भाग – 1
मोठ्ठं, नक्षीदार कमानीचं लोखंडी गेट आणि समोर भव्य आवार. गेटच्या समोर दोन-तीन अलिशान पांढऱ्या शुभ्र गाड्या आणि आवारात इकडून तिकडे फिरणारे कार्यकर्ते. मोबाइलवर बोलणारे कांजीच्या खादी कपड्यातले काही नेते आणि धावपळ करणारे खाकी वर्दीतले नोकर. शिट्या वाजवणारे वॉचमन आणि हातातल्या रंगीत फाईली सावरत इकडून तिकडे फिरणारा पीए. ‘आमदार साहेब बाहेर कधी येतील,’ असे वारंवार विचारणारे लोक… सगळीकडे सगळ्यांचीच लगबग आणि गडबड.
ही गर्दी न्याहाळत त्या गेटजवळ उभा राहिलेला नामदेव मात्र शांत होता. त्याच्या अंगावर धुतलेला, पण फिकट झालेला पांढरा शर्ट होता. कमरेला जुनी पॅन्ट होती. पायात घासून झिजलेल्या चपला होत्या. डोक्यावर उन्हाचा तडाखा लागू नये म्हणून खांद्यावर टाकलेला टॉवेल होता. हातात एक लालसर रंगाची पिशवी होती. त्या पिशवीत काळजीपूर्वक ठेवलेली मुलाच्या लग्नाची पत्रिका होती. चेहऱ्यावर उत्साह होता. मनात अभिमान होता. डोक्यात एकच विचार होता, “आमदार साहेबांना पत्रिका द्यायची… नंतर उद्या परवा खासदार साहेबांनाही बोलवायचं… मोठे लोक आले तर लग्नाची शान वाढेल.”
गेली पंधरा वर्षे पक्षासाठी जीव तोडून काम करणारा कार्यकर्ता म्हणजे नामदेव. निवडणुकीत झोप न घेता बूथ सांभाळणारा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणजे नामदेव. पोस्टर लावणारा कार्यकर्ता म्हणजे नामदेव. रात्री दोन-दोन वाजेपर्यंत सभा संपल्यानंतर खुर्च्या उचलणारा जबाबदार कार्यकर्ता म्हणजे नामदेव. मोर्चा असेल तर पहिल्या रांगेत चालणारा कार्यकर्ता म्हणजे नामदेव. पोलिसांचा लाठीचार्ज झाला तर, छाती पुढे करून उभा राहणारा निर्भय कार्यकर्ता म्हणजे नामदेव…!
पण त्याने कधी आमदार साहेबांकडे काही मागितलं नव्हतं. ना ठेका, ना पद, ना पैसा. इच्छा फक्त एक होती, “हा आपला माणूस आहे,” अशी ओळख असावी. बस्. पण इथली गर्दी मात्र वेगळीच होती. ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर, बिअर बारचे लायसनवाला, कुणाला नोकरी, कुणाची बदली, कुणाच्या जमिनीचा वाद प्रत्येकाचे काहीतरी काम. लॅंड रोव्हर डिफेंडर, टोयाटा फॉर्च्युनर, महिंद्रा थार, इनोव्हा, बीएमडब्ल्यू दिमाखदार रथांची रांगच आमदारांच्या बंगल्याबाहेर उभी होती. लोखंडी गेटवर सूर्यकिरणांचे सोनेरी थर चमकत होते. त्या गाड्या जणू सत्तेच्या वैभवाला चाकं फुटली आहेत, अशा थाटात ताठ उभ्या होत्या. प्रत्येक वाहनाचा रुबाब असा की, पाहणाऱ्याच्या नजरा क्षणभर थबकाव्यात. बंगल्याच्या प्रवेशद्वाराशी त्या केवळ गाड्या नव्हत्या, तर ऐश्वर्य, ताकद आणि प्रतिष्ठेचे मूक पहारेकरीच उभे होते.
