युवल नोआ हरारी लिखित आणि वासंती फडके अनुवादित ‘सेपियन – मानवाचा संक्षिप्त इतिहास’ हे पुस्तक हिब्रू भाषामध्ये 2011 साली प्रसिद्ध झाले आणि इंग्लिशमध्ये 2014 साली, तेव्हापासून जगभर गाजते आहे. आतापर्यंत 65 भाषांत अनुवादित झाले आहे. 498 पानांचे हे पुस्तक अक्षरशः आपल्याला खिळवून ठेवते. हे पुस्तक जसे मला मैत्रिणीने आग्रहाने वाचायला लावले, तसे कोणाच्या मित्राने, भावाने, भावाच्या मित्राने, बहिणीने, ट्रेनमधल्या मित्राने, ग्रंथपालाने, पुस्तकमैत्र समूहाने एकमेकांना सांगितले.
समाजमाध्यमांतून यावर लिहिले गेले. असे म्हणतात, जेव्हा ‘गीता रहस्य’ प्रसिद्ध झाले होते, तेव्हा आपल्याकडे लोक ते हातात घेऊन रस्त्यातून मिरवत असत! असेच इम्प्रेशन मारण्यासाठी सुद्धा ‘सेपियन – मानवाचा संक्षिप्त इतिहास’ पुस्तक लोकांनी विकत घेतले आणि दिवाणखान्यात सजवून ठेवले. गेल्या दशकातले सगळ्यात जास्त गाजलेले हे पुस्तक आहे. लेखकाच्या अनेक मुलाखती समाजमाध्यमांवर आहेत.
बव्हंशी लोकांना आवडले, अर्थात टीकाही झाली. पण पुस्तकाची दखल घ्यायला लागली. मी हे पुस्तक वाचल्यावर जो भेटेल त्याला सांगितले (नंतर लोक आधीच ‘हो, सेपियनबद्दल म्हणालीस तू’ असं सांगून टाकायला लागले!) इतके मला आवडले होते.
लेखकाने या पुस्तकाचे वेगळेपण सांगताना म्हटले आहे, इतिहासाची पुस्तके महान व्यक्तींचे विचार, वीरांचे शौर्य, संतांची शिकवण, कलाकारांची सृजनात्मकता यावर प्रकाशझोत टाकतात. साम्राज्याचे उदयास्त, समाजाची गुंतागुंत तसेच शोध आणि तंत्रज्ञान याबद्दल सांगतात. पण या सर्वांमुळे माणसाचा आनंद कसा वाढला आणि दुख कसे कमी झाले हे सांगत नाहीत. आपल्या इतिहासाच्या अभ्यासात हीच मोठी पोकळी आहे. ती आता भरायला सुरवात केली पाहिजे.
माणसाच्या इतिहासावरचे हे पुस्तक आहे. पृथ्वीवर माणसाचे पहिले पाउल पडले तेव्हापासून कृत्रिम बुद्धिमत्ता उंबरठ्यावर उभी राहिल्यापर्यंतचा इतिहास. करोडो वर्षांचा इतिहास सांगत माणसाची उत्क्रांती कशी झाली? हे वेगळ्या दृष्टीकोनातून लिहिले आहे. हरारी म्हणतात, त्यांनी अनेक पुस्तके वाचून माहिती एकत्र करून लिहिले आहे. म्हणजे हे त्यांचे मुलभूत संशोधन नाही. त्यांनी तीच माहिती रंजकतेने सोपी करून सांगितली आहे. ज्ञानक्रांती, कृषीक्रांती, मानवाचे एकत्रीकरण, वैज्ञानिक क्रांती अशा चार भागांत विभागून मोठा काळ या पुस्तकात मांडला आहे.
होमो सेपियन म्हणजे आपण जन्माला येण्याआधी होमोच्या इतर प्रजाती (उदा. होमो निएंडरथाल) पृथ्वीवर नांदत होत्या. बदल घडत-घडत आजचा माणूस झाला, टिकला. चार पायांचा माणूस उभा राहिला. त्याला दोन हात मिळाले, त्यामुळे झालेला फायदा आणि तोटा, नंतर ज्ञानक्रांती झाली, नेणिवा समृद्ध होऊ लागल्या, संस्कृती निर्माण झाली… शेती सुरू झाली… नगरे, महानगरे, राष्ट्र वसली. असे अनेक टप्पे ते आपल्या खास शैलीत सांगताना काही न दिसलेल्या गोष्टी दाखवतात आणि आपण स्तिमित होतो.
