दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 21 मे 2026; वार : गुरुवार
भारतीय सौर : 31 वैशाख शके 1948; तिथि : पंचमी 08:26; नक्षत्र : पुष्य 26:49;
योग : गंड 10:58; करण : कौलव 19:20;
सूर्य : वृषभ; चंद्र : कर्क; सूर्योदय : 06:02; सूर्यास्त : 19:07;
पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
गुरुपुष्यामृत योग
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
हिंदी कवी, लेखक शरद जोशी
टीम अवांतर
हिंदी कवी, लेखक आणि उपहासकार शरद जोशी यांचा जन्म 21 मे 1931 रोजी मध्य प्रदेशातील उज्जैन येथे झाला. त्यांनी काही काळ सरकारी नोकरी केली, त्यानंतर त्यांनी लेखनाला पूर्णवेळ वाहून घेतले. सुरुवातीला त्यांनी काही साध्या, सरळ, सोप्या कथा लिहिल्या, मात्र नंतर त्यांनी पूर्णपणे विनोदी-लेखन केले. त्यांनी राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील विसंगतींवर अत्यंत उपरोधिक आणि मार्मिक भाष्य केले आहे. त्यांची भाषाशैली अतिशय सोपी, ओघवती आणि वाचकाला खिळवून ठेवणारी होती. उपहासात्मक लेख, उपहासात्मक कादंबऱ्या, व्यंगात्मक स्तंभलेखन याशिवाय त्यांनी विनोदी मालिकांसाठी पटकथा आणि संवादही त्यांनी लिहिले आहेत. शरद जोशी म्हणजे हिंदी व्यंग-लेखनाला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या प्रमुख लेखकांपैकी एक अशी त्यांची ओळख बनली.
परिक्रमा, किसी बहाने, जीप पर सवार इल्लियाँ, रहा किनारे बैठ, दूसरी सतह, प्रतिदिन (3 खंड), यथासंभव, यथासमय, यत्र-तत्र-सर्वत्र, नावक के तीर, मुद्रिका रहस्य, हम भ्रष्टन के भ्रष्ट हमारे, झरता नीम शाश्वत थीम, जादू की सरकार, पिछले दिनों, राग भोपाली, नदी में खड़ा कवि, घाव करे गंभीर, मेरी श्रेष्ठ व्यंग रचनाएँ असे साहित्य त्यांचे प्रसिद्ध झाले आहे. ‘एक था गधा उर्फ अल्लाद खान’ आणि ‘अंधों का हाथी’ सारखी नाटकेही त्यांनी लिहिली.
हेही वाचा – मी, मार्था मॅम आणि राधा…
तर दुसरीकडे क्षितिज, गोधूलि, उत्सव, उड़ान, चोरनी, साँच को आँच नहीं, दिल हैं कि मानता नहीं अशा अनेक चित्रपटांसाठी शरद जोशी यांनी संवाद लिहिले आहेत. यह जो है जिंदगी, मालगुड़ी डेज, विक्रम और बेताल, सिंहासन बत्तीसी, वाह जनाब, दाने अनार के, यह दुनिया गज़ब की या मालिकांचे लेखनही त्यांनी केले. त्यांच्याच कथांवर आधारित लापतागंज ही मालिका सब टीव्हीवर प्रसारित केली जात होती.
1990 मध्ये त्यांना भारत सरकारने ‘पद्मश्री’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित केले. याशिवाय त्यांच्या स्मरणार्थ मध्य प्रदेश सरकारने ‘शरद जोशी सन्मान’ हा पुरस्कार सुरू केला आहे, जो दरवर्षी उत्कृष्ट व्यंग्य आणि निबंध लेखनासाठी दिला जातो. 5 सप्टेंबर 1991 रोजी त्यांचे निधन झाले.
आजचे राशीभविष्य
मेष – आजचा दिवस नात्यांचा गोडवा आणि आनंदाची भेट घेऊन येऊ शकतो. जुन्या मित्रांना भेटल्याने आठवणींचा खजिना उघडेल. घरात नवीन पाहुण्यांच्या आगमनाने आनंदात भर पडेल. आई-वडिलांसोबत वेळ घालवल्याने त्यांच्या मनातील भावना समजून घेण्याची संधी मिळेल. नोकरीच्या ठिकाणी नवी जबाबदारी सोपविली जाईल, पण त्यासाठी वरिष्ठ तसेच सहकाऱ्यांकडून मदत मिळेल.
वृषभ – आज आरोग्याबाबत थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण बदलत्या वातावरणामुळे आजारपण जाणवू शकते. दीर्घकालीन व्यावसायिक योजना हळूहळू यशस्वी होतील. प्रवासाचे नियोजन करत असल्यास, वडीलधाऱ्यांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. कुटुंबात सुसंवाद ठेवा, अनेक प्रश्न सहज सुटू शकतील. एखाद्या सामाजिक कार्यात सहभाग घ्या, त्याने नवीन ओळखी होतील. पुढे त्याचा फायदा होईल.
मिथुन – आज मालमत्ता आणि गुंतवणुकीच्या बाबतीत नशीब तुम्हाला साथ देऊ शकते. नवीन मालमत्ता खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते. मात्र इगो किंवा घाईमुळे काही कामे अपूर्ण राहू शकतात. कोणाबद्दलही मत्सराची भावना नको, आपली ऊर्जा योग्य दिशेने वापरा. बोलण्यावर ताबा ठेवा, नकळतपणे एखाद्याच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. जुन्या आरोग्य समस्या पुन्हा उद्भवू शकतात.
