शनिवारी संध्याकाळीच आमच्या घरात रविवारच्या सकाळच्या न्याहारीची चर्चा जोर धरू लागते. साबुदाण्याची खिचडी करायची असेल तर साबुदाणा भिजवावा लागतो. आंबोळी असेल तर तशी तयारी करावी लागते, कारण न्याहारी हा एक सोहळा असतो रविवारी. अर्थात, तो सगळ्यांच्याच घरात असतो, आमचं काही फार वेगळं नाही. पोहे, उपमा, फोपो (फोडणीची पोळी) वगैरे काही असेल, तर मला स्फुरण चढतं आणि मी माझ्या पाककलेचे प्रयोग घरच्या लोकांवर करायला सिद्ध होतो. बायको तर म्हणते, “तू शेफच व्हायला हवा होतास. उगाच नको त्या क्षेत्रात मुशाफिरी करत बसलास. आमच्या डोक्याला ताप जरा कमी झाला असता आणि वेगवेगळे पदार्थही चाखायला मिळाले असते आम्हाला.”
जाऊ द्या, तो विषय नाही. ती बोलतच असते आणि मी आपला ‘नळी फुंकीली सोनारे’ या म्हणीचं पारायण करत असतो अशा वेळी, डोक्यावर बर्फ ठेवून! तर, या रविवारी उपमा करावा, असं सर्वानुमते ठरलं आणि मी स्वतःहून या चक्रव्यूहात शिरायचं ठरवलं. ती जिम्मेदारी मी ओढवून घेतली आणि म्हणालो, “कधी खाल्ला नसेल असा उपमा खाऊ घालेन तुम्हाला. समजताय काय तुम्ही?”
आता उपमा हा पदार्थ काही जगावेगळा नाही, पण स्वतःची टिमकी वाजवायची संधी मी सुखासुखी बरा सोडेन? तिला म्हणालो, “तशी कृती ठाऊक आहे मला, पण परीक्षेच्या आधी जशी उजळणी करतात तसं एकदा सांगतो मी तुला, ऐकून घे आणि चुकत असेल तर सांग.” कृती ऐकवल्यावर तिने संमतीदर्शक मान डोलावली आणि thumbs up करून मला शुभेच्छा दिल्या… भरून पावलो मी!
पहाट झाली आणि आज भैरु उठला चक्क आठ वाजता, आळोखेपिळोखे देत. रविवार अंगावर आला होता, पण उठणं तर भाग होतंच. सौ कधीच उठून कामाला लागल्या होत्या… सुट्टीच्या दिवशी चहा मीच करतो एरवी, पण आज उठायला अंमळ उशीरच झाला होता, त्यामुळे आलं घातलेला फक्कड चहा तयारच होता… ताजं वर्तमानपत्रही, त्यातल्या नव्या शब्दकोड्यासकट तयार होतं… पण मला माझं काल स्वीकारलेलं, ‘आ बैल मुझे मार’ म्हणत अंगावर घेतलेलं आव्हानही समोर दिसत होतं…
हेही वाचा – बल्लव! म्हातारी मेल्याचं दुःख नाही…
“उपमा करायचाय, आहे ना लक्षात? काल मोठ्या डिंग्या मारल्या होत्या, यांव करेन आणि त्यांव करेन म्हणून. उठा चला, कामाला लागा. वेळेवर मिळू द्या तुमचा उपमा आम्हाला,” अशी गाज आलीच.
मी मोठ्या नाखुशीनेच उठलो. रोज सगळं आयतं हातात मिळण्याची सवय झालेला मी, सिद्ध झालो स्वतःला सिद्ध करायला, पुन्हा एकदा! फ्रीजमध्ये कायकाय आहे, याचा अदमास घेतला. टोमॅटो होते, मिरच्या होत्या, कढीलिंब होतं, गाजरं होती, दोन छोटी वांगी सुद्धा होती. बाहेर टोपलीत कांदे होते… सगळं साहित्य बाहेर काढून घेतलं आणि मांडून ठेवलं ओट्यावर, चिरण्यासाठी. माझ्या प्रत्येक हालचालीवर वक्र नजर होतीच तिची. ओट्यावर वांगं बघितल्यावर मात्र ती आली तावातावात…
“उपम्यात वांगं घालणार आहेस?”
“हो, काय म्हणणं आहे? चाकोरी सोडून वेगळं काहीतरी करून बघूदे की मला!”
खाऊ का गिळू नजरेनं माझ्याकडे बघत म्हणाली, “तुझी घैसास आजी खानावळ चालवायची ना रे पनवेलला? हेच का आलं तुझ्याकडे तिच्याकडून? उपम्यात वांगं आम्ही कधी घातलं नाही आणि घालणारही नाही. मुकाट ती वांगी आपल्या जागी जाऊदेत!”
