यायालय मानवी दृष्टिकोनातून निश्चित विचार करेल. शेवटी आरोपी असला तरी काय झालं? त्याची आई मयत होणं, हे कुणालाही वाईट वाटण्यासारखंच आहे. परंतु काही क्षणांतच आदेश आला…
“अर्ज नामंजूर.”
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. त्याच्या चेहऱ्यावरचा आशेचा शेवटचा किरणही विझला.
माझ्याही मनाला वाईट वाटलं.
‘बिचाऱ्याची आई वारली आहे. आता तिच्या विधीलाही जाता येणार नाही,’ हा विचार मनात येत राहिला.
मी न्यायालयाला नमस्कार करून बाहेर पडू लागलो. तेवढ्यात न्यायाधीश साहेबांनी मला थांबवलं…
“वकील साहेब… तुम्ही यांची फाइल पाहिली आहे का?”
मी नम्रपणे उत्तर दिलं, “नाही साहेब. आज प्रथमच माझं वकीलपत्र दाखल केलं आहे. पूर्वी त्यांच्या जिल्ह्यातील वकील काम पाहत होते.”
साहेब किंचित हसले…
“म्हणजे, तुम्ही आरोपीवर विश्वास ठेवून अर्ज केला?”
“हो, साहेब.”
त्यांनी समोरची फाइल उघडली. हातातलं लाल पेन अलगद फिरवत ते शांतपणे म्हणाले,
“साहेब, हा माणूस गेली दोन वर्षे कोर्टात फिरकलाच नाही. या आधी त्याच्याविरुद्ध सहा वेळा वॉरंट निघाले होते. प्रत्येक वेळी त्याने पोलिसांना गुंगारा दिला. त्याच्या भागातील पोलिसांनीही वॉरंटची अंमलबजावणी केली नाही. शेवटी त्या पोलीस स्टेशनच्या डीवायएसपींनाच नोटीस काढावी लागली. तेव्हा पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला… आणि आज तो स्वतःहून कोर्टात आला आहे.”
क्षणभर थांबून ते पुढे म्हणाले,
“आज त्याला वाटलं असेल, ‘आई वारली आहे. कोर्ट दया दाखवेल.’ पण न्यायालय एखाद्या दिवसाचा विचार करत नाही. ते माणसाच्या संपूर्ण वागण्याचा इतिहास पाहतं. पाप-पुण्याच्या भाषेत सांगायचं झालं तर… यापूर्वी त्याने इतकं ‘पाप’ जमा केलं आहे की, आजचं ‘पुण्य’ त्याच्या मदतीला धावून आलं नाही.”
न्यायाधीश साहेबांच्या त्या एका वाक्याने माझ्या मनावर खोल ठसा उमटला.
खरंच…
आपणही आयुष्यात असंच करत नाही का? दारू पिणारा कामगार महिनोनमहिने काम चुकवत राहतो. उचल घेत राहतो. परतफेडीचे नाव काढत नाही… वेळ आली की उद्यावर ढकलतो. विश्वास तोडत राहतो आणि एक दिवस अचानक येऊन म्हणतो,
“मालक, वडील अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. दवाखान्यात आहेत. वीस हजारांची गरज आहे. आजच्या दिवस मदत करा.”
बाहेरचे लोक म्हणतात, “अरे, असल्या प्रसंगीही हा मदत करत नाही? माणुसकी आहे की नाही?”
पण त्यांना त्या माणसाचा मागचा इतिहास दिसत नाही. विश्वास हा एका दिवसात तुटत नाही. तो रोजच्या छोट्या छोट्या खोटं बोलण्यांनी हळूहळू तुटत जातो.
घरातही हेच घडतं. मुलगा रोज उशिरा उठतो. रोज सूचना दिल्या जातात. रोज दुर्लक्ष केलं जातं आणि ज्या दिवशी घरात अत्यंत महत्त्वाचं काम असतं, त्या दिवशी तो रात्री आजारी पडतो. सकाळी वडील ताडताड बोलतात. त्यावेळी आई मधे येते. आई म्हणते, “अहो, तो आजारी आहे. तुम्हाला समजत कसं नाही? कोणत्या वेळेला काय बोलावं हे कळत कसं नाही? राग आला की, तुम्ही वाटेल तसे बोलता!”
खरं म्हणजे, तो राग आठ वाजता उठण्याचा नसतो. यापूर्वी सूचना देऊनही त्या न ऐकल्याचा असतो. स्फोट त्या दिवशी होतो. पण ज्वालामुखी आधीपासूनच धुमसत असतो.
विशेषतः, अशा प्रकारच्या वागण्याचे घरातल्या कर्त्या पुरुषांवर खूप वाईट परिणाम होत असतात. तो बिचारा घरासाठी राब राब राबत असतो. त्याचवेळी घरातलं कुणी चुकत असेल आणि त्यामुळे आपल्या प्रपंच्याचा तोटा होत असेल तर, त्याला रागाने बोलावे लागते. परंतु घरातले सर्व सदस्य मिळून कुटुंब प्रमुखाला तेही स्वातंत्र्य देत नाहीत. त्याने राग कसा व्यक्त करावा आणि कोणत्या वेळेला व्यक्त करावा, हे सुद्धा इतरांच्या मर्जीवर अवलंबून ठेवले जाते. त्यामुळे घरा-घरातला कुटुंब प्रमुख हवालदिल होऊन जातो. अशा गोष्टी आपण वेळीच सावरल्या पाहिजेत.
त्या दिवशी न्यायालयातून बाहेर पडताना मला एक मोठा धडा मिळाला. दया ही तात्पुरत्या क्षणिक भावनेवर मिळत नाही. ती विश्वासावर मिळते आणि विश्वास हा रोजच्या प्रामाणिक वागण्यातून कमवावा लागतो. वेळ पाळणं, जबाबदारी स्वीकारणं, दिलेला शब्द पाळणं, चुका झाल्या तर त्या मान्य करणं. हीच खरी विश्वास कमावण्याची गुरुकिल्ली आहे.
हेही वाचा – दादू… लेकीच्या उदारपणाने गाव गहिवरला
संकटाच्या दिवशी न्यायालय असो, समाज असो किंवा स्वतःचं कुटुंब असो, ते त्या एका दिवसाकडे पाहून निर्णय घेत नाहीत. ते आपल्या संपूर्ण आयुष्याची बेरीज करत असतात.
तेवढ्यात घड्याळात दोन वाजल्याचे दिसले. पांढऱ्या शुभ्र गणवेशातील शिपाई शांतपणे डायसजवळ आला.
“शूऽऽ…”
त्याच्या आवाजाबरोबर संपूर्ण न्यायालय उभं राहिलं.
न्यायाधीश आपल्या दालनाकडे निघून गेले. मीही त्यांना नमस्कार केला आणि कोर्टाच्या आवारातून बाहेर पडलो. बाहेर ऊन तळपत होतं. रस्ते गर्दीने ओसंडून वाहत होते. पण माझ्या मनात मात्र न्यायालयाने दिलेला एक अमूल्य धडा कायमचा कोरला गेला होता.
“एक दिवसाची सहानुभूती मिळवण्यापेक्षा, आयुष्यभराचा विश्वास कमवणे अधिक महत्त्वाचे असते!”