हेही वाचा – …अन् संदीपने स्वतःचा स्वाभिमान वाचवला!
पीएने कालच नामदेवला फोनवर सांगितलं होतं, “सकाळी साडेनऊला या. आमदार साहेबांना सांगितलंय. दोन मिनिटांत भेट होईल.”
नामदेव आज वेळेच्या आधीच आला होता. कारण घरात पहिल्यांदाच मोठं कार्य होतं. मुलगा शिकून नोकरीला लागला होता. कष्टाने संसार उभा केलेल्या बापासाठी हा दिवस मोठा होता. त्याला वाटलं, साहेबांना पत्रिका दिली, त्यांनी दोन शुभेच्छा दिल्या, तर मुलालाही आनंद होईल.
साडेनऊ वाजले. पीए बाहेर आला. नामदेव गर्दीतून वाट काढत त्याच्याजवळ पोहोचला. “बसा ना थोडावेळ, साहेब अजून उठतायत.”
नामदेव हसला… “ठीक आहे.”
दहा वाजले. नामदेव लक्ष देऊ लागला. पीए दिसल्याबरोबर पुन्हा विचारलं तर उत्तर आलं, “रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम होते. साहेब चार ठिकाणी गेले होते. थोडा वेळ द्या.”
नामदेव पुन्हा शांत बसला.
अकरा वाजले. उन्हं डोक्यावर आली. अंगणातील सावलीही सरकली. आवारातील महागड्या गाड्यांमधील एक एक व्हीआयपी माणूस वरच्या मजल्यावर जाऊन दहा वीस मिनिटांत परत येत होता. आवारातील एक एक गाडी कमी होत होती. पीएला विचारल्यावर पीए म्हणायचा, “मंत्रालय स्तरावरील मीटिंगा चालू आहेत. थोड्या वेळात साहेब खाली येणारच आहेत. त्यावेळी तुम्ही भेटा.”
नामदेवने टॉवेलने घाम पुसला. चहा सोडला तर पोटात सकाळपासून काही नव्हतं. पण उठून जावं, असं त्याला वाटेना. कारण मनात आशा होती, साहेब आता येतील… थोड्या वेळातच येतील…
आज घरी अजून कितीतरी कामं होती. मंडपवाल्याला ॲडव्हान्स द्यायचा होता. किराणाच्या दुकानात उधारीची विनंती करायची होती. जवळच्या नातेवाईकांना अजून पत्रिका द्यायच्या होत्या. मुलीसाठी चप्पल आणायची होती. घराच्या मागच्या भिंतीला चुन्याचा हात द्यायचा होता. आचारी बोलवायचा होता. गरीबाच्या घरात लग्न म्हणजे उत्सव कमी आणि परीक्षा जास्त!
तरीही नामदेव थांबला. कारण तो कार्यकर्ता होता… ज्याने आयुष्यभर वाट पाहणं शिकलं होतं. सभा संपेपर्यंत वाट पाहणं. तिकीट मिळेल म्हणून वाट पाहणं. काम होईल म्हणून वाट पाहणं. ओळख मिळेल म्हणून वाट पाहणं. साहेब येतील म्हणून वाट पाहणं…
साडेबारा झाले.
अचानक बंगल्याच्या दारात हालचाल झाली. दोन-तीन जण धावत बाहेर आले. कुणीतरी ओरडलं, “साहेब येतायत… बाजूला व्हा…” ओसरलेली गर्दी एकदम जिवंत झाली. सगळे सरसावले. हातात अर्ज, फाईली, निवेदने घेऊन लोक पुढे सरकले.
