पंचतारांकित हॉटेल्स म्हणजे एक वेगळीच दुनिया. तिथे समाजातल्या वरच्या थरातल्या, उच्चभ्रू लोकांचा वावर… चकचकाट आणि झगमगाट पैशांचा, सुबत्तेचा आणि आढ्यतेचा. तोऱ्यात मिरवणारे देशी, विदेशी पाहुणे, त्यांच्यासमोर मर्यादशील वागणारे आणि बोलणारे, पढवलेले कर्मचारी, असा सगळा माहौल.
मोठमोठ्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये काम केलेले बरेच जण आहेत माझ्या ओळखीचे. त्यांच्याशी बोलताना बऱ्याच सुरस कहाण्या ऐकायला मिळतात, याच थरातल्या लोकांच्या! आपण कधीही न ऐकलेल्या आणि कधीही न अनुभवलेल्या…
तशीच एक कहाणी.
मुंबईतलं एक प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेल. कॉर्पोरेट इंडियाच्या आणि सरकारातल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा, परदेशी पाहुण्यांचा सदैव राबता असलेलं… असाच एक मोठ्या हुद्दयाचा सरकारी अधिकारी महागड्या गाडीतून उतरून, उंची कपडे लेऊन, चेहेऱ्यावर उर्मट भाव वागवत हॉटेलमध्ये यायचा. प्रत्येक वेळी, कोणीतरी कंत्राटदार हॉटेलची महागडी आलिशान खोली बुक करून ठेवत असे, त्याच्यासाठी…
एक किंवा दोन रात्रींचा मुक्काम करून गडी जायचा. दिवसभर बरीच लोक येऊन भेटून जायची. दोन-तीनदा मुक्काम झाला होता त्याचा या हॉटेलमध्ये. आताची चौथी किंवा पाचवी भेट असावी.
त्या दिवशी तो असाच हॉटेलला आल्यावर हॉटेल कर्मचाऱ्यांची नेत्रपल्लवी झाली आणि या महाशयांचं आगमन झाल्याची वर्दी हॉटेलच्या जनरल मॅनेजरकडे गेली. ते स्वतः येऊन कोण हा माणूस नक्की, ते बघून गेले. यावेळी त्यांचा दोन रात्रींचा मुक्काम होता.
हेही वाचा – एका केरसुणीची कहाणी…
तिसऱ्या दिवशी जेव्हा ते चेक आऊट करण्यासाठी खाली आले, तेव्हा तिथल्या मुलीने पटकन एक फोन फिरवला आणि नेटवर्क नाहीये, या बहाण्याने त्या महाशयांना जरा बसायला सांगितलं. चुळबुळ करत, ते काहीशा नाराजीनेच बसले.
जवळजवळ दहा मिनिटे काहीच हालचाल न झाल्याने, रागारागात उठून परत ते बिलिंग काऊंटरला जाणार, इतक्यात जनरल मॅनेजर आणि हॉटेलचा मुख्य सुरक्षा अधिकारी त्यांच्याकडे पोहोचले. थोड्या अदबीने, होत असलेल्या विलंबाबद्दल माफी मागितली त्यांनी आणि मग शब्दांची जुळवाजुळव करत म्हणाले, “माफ करा, पण आम्हाला तुमच्या बॅग्ज तपासाव्या लागतील.”
हे ऐकताच महाशयांचा पारा चढला आणि त्यांनी अद्वातद्वा बोलायला सुरुवात केली… “मी कोण आहे ठाऊक आहे का तुम्हाला? माझ्यावर संशय घेता? हॉटेल चालवणं मुश्किल करून टाकेन मी तुम्हाला…” वगैरे वगैरे.
अशा ग्राहकांना हाताळण्याचं प्रशिक्षण घेतलेले हॉटेलचे ते दोन्ही कर्मचारी, हा भडिमार अत्यंत शांतपणे सहन करत होते. सभ्य शब्दांत त्यांना समजावायचा त्यांचा प्रयत्न सुरू होता, पण तो उच्चपदस्थ काहीही ऐकून घ्यायच्या मन:स्थितीत नव्हता. त्याचा एकच धोशा, “मला निघायचं आहे आणि मी माझ्या बॅग्स तपासू देणार नाही, कुठल्याही परिस्थितीत!” वाद विकोपाला चालला होता आणि दोन्ही बाजू आपापल्या म्हणण्यावर ठाम होत्या.
यावर एक सगळ्यात सोपा उपाय म्हणजे पोलिसांना पाचारण करणे, पण स्वतःच्या प्रतिमेबद्दल खूपच जागरूक असणारी ही हॉटेल्स, दुसरा काही पर्याय नसेल तरच तो मार्ग चोखाळतात. शक्यतो, अशी प्रकरणं आपसात मिटवण्याकडेच कल असतो त्यांचा! इथेही त्यांचा तोच प्रयत्न सुरू होता, पण उपयोग होत नव्हता. शेवटी, सुरक्षा अधिकाऱ्याने ते ब्रह्मास्त्र वापरण्याचा निर्णय घेतला आणि तो म्हणाला, “साहेब, तुम्हाला तुमच्या बॅग्ज उघडणे मान्य नसेल, तर आमच्याकडे पोलिसांना बोलावण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.”