हेही वाचा – Bookshelf : अर्थपूर्ण जगण्याचा दृष्टीकोन देणारे Man’s search for meaning
शेतीचा नक्की फायदाच झाला का? भटका असलेला माणूस एकाजागी का राहायला लागला? या प्रश्नाची उत्तरे देताना ते वैज्ञानिक क्रांतीकडे वळतात. ते शेतीला इतिहासातली सर्वात मोठी फसवणूक म्हणतात. युरोपियन लोकांनीच जग का जिंकले? हा प्रश्न सर्वांनाच पडतो. त्याचेही सयुक्तिक उत्तर ते देतात. राष्ट्र आणि पैसा या दोन संकल्पनांकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टीकोन चकित करणारा आहे.
माणूस हा गप्पिष्ट प्राणी आहे. भाषा बोलता आल्यामुळे जे अस्तित्वात आहे आणि जे कल्पनेत आहे, असे दोन्ही इतरांना सांगता आले. माणसाचा कथांवर, कल्पनांवर विश्वास बसतो म्हणून तो एकमेकांना, अगदी अनोळखी माणसांना सहकार्य करतो. माणूस जगावर राज्य का करतो? या प्रश्नाचे उत्तर ते देतात. माणसाचा आनंदीपणा मोजता येईल का? असाही प्रश्न ते विचारतात. जसा मूर्खपणा मोजता येत नाही, तसा आनंदही. विज्ञानामुळे कल्पनातीत ताकद आणि ऊर्जा माणसाला मिळाली आहे. पण तरीही तो आनंदी नाही. निसर्गाला आपण आनंदी असण्याशी काही देणेघेणे नाही आणि परोपकाराशी सुद्धा! जीव वाचवणे आणि वंशसातत्य टिकवणे ही प्रत्येक प्राण्याची कर्तव्य आहेत. प्राण्याचा मेंदू आहार, निद्रा, भय आणि मैथुन या चार भावना ओळखतो.
ज्ञानक्रांती झाल्यावर माणसाने स्वतःची दुःख कमी करायचा प्रयत्न केला, त्याचवेळी इतर प्राण्यांचे जगणे वेदनादायक केले. सृष्टीची हानी केली. एक दिवस पृथ्वीवरचा कच्चा माल संपेल तेव्हा काय होईल? हा लेखकाने विचारलेला प्रश्न अवाक करतो. कीर्तिमुख राक्षसाची कहाणी आपल्याला माहीत असते. त्याला इतकी वखवख सुटली की, त्याने स्वतःचेच शरीर खायला सुरुवात केली, शेवटी फक्त डोके उरले. एक दिवस आपलीही तीच गत होईल!
जी. ए. कुलकर्णींचा ‘अश्वत्थामा’, दुःखाचे कारण शोधायला निघालेल्या गौतम बुद्धाला सांगतो की, ‘माणसाचे जीवन सुंदर आहे; कारण त्याच्या शेवटी मृत्यू आहे.’ अश्वत्थाम्याचे दुख अमरत्वाचा शाप हे आहे. वैज्ञानिक क्रांतीमुळे माणूस अमर झाला तर – ग्रीन माइल्स सिनेमात नायक म्हणतो, मी जीवन नावाच्या रोगाने पछाडलेला आहे (I am infected with life)… हरारी हाच प्रश्न विचारतात.
हेही वाचा – जापनीज वाइफ… अजब प्रेम की गजब कहानी!
माणूस देव होण्याच्या प्रयत्नात आहे. म्हणजे, निसर्गात इतकी ढवळाढवळ करून नवीन जीव जन्माला घालायचे किंवा नष्ट झालेल्या प्रजाती पुन्हा जन्माला घालायच्या. अमरत्व प्राप्त करायचे. थोडक्यात, जीवन आणि मृत्यूची दोरी आपल्या हातात घ्यायची. ‘ज्युरासिक पार्क’ सिनेमा आठवला असेलच! पण पूर्वीचा नीएंडरथाल सारखा बलिष्ठ मानव आपण जन्माला घातला आणि तो आपल्याच जीवावर उठला तर, आपण सेपियन म्हणजे बुद्धिमान हुशार माणूस तरी म्हणून घेऊ शकू का? की homo stultas म्हणजे मूर्ख माणूस होऊ?
माणसाच्या इतिहासाच्या या कथनातून आपण सैरसपाटा करून येतो. हजारो वर्षांचा सेपियन समजून घेताना आपण स्वतःलाच समजून घेत असतो. अनेक समजूती पुसून टाकतो, नवी माहिती घेतो. डोळ्यात झणझणीत अंजन घातले जाते आणि विचारांना खाद्य मिळालेले असते. कॅलिडोस्कोपमधून माणसाचा इतिहास पाहात असल्यामुळे अनेक न दिसलेले, दुर्लक्षित कानेकोपरे दिसतात, वेगवेगळ्या कोनांतून आपलेच दर्शन घडते.
एवढे महत्त्वाचे, अचंबित करणारे पोटात टिकणे शक्यच नसते आणि मग ही ताजा खबर द्यायला गप्पिष्ट आपण फोन उचलतो!