अरेच्चा, आता भूतकाळ झालेल्या खानावळीचा आणि आजीचा हा उपमर्द? मी मूग गिळून गप्प बसलो, पण मोठ्या उमेदीने नवं काहीतरी करण्याच्या माझ्या प्रयत्नावर अक्षरश: पाणी ओतलं गेलं हो!
वांग्यांची रवानगी झाल्यावर मग मी गाजर, टोमॅटो, कांदा आणि मिरच्या छान बारीक चिरून घेतलं सगळं. थोडी उदडाची डाळ पण काढून घेतली आणि मग रवा भाजायच्या मुख्य उद्योगाला लागलो. तीन जणांसाठी किती रवा लागेल, याचा अंदाज तिच्याकडूनच घेतला आणि मग कढल्यात तो काढून, भाजायला सुरुवात केली. गॅस बारीक ठेवला, म्हणजे तेवढ्यावरून परत बोलणी खायला नकोत!
मंद आचेवर रवा छान भाजून घेतला आणि मग तो वेगळ्या भांड्यात काढून ठेवला. थोडं तेल घेतलं त्याच कढईत आणि त्यात चिरून ठेवलेले जिन्नस घातले, मोहोरी घातली आणि तेवढ्यात, “हळद घालू नका, उपमा पांढरा असतो पिवळा नाही,” हे ऐकलं. हळदीचा चमचा परत डब्यात गेला…
थोडक्यात बचावलो होतो.
तापल्या तेलात सगळे जिन्नस मस्त एकजीव करून घेतले आणि मग त्यात भाजून वेगळा ठेवलेला रवा सोडला. ते मिश्रण घोळवलं थोडा वेळ आणि मग गरम करून ठेवलेलं पाणी घातलं, मीठ आणि थोडीशी साखर घालून मिश्रण हलकेच ढवळलं. गंध यात्रा सुरू झाली होती… उपमा आकाराला यायला लागला होता, माझ्या नजरेसमोर.
“झाकण ठेवा, वाफ येऊ द्या आणि शिजू द्या थोडा वेळ…”
सूचना आली आणि मी तिचं पालन केलं, तंतोतंत. झाकण ठेवलं थोडा वेळ आणि मग मधेमधे ढवळत राहिलो ते मिश्रण. गाजर आणि टोमॅटो या दोघांची गुलबट लाली उतरली होती उपम्यात माझ्या… दिसायला तरी खूप छान होता, आता चव घेतल्यावर नक्की काय ते कळणार होतं!
हेही वाचा – मी, लेक, बायको आणि कुकर!
उपमा नीट शिजल्यावर, वरून मस्त हिरव्यागार कोथिंबीरीची पखरण केली आणि तो ताटलीत काढून, लिंबू पिळून, वर शुभ्र ओल्या खोबऱ्याची सजावट करून, बायकोच्या हातात ठेवली ताटली… तिची कौतुकमिश्रित नजर एकदा ताटलीकडे, मग माझ्याकडे वळली आणि तिथेच अर्धी लढाई जिंकली मी!
“छानच दिसतोय,” म्हणत, वाफाळता उपमा फुंकर घालून निववत, पहिला घास घेतला तिने चमचाभर. “मस्त झालाय हो,” अशी वाखाणणी आली उत्स्फूर्तपणे आणि माझे ‘कष्ट सत्कारणी’ लागले. खरा नव्हता पडू शकला, पण हा अभिमन्यू मात्र चक्रव्यूहातून बाहेर पडला होता, सहीसलामत…
खाऊन झाल्यावर म्हणाली, “फोपो झाली, आमटीभात झाला, उपमा झाला. अजून उकडलेल्या बटाट्याची भाजी राहिलीये कधींची. आणूया तो योगही लवकरच.”
लक्ष्मीबाई टिळकांची क्षमा मागून, काही दिवसांनी मलाही म्हणता यायला हवं, ‘तू तर माझ्याही पुढे गेलास’, असं. मी म्हणालो, “येईल हो तो सुदिन लवकरच. पोळ्या आणि भाकरी सोडून सगळं काही करून दाखवेन तुला.”
हसत हसत ‘तथास्तु’ म्हणाली ती चक्क आणि मी रविवार सकाळच्या दुसऱ्या चहाचं आधण ठेवायला स्वयंपाकघराकडे मोर्चा वळवला. आजच्या माझ्या उपम्याला उपमाच नव्हती!


