Thursday, March 12, 2026

banner 468x60

Homeललितरत्नाच्या प्रिय आज्जोंनी घेतला महत्त्वाचा निर्णय…

रत्नाच्या प्रिय आज्जोंनी घेतला महत्त्वाचा निर्णय…

प्रदीप केळुस्कर

भाग – 2

रविवारी विलास येऊन बाबांना घेऊन जातोय.. असे अनंताने घरी सांगताच विभा आणि रत्ना गप्प झाल्या. दोघींना हुरहूर लागून राहिली. विभाच्या डोळ्यांतून पाणी पाझरू लागले. रविवार म्हणजे दोन दिवस राहिले, हे लक्षात येताच तिने बेसन लाडू करायला घेतले… चकल्या केल्या. त्याचे छोटे डबे भरून ठेवले. काल बोलता बोलता बाबांना शिंपल्या फार आवडतात, हे तिला कळले. ती मुद्दाम मासेबाजारात गेली आणि तिने ताज्या शिंपल्या आणल्या आणि मालवणी पद्धतीने शिंपल्या बनवल्या. शिवाय इतर मासे होतेच!

रविवारी दोघी गप्प गप्प होत्या. रत्ना तर आजोबांच्या खोलीतच होती. दुपारनंतर विलास आणि सरोज आले. सरोज विभाला म्हणाली, “विभा, तुला त्रास दिला गं…”

“नाही गं… उलट, बाबा होते म्हणून घरात जाग होती. सकाळ, संध्याकाळ रामरक्षा, सूक्त मोठमोठ्याने म्हणायचे. माझ्या बाबांना अशी सवय होती. ते गेल्यावर या घरात असे श्लोक कुणी म्हटलेच नव्हते… शिवाय रत्नासोबत शेक्स्पिअर, हेमिंग्वेच्या साहित्यावर चर्चा व्हायच्या दोघांच्या… तिला पण वाईट वाटतंय बाबा आपल्या घरी जाणार म्हणून…”

विभा डोळे पुसत पुसत बोलत होती.

बाबा खोलीतून बाहेर आले. त्यांच्या मुलाला, विलासला बाबा टवटवीत दिसलें. सर्वाना हात दाखवत बाबा विलासच्या गाडीत चढले, तेव्हा तिघेही सद्गदीत झाले होते.

मग अधूनमधून अनंता, विभा आणि रत्ना बाबांना भेटायला जायचे… जाताना विभा बाबांसाठी कधी चिकन, कधी मासे, कधी खरवस घेऊन जायची. रत्ना नवीन पुस्तक खरेदी केले की, बाबांना दाखवायला जायची. विभाच्या लक्षात आले की, बाबा आता खंगत चालले आहेत. त्यांचे हात कापायला सुरुवात झाली आहे. तिला त्यांची काळजी वाटायची. पण ती बोलू शकत नव्हती, कारण ते तिचे बाबा नव्हते किंवा सासरे नव्हते! सरोजच्या जेवणावर ते नाखूश होतेच… शिवाय संपूर्ण दिवस त्यांच्याशी बोलायला कोणी नव्हते…

हेही वाचा – प्रिय आज्जो… वडीलधाऱ्यांच्या प्रेमाला भुकेल्या रत्ना अन् विभा!

…आणि अचानक एक दिवस अनंताच्या बदलीची बातमी आली… प्रमोशन आणि बदली! प्रमोशन घेणे आवश्यक होते आणि हे शहर सोडायला हवे होते. अनंताची बदली या शहरापासून साडेतीनशे किलोमीटरवर झाली… मोठे शहर, मोठी जबाबदारी. विभाच्या मनाची चलबिचल झाली. जवळजवळ दहा वर्षे या शहरात काढली. आलो तेव्हा रत्ना दहा वर्षांची होती. तिचे बहुतेक शिक्षण इथेच झाले. शेवटचे वर्ष होते आणि आता दुसरं गाव… नवीन विटी, नवीन गाव…!