हे ऐकताच, अधिकारी महाराजांच्या चर्येवरचे रंग पालटले आणि आत्तापर्यंतची मग्रूरी थोडी निवळली. प्रकरण पोलीसात गेलं तर दुनियेत बभ्रा होईल हे जाणवून, ते सहकार्य करायला तयार झाले.
बॅगा तिथे स्वागतकक्षात उघडायच्या, का आत जनरल मॅनेजरच्या कक्षात नेऊन उघडायच्या असे दोन पर्याय होते, पण सगळ्यांच्या समोर अब्रूचे धिंडवडे नको म्हणून त्या खासगीत उघडायचे ठरले आणि वरात निघाली आतल्या बाजूला…
बॅगेत काय निघणार हे सगळ्यांनाच ठाऊक होतं, कारण हा सगळा तमाशा खाली सुरू असताना, हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी खोलीची तपासणी करून गहाळ वस्तूंची यादी तयार करून ठेवली होती.
पुरावा म्हणून मोबाइल कॅमेऱ्यात चित्रीकरण सुरू झालं आणि मग बॅगा उघडल्या गेल्या. चांदीच्या वर्खाचे उंची काटे, चमचे आणि सुऱ्या, वाट्या, ताटल्या, बाथरोब, महागातले टॉवेल्स, हात पुसायचे रुमाल, चहाचे कप आणि बशा, पाणी प्यायचे महागडे ग्लास, हेयर ड्रायर, शाम्पूच्या बाटल्या असा मुद्देमाल जसजसा बाहेर पडत गेला, तसतसे साहेबांच्या चेहेऱ्यावर घर्मबिंदू डंवरायला लागले. सगळा ताठा, सगळा माज उतरला आणि हात नकळतच जोडले गेले, क्षमा याचनेसाठी!
या आधी जेव्हा जेव्हा ते हॉटेलमध्ये आले होते, त्यावेळी काही छोट्या गोष्टींवर त्यांनी डल्ला मारला होता आणि त्या चोऱ्या पचल्या असं वाटून, आज त्यांनी बऱ्याच वस्तू सोबत घेतल्या होत्या. त्यांचं वर्तन लक्षात आलेलं असल्यामुळे, यावेळी त्यात कोलता घालायचा, हे हॉटेलने पक्कं ठरवून त्याप्रमाणे सगळं नियोजन केलं होतं आणि सावज अलगद जाळ्यात सापडलं होतं.
‘मार दिया जाय, के छोड दिया जाय…’ हे आता हॉटेलने ठरवायचं होतं. साहेब आता क्षमा याचना करायला लागले, गयावया करायला लागले, पण हे आता चोरीचं प्रकरण होतं. प्रक्रियेप्रमाणे, पोलीस तक्रार करणं क्रमप्राप्त होतं आणि पावलं त्या दिशेने पडायला लागली होती. हवालदिल झालेले साहेब, हे थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते….
सरते शेवटी, साहेबांचा हुद्दा आणि वय लक्षात घेता, हॉटेल व्यवस्थापनाने थोडं नमतं घेतलं आणि एक माफीनामा लिहून घेऊन, सगळा मुद्देमाल ताब्यात घेऊन त्यांची मुक्तता केली… त्यांना जन्माची अद्दल घडवून! अर्थात, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, हे तितकंच खरं पण प्रकरण जास्त ताणायची हॉटेलची पण इच्छा नव्हती.
हे असं बऱ्याच जणांच्या बाबतीत घडतं. मानसिक आजार आहे हा, क्लेप्टोमेनिया नावाचा! यात गरज नसताना चोरी करण्याची उबळ येते आणि माणूस याला बळी पडतो. या चोरीतून आर्थिक फायदा अपेक्षित नसतो, चोरी करणाऱ्याला या वस्तूंची फार गरज असतेच असंही नाही, आपण करतोय ते चूक आहे, हे कळूनसुद्धा चोरीसाठी हात शिवशिवतात आणि मग स्वतःवरचा ताबा जाऊन माणूस हे करण्यासाठी उद्युक्त होतो.
हेही वाचा – दूरदर्शन… कृष्ण-धवल आठवणींना उजाळा!
या अशा चोऱ्या करणाऱ्याला, आपल्याला काहीतरी मानसिक आजार जडलाय याची जाणीवही नसते आणि समाजातही याविषयी फारशी जागरूकता अजूनही नसल्यामुळे खूप दुर्धर प्रसंग ओढवतात, हकनाक बदनामी होते आणि माणसं आयुष्यातून उठतात. उपचार आणि समुपदेशन यामुळे हा विकार बऱ्याच अंशी काबूत ठेवता येतो, पण तो पूर्णपणे बरा होणं खूप कठीण असतं. बऱ्याच नामवंत मानसोपचार तज्ज्ञांनी आणि लेखकांनी या विकारावर अत्यंत उपयुक्त लेखन केलं आहे.
कधीकधी आपल्या कुटुंबात, मित्रमंडळीत असा एखादा निपजतो आणि मग तो कुचाळक्या, अवहेलना आणि चेष्टेचा विषय ठरतो. अशा व्यक्तीला समजून घेणं, मार्गदर्शन करणं आणि या सवयीतून बाहेर पडण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेण्यास प्रवृत्त करणं, हेच एक सुहृदय म्हणून आपलं कर्तव्य ठरतं, अशा वेळी.


