भाग – 32
“आपला बॉस खरंच बदलतोय…”
शर्वायच्या सहकाऱ्यांपैकी एक म्हणतो, “बदल नाही रे दत्ता… प्रेमाच्या झुळुकीने माणूसही फुलतो असं म्हणतात ना, अगदी तसंच काहीसं वाटतंय.”
दत्ता डोळे मिचकावतो, “म्हणजे हे सगळं आराध्या मॅडममुळे?”
तो फाइल हातात घेतो आणि स्वतःशीच हसतो —
“बॉस, तुम्ही कुणाचं ऐकत नाही म्हणता… पण यावेळी मनाचं ऐकायला लागलात असं दिसतंय!”
हळूहळू दत्ताच्या मनातही आदर निर्माण होतो — शर्वायच्या बदलासाठी आणि त्याच्या त्या शब्दात न मांडलेल्या, पण स्पष्ट उमटणाऱ्या भावना पाहून…
आजपासून दोन दिवसांच्या कॉन्फरन्सकरिता शर्वायला निघायचं होतं… पण आज का कोणास ठावूक मन अस्वस्थ झालं होतं. त्या मनाला अस्वस्थ असण्याचं कारण कळलं आणि डोक्यात वीज चमकावी तशी कल्पना चमकली. आता ही कल्पना अस्तित्वात येणं तेवढं बाकी होतं…
सकाळची वेळ होती. आराध्या ऑफिससाठी तयार होऊन निघणारच होती, तेवढ्यात शर्वायचा कॉल आला.
शर्वाय हसत म्हणाला. “आज ऑफिस नाही. दोन दिवस मी मुंबईबाहेर कॉन्फरन्ससाठी जातोय, आणि मला वाटतं तूही यायला हवीस.”
आराध्या आश्चर्याने… “मी? पण मला काही कल्पनाच नाही… ऑफिसला सुट्टी तर मागितली नाहीये.”
“तू मेल टाक… दोन दिवसांची सुट्टी हवी! मी तुला यायला सांगतोय म्हणजे तेही कामाचाच भाग आहे. Besides company आणि company representative दोघांचंही प्रतिनिधित्व गरजेचं आहे.”
आराध्या गोंधळून गेली… पण त्याच्या आवाजात असलेला संयम, आत्मविश्वास आणि एक प्रकारचा आपलेपणा तिच्या मनाला भिडला. ती त्याच्यासोबत जायला तयार होते. ती कुठे जातं आहे, हे फक्त आई आणि आजीलाच ती सांगून ठेवते. कोणी खोदून चौकशी केलीच तर ‘मैत्रिणीकडे जाऊन आजारी पडली’ सांगा, अस सांगून ठेवते.
ती मेल टाकते. शर्वाय स्वतः तिला मेल draft करून पाठवून देतो. त्याने सांगितलेल्या ठिकाणी ती पोहचते जिथून तिला तो पिकअप करणार होता.
0000
शर्वायच्या डोळ्यांत मिश्कीलपणा होता… “असं वाटून नकोस घेऊस की, सुट्टी घेतली म्हणजे आराम करायला चाललोय. Actually, मी तुला एका वेगळ्या दुनियेत घेऊन जातोय — जिथे तुझ्या गुणांचं खऱ्या अर्थानं मूल्यमापन होईल.”
त्याचं अस बोलणं ऐकून ती नुसतीच त्याच्याकडे पाहात राहिली. दुसरी गाडी त्यांना पिकअप करायला आली होती… त्यांचा प्रवास सुरू होतो. गाडीत दोघं शांत बसलेले. मधेच शर्वाय खिडकीबाहेर बघत म्हणतो,
हेही वाचा – शर्वाय आणि आराध्याच्या प्रेमात माधवचा अडसर!
“कधीकधी लोक ठरवलेली भूमिका मोडून नवा चेहरा घेऊन समोर येतात… आणि काही लोक, आपल्या भूमिकांनाही अर्थ देऊन जातात.”
आराध्या नकळत त्याचं म्हणणं समजून घेऊ लागते. या प्रवासात काहीतरी वेगळं फुलणार आहे, असं तिच्या मनाला जाणवतं…
शर्वाय आणि आराध्या कॉन्फरन्सच्या ठिकाणी पोहचतात. कॉन्फरन्सचं आयोजन एका समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या प्रीमियम रिसॉर्टमध्ये केलेलं असतं. प्रवासादरम्यान शर्वायने ठरवलेलं होतं —
“आराध्या माझ्यासोबत आहे, ही गोष्ट माधवच्या कधीच लक्षात यायला नको.” त्यामुळे त्याने कंपनीच्या सिस्टममध्ये तिचं नाव ‘external consultant’ म्हणून दाखवलं होतं.