आमदार साहेब खाली आले. ताजे इस्त्री केलेले कांजीचे पांढरे शुभ्र कपडे. डोळ्यावर महागडा सोन्याच्या काड्यांचा गॉगल. हातात दोन मोबाईल. बोटात हिऱ्यांच्या चमकदार अंगठ्या. मनगटात जाडजूड ब्रासलेट. चेहऱ्यावर घाई…
लोकांनी नमस्काराचा वर्षाव केला. साहेबांनी हवेत हात हलवला. दोन-चार जणांच्या खांद्यावर हात ठेवला. कुणाला “हो बघू”, कुणाला “फोन कर”, कुणाला “पीएला भेट” असं म्हणत ते गाडीच्या दिशेने चालू लागले.
नामदेव गर्दीतून धडपडत पुढे आला.
“साहेब… साहेब…”
त्याचा आवाज गर्दीत हरवला.
तो अजून पुढे झाला. हातातली पत्रिका उंच केली.
“साहेब, मुलाचं लग्न आहे… पत्रिका द्यायची होती…”
आमदारांनी एक क्षण त्याच्याकडे पाहिलं की नाही, ते समजलंच नाही. ते फक्त म्हणाले,
“आज खूप मोठा दौरा आहे. मी उद्या किंवा परवा फ्री असेन. तेव्हा या सगळे.”
गाडीचं दार बंद झालं… गाडी सुरू झाली… क्षणात धुळीचा लोट उडाला आणि गाडी भुर्रकन निघून गेली.
गर्दी हळूहळू विरली. काही लोक नाराज होऊन निघून गेले. काहीजण पुन्हा पीएकडे वळले. काहींच्या चेहऱ्यावर सवयीचा निर्विकारपणा होता. पण नामदेव तिथेच उभा होता. हातात लग्नपत्रिका घेऊन… त्याच्या हाताची पकड घट्ट झाली होती. पत्रिकेच्या कोपऱ्यावर घामाचे डाग पडले होते. डोळ्यांतलं पाणी तो आवरत होता. त्याला रडू येत होतं का?
तर होय. पण स्वतःसाठी नाही. त्याला आठवत होतं, निवडणुकीच्या रात्री तोच घराघरांत फिरला होता. साहेबांच्या विजयासाठी घोषणाबाजी करत घसा बसला होता. स्वतःच्या मुलाच्या फीचे पैसे नसताना पक्षाच्या झेंड्यासाठी पैसे दिले होते. आज त्याला फक्त दोन मिनिटं हवी होती… एक शुभेच्छा… एक पाठीवर थाप… “नामदेवा, मुलाला आशीर्वाद. तुलाही आशीर्वाद. तुझे अभिनंदन.” बस्स!
पण तीही मिळाली नाही.
तो हळूहळू गेटबाहेर पडला. आवारात आता सामसूम झाली होती. तो हळूहळू मुख्य रस्त्याला लागला. हमरस्त्यावर मात्र गर्दी होती. गाड्या धावत होत्या. जग आपल्या गतीने चाललं होतं. नामदेवने पत्रिका पिशवीत ठेवली. पुन्हा बाहेर काढली. ती नीट केली. हाताने सुरकुत्या सरळ केल्या. त्याला अचानक स्वतःचाच राग आला.
“मी एवढा वेळ का थांबलो?”
पण लगेच मनातून दुसरा आवाज आला,
“कारण तू सच्चा होतास.”
तो चालत निघाला.
रस्त्यात एका चहाच्या टपरीवर तो थांबला. चहा मागवला. गरम कप हातात धरून बराच वेळ तो उभा राहिला. टपरीवाल्या बापूने विचारलं, “काय रे नाम्या, झाली का भेट साहेबांची?” नामदेव हलकंसं हसला. तो काहीच बोलला नाही. दूरच्या भुंड्या टेकडाकडे पाहात तसाच उभा राहिला. कारण अपमान सांगायला शब्द लागत होते, आणि त्याच्याकडे ते उरले नव्हते!
हेही वाचा – घटस्फोटाची याचिका? नव्हे, अतिअपेक्षांचा मृत्यूलेख!
