अध्याय तेरावा
तंव तिये इष्टीचां बुडीं । पशुहिंसा रोकडी । मग अहिंसेची थडी । कैंची दिसे ॥222॥ पेरिजे नुसधी हिंसा । तेथ उगवैल काय अहिंसा । परी नवल बापा धिंवसा । या याज्ञिकांचा ॥223॥ आणि आयुर्वेदुही आघवा । याचि मोहोरा पांडवा । जे जीवाकारणें करावा । जीवघातु ॥224॥ नाना रोगीं अहाळलीं । लोळतीं भूतें देखिलीं । ते हिंसा निवारावया केली । चिकित्सा कां ॥225॥ तंव ते चिकित्से पहिलें । एकाचे कंद खणविले । एका उपडविलें । समूळीं सपत्रीं ॥226॥ एकें आड मोडविली । अजंगमाची खाल काढविली । एकें गर्भी उकडविली । पुटामाजीं ॥227॥ अजातशत्रु तरुवरां । सर्वांगीं देवविलिया शिरा । ऐसे जीव घेऊनि धनुर्धरा । कोरडे केले ॥228॥ आणि जंगमाही हात । लाऊनि काढिलें पित्त । मग राखिले शिणत । आणिक जीव ॥229॥ अहो वसतीं धवळारें । मोडूनि केले देऊळ देव्हारें । नागौनि वेव्हारें । गवादी घातली ॥230॥ मस्तक पांघुरविलें । तंव तळवटीं उघडें पडलें । घर मोडोनि केले । मांडव पुढें ॥231॥ नाना पांघुरणें । जाळूनि जैसें तापणें । जालें आंगधुणें । कुंजराचें ॥232॥ बैल विकूनि गोठा । पुंसा लावोनि गांठा । इया करणी कीं चेष्टा । काइ हंसों ॥233॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : माझें असतेपण लोपो, नांवरूप हारपो
अर्थ
तर प्राण्याच्या बचावाकरिता करावयाच्या या यज्ञांमध्ये आरंभीच जनावरांचे प्रत्यक्षपणेच प्राण घेतले जातात; अशा स्थितीत अहिंसेचे पलीकडचे तीर कसे दिसणार ॥222॥ नुसती हिंसा पेरली असतां तेथे अहिंसा उगवेल काय? (तर नाही). परंतु याज्ञिकांचे धाडस आश्चर्यकारक आहे ॥223॥ आणि सर्व आयुर्वेदहि अर्जुना, याच धोरणाचा आहे. कारण की, एका जीवाचे रक्षण करण्याकरिता दुसर्या जीवाचा घात करावा, असे तो प्रतिपादन करतो ॥224॥ नाना प्रकारच्या रोगांनी पोळलेले व त्या दु:खाने लोळत पडलेले प्राणी पाहिले व मग आयुर्वेदाने ती हिंसा (दु:ख) निवारण करण्याकरिता औषधांची योजना केली ॥225॥ तो, औषधयोजनेत पहिल्या प्रथम कित्येक झाडांचे कंद खणविले व कित्येकांना मुळांसकट व पानांसकट उपटविले; ॥226॥ काही झाडांच्या मधल्या भागाचा औषधांत उपयोग केला; काही झाडांची साल काढविली व काही फळ देण्य़ाच्या बेतात आलेल्या वनस्पती, त्यावर क्षारांचे वगैरे कसले तरी थर देऊन उकडविल्या; ॥227॥ (ज्यांनी) कोणाचे केव्हांच वाकडे केले नाही, अशा अजातशत्रू झाडांना (त्यांचा चीक काढण्याकरिता) त्यांच्या सर्वांगावर भेगा पाडून, याप्रमाणे अर्जुना, त्या वृक्षांचे जीव घेऊन त्यांना कोरडे केले ॥228॥ आणि हालचाल करणार्या प्राण्यांसही हात घालून त्यांचे पित्त काढून मग त्या योगाने रोगांनी पीडित अशा दुसर्या जीवांचे रक्षण केले ॥229॥ अहो, राहती घरें मोडून त्या घराच्या सामानाने देवळें व देव्हारे केले व व्यवहारात लोकांस फसवून, लुटून जे द्रव्य मिळविले, त्या द्रव्याच्या योगाने अन्नसत्र घातले ॥230॥ डोक्यास गुंडाळण्याकरता नेसलेले वस्त्र सोडून जर ते मस्तकास बांधले तर शरीराचा खालचा भाग उघडा पडतो; अथवा जसे घर मोडून त्या घरापुढे मांडव केले ॥231॥ अथवा पांघरुणे जाळून मग जसा शेक घ्यावा किंवा हत्तीचे जसे अंग धुणे असते (हत्ती हा स्नान केल्याबरोबर आपल्या ओल्या अंगावर सोंडेने माती घेऊन जास्त मलीन होतो) ॥232॥ बैल विकून जसा गोठा बांधावा, अथवा राघूस हाकून देऊन मग पिंजरा तयार करावा, असल्या कृतींना योग्य म्हणावे किंवा चेष्टा म्हणाव्यात? कां यांना हंसावे? ॥233॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : केळीचें दळवाडें, हळू पोकळ आवडे