गाडी रिसॉर्टच्या गेटपाशी थांबते. रिसेप्शनवर आधीच सगळं बुकिंग शर्वायने व्यवस्थित करून ठेवलेलं होतं. शर्वाय हलक्या आवाजात आराध्याला बोलतो…
“तुला इथे कुणी विचारलं तर, फक्त एवढंच सांगायचं — तू एक कन्सल्टन्ट आहेस. मी बाकी सांभाळतो.”
आराध्या थोडीशी गोंधळलेली होती, पण त्याच्या बोलण्यातल्या आत्मविश्वासामुळे तीही शांतपणे मान डोलावते.
कॉन्फरन्सचा पहिला दिवस…
आराध्याने अंगात निळसर रंगाचा कुर्ता घातलेला होता — नाजूक सिल्क फॅब्रिकमध्ये तिचं सोज्वळ सौंदर्य खुलून आलं होतं. केस मोकळे, चेहऱ्यावर सौम्य आत्मविश्वास… आणि डोळ्यांत किंचित भीती!
कॉन्फरन्स हॉलमध्ये अनेक मोठ्या कंपन्यांचे सीईओ, सीएसआर प्रतिनिधी आणि इन्व्हेस्टर्स जमा झालेले होते. शर्वायने मुद्दाम आराध्याला एका छोट्याशा सादरीकरणासाठी तयार केलं होतं — एका उपक्रमाची माहिती.
शर्वाय तिच्या शेजारी उभा राहून — न बोलता आधार देत असतो… आराध्या काहीशी भीत भीत स्टेजवर जाते. ती बोलायला सुरुवात करते… सुरुवातीला बोलताना जरा थरथरत होते, पण काही क्षणातच तिचा आवाज स्थिर होतो. आपल्या संयमी बोलण्यातून तिनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
स्टेजवरून खाली उतरताना आराध्याची नजर शर्वायच्या डोळ्यांना जाऊन भिडते — त्यात तिला कौतुक, आदर, आणि एक अनामिक जिव्हाळा दिसून येतो…
शर्वाय….”खूप छान केलंस. I’m proud of you.”
तेवढ्यात तिथल्या एका वरिष्ठ अधिकार्याने त्याला विचारलं, “शर्वाय, ही कोण आहे? तुमच्या टीममधली?”
शर्वाय थोडे हसत हसत, पण ठामपणे म्हणाला, “ज्याचं नाव अजूनही मी खूप जपून ठेवतोय… आमच्या असिस्टंट कन्सल्टन्ट आहेत.”
त्या रात्री, कॉन्फरन्सनंतर रिसॉर्टच्या लॉनमध्ये दोघेच बसलेले होते. सर्वत्र शांतता… समुद्राच्या लाटांचा अनुभव घेत असता मधेच शर्वाय म्हणतो…
“कधी कधी वाटतं, या कामाच्या गदारोळात हरवलेला मी… अचानक तुझ्यासारखं कुणीतरी भेटावं – जे फक्त मला समजून घेतं… आणि काही विचारत मात्र काही नाही!”
हे ऐकून आराध्या फक्त हसते… आणि त्या क्षणी त्यांची नजर एकत्र एकमेकांवर स्थिरावते…. काही न बोलताही ते खूप काही बोलून जातात…
रात्रीच्या त्या रम्य गारव्यात, समुद्राच्या लाटा शांतपणे किनाऱ्यावर आदळत होत्या. एकमेकांच्या मूक सानिध्यात रममाण झालेले ते दोघंही आपापल्या रूममध्ये गेले, पण मन मात्र अजूनही त्या एकत्र घालवलेल्या क्षणांत गुंतलं होतं. त्या अस्तित्वाची ओढ त्या दोघांनाही जाणवत होती…
आराध्या आपल्या रूमच्या खिडकीतून बाहेर पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर एक हसू होतं. शर्वायने घेतलेली तिची काळजी, त्याच्या डोळ्यातली आपुलकी आणि तिच्याशी बोलताना उमटणारा तो सौम्य भाव — सारं काही तिच्या मनाच्या कप्प्यात एका सुंदर आठवणीसारखं जागा करत होतं.
