सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
जरी तूं गोसावी आमुचा अनंता । तरि सुईं वोडण माझिया जीविता । सांटवीं पसारा हा मागुता । महामारीचा ॥383॥ आइकें सकळ देवांचिया परदेवते । तुवां चैतन्यें गा विश्व वसतें । तें विसरलासी हें उपरतें । संहारूं आदरिलें ॥384॥ म्हणोनि वेगीं प्रसन्न होईं देवराया । संहरीं संहरीं आपुली माया । काढीं मातें महाभया- । पासोनियां ॥385॥ हा ठायवरी पुढतपुढती । तूंतें म्हणिजे बहुवा काकुळती । ऐसा मी विश्वमूर्ती । भेडका जाहलों ॥386॥ जैं अमरावतीये आला धाडा । तैं म्यां एकलेनि केला उवेडा । जो मी काळाचियाही तोंडा । वासिपु न धरीं ॥387॥ परि तया आंतुल नव्हे हे देवा । एथ मृत्यूसही करूनि चढावा । तुवां आमुचाचि घोटू भरावा । या सकळ विश्वेंसीं ॥388॥ कैसा नव्हता प्रळयाचा वेळु । गोखा तूंचि मिनलासि काळु । बापुडा हा त्रिभुवनगोळु । अल्पायु जाहला ॥389॥ अहा भाग्या विपरीता । विघ्न उठिलें शांत करितां । कटा विश्व गेलें आतां । तूं लागलासि ग्रासूं ॥390॥ हे नव्हे मा रोकडें । सैंघ पसरूनिया तोंडें । कवळितासि चहूंकडे । सैन्यें इयें ॥391॥
अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः सर्वे सहैवावनिपालसंघै: । भीष्मो द्रोणः सूतपुत्रस्तथासौ सहास्मदीयैरपि योधमुख्यैः ॥26॥
नोहेति हे कौरवकुळींचे वीर । आंधळिया धृतराष्ट्राचे कुमर । हे गेले गेले सपरिवार । तुझां वदनीं ॥392॥ आणि जे जे यांचेनि सांवायें । आले देशोदेशींचे राये । तयांचें सांगावया जावों न लाहे । ऐसें सरकटितु आहासी ॥393॥ मदमुखाचिया संघटा । घेत आहासि घटघटां । आरणीं हन थाटा । देतोसि मिठी ॥394॥ जंत्रावरिचील मार । पदातींचे मोगर । मुखाआंत भार । हारपताति मा ॥395॥
हेही वाचा – Dnyaneshwari : ऐसें वाऊनि महाभयाचें भोज, एथ काय निपजवूं पाहातोसि काज
अर्थ
अहो श्रीकृष्णा, जर आपण आमचे स्वामी आहात तर, माझ्या जीविताच्या आड ढाल घाला, आणि हा विश्वरूप रूपी महामारीचा पसारा पुन्हा आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी साठवा. ॥383॥ हे सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ अशा देवा, ऐक. तू जो चैतन्य, त्या तुझ्यामुळे सर्व विश्व वसते आहे ते विसरलास आणि उलटे संहार करण्याचे काम आरंभले आहेस. ॥384॥ एवढ्याकरिता हे देवातील राजा, श्रीकृष्णा, लवकर प्रसन्न हो आणि आपल्या मायाशक्तीला आवर आणि मला या मरणासारख्या मोठ्या भयातून बाहेर काढ. ॥385॥ इतके तुला मोठ्या दीनपणे वारंवार म्हणावे, असा मी विश्वरूपाच्या योगाने खरोखर भ्यायलो आहे. ॥386॥ ज्यावेळी अमरावतीवर राक्षसांचा हल्ला आला, त्यावेळी मी एकट्याने तो परतविला आणि साक्षात् काळ समोर आला, तरी भय न धरणारा असा मी आहे, ॥387॥ परंतु देवा, ही विश्वरूप गोष्ट त्यातील नव्हे. येथे तू मृत्यूवर ताण करून या सर्व विश्वासकट माझा देखील ग्रास करण्याचा दुर्घट प्रसंग आणला आहेस. ॥388॥ प्रलयाचा वेळ नसताना मधेच कसा तू काळ प्राप्त झालास? हे त्रैलोक्य बिचारे अल्पायुषी झाले असे वाटते. ॥389॥ अरेरे! विपरीत दैवा! विश्वरूप दर्शनाने शांत व्हावे म्हणून खटपट केली, तो अकल्पित विघ्न उत्पन्न झाले. हाय! हे त्रैलोक्य आता नाहीसे होत चालले! तू हे आता गिळावयास लागलास! ॥390॥ एकसारखी तोंडे पसरून ही सैन्ये चारी बाजूंनी तू ग्रासीत आहेस, हे प्रत्यक्ष (दिसत) नाही काय? ॥391॥
तसेच राजांच्या समुदायांसह वर्तमान हे धृतराष्ट्राचे सर्व पुत्र, भीष्म, द्रोण, तसाच कर्ण, त्याप्रमाणेच आमच्या पक्षाच्या देखील मुख्य योध्यांसह- ॥26॥
हे कौरवांच्या वंशांतील वीर, आंधळ्या धृतराष्ट्राचे पुत्र नव्हेत का? अरे अरे, हे तर आपले परिवारसुद्धा तुझ्या तोंडात पूर्णपणे गेलेच म्हणावयाचे! ॥392॥ आणि जे जे यांच्या मदतीकरिता देशोदेशीचे राजे आले आहेत, त्यांची वार्ताही सांगता येणार नाही, (कोणी उरणार नाही,) असा तू सर्वांचा सरसकट ग्रास करीत आहेस. ॥393॥ मदोन्मत्त हत्तीचे समुदाय तू घटाघट गिळीत असून, युद्धभूमीवरील सेनासमुदाय तू गिळून टाकीत आहेस. ॥394॥ तोफांवरून मारा करणारे लोक आणि पायांनी चालणारे पायदळ, यांच्या झंडीच्या झुंडी तुझ्या मुखात नाहीशा होत आहेत, नाही का? ॥395॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : पैं अखंड डोळ्यांपुढें, फुटलें जैसें महाभयाचें भांडें


