Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    मुलगा राज रातोरात बदलल्याने सदानंद आणि सावित्रीबाई विचारात पडले…

    April 28, 2026

    मृत्यू… एक रूटीन!!

    April 28, 2026

    आत्मसन्मान जपलाच पाहिजे…

    April 28, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 29
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » मुलगा राज रातोरात बदलल्याने सदानंद आणि सावित्रीबाई विचारात पडले…
    ललित

    मुलगा राज रातोरात बदलल्याने सदानंद आणि सावित्रीबाई विचारात पडले…

    दिलीप कजगांवकरBy दिलीप कजगांवकरApril 28, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेखन, सदानंद सावित्रीबाई मुलाकडे, सदानंद सावित्रीबाईंचा मुलगा राज, सून नेहाचा उद्धटपणा, सासू सूनेचा बेबनाव, सासू सुनेला पाहून नेहाची नाराजी, सदानंदाची सून नेहा, सावित्रीबाईंची सून नेहा, राज आणि नेहाचा उद्धटपणा,
    प्रातिनिधीक फोटो (सौजन्य चॅटजीपीटी)
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    पूर्वार्ध

    सदानंदांनी मुलगा राजच्या दरवाज्यावरची बेल वाजवली, त्यावेळी रात्रीचे साडेनऊ वाजले होते. सदानंद आणि सावित्रीबाई सांगलीजवळील एका छोट्याशा गावात राहत होते. सहा-सात तासांचा एसटीचा प्रवास करून पुण्याला आल्यामुळे ते दोघेही खूप थकले होते.

    “कोण पाहिजे तुम्हाला?” स्लीवलेस टी-शर्ट आणि शॉर्ट पॅन्ट घातलेल्या तरुणीने दरवाजा किंचितसा उघडून विचारले.

    “सूनबाई, तू ओळखलं नाहीस का आम्हाला?”

    “मी आणि सूनबाई? अहो, अविवाहित आहे मी.”

    “कोण तुम्ही? कोणाकडे जायचं तुम्हाला?” त्या तरुणीने त्रासलेल्या स्वरात विचारले.

    “माफ करा, हे बंडूचेच घर आहे ना?” खात्री करून घेण्यासाठी सदानंदांनी विचारले.

    “नाही, नाही येथे बंडू वगैरे कोणी राहत नाही,” असे म्हणताना त्या तरुणीने दरवाजा पूर्णपणे उघडला.

    ती सदानंद आणि सावित्रीबाईंची सून नव्हती.

    हेही वाचा – म्हातारा-म्हातारी आणि मृत्यूपत्र!

    “आम्हाला आमचा मुलगा बंडूकडे जायचंय, अंधारामुळे आम्ही घर चुकलो, क्षमा असावी,” असे म्हणत सदानंद आणि सावित्रीबाई जायला निघाले; तेवढ्यात —

    “मावशी, अगं हे माझे आजी-आजोबा आहेत,” असे म्हणत रीना आजोबांना बिलगली.

    “रीनू बेटा, कशी आहेस तू? तुझे बाबा कुठे आहेत? तुझी मम्मी कुठे आहे?” विचारत सदानंद आणि सावित्रीबाई घरात शिरले.

    “माझे बाबा ऑफिसच्या कामासाठी दिल्लीला गेलेत आणि आई आइस्क्रीम आणायला गेलीय, येईलच आता.”

    तेवढ्यात नेहा म्हणजे रीनाची आई आली.

    “काहीही न कळवता आणि असे अचानक तुम्ही आलात, सर्व ठीक तर आहे ना?” नेहाने विचारले.

    “ही माझी मावस बहीण, डॉक्टरेट करण्यासाठी पुण्याला आली आहे,” नेहाने ओळख करून दिली.

    “तुमचं जेवण झालं असेलच ना? नसेल झालं तर मी करते तुमच्यासाठी स्वयंपाक… घरात चिकन बिर्याणी आहे, पण ती चालणार नाही ना तुम्हाला. आधी चहा करू का? की आइस्क्रीम घेता?”

    “सूनबाई, आम्हाला चहा नको, जेवण नको, अगदी आइस्क्रीम सुद्धा नको. पोट अगदी गच्च भरलंय आमचं,” सदानंद म्हणाले.

    “तुम्ही तुमचं सामान या रूममध्ये ठेवा आणि इथेच झोपा,” नेहाने सांगितले.