इथे खूप माणसे भेटली, जवळची झाली. सर्वाना सोडून नवीन गावात जायचंय… विशेष करून बाबांना! पूर्वी ते विलासचे बाबा होते, आता आपले बाबा झाले. रत्नाचे आजोबा… प्रिय आज्जो! त्यांना पण सोडून जायचंय.. त्यांची तब्येत आता बरी नसते, विसरायला होतं… हात कापतात… या शहरात असतो तर लक्ष ठेवता आले असते, विलास आणि सरोज किती लक्ष देतील? की दुर्लक्ष करतील? कदाचित अनाथाश्रमात पण टाकतील… विलास म्हणजे सरोजच्या ताटाखालील मांजर… स्वतःचे अस्तित्व नसलेला पुरुष! काय करावे? शेवटी ते विलासचेच बाबा… बाबांनी जन्म दिलाय विलासला… म्हणजे त्याचाच अधिकार बाबांवर. मग आपले मन का सांगत रहाते, ते आपले बाबाच आहेत म्हणून?

विभाने सामान बांधायला घेतले. मोठे सामान, फर्निचर वगैरे ट्रकने जाणार होते. फक्त छोट्या वस्तू गाडीतून घेऊन जायच्या होत्या. रात्री तिघेजण सामानाची बांधाबांध करत होते. विभा गप्प गप्प होती. रत्ना आईला म्हणाली,

“आई.. तू आजोची काळजी करतेस ना… म्हणून गप्प?”

“हो गं… बारा दिवस राहिले ते आपल्याकडे, पण घरातले झाले गं… त्यानी लळाच लावला. आता आपण एवढे लांब जातोय, मग त्यांना भेटणे शक्य होणार आहे का आपल्याला? याचा विचार करत असते मी… त्यात त्यांची तब्येत ढासळायला लागलीय… आपण असतो इथे तर लक्ष ठेवला असता, पण…”

“आई, आजोला आपल्यासोबत नेऊया का?”

अनंताने आणि विभाने चमकून लेकीकडे पाहिले. अनंता म्हणाला, “त्यांना मुलगा आहे आणि सून नातवंडे पण आहेत. त्यांची गाडी घसरगुंडीला लागलीय, हे पण विसरता कामा नये. ऐंशी पार केली बाबांनी…”

‘पण, विचारा ना तुम्ही विलास आणि सरोजला, नाहीतरी त्यांना म्हातारा माणूस नकोच असणार! पण आम्हाला ते हवेत… ते आजारी आहेत म्हणून काय झालं? माझी आई किंवा बाबा म्हातारे झाले तरी, मी त्यांची काळजी घेणारच की! …आणि अगदी तुमचे आई-वडील असते तर त्यांची पण काळजी मी घेणारच होते… तशी या बाबांची पण घेईन. त्यांचे थोडे दिवस राहिले असतील कदाचित, पण घरात वडीलधारे पाहिजेत… जसे लहान बाळाने घराला घरपण येते तसेच वडीलधाऱ्यांनी सुद्धा!” विभा म्हणाली.

“मग मी विचारू का विलासला? पुन्हा पुन्हा विचार करून सांग, कारण पुरुष नेहेमी बाहेर असतो आणि घरातील स्त्रीला आजारपण काढावं लागतं…”

“होय बाबा… आपण विचारू, म्हणजे आपण तिघेही जाऊ आणि विचारू,” रत्ना म्हणाली.

“तिघेही जाऊ या रविवारी. अर्थात, त्यांची इच्छा पण विचारली पाहिजे. त्याना इच्छा असेल तरच…”

त्या रविवारी तिघे विलास, सरोजच्या घरी गेली. बाबा आपल्या खोलीत होते.

“मग अनंता, निघालात तर! आमची आठवण ठेवा, काय विभा?”

“तुम्हाला कस विसरणार भावोजी… तुम्ही होतात म्हणून या परक्या गावात कसलीच अडचण आली नाही. रत्नाची शाळा ॲडमिशन पण चटकन मिळाली त्यावेळी!”

“त्यात काय, आपल्या बँकेतील माणसाचे काम करावेच लागते. त्यात मोठं काही नाही, पण गेल्या वर्षी आम्हाला राजस्थानला जायचं होते, तेव्हा तुम्ही बाबांना आपल्याकडे दहा-बारा दिवस ठेवून घेतलंत. ते मोठे काम केलंत आमचे, नाहीतर आम्हाला कुठे जायलाच मिळतं नाही. आता सुद्धा सरोजचा भाऊ म्हणतोय दोघे इंग्लंडला या… पण बाबा असताना जाणार कसे? त्यावेळी तुमच्याकडे ठेवले त्यांना.. आता कुठे ठेवणार?”