बापू काही क्षण शांत राहिला. मग जवळ येऊन त्याने नामदेवच्या खांद्यावर हात ठेवला. “एक नाही, दोन नाही तब्बल सोळा वर्षे राजकारणात घालवली नामदेव. दिवस म्हणलो नाही की, रात्र म्हणलो नाही. जवानीतला बराचसा काळ मी नेत्यांच्या मागे फिरण्यातच घालवला. खूप वर्षांनी अक्कल आली. त्यावेळी वेळ निघून गेली होती. मग मी तो नादच सोडला. आता नोकरीची वेळही निघून गेली होती. मग नाईलाजाने ही टपरी चालू केली. सहा वर्षांमध्ये मी घर बांधून स्थिरस्थावर झालोय. माझा अनुभव म्हणून सांगतो नामदेव, नेत्यांच्या मागे फिरणं बंद कर. लग्नपत्रिका देण्यात वेळ घालव, पण योग्य माणसांना! ज्यांना तुझ्या आनंदाचं मोल आहे. ज्यांना तुझ्या घरचा घास गोड वाटतो. ज्यांचं तुझ्या मुलाबाळांवर प्रेम आहे, त्यांना बोलव. फक्त नाव मोठं आहे म्हणून ज्यांच्यामागे धावतोस, त्यांचा पुन्हा एकदा विचार कर.
आज समाजात एक विचित्र समजूत रुजली आहे. लग्नात आमदार आला, खासदार आला, मंत्री आला, मोठा नेता आला तर लग्न मोठं झालं, कार्यक्रम भव्य झाला, प्रतिष्ठा वाढली, समाजात वजन तयार झालं… पण खरंच असं असतं का? ज्यांच्या येण्याने तुमचं मन आनंदी होईल, घरातला प्रत्येक माणूस सुखावेल, मुला-मुलीच्या चेहऱ्यावर समाधान येईल… ते लोक मोठे असतात. खुर्चीवर बसलेला प्रत्येक माणूस मोठा नसतो. मोठेपण पदाने येत नाही, ते मनाने येतं. अनेक वेळा आपण पाहतो, मोठ्या नेत्याला बोलावण्यासाठी घरचा माणूस दिवसेन्दिवस धावतो. पीएकडे वेळ मागतो. ऑफिसबाहेर थांबतो. रांगेत उभा राहतो. एक पत्रिका देण्यासाठी तासन्तास बसतो. स्वतःचा अपमान गिळतो आणि शेवटी पत्रिका दिली गेली तर, आपण धन्य झाल्यासारखं मानतो.
परंतु लग्नाच्या दिवशी काय होतं? ते वेळेवर येत नाहीत. आले तर आधी त्यांच्यासाठी धावपळ सुरू होते. खुर्च्या बदलतात. माईक बदलतो. फोटोग्राफर धावतो. मंडपात बसलेले पाहुणे बाजूला सारले जातात. आपल्या घरचे लोक मुलाला सोडून त्यांच्यामागे धावत राहतात. ज्या लोकांनी खरंच प्रेमाने वेळ काढून कार्यक्रमाला हजेरी लावलेली असते, त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. कधी कधी तर आपली वडीलधारी मंडळी तासन्तास उभी असतात, पण नेत्यासाठी मखमली खुर्ची ठेवलेली असते. हे दृश्य पाहून कितीतरी माणसांच्या मनाला टोचत असेल, “आपण इतके दुय्यम आहोत का?” लग्न म्हणजे दोन जीवांचा, दोन कुटुंबांचा, दोन संसारांचा मंगल सोहळा. तो दिखाव्याचा बाजार नाही. तो पदपथावरील जाहिरात फलक नाही. तो समाजात वजन दाखवण्याचा कार्यक्रम नाही.”
नामदेव शांतपणे ऐकत होता. त्याने चहा संपवला. उठता उठता म्हणाला, “बापू खरंच, तुझे बोल अनुभवाचे आहेत.”
तो घराच्या दिशेने चालू लागला.