    सदानंद आणि सावित्रीबाईंनी त्यांचे सामान नेहाने सांगितलेल्या रूममध्ये नेले. सावित्रीबाईंनी स्वतः खारीक-खोबऱ्याच्या, साजूक तुपात बनवलेल्या लाडवांमधील एक लाडू रीनाला दिला.

    “सूनबाई आणि मावशी, तुम्ही पण लाडू घेतात का?” सावित्रीबाईंनी प्रेमाने विचारले.

    “नको नको, आम्ही गोड कमी खातो,” असे म्हणताना नेहाने रीनाच्या हातातील लाडू ओढून घेतला.

    “आई, मला लाडू आवडतो, खाऊ दे ना मला,” म्हणणाऱ्या रीनावर नेहा ओरडली…

    “रीना, हे लाडू काळपट दिसतात. बहुतेक खूप पूर्वी केलेले असतील, तू खाऊ नकोस, त्रास होईल तुला. मी उद्या तुला समोरच्या मिठाईच्या दुकानातून ताजे लाडू आणून देईन.”

    मोठ्या कष्टाने आणि प्रेमाने केले होते सावित्रीबाईंनी लाडू. मेथी आणि काळ्या मनुका घातल्यामुळे लाडू थोडेसे काळपट दिसत होते हे खरं, पण ते शिळे नव्हते, त्यांनी लाडू कालच केले होते.

    लाडू खायला न मिळाल्यामुळे रीना हिरमुसली आणि नेहाच्या कडवट बोलण्यामुळे सावित्रीबाई दुखावल्या गेल्या. एकेक लाडू खाऊन आणि पाणी पिऊन सदानंद आणि सावित्रीबाईंनी भूक भागवली आणि स्वतःला निद्रेच्या स्वाधीन केले.

    सकाळी सावित्रीबाईंनी चहा ठेवला.

    “सूनबाई, मावशी पण चहा घेतील ना?” त्यांनी विचारले.

    “हो, पण आम्हा दोघींसाठी बिनसाखरेचा चहा करा.”

    चहा करता करता सावित्रीबाईंनी पोहे देखील बनवले.

    “पोहे खूप तिखट आणि तेलकट आहेत,” असे म्हणत नेहा आणि तिच्या बहिणीने पोहे खाल्ले नाहीत आणि रीनालाही खाऊ दिले नाहीत.

    “राज ऑफिसच्या कामासाठी दिल्लीला गेला आहे, तो चार दिवसांनी परत येईल,” नेहाने सांगितले.

    “सूनबाई, पांडुरंगावरची सीरियल आहे, आम्हाला टीव्ही लावून दे ना,” सावित्रीबाईंनी विनंती केली.

    “टीव्ही खराब झाला आहे, मी मेकॅनिकला बोलावले आहे,” नेहा म्हणाली.

    “आजोबा, मला ती परीची गोष्ट सांगा ना,” रीनाने हट्ट धरला.

    सदानंद गोष्ट सांगू लागले…

    “बाबा, ती इंग्रजी शाळेत शिकते, तिला मराठी गोष्ट सांगू नका. तिचं इंग्रजी बिघडेल ना.”

    सदानंदांच्या उत्साहावर विरजण पडले, रीनाही हिरमुसली.

    दुपारी दोघी बहिणी पार्लरला गेल्या.

    “आजी, मला सरबत करून दे ना, तू आणि आजोबा पण घ्या.”

    सावित्रीबाईंनी सरबत बनवले.

    “मला हा पिटुकला ग्लास दे, हे दोन मोठे ग्लास तुमच्यासाठी आहेत… आई म्हणाली, आजी-आजोबांना खोकला आहे, त्यांनी वापरलेले ग्लास आपण वापरायचे नाही.”

    सकाळी टीव्ही मेकॅनिक आला होता.

    “आईने त्याला चार-पाच दिवसांनी यायला सांगितले आहे. पुढच्या आठवड्यात माझे दुसरे आजी-आजोबा येणार आहेत,” रीना सांगत होती.

    “रीना, ते तुला गोष्टी सांगतात का? तुझ्याबरोबर खेळतात का?”

    “अजिबात नाही, सारखे टीव्ही बघतात, फोनवर बोलतात आणि मला उगाचच रागावतात.”

    रात्री काही शर्ट्स नेहाने सदानंदांना दाखवले.

