भाग – 1
घड्याळाचा काटा जसजसा पुढे सरकत होता, तशी माझ्या मनात धाकधूक वाढत चालली होती. ते सगळं अचूक ओळखून दिप्ती काकूने म्हणजे अजितदादांच्या बायकोने मला शेवटी विचारले, “सुहास तुझा चेहरा का असा पडलाय?” हे ऐकून समोरच्या बेडवर शांतपणे आडवे झालेल्या दादांनी पण मला विचारले, “सुहास सगळं ठीक आहे ना?”
“हो दादा सगळं ठीक आहे,” मी जेमतेम म्हणालो खरं, तसं पण माझ्या मनात काय सुरू होते, ते मला कोणालाच सांगता येणार नव्हते. सहा महिन्यांपूर्वी अचानकपणे झालेली अरुणची भेट आठवली. त्या छोट्या गावात निराधार गरीब मुलांना शिकवण्यासाठी अरुणने मोठ्या हिमतीने सुरू केलेला तो शैक्षणिक प्रकल्प आठवला… मला दिसताक्षणी त्याने कडकडून मारलेली मिठी आठवली… डबडबलेल्या डोळ्यांनी दादा आणि काकूंची केलेली चौकशी आठवली… त्यांच्या आठवणीने गेली काही वर्षे तो जे आयुष्य जगला त्याची त्याच्या तोंडून ऐकलेली कहाणी आठवली… कधीतरी दादा आणि काकूंना भेटायला येण्याचं त्यानं दिलेलं वचन आठवलं… दादांच्या आजारपणाची बातमी कळवण्यासाठी त्याला केलेला फोन आठवला… आणि तो ठरल्या दिवशी येईस्तोवर ही बातमी कोणाला न सांगण्याचं मी त्याला दिलेलं वचन आठवलं…
माझ्या या अवस्थेतून सुटका केली, ती दारावरील बेलने. ती ऐकताच मी झटकन खुर्चीवरून उठलो. “कोण आलंय बाहेर ते बघून येतो…” असं म्हणून मी अधीरतेने मुख्य दरवाज्यापाशी आलो आणि तो उघडला.
हेही वाचा – बेसनाचे लाडू… माँची आठवण
दारात अरुण उभा होता… छोटी बॅग घेऊन!
” अरुण तू!” मी डोळ्यांवर विश्वास न बसल्यागत मोठ्याने म्हणालो.
“कोण आलंय रे सुहास?” असं म्हणत काकू स्वयंपाकघरातून बाहेर डोकावल्या आणि अरुणला अचानक दारात उभा बघून त्या जागच्या जागी थबकल्या. त्यांचा त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. त्यांचे डोळे पाणावले होते.
सावकाश पावलं टाकत त्या अरुण जवळ गेल्या. त्याच्या अंगावरून हात फिरवला आणि त्याला घट्ट मिठी मारत त्या ओक्साबोक्शी रडायला लागल्या. “डोळे मिटायच्या आधी तू भेटशील, ही आशा मी सोडून दिली होती रे…”
“माई मागचं सगळं विसरून मी, तुला आणि दादांना भेटायला आलो आहे. कसे आहेत दादा? तब्येत सुधारत आहे ना त्यांची? त्यांच्या आजारपणाचं कळलं आणि पायाखालची जमीन सरकली. जुनं सगळं विसरून भेटायला आलो आहे. अजूनही तुमचा राग गेला नसेल तर, लगेच निघून जाईन मी दादांना भेटल्यावर…” काकूंसमोर हात जोडून अरुण उभा होता.
“ते तुझे दादाच ठरवतील. तू भेटशील तेव्हा त्यांनाच विचार,” काकू अजूनही त्या धक्क्यातून सावरल्या नव्हत्या. “पण अरुणला कळलं कसं यांच्या आजारपणाचे?” काकूंना खरा प्रश्न पडला होता.
इतका वेळ शांतपणे सगळं ऐकून घेणारा मी अखेर बोलता झालो, “काकू मी सगळं सांगतो. आधी अरुणला आत येऊ दे. हातपाय धुवून दादांना भेटू दे. मग सगळ्यांच्या समोर मी सगळं सांगतो.”
अरुण हातपाय धुवून आल्यावर मी बोलायला सुरुवात केली, “गेल्या वर्षी जागतिक आरोग्य संघटनेतर्फे आरोग्यसेवेच्या वार्षिक पाहणी कार्यक्रमात सहभागी व्हायची संधी मला मिळाली होती. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या आजूबाजूला असलेल्या छोट्या छोट्या गावांतून आणि आदिवासी पाड्यातून आमचं पाहणी पथक जात होते. अशाच एका संध्याकाळी एका पाड्यावर वस्ती करण्यासाठी थांबलो असता तिथला ग्रामसेवक मी मुंबईचा आहे, हे ऐकून मला सहज बोलून गेला की, “दादा, तुमच्या मुंबईचे एक भाऊ इथे आडवाटेला एकटेच रहातात. आमच्या मुलांना पुस्तकाशिवाय अभ्यास शिकवतात. निसर्गाच्या सान्निध्यात मुलं रमतात आणि दादांनी शिकवलेलं लक्ष देऊन ऐकतात. सरकारी शाळा संपली की, भाकर तुकडा खाऊन सगळी मुलं भाऊंच्या ओसरीवर जाऊन बसतात, ते पार अंधार पडला की, घराकडे परततात.”
“उद्या तुम्ही निघायच्या आधी मी निरोप धाडून भाऊंना बोलवून घेतो इथे. तुम्ही भेटा त्यांना. दोघांनाही बरं वाटेल.”
