ओपीडीत नेहमीप्रमाणेच पेशंटची गर्दी होती. एक पेशंट माझ्यासमोर आला. “थोडं बीपी वाढलंय… एक ईसीजी करावा लागेल,” पेशंटची लक्षणं आणि वाढलेला रक्तदाब बघून मी रुटिन सल्ला दिला. तो म्हणाला,
“डॉक्टर, मी एक साधा रिक्षावाला… रोज सकाळी लवकर उठून रिक्षा घेऊन निघतो. प्रवासी शोधतो, मीटर फिरवतो, दिवसभर शहरभर धावपळ करतो… घरी खंगलेली आई, कॅन्सर पेशंट बायको, ऐन विशीत अंगावरून वारं गेलेला मुलगा आणि मतिमंद मुलगी हे माझी वाट पाहात असतात. ईमानेइतबारे कमावलेले पैसे सगळे त्यांच्यासाठीच. कर्ज फेडायला, औषधोपचाराला, जेवणाला सगळं काही त्यांच्यासाठी… पण मी आता थकलोय… खूप थकलोय…
बायको यावेळची किमो सहन करू शकेल का, सांगता येत नाही… पण हीच एक आशा असल्याचं डॉक्टर सांगतात.
रोजचं हॉस्पिटल, आईचीही औषधं, मुलाची फिजिओथेरपी सगळं काही फक्त रिक्षाच्या कमाईतून चालवतोय… दिवसभर अर्धपोटी धावपळ करून रोज रात्री बायकोच्या डोळ्यातील वेदना पाहून काळीज पिळवटून निघतं. ती केविलवाणं हसण्याचा प्रयत्न करत म्हणते, ”काळजी करू नका, होईल सर्व ठीक…” पण तिची आणि माझीही झुंज किती कठीण आहे, ते मी मनोमन जाणतो.
एकुलता एक मुलगा… हातात आला असं वाटावं तेवढ्यात डोकंदुखीचं निमित्त झालं, बोबडी वळली… तो आता वीसचा झालाय, पण पॅरलिसीसमुळं बेडवर पडून असतो. ऐन तारुण्यात त्याची ही व्यथा! त्याला चालता यावं म्हणून किती प्रयत्न केले… फिजिओथेरपी – डॉक्टर -औषधं सगळं… पण तो हलू शकत नाही. त्याच्या डोळ्यातील निराशा पाहिली की, मला लाज वाटते. मी पोटच्या पोराला आजवर काय देऊ शकलो? फक्त प्रेम आणि अश्रू?
…आणि माझी मुलगी… माझी छोटी लाडकी परी… ती मतिमंद आहे. बोलता येत नाही नीट, समजत नाही जग… तिला शाळेत पाठवायचंय… पण खर्च? तिच्या एका हसण्यानं मला अगदी जग जिंकल्यासारखं वाटतं!
हेही वाचा – कर्तव्य, करुणा आणि बलिदानाचं प्रतीक… डॉ. कार्लो उर्बानी
पण रात्री कधी कधी छाती दडपून येते, थंड घाम सुटतो, छातीत बारीक कळ उमटते… तेव्हा प्रश्न पडतो, मी अचानक झोपेतच गेलो तर? नाही… नाही हे शक्य नाही… मला असं जाता येणार नाही!
मी जागं रहातो, मी इमानानं जगतो, कुणाला फसवत नाही, कुणाला चुकीचं बोलत नाही… रोज रिक्षा चालवतो, थकतो आणि घरी येऊन सर्वांचे भेसूर चेहरे बघतो…
हेही वाचा – मानसशास्त्रज्ञ ते जाहिरात क्षेत्रातील जादूगार!
काय सांगू? शक्ती संपत आलीय, कर्ज वाढतंय, कमाई कमी होतेय, आईच्या गोळ्या दोन दिवसांपासून संपल्यात, बायकोच्या उपचाराला पैसे नाहीत, मुलाच्या औषधालाही नाहीत आणि मुलीच्या शाळेलाही नाहीत…! कर्ज काढलं, व्याज वाढलं, लोकं तगादा लावतात… त्यांचीही चूक नाही. जीव जाण्याच्या भीतीनं रात्री झोपत नाही.. एक विचार येतो, मी मेलो तर सगळं संपेल! पण… पण… चुकून जगलो तर? हे सगळे ‘मला’ कसं सांभाळता येणार?
आज तुम्ही ईसीजी फुकट करणार, दोन दिवसांची औषधंही देणार… पण परवाचं काय? नकोच ते… माफ करा मला… फक्त एक पेनकिलर द्या… चुकीचंय हे मला माहिती आहे… पण चिंता करू नका, मी मरणार नाही, मला मरता येणारच नाही!”