    “माझ्या बाबांनी थोडेच दिवस वापरलेले हे शर्ट्स अजूनही नव्यासारखेच आहेत. बाबा म्हणालेत तुमच्या वॉचमनला दे. इतके चांगले शर्ट्स का वॉचमनला द्यायचे? तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही घ्या.”

    “नको, नको, माझ्याकडे खूप कपडे आहेत,” असे म्हणताना सदानंदाचे डोळे पाणावले.

    सावित्रीबाई आल्यापासून नेहाने घरातील सर्व जबाबदारी त्यांच्यावर टाकली. ती स्वतः मात्र तिच्या बहिणीशी गप्पागोष्टी करण्यात मग्न असायची. सदानंद आणि सावित्रीबाईंना हे खटकत होतं, परंतु त्यांनी ठरवले की, मुलाची येण्याची वाट पाहायची; कारण त्यांना त्याच्याशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे होते.

    हेही वाचा – लग्नाचा 51वा वाढदिवस अन् वृद्धाश्रम

    संध्याकाळी राजचा शाळेतील मित्र आला. “काका, काकू, कसे आहात तुम्ही? किती दिवसांनी भेटता आहात? काकू, तुमच्या हातच्या खारीक-खोबऱ्याच्या लाडवांची चव अजूनही आठवते मला. अगदी कमाल असायचे.” निघताना सावित्रीबाईंनी दिलेली लाडवांची पिशवी त्याने आनंदाने घेतली. “नेहा वहिनी, काका-काकूंना माझ्या घरी नक्की घेऊन या,” असे आग्रहाचे निमंत्रण त्याने दिले।

    रात्री नेहाने सदानंदांना एक मोबाइल दाखविला. “हा मोबाइल माझ्या भावाने दुबईहून आणला आहे. या मोबाइलची किंमत भारतात 25 हजार रुपये आहे. माझा भाऊ हा मोबाइल 15 हजार रुपयांना विकतो, परंतु तुम्हाला म्हणून 10 हजार रुपयांत मिळेल. घ्यायचा का तुम्हाला?”

    “सूनबाई, मोबाइल खूप छान आहे परंतु माझ्याकडे एवढे पैसे नाहीत गं.”

    सदानंद आणि सावित्रीबाई रूममध्ये गेले आणि मागोमाग रीनाही आली. “आजोबा, तुम्हाला पैसे कमी पडत असतील तर माझ्या मनीबँकेतील पैसे घ्या.” सदानंदांनी डोळ्यांतील पाणी लपवत रीनाला जवळ घेतले।

    दुसऱ्या दिवशी संध्याकाळी राज आला. “आपल्या मुलाला बंडू म्हणू नका हं, सूनबाईला आवडत नाही,” सावित्रीबाईंनी सदानंदांना सूचना केली. सदानंद आणि सावित्रीबाईंची आदराने चौकशी करत राजने त्यांच्याशी छान गप्पा मारल्याने दोघांनाही आनंद झाला. पुण्याला आल्यानंतर त्यांना आज प्रथमच छान झोप लागली।

    “बेटा, तुझ्या आईची ही औषधे एक-दोन दिवसांत आण,” सदानंदांनी मोठ्या अधिकाराने राजला सांगितले.

    “आपल्या बिल्डिंगसमोरच तर मेडिकल स्टोअर्स आहे. तुम्हीच आणा ना,” राजच्या बोलण्यात उद्धटपणा होता.

    “अरे, खरंच की, आणेन मी,” दुखावलेला बाप म्हणाला. काल संध्याकाळी खूप प्रेमाने वागणारा राज एका रात्रीत बदलला होता…!