“हो ना… घरात आजारी आणि म्हातारे कुणी असले म्हणजे तुम्ही अडकलात! या वयात फिरायचे हो… उद्या यांच्यासारखे हात थरथरू लागले की, जाणे थांबले… एकदा वाटते… म्हणजे मला वाटते, यांना काही दिवस अनाथाश्रमात ठेवून आपण जाऊन यावे… पण हा तयार होत नाही, याचे बाबा ना ते?” सरोज.

“मग मी म्हणते, विलास भावोजी आणि सरोज, तुम्ही जा इंग्लंडला! बाबांना आम्ही घेऊन जातो…” विभाने लगेच मुद्दा मांडला.

“काय?” सरोज किंचाळली… “अगं तुम्ही बदलीच्या गावी जाताय ना? आणि या म्हाताऱ्याला कुठे घेऊन जाताय?”

“तेच तुझ्याशी बोलायला आणि विचारायला आलोय विलास… मधे बाबा आमच्याकडे बारा दिवस राहिले आणि त्यांची आम्हाला विशेष करून विभाला आणि रत्नाला सवय झाली. विभाला ते आपले बाबा वाटले आणि रत्नाला आजोबा! ते तुमच्याकडे परत आले, तेव्हा या दोघी दोन दिवस जेवल्या नाहीत. हल्ली बाबांची तब्येत बरी नसते म्हणून आम्हाला सर्वांनाच काळजी वाटत असते. आता माझी बदली झाली, एवढे लांब बदलीचे ठिकाण… आता बाबा भेटणार नाहीत म्हणून या दोघी हवालदिल झाल्यात. म्हणून यांचे म्हणणे जर बाबांची इच्छा असेल तर… आणि तुम्हा दोघांची परवानगी असेल तर बाबांना आम्ही नेतो कायमचे!”

विलास आणि सरोज आ वासून ऐकत राहिले…

‘पण अनंता, बाबांचे वय ऐंशी झाले आहे आणि सर्व आजार आता जोर धरू लागले आहेत… याचे भान ठेव. तू आता म्हणत असलास तरी काही दिवसांनी कंटाळशील. कारण म्हातारा माणूस कुणालाही नको असतो…” विलास सांगत होता.

हेही वाचा – पूल पडला… मुकादमला दणका

“आम्ही पूर्ण विचार केलाय विलास भावोजी… मला आईवडील नाहीत, सासूसासरे नाहीत… घरात आम्ही दोघेच, ही माझ्या पोटी जन्म घेतलेली रत्ना तिसरी. कुणीतरी मोठे हवं हो घरी! ते असतात तेव्हा त्यांची किमत नसते… मी माझ्या मुलीची शपथ घेऊन तुम्हाला शब्द देते, माझ्या वडिलांप्रमाणे बाबांना जपेन.” विभा भावूक झाली होती.

सरोज गप्पच होती. तिला जे हवे होते तेच घडतं होते. ती आता इंग्लंडला जायचं स्वप्न पहात होती.

“पण बाबांना आमच्यासोबत यायला आवडेल काय.. हे विचारायला हवे,” अनंता म्हणाला.

“अरे अनंता, मी ऐकतो आहे मघापासून. माझी बॅग भरून तयार आहे… केव्हा निघायचे?”

चार दिवसांनी अनंताने गाडी सुरू केली. मागील सीटवर एका बाजूला रत्ना बसली होती, दुसऱ्या बाजूला तिची आई विभा बसली होती. तिच्या एका हातात बाबांचा हात होता.. दुसऱ्या बाजूला रत्नाच्या हातात तिच्या प्रिय आज्जोचा हात होता…

दोघींच्या डोळ्यांत पाणी होते… शेवटी बाबा त्यांच्यासोबत येत होते, कायमचे…!

समाप्त


मोबाइल – 9307521152 / 9422381299


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!