दुसऱ्या दिवशी पक्षांच्या किलबिलाटात जाग आली. आमचा चहा आणि न्याहरी होत असतानाच आरोग्य सेवक सांगायला आले की, भाऊ सायकलवरून यायला निघाले आहेत. आमची सामानाची बांधाबांध सुरू असतानाच बाहेर सायकलची घंटी वाजली. आम्ही उत्सुकतेने बाहेर आलो आणि माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. सायकलसोबत उभ्या असलेल्या व्यक्तीला मी लगोलग ओळखले. काकू तो तुमचा मुलगा आणि माझा अरुण दादा होता!
“अरुण तू?” मी जवळजवळ ओरडलोच आश्चर्याने.
“हो, सुहास मीच आहे. दादा, आई कसे आहेत रे? सगळं ठीक आहे ना घरी?” अरुणचा प्रश्न ऐकून डोळे पाणावले.
“सगळं ठीक आहे. पण तू इथे कसा पोहोचलास?” मी अजूनही त्या धक्क्यातून बाहेर पडलो नव्हतो.
थोडक्यात सांगतो, असं म्हणून अरुणने घर सोडल्यापासून आजपर्यंतची सगळी कहाणी मला सांगितली. ऐकून अर्थात खूप वाईट वाटलं. दादांनी ज्या कारणासाठी अरुणला घराबाहेर काढले होते, ते शेवटपर्यंत पूर्ण झालेच नाही. अरुण त्याला आवडणाऱ्या मुलीसोबत तिच्या गावी गेला, पण तिथे त्या दोघांच्या लक्षात आलं की, त्यांच्या लग्नाला सगळ्यांचाच विरोध आहे. ते दोघे नंतर थेट अमरावतीला पोहोचले आणि मिळेल ती नोकरी करत रहायला लागले. एक-दोन वर्षे नोकरी करून पैसे साठवून दोघांनी लग्न जरूर केले; पण ते जेमतेम सहा महिने टिकले. कारण दुर्दैवाने एका अपघातात अरुणची बायको तडकाफडकी गेली आणि अरुण खचून गेला. घरची खूप आठवण येत होती. त्या नादात एकदा मुंबईला येऊन गेला. पण घरी यायची हिंमत झाली नाही आणि मग उलट पावली तसाच परत अमरावतीला परतला. शेयर ब्रोकरकडे काम करताना, त्याने शेयर बाजाराचा खोलवर जाऊन अभ्यास केला आणि त्याने त्या बाजाराच्या माध्यमातून पैसे मिळवायला सुरुवात केली. इथे बऱ्यापैकी जम बसला खरा पण त्याचं मन शहरात रमलं नाही. अखेर सध्या रहातो त्या गावात तो पाच वर्षांपूर्वी रहायला गेला आणि गावातील मुलांसाठी बिनापुस्तकांची आणि बिनाअभ्यासाची शाळा त्याने सुरू केली त्याच्या घराच्या ओसरीवर. मुलांना केवळ शाळेतील विषयांच्या पुस्तकी ज्ञानात न अडकवता निसर्गाच्या सान्निध्यात तिथे असणाऱ्या गोष्टींच्या माध्यमातून त्याने मुलांना आयुष्य कसं जगायला पाहिजे, त्याचं शिक्षण द्यायला सुरुवात केली… पशुपक्षांशी त्याने मैत्री करायला लावली सगळ्यांना…”
हेही वाचा – दोन शब्द पुरे जगण्याला…
“काकू त्याच्या या आगळ्यावेगळ्या शैक्षणिक पद्धतीचे वर्णन परदेशातील एका संस्थेला समजले. त्यांनी मग प्रत्यक्ष येऊन अरुणच्या उपक्रमाची माहिती करून घेतली आणि त्यानंतर आता दरवर्षी शाळेला परदेशी मदत मिळायला लागली. अरुण रहातो तिथे बाजूलाच नुसती एक मजली शाळा बांधली नाही, त्या परदेशी संस्थेने तर, नवनवीन शैक्षणिक साहित्य आणि संगणक देखील उपलब्ध करून दिले. सरकारी माध्यमातून शाळेत आणि अरुणच्या घरात 24 तास वीज आणि इंटरनेटसाठी नेटवर्क उपलब्ध झाले आहे आता. अरुणच्या या आगळ्यावेगळ्या शाळेची कीर्ती दूर दूरवर पसरत चालली आहे… अरूणदादाच्या तोंडून त्याचा हा थक्क करणारा प्रवास आणि गावातील छोट्या मुलांना त्याची शिकवण्याची तळमळ बघून त्याच्याबद्दल मनांत असलेला राग आणि किल्मीष क्षणांत दूर होऊन त्याची जागा अभिमानाने घेतली.”
“माझी आणि दादा आईची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करशील का रे तू? असं अरुण दादाने मला विचारलं. दादाला मी ‘हो’ म्हणालो खरं, पण मुंबईला आल्यावर खूप विचार करून देखील काकू तुला आणि दादांना हे सगळं सांगायची हिंमत नाही झाली माझी! अगदी दादा आजारी पडेस्तोवर… पण म्हणतात ना, काळाच्या ओघात विनाकारण नात्यात पडलेल्या निरगाठी सोडवण्यासाठी देवच बुद्धी देतो आणि तशी परिस्थिती निर्माण करतो. इथे देखील तसंच काहीसं झालं. दोन आठवड्यांपूर्वी मी दादांना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. दादा खरंतर ग्लानीत होते, पण त्यांच्या तोंडून अरुण दादाचं नाव ऐकल्याचा भास झाला मला… एकदा नाही तर मोजून तीन वेळा! मी दादांच्या कपाळावर हात ठेवून त्यांना थोपटत असताना दादांनी अचानकपणे तो थक्क करणारा प्रश्न मला विचारला…