    क्रमश:
    Avatar photo
    दिलीप कजगांवकर

    तंत्रज्ञान क्षेत्रातील चार दशकांचा अनुभव आणि साहित्यविश्वातील संवेदनशील लेखन यांचा सुरेख संगम. शिक्षणाने बी.ई., एम.बी.ए. आणि कॉस्ट अकाऊंटंट असलेले दिलीप कजगांवकर हे सर्टिफाइड प्रोजेक्ट मॅनेजर, सर्टिफाइड क्वालिटी मॅनेजर आणि सिक्स सिग्मा ब्लॅक बेल्ट आहेत. इंजिनिअरिंग व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात त्यांना सुमारे 40 वर्षांचा समृद्ध व्यावसायिक अनुभव आहे. ग्रीव्ह्ज, महाराष्ट्र स्कूटर्स, पथेजा ग्रुप, झेन्सार, हेक्सावेअर, कॅपजेमिनी, इन्फ्रासॉफ्ट व टेस्टिंगएक्स्पर्ट यासारख्या नावाजलेल्या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. लेखन, कथाकथन आणि कवितेची त्यांना विशेष आवड आहे. 2012 साली प्रकाशित झालेला “वाचावेसे” हा त्यांचा काव्यसंग्रह रसिक वाचकांच्या विशेष पसंतीस उतरला. त्यांच्या कथा आणि कविता विविध वृत्तपत्रे आणि मासिकांत नियमितपणे प्रसिद्ध होत असतात. त्यांच्या लेखनात माणूस, नातेसंबंध आणि जीवनातील सूक्ष्म भावविश्व यांचे प्रामाणिक दर्शन घडते. गेली अनेक वर्षे विविध दिवाळी अंकांत त्यांच्या कथा प्रकाशित होत आहेत. तसेच, गेली दोन वर्षे दर मंगळवारी व शुक्रवारी “विश्वास रेडिओ” (नाशिक) तसेच आकाशवाणी पुणे आणि जळगाव येथून त्यांच्या कथा प्रसारित होत आहेत. विविध संस्थांकडून त्यांना “महाराष्ट्र भूषण”, “साहित्य रत्न” यासारख्या मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ते विविध कार्यक्रमांत 30 मिनिटांपासून 2 तासांपर्यंत आपल्या कथांचे प्रभावी कथाकथन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात. त्यांनी स्वतः कथन केलेल्या तसेच दत्ता सरदेशमुख, सचिन दातार, मुकुंद जोशी, डॉ. सुचिता पाटील, डॉ. जयश्री अय्यंगार, विनया देशपांडे आणि अर्चना कापरे यांसारख्या दिग्गजांनी सादर केलेल्या त्यांच्या अनेक कथा युट्यूबवर उपलब्ध आहेत. आपल्या साहित्यिक प्रवासात दादर येथील जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूशनचे माजी संचालक, डोंबिवली स्थित आदरणीय व्ही. एस. वाणी सर यांच्या लाभलेल्या मौल्यवान मार्गदर्शनाचा ते आवर्जून उल्लेख करतात.

    Related Posts

    मृत्यू… एक रूटीन!!

    April 28, 2026 ललित

    आत्मसन्मान जपलाच पाहिजे…

    April 28, 2026 ललित

    सोन्याचा हिशेब ऐकून जजही चक्रावले!

    April 27, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    मृत्यू… एक रूटीन!!

    By Team AvaantarApril 28, 2026

    संध्या हरदास गेली वीस वर्षे मुंबईत नियमाने सकाळी फिरायला जातेय. सोसायटीजवळच्या मोकळ्या मैदानात किंवा बागेत…

    आत्मसन्मान जपलाच पाहिजे…

    April 28, 2026

    सोन्याचा हिशेब ऐकून जजही चक्रावले!

    April 27, 2026

    शाळेचा डबा अन् गुंडाळी पोळी

    April 27, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    मुलगा राज रातोरात बदलल्याने सदानंद आणि सावित्रीबाई विचारात पडले…

    April 28, 2026

    मृत्यू… एक रूटीन!!

    April 28, 2026

    आत्मसन्मान जपलाच पाहिजे…

    April 28, 2026

    Dnyaneshwari : आपण आंग आपण अलंकार, आपण हात आपण हातियेर

    April 28, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 28 एप्रिल 2026

    April 28, 2026

    वास्तव अन् आभासी जगामधली धूसर रेषा!

    April 27, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 281
    • अवांतर 184
    • आरोग्य 106
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 399
    • फिल्मी 47
    • फूड काॅर्नर 200
    • मैत्रीण 18
    • ललित 587
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    मुलगा राज रातोरात बदलल्याने सदानंद आणि सावित्रीबाई विचारात पडले…

    April 28, 2026

    मृत्यू… एक रूटीन!!

    April 28, 2026

    आत्मसन्मान जपलाच पाहिजे…

    April 28, 2026
    Most Popular

    मुलगा राज रातोरात बदलल्याने सदानंद आणि सावित्रीबाई विचारात पडले…

    April 28, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.