कर्क – नवीन शक्यता आणि संधी तुमच्या दारावर टकटक करू शकतात. नवीन नोकरीच्या प्रस्तावामुळे तुमचा उत्साह वाढेल. सक्रिय सामाजिक उपस्थितीमुळे इतर अनेकजण प्रभावित होतील. नोकरीच्या ठिकाणी कठोर परिश्रमाच्या वेळी चालढकल करणे हानिकारक ठरू शकते. इतरांच्या प्रभावाखाली येऊन घरच्यांशी संघर्षाची भूमिका घेऊ नका, उलट सामंजस्याने वागा, स्नेहबंध आणखी घट्ट होतील.
सिंह – सावधगिरीने पावले उचलणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. नवीन कामात घाई करू नका आणि प्रत्येक व्यक्तीशी पूर्ण ओळख झाल्यावरच विश्वास ठेवा. नोकरी बदलण्याच्या बाबतीत सकारात्मक परिणाम मिळू शकतात. बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा चांगला काळ आहे, मात्र त्यासाठी जाणकारांचा सल्ला घ्या. संततीकडून येणारी आनंदाची बातमी तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणेल.
कन्या – आजचा दिवस तुमच्यासाठी एक नवीन ओळख आणि यश घेऊन येईल. कार्यालयात तुमच्या कामाची प्रशंसा होईल. नवीन लोकांशी परिचय होऊन तुमचे संबंध दृढ होतील. व्यवसाय पुढे नेण्यासाठी घेतलेल्या मेहनतीला फळ मिळेल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली सरकारी कामे पूर्ण झाल्याने दिलासा मिळेल. कुटुंबातील व्यक्तीच्या दीर्घकालीन आजारामुळे चिंता वाढू शकते, ज्यामुळे मानसिक ताण कायम राहील.
तुळ- आज आळस हा सर्वात मोठा अडथळा ठरू शकतो. कामे पुढे ढकलण्याच्या सवयीमुळे आणखी समस्या निर्माण होऊ शकतात. जोडीदारासोबत खरेदीला किंवा बाहेर फिरायला जाण्याचे नियोजन केल्यास आनंद मिळेल, पण खर्च विचारपूर्वक करा. मालमत्तेच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा, कारण त्यात फसवणूक होण्याची शक्यता आहे. एखाद्या अनोळखी व्यक्तीवर गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवणे हानिकारक ठरू शकते.
वृश्चिक – मित्रांसोबत वेळ घालवल्याने तणाव कमी होईल. राजकारणात असलेल्यांना आव्हानांना सामोरे जावे लागेल, परंतु त्यांनी संयमाने पुढे जायला हवे. अडकलेला पैसा परत मिळू शकतो. जोखीम न घेता योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्याने भविष्य अधिक मजबूत होईल. विचारसरणीत आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल करण्याचा प्रयत्न करा, आयुष्य आणखी सुकर होईल.
हेही वाचा – तिचा फोन ‘व्यस्त’ आला अन् त्याला संशयपिशाच्चाने ग्रासलं…
धनु – आजचा दिवस आनंद आणि उत्साहाने भरलेला असू शकतो. आई-वडिलांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या मेहनतीने प्रलंबित कामे पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. नोकरीच्या ठिकाणी कामातील हलगर्जीपणामुळे सहकारी नाराज होऊ शकतात, म्हणून कामावर लक्ष केंद्रित करा. आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय यशाकडे नेतील. वाहन चालवताना काळजी घ्या आणि सध्या लांबचा प्रवास टाळा.
मकर – व्यावसायिक योजना अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम देऊ शकतात. त्यामुळे आर्थिक लाभ होईल. नवीन भागीदारी आणि घर खरेदी करण्याची स्वप्नेही साकार होऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी कल्पकतेने कामे उरकल्याने वरिष्ठांकडून कौतुक होईल. अभ्यासात गांभीर्य न ठेवल्याचे विपरित परिणाम विद्यार्थ्यांना पाहायला मिळू शकतात. म्हणून कठोर परिश्रम सुरू ठेवा.
कुंभ – कठोर परिश्रम आणि नवीन कल्पना यशाची गुरुकिल्ली ठरू शकतात. व्यवसायातील नवीन विचार तुम्हाला पुढे जाण्यास मदत करतील. मालमत्तेचा जुना प्रश्न सुटल्याने दिलासा मिळेल. घरी नवीन पाहुण्यांच्या आगमनाने आनंदी वातावरण निर्माण होईल. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, फसविले जाण्याची शक्यता आहे. प्रियजनांसोबत सहलीचे नियोजनही करू शकता.
मीन – कौटुंबिक समस्यांमुळे तुम्हाला काही प्रमाणात चिंता वाटू शकते. क्षुल्लक बाबींवरून भावंडांमधील तणाव वाढू शकतो, अशावेळी संयम महत्त्वाचा आहे. कामाच्या ठिकाणी कोणीतरी तुमच्या विरोधात कट रचू शकते, त्यामुळे सावध रहा. बँकिंग किंवा वित्त क्षेत्रात काम करणाऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे उत्तम फळ मिळेल आणि त्यांची प्रशंसाही होईल. व्यवसायात नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करा, चांगला फायदा होऊ शकतो.