“तो इतका कठोर का वाटायचा आधी?” ती स्वतःलाच विचारते, “…आणि आता? इतका शांत, समजूतदार, जणू माझं मूक संरक्षण करणारा…”
त्याचवेळी, शर्वायही आपल्या रूममध्ये शांत बसला होता. हातात कॉफीचा मग होता, पण त्याच्या डोळ्यांत आराध्याचं प्रतिबिंब उमटलेलं! तिचा गोंधळलेला चेहरा, ते लाजून नजर खाली करणे, तिचा निखळ साधेपणा…
“ती वेगळी आहे…” त्याच्या मनात विचार घोळतो, “पण हे वेगळेपणच इतकं सहज आहे की, नकळत जवळ येतंय.”
एकाच वेळी दोघंही खिडकीपाशी असतात… वेगवेगळ्या रूम्स, पण एकाच चंद्राकडे पाहताना त्यांच्या मनात हलकेच एकच विचार उमटतो…
“काहीतरी बदलतेय आणि ते मनापासून वाटायला लागलंय… मन तिकडे ओढ घेऊ लागलंय… रोज भेटावंसं वाटतंय, बोलावंसं वाटतंय… पाहावंसं वाटतंय… हे आहे तरी काय?”
त्या रात्रीच्या गारव्याने, फक्त हवेतच नाही, तर दोन मनांमध्येही एक नाजूक प्रेमाचा स्पर्श केला होता — प्रवास सुरू झाला होता, प्रेमाच्या नव्या अध्यायाचा!
कॉन्फरन्सचा दुसरा दिवस उजाडला. सकाळपासून एक औपचारिक, पण उत्साही गडबड होती. विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, उद्योगपती आणि विश्लेषक आपल्या जागांवर बसलेले, एकमेकांचे विचार ऐकण्यासाठी सज्ज होते… आजच्या सत्रात “नवीन उद्योग धोरण आणि युवा दृष्टिकोन” या विषयावर चर्चा होती — आणि जहागिरदार इंडस्ट्रीजकडून एक नवं, तरुण, पण तितकंच प्रभावी प्रतिनिधित्व करणार होती आराध्या! शर्वायने तिचं नाव सुचवलं होतं आणि तिनेही नकार न देता स्वतःला सिद्ध करायचं ठरवलं होतं.
तिचं नाव पुकारलं जाताच, आराध्या संयमानं आणि आत्मविश्वासानं स्टेजवर पोहोचली. सोज्वळ पण आत्मभानाने परिपूर्ण अशा तिच्या वेशभूषेने आणि व्यक्तिमत्त्वाने क्षणभर सगळं सभागृह शांत झालं. सुरुवातीच्या शब्दांपासूनच लोकांचं लक्ष तिने खिळवून ठेवलं…
“जहागिरदार इंडस्ट्रीजसाठी नफा ही एकमेव गोष्ट नाही — तर नव्या पिढीच्या गरजा, शाश्वत विकास, आणि सामाजिक जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे…” असं सांगतानाच तिनं आपल्या सादरीकरणात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीवर भर देणाऱ्या प्रकल्पांबद्दल माहिती दिली. महिलांना सक्षम बनवणाऱ्या पॉलिसीज्, तरुणांच्या उद्योजकीय कल्पनांना आधार देणारी रचना आणि सस्टेनेबल मॅन्युफॅक्चरिंगवर कंपनीचा कल स्पष्ट करत, तिने सर्वच उपस्थितांची मने जिंकली.
शेवटी तिने म्हटलं…
“युवती म्हणून माझा दृष्टिकोन हेच आमच्या कंपनीचं नवं बळ आहे… आणि आज मला अभिमान आहे की मी त्याचा एक भाग आहे.”
सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला…
हेही वाचा – माधवनं शर्वायसाठी नेमकं कोणतं स्थळ दाखवलं?
समोर बसलेला शर्वाय, शांतपणे तिच्या सादरीकरण पाहत-ऐकत होता. त्याच्या चेहऱ्यावर फक्त व्यावसायिक समाधान नव्हतं, तर एक गर्व होता — तिच्यावर, तिच्या विचारांवर आणि तिच्या अस्तित्वावर…
त्याच क्षणी, एक शंका मात्र त्याच्या मनात आली — “हीच ती…? जिला मी फक्त एक साधा भाग समजत होतो, पण जिचं भविष्य आज माझ्या स्वप्नांचाही भाग होतंय…”
हा दिवस आराध्याच्या सशक्त अस्तित्वाची आणि त्यांच्या नात्यातील नव्या जवळीकीची साक्ष देणारा ठरला होता…
क्रमशः
शर्वाय तर बदलू लागला… आता काय होईल पुढे,, जेव्हा आनंदी मांडेल लग्नाचा प्रस्ताव?


