हरीश राणा या 31 वर्षीय तरुणाच्या इच्छा मरणाची बातमी ऐकून मन सुन्न झाले. गाझियाबाद येथील हरीश राणा हा त्याच्या आई-वडिलांचा अत्यंत हुशार आणि अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा गुणवंत मुलगा. पण नियतीला काहीतरी वेगळेच मान्य होते. अचानक एक दिवस तो राहत्या घराच्या चौथ्या मजल्यावरून कोसळला आणि त्या अपघातामुळे त्याच्या मेंदूला गंभीर इजा झाली. या एका घटनेने संपूर्ण कुटुंबाचे हसते-खेळते आयुष्यच उद्ध्वस्त झाले.
गेली 13 वर्षे हा तरुण कोमामध्ये असून, मृत्यूशी झुंज देत होता. “आज ना उद्या आपला मुलगा डोळे उघडेल, तो बरा होईल…” या एकाच आशेवर हरीशच्या आई-वडिलांनी दिल्लीतील ‘एम्स’सारख्या (AIIMS) नामांकित रुग्णालयाचे उंबरठे झिजवले. मात्र, त्यांच्या नशिबात नियतीने कधीच न संपणारा क्रूर डाव मांडला होता. या माता-पित्याने आपल्या तरुण मुलाला तब्बल 13 वर्षे तीळतीळ मरताना पाहिले आहे. कधीतरी एखादा दैवी चमत्कार घडेल आणि आपला मुलगा पुन्हा आनंदी आयुष्य जगू शकेल, या आशेपोटी या दाम्पत्याने आपल्या आयुष्याचे एक तप मुलाच्या सेवेत व्यतीत केले. या काळात त्यांनी आपली शेती, घरदार आणि सर्वस्व विकले, परंतु एम्समधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपचारांनंतरही हरीशच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही.
अखेर एम्सच्या (AIIMS) डॉक्टरांनीही सर्व इलाज करून हात टेकले आणि ‘आता कोणतीही आशा उरली नाही,’ असे सांगत हरीशला दैव आणि निसर्गाच्या हवाली केले. हरीशला प्रत्येक श्वास घेण्यासाठी अतोनात कष्ट करावे लागत होते. ‘लाइफ सपोर्ट सिस्टीम’वर (जीवरक्षक वैद्यकीय प्रणाली) तो पूर्णपणे परावलंबी होता. त्याला दिवस-रात्रीचा फरकही समजत नव्हता. आपल्या तल्लख बुद्धीच्या मुलाची ही केविलवाणी अवस्था पाहण्यापलीकडे त्याचे आई-वडील काहीच करू शकत नव्हते. आपल्या मनावर दुःखाचा डोंगर असूनही, त्यांनी त्याला या दुर्धर प्रसंगातून उभे करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. 13 वर्षांच्या या न संपणाऱ्या वेदना आणि मुलाचा जीवघेणा संघर्ष पाहून त्या माय-बापाचे मन विदीर्ण झाले. अखेर, मुलाचा हा असह्य शारीरिक छळ थांबवण्यासाठी त्यांनी जड अंतःकरणाने सर्वोच्च न्यायालयाकडे ‘निष्क्रिय इच्छामरणा’ची’ (Passive Euthanasia) मागणी केली. न्यायालयाने एम्सच्या डॉक्टरांचे मेडिकल बोर्ड स्थापन करून सखोल अहवाल मागवला होता. हा अहवाल तपासून आणि ही स्थिती सुधारण्यापलीकडे आहे, हे ध्यानी घेऊन कोर्टाने अत्यंत जड अंतःकरणाने निर्णय घेतला.
हेही वाचा – अंतिम सत्य मात्र एकच!
हरीशचे वडील अशोक राणा यांनी न्यायालयात जी कैफियत मांडली, त्यात अत्युच्च प्रेमाचे दर्शन घडले. ते म्हणाले होते…
“माझा मुलगा गेली 13 वर्षे एका अशा अंधारात आहे, जिथे प्रकाशाचा एक किरणही पोहोचत नाही. आम्ही त्याला जिवंत ठेवण्यासाठी आमचे सर्वस्व अर्पण केले, पण आता त्याच्या शरीराच्या मर्यादा संपल्या आहेत. त्याला अशा वेदनेत जिवंत ठेवणं, हा आता आमचा स्वार्थ वाटू लागला आहे, आणि आम्ही त्याला आता या छळात सोडू शकत नाही.”
सर्वोच्च न्यायालयाने 11 मार्च 2026 रोजी दिलेला हा ‘निष्क्रिय इच्छामरणा’ निकाल केवळ कायदेशीर नव्हता, तर तो मानवी दृष्टिकोनातूनही होता. न्यायमूर्तींनी या प्रकरणातील गुंतागुंत समजून घेताना म्हटले की, “एका पित्यासाठी आपल्या मुलाला मृत्यूच्या स्वाधीन करण्याची परवानगी मागणे, हे जगातील सर्वात कठीण कार्य आहे. पण जेव्हा जगणे हे केवळ शरीराचा छळ बनतं, तेव्हा ‘मृत्यू’ ही शिक्षा नसून ती एक ‘दया’ (Mercy) ठरते.”
‘सन्मानपूर्वक मृत्यू’ (Right to Die with Dignity) ही संकल्पना कायदा, नैतिकता आणि वैद्यकशास्त्र यांचा मिलाफ आहे. ज्या व्यक्तींना असाध्य रोग झाला आहे किंवा सुधारण्याची कोणतीही शक्यता नाही, अशांना अनावश्यक वेदना टाळण्यासाठी निरोपाची वेळ निवडण्याचा अधिकार असावा, हाच यामागचा उदात्त विचार आहे.
हेही वाचा – दहा पैशाला एक ‘सिंगल’!
अखेर, हरीश राणा यांना वेदनांपासून मिळणारी मुक्ती हा मानवी संवेदनांचा विजय आहे. हे प्रकरण आपल्याला शिकवते की, प्रेम म्हणजे नेहमीच हृदयाशी कवटाळून ठेवणे नसते; तर कधीकधी ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो, त्याला त्याच्या वेदनेतून मुक्त करण्यासाठी ‘जाऊ देणे’ हीच प्रेमाची सर्वात मोठी परीक्षा असते. हरीश आता या जगाच्या अंधारातून मुक्त होईल, पण त्याच्या माता-पित्याचा हा नि:स्वार्थी त्याग इतिहासात कायम स्मरणात राहील. ज्या मुलासाठी एक काळ आयुष्य मागितले होते, त्याच मुलाला शांतपणे निरोप देताना त्या माता-पित्याच्या डोळ्यांतील अश्रू हेच सांगत होते की — “बाळा, आता तू शांत नीज… तुझा हा कठीण प्रवास आता संपला आहे!”
वाईट याचंच वाटत की, हरीशचे आई-वडील आयुष्यभर ही भळभळती जखम घेऊन आपले पुढील आयुष्य जगतील. ते ही घटना कधीच विसरू शकणार नाहीत! शेवटी कितीही झालं, हरीशला जरी मुक्ती मिळाली, तरी ते त्याचे आईवडील आहेत. तरुण मुलाच्या असहाय अवस्थेतील इच्छामरणाचे दुःख त्यांना त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी कायम अस्वस्थ करत राहील